आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
२०२१ साली स्कॉटलंडमधील ग्लासगो शहरात संयुक्त राष्ट्रांची २६वी हवामान बदल परिषद (COP26) आयोजित करण्यात आली होती. त्यादरम्यान दक्षिण पॅसिफिकमध्ये असलेलं ‘तुवालू’ हे लहानसं राष्ट्र अचानक चर्चेत आलं. तुवालूच्या परराष्ट्र मंत्र्यांनी ग्लासगो येथील संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेत समुद्र किनाऱ्यावरील गुडघाभर पाण्यात उभं राहून भाषण दिलं. समुद्रात उभारलेल्या लेकटर्नवर सूट आणि टाय घालून उभे असलेले परराष्ट्रमंत्री सायमन कोफे यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केले गेले.
समुद्र आणि महासागरांच्या किनाऱ्यावर असणारी अनेक राष्ट्रे वाढत्या पाणी पातळीच्या संकटाचा सामना करत आहेत. तुवालू या देशानं समुद्राच्या वाढत्या पाणी पातळीविरूद्ध संघर्ष करणाऱ्या राष्ट्रांकडं जगातील इतर राष्ट्रांचं लक्ष वेधण्याचा असा अनोखा प्रयत्न केला. पण, असा प्रयत्न करणारा तुवालू हा पहिलाचं देश नाही.
यापूर्वी आणखी एका राष्ट्रानं असाच काहीसा प्रयत्न केला होता. त्या राष्ट्राच्या संपूर्ण कॅबिनेट मंडळानंच पाण्याखील मिटींग भरवली होती. जगातील पहिली अंडरवॉटर कॅबिनेट मिटींग भरवणारं राष्ट्र कोणतं होतं? असा प्रश्न आता अनेकांना पडला असेल. या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा.
१७ ऑक्टोबर २००९ रोजी काळे डायव्हिंग सूट आणि मास्क घातलेल्या १० ते १५ लोक मालदीवमधील समुद्राच्या पाण्यात जाण्यासाठी तयार होते. पाण्याखाली त्यांच्या आगमनाची जय्यत तयारी करण्यात आली होती. पाण्याखाली प्रत्येक व्यक्तीच्या नावानं एक टेबल आणि खुर्ची ठेवण्यात आली होती. या व्यक्ती कुणी पर्यटक किंवा प्रोफेशनल स्कूबा डायव्हर्स नव्हत्या. या व्यक्ती म्हणजे मालदीवचं कॅबिनेट मंडळ व उच्चपदस्थ शासकीय अधिकारी होते आणि ते सर्व एका मिटींगसाठी त्याठिकाणी जमले होते!
मालदीवचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद आणि त्यांच्या इतर १३ सहकारी व अधिकाऱ्यांनी समुद्राच्या तळाशी मिटींग आयोजित केली होती. लष्करी प्रशिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या गिरीफुशी बेटापासून २० फूट खोल ही मिटींग आयोजित करण्यात आली होती. डिसेंबर २००९ मध्ये होणाऱ्या जागतिक हवामान बदल परिषदेपूर्वी समुद्राच्या वाढत्या पाणी पातळीकडे सर्वांचं लक्ष वेधण्यासाठी मालदीवच्या मंत्रीमंडळानं ही शक्कल लढवली होती.
पाण्याखाली अर्धातास मिटींग घेतल्यानंतर सर्व कॅबिनेट पाण्याच्या बाहेर आलं. बाहेर आल्यानंतर राष्ट्राध्यक्ष नशीद यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. हवामानातील बदल काळजीपूर्वक तपासले नाही तर भविष्यात काय घडू शकतं आणि मालदीव सध्या कुठल्या संकटाचा सामना करत आहे, हे जगाला कळवण्यासाठी पाण्याखाली बैठक घेतल्याचं नशीद यांनी सांगितलं होतं. ‘हवामानामध्ये झपाट्यानं बदल होत आहेत. त्यामुळं पृथ्वीवरील प्रत्येकाचा हक्क आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे.
आणखी तापमान वाढ थांबवण्यासाठी आपण जागतिक स्तरावर एकत्र आलं पाहिजे’, अशा एक एसओएस मेसेजही या मिटींगदरम्यान देण्यात आला. या मेसेजवर सह्या करण्यासाठी नशीद आणि इतर मंत्र्यांनी पांढरी प्लास्टिक स्लेट आणि वॉटरप्रूफ पेन्सिलचा वापर केला. या अंडरवॉटर मिटींगसाठी उपस्थित राहणाऱ्या मंत्र्यांना दोन आठवडे प्रशिक्षित केलं गेलं होतं. यासाठी व्यावसायिक स्कूबा डायव्हर्सनी त्यांना मदत केली होती.
समृद्ध उष्णकटिबंधीय हाइडवेज आणि सुरक्षित सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी मालदीव प्रसिद्ध आहे. समुद्राच्या वाढत्या पाणी पातळीचा सर्वात जास्त धोका या राष्ट्राला आहे. संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केलेला अंदाज जर बरोबर ठरला तर २१०० पर्यंत मालदीव पूर्णपणे पाण्याखाली जाईल.
२००८ साली मालदीवचे राष्ट्राध्यक्ष झालेल्या नशीद यांनी लिव्हरपूल विद्यापीठातून मेरीटाइम स्टडीजमध्ये पदवी घेतलेली आहे. त्यामुळं त्यांना समुद्राच्या वाढत्या पाणीपातळीचं गांभीर्य माहिती आहे. मालदीवच्या किनारी भागातील नागरिकांसाठी त्यांनी विशेष निधी देण्याची घोषणादेखील केली होती.
जवळपास गेल्या दोन दशकांपासून जागतिक तापमानवाढीची समस्या मोठ्या प्रमाणात समोर आली आहे. मानवानं आपल्या प्रगतीसाठी वातावरणात ग्रीन हाऊस गॅसेस सोडणं सुरू ठेवल्यानं ग्लोबल वॉर्मिंग वाढलं आहे. वाढलेलं तापमान नियंत्रित करण्याचं काम महासागर करतात. जगभरातील समुद्र आणि महासागर ग्रीन हाऊस गॅसेसमधून ९० टक्क्यांपेक्षा अधिक उष्णता शोषून घेतात. मात्र, त्याचा आता महासागरांवर परिणाम होत आहे.
अनेकजण ग्लोबल वार्मिंग आणि क्लायमेट चेंज या दोन्ही घटना एकाच प्रकारच्या आहेत, असा विचार करतात. परंतु, शास्त्रज्ञांच्या मते क्लायमेट चेंज, ग्रहाचं हवामान आणि त्यावर होणाऱ्या परिणामांशी संबंधित आहे. समुद्राची वाढती पाणी पातळी हे हवामान बदलाच्या परिणामांपैकी एक आहे. १८८० पासून समुद्राची सरासरी पातळी ८ इंचांपेक्षा (सुमारे २३ सेमी) जास्त वाढली आहे. गेल्या २५ वर्षांत हे प्रमाण सर्वात जास्त वाढलं आहे. दरवर्षी, समुद्राच्या पाणी पातळीमध्ये ३.२ मिलीमीटरनं वाढ होतं आहे.
समुद्राची पाणी पातळी वाढते ही गोष्ट आपण फारशी गांभीर्यानं घेत नाही. कारण, आपल्याला वाटतं त्याचा धोका फक्त किनारी भागात राहणाऱ्या लोकांनाच आहे. मात्र, तज्ञांच्या मते, याचा सर्वांनाच धोका आहे. समुद्राची वाढती पाणी पातळी चक्रीवादळे आणि टायफून यांच्याशी एकरूप होत आहेत. त्यामुळं चक्रीवादळ आणि टायफून्स अधिक धोकादायक स्वरूप धारण करतात. अशी वादळं अधिक पाऊस पडतात. शिवाय ती अधिक शक्तिशाली असल्यामुळं ते त्यांच्या मार्गातील सर्व गोष्टींचा नाश करतात.
एका अभ्यासात असं दिसून आलं आहे की, १९६३ ते २०१२ दरम्यान, अटलांटिक चक्रीवादळांमध्ये झालेल्या मृत्यूंपैकी निम्मे मृत्यू तर अशाच प्रकारच्या वादळांमुळं झाले आहेत. याशिवाय जगभरातील असंख्य राष्ट्रांना समुद्राच्या वाढत्या पाणी पातळीचा धोका आहे. आतापर्यंत समुद्र किनाऱ्यावरील लाखो लोकांना स्थलांतर करावं लागलं आहे. काही लहान-लहान आकाराची बेट कुठल्याही क्षणी पूर्णपणे पाण्याखाली जाण्याची भिती निर्माण झाली आहे.
जागतिक हवामान तज्ञांच्या मते, ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज या दोन्ही गोष्टींकडे आपण गांभीर्यानं लक्ष दिलं नाही तर भविष्यात याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. सध्या ज्या वेगानं वातावरणातील कार्बनचं प्रमाण आणि समुद्राची पाणी पातळी वाढत आहे, ते पाहिल्यास संपूर्ण पृथ्वी पाण्याखाली जाण्यासाठी पुढील दोन ते तीन शतकं पुरेशी ठरतील.
इंटर गव्हर्नमेंट क्लायमेट चेंज पॅनलनं दिलेल्या एका विशेष अहवालानुसार, २१०० पर्यंत महासागरांची पाणी पातळी १० ते ३० इंचांपर्यंत (२६ ते ७७ सेंटीमीटर) आणि तापमान १.५ डिग्री सेल्सियसपर्यंत वाढेल. महासागरांच्या किनारी भागात वसलेल्या अनेक शहरांवर गंभीरपणे परिणाम करण्यासाठी ते पुरेसं आहे.
सध्या पृथ्वीवर असलेल्या हिमनद्या आणि हिमनगांमध्ये असलेला सर्व बर्फ वितळल्यास समुद्राची पातळी २१६ फुटांनी वाढेल. त्यामुळं फ्लोरिडा, बांग्लादेश, मालदीव, अंदमान निकोबार, मॉरिशस सारखी अनेक ठिकाणं पाण्याखाली गायब होऊ शकतात. मालदीवला या धोक्याची जाणीव २००९ मध्येच झाली होती. याकडे सर्व जगाचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी अंडरवॉटर बैठक बोलावली होती.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.