आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
प्रत्येक व्यक्तीकडे काही खास आणि उपजत गुण असतात. जे विपरीत स्थितीतही उफाळून वर येतात. प्रतिकूल परिस्थितीतही त्या व्यक्तीला योग्य वाटेवर चालण्याची प्रेरणा देतात. पाकिस्तानच्या फैसलाबादमधील रोदालाच्या रस्त्यावर तुटक्या चपलांची दुरुस्ती करून उदारनिर्वाह करणारे मुनवर शकील नावाचे एक गृहस्थ आहेत, ते केली तीन दशके हेच काम करत आहेत.
त्यांच्याकडे येणारे अनेक लोक हे फक्त तुटक्या चपलाच शिवून घेत नाहीत तर, फाटक्या जिंदगीला ठिगळ लावण्याची कलाही शिकून जातात.
मुनवर शकील यांच्या डोक्यावरील पितृछत्र लहानपणीच हरवले. शिकण्याची प्रचंड इच्छा असूनही त्यांना औपचारिक शिक्षण घेणे शक्य झाले नाही. घराच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी आपल्या कोवळ्या खांद्यावर पेलत त्यातून पै-पै वाचवून त्यांनी पुस्तके विकत घेतली आणि वाचली. या पुस्तकांनीच त्यांच्या जीवनाला एक वेगळी दिशा दिली.
दिवसभर रस्त्यावर बसून चपला शिवून झाल्या की मुनवर संध्याकाळी तासंतास पुस्तकात हरवून जात.
पुस्तकात हरवून जाण्याच्या त्यांच्या या छंदातूनच त्यांना जगण्याचा एक नवा मार्ग गवसला. पुस्तके वाचता-वाचता मुनवर स्वतःच लिहू लागले.
लिहिण्याचा छंद त्यांनी स्वतःपुरताच मर्यादित ठेवला नाही. ते म्हणतात, समाजातील उच्चवर्गीय आणि मध्यमवर्गीय लोक नेहमीच खालच्या वर्गातील लोकांची उपेक्षा करतात, त्यांचे शोषण करून स्वतः ऐशोआरामात राहतात. पण, त्यासाठी खाली गाडलेल्या शोषितांचा आवाज मात्र कुणीही ऐकत नाही. त्यांच्या वतीने कुणीही बोलत नाही. म्हणूनच मी अशा दाबल्या गेलेल्या शोषित वर्गाच्या वतीने बोलण्याचा निश्चय केला. जे मी थेट बोलू शकत नाही, ते मांडण्यासाठी मी कवितेचा आधार घेतो. या कविता फक्त त्यांच्या पुरत्या मर्यादित न राहता समाजापर्यंत पोचवल्या पाहिजे, म्हणून त्यांनी आपले कवितासंग्रह प्रकाशित केले.
पंजाबी साहित्य वर्तुळातही या कवीची दखल घेतली गेली. त्यांच्या लेखनाबद्दल त्यांना अनेक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यांचे ‘सोच समंदर’ हे पहिले पुस्तक २००४ साली प्रकाशित झाले.
चपला शिवणे हा मुनवर यांचा पिढीजात व्यवसाय आहे. ते म्हणतात, “मला चपला शिवण्याच्या कामाची अजिबात लाज वाटत नाही. दुपारी रस्त्यावर बसून चपला शिवतो, सकाळी आजूबाजूच्या दुकानात वर्तमानपत्रे पोहोचवतो, संध्याकाळी पुस्तकात हरवून जातो.” मुनवर यांच्या कित्येक वर्षांचा हाच दिनक्रम आहे.
मुनवर यांना चपला शिवून आणि वर्तमानपत्रे वाटून दिवसाला २५० ते ३०० रुपये मिळतात. रोज त्यातले १० रु. ते बाजूला काढून ठेवतात आणि हे पैसे ते पुस्तकांच्या प्रकाशनासाठी वापरतात.
त्यांचे दुसरे पुस्तक “परदेस दि संगत” २००५मध्ये प्रकाशित झाले. ‘सादिया दि भेट” हे तिसरे पुस्तक २००९ साली आणि “झोरा धाप गावाची दा” हे चौथे पुस्तक २०११मध्ये प्रकाशित झाले. “अखां मिट्टी हो गैया” हे त्यांचे पाचवे पुस्तक २०१३ साली प्रकाशित झाले. या सगळ्या पुस्तकांना पुरस्कार मिळाले आहेत.
मुनवर रॉयल अदाबी अकादमी, जरनवाला आणि नाकीब कारावां-ए-अदब यासारख्या साहित्यिक गटाचे सदस्य आहेत. अश्ना-ए-संदाल बार, पाकिस्तान रायटर्स गिल्ड आणि पंजाबी सेवक या साहित्यिक संघटनांनी त्यांना पुरस्काराने गौरवले आहे.
आपल्या कवितेबद्दल बोलताना ते म्हणतात, खालच्या वर्गाच्या शोषणा विरोधात आवाज उठवण्याचे काम त्यांच्या कविता करतात. या वर्गाबद्दल मी माझ्या कवितेतून बोलू इच्छितो. त्यांना काय हवंय, त्यांना काय म्हणायचं आहे, ते मी माझ्या कवितेतून मांडतो.
इन्नु किन्ने पाणी दित्ता, इन्नु किन्ने बोया एय
पत्थर दे जो सिने उठे, बुता उग्या होया एय
“यांना कोण देतो पाणी , यांना इथे कुणी पेरले ,
पाषाणाच्या हृदयावरही फुलणे यांना कोणी शिकवले”
मुनवर सांगतात, त्यांनालहानपणी शिकण्याची खूप इच्छा होती पण, वडिलांच्या अकाली निधनामुळे शिकता आले नाही.
“म्हणून मी स्वतःच पुस्तके विकत घेऊन वाचू लागलो. पुस्तके वाचण्यात मी तासनतास वेळ घालवतो. पुस्तके वाचण्याची ही सवय इतकी भिनली आहे की आता झोपण्यापूर्वी जर पुस्तक वाचले नाही तर झोपच येत नाही.”
ते फक्त पंजाबी भाषेतूनच कविता लिहितात.
त्यांच्या मते, “पंजाबी ही पंजाबच्या लोकांची मातृभाषा आहे. त्यांना याच भाषेतून शिक्षण मिळाले पाहिजे. पंजाबी भाषेचा पुरस्कार करणे सरकारचे काम आहे. फक्त पंजाबीच नाही तर सर्वच भाषांना सरकारने प्रोत्साहन दिले पाहिजे.
कवी असण्यासाठी संपूर्ण मानवजातीची वेदना समजून घेण्याची पात्रता असावी लागते, असे त्यांचे मत आहे.
त्यांचे सहावे पुस्तक ‘तांघन’ लवकरच प्रकाशित होत आहे. या पुस्तकात त्यांनी ११२ गझल एकत्रित केल्या आहेत.
ते म्हणतात, “मला चपला शिवण्याच्या कामाची अजिबात लाज वाटत नाही. पण, मला वाटते लोकांनी जागृत झाले पाहिजे. त्यांनी पुस्तके वाचली पाहिजेत. पुस्तके वाचणाऱ्या जागृत लोकांची संख्या वाढेल तेंव्हा आपलाही देश विकसित देशांच्या यादीत दिसेल.”
गुलाम मुस्तफा आझाद नाकीब हे मुनवर यांचे गुरु आहेत. आपल्या शिष्याची साहित्याबद्दलची ओढ आणि साहित्यातील प्रगती पाहून आपल्याला अभिमान वाटतो, असे ते म्हणतात. ते म्हणाले, “उपनगरी भागात राहणाऱ्या लोकांमध्येही क्षमता आहे. ते कुणाही पेक्षा कमी नाहीत. पण, त्यांना वेळेत संसाधने उपलब्ध न झाल्याने ते पिछाडीवर राहतात.”
मुनवर यांची कविता ही शोषितांची आणि वंचितांची कविता आहे. यात पारंपारिक कवितेतील प्रेम, ओढ दिसत नाही. तर यात सामान्य माणसाच्या इच्छा, त्यांच्या आकांक्षा, त्यांच्या समोरील अडचणी आणि त्यावर मात करत पुढे जाण्याची जिद्द यांचे प्रतिबिंब दिसते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.