आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
चीनच्या प्रसिद्ध वुहान शहरात कोरोना व्हायरसने धुमाकुळ घातला असून आज ह्या व्हायरसमुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांची सांख्य ही ४२५ इतकी आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ह्या व्हायरसच्या संकटाचा सामना करण्यासाठी आणीबाणी जाहीर केली असून प्रत्येक देश ह्या आजाराचा आपल्या मायभूमीवरील प्रसार रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे.
अनेक देशांनी चीनमध्ये शिकत असलेल्या आपल्या विद्यार्थ्यांना आणि नोकरीनिमित्त तिथे गेलेल्या आपल्या नागरिकांना परत आणायला सुरुवात केली आहे.
भारताने देखील आपल्या नागरिकांना चीनमधून परत आणलं असून मालदीवच्या सात नागरिकांची सुटका देखील वुहानमधून करण्यात आली आहे.
एकीकडे भारताचे सर्वत्र कौतुक होत असतांना पाकिस्तानने मात्र आपल्या वुहानमध्ये शिकायला गेलेल्या विद्यार्थ्यांना पाकिस्तानात परत आणण्यास नकार दिला असून तिकडे अडकलेल्या विद्यार्थ्यांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत.
अनेक विद्यार्थिनी आणि विद्यार्थी ह्या व्हिडीओमध्ये, “आम्हाला परत न्या, आमची सुटका करा” अशी मागणी करताना दिसत आहेत. मग आपल्याला प्रश्न पडतो की पाकिस्तान सरकार यावर काहीच का करत नाही?
ते आपल्या विद्यार्थी व नागरिकांना परत का आणत नाहीत ? तर यामागे एक खूप मोठा आंतरराष्ट्रीय राजकीय मुत्सुद्दीपणा आहे जो आपण समजून घ्यायला हवा.
पाकिस्तान सरकारनुसार,
आमचा चीनवर विश्वास असून चीनमध्ये आमचे विद्यार्थी सुरक्षित राहतील याची आम्हाला खात्री असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
आम्ही भावनिक निर्णय घेऊन आमच्या पाकिस्तानमधील इतर लोकसंख्येला धोक्यात घालू शकत नाही. आमच्या दृष्टीने आमचे लोक तिथेच राहिलेले बरे, आम्हाला चीनच्या व्यवस्थेवर विश्वास असून ते त्या विद्यार्थ्यांची योग्य काळजी घेतील.
चीनमधील लोकांना परत इकडे आणून त्याचा प्रसार होऊ शकतो. हे आम्हाला टाळायचे आहे. शिवाय चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेने देखील आम्हाला तशाच सूचना केल्या असून आम्ही त्या सूचनांचे पालन करत आहोत.
आम्ही ह्या संपूर्ण वाईट काळात चीनसोबत असून चीनला आमची संपूर्ण साथ असल्याचे पाकिस्तान सरकारने स्प्ष्ट केले आहे.
असं करणारा पाकिस्तान एकमेव देश आहे का ?
जगभरातील विविध राष्ट्रात ह्या कोरोना व्हायरस प्रति वेगवेगळी भूमिका आहे. एकीकडे अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरच्या सरकारने आपल्या देशाचे नागरिक नसणाऱ्या चीनमधून येणाऱ्या लोकांसाठी आपल्या देशाची द्वारे बंद केली आहेत.
व्हिएतनामने देखील चीनमधून येणाऱ्या सर्व विमानांवर बंदी घातली असून, जपानने चीनच्या हुबेई प्रांतातून येणाऱ्या कुठल्याही परकीय नागरिकाला देशात परवानगी नाकारली आहे.
मंगोलिया आणि रशियाने आपल्या बॉर्डर चीनसाठी बंद केल्या आहेत. याची सर्वात पहिले अंमलबजावणी उत्तर कोरियाने केली आहे. अँपलने देखील चीनमधील आपले सर्व स्टोअर बंद केले असून चीन ही अँपलची सर्वात मोठी बाजरपेठ आहे.
पण ह्यात देखील पाकिस्तानप्रमाणे काही देश असून ज्यांनी कुठल्याही प्रकारची घाई न करता, शांततेत या गोष्टीवर कारवाई करण्याचे ठरवले आहे. यात म्यानमार, कंबोडिया आणि इंडोनेशिया यांचा देखील समावेश होतो.
म्यानमारमध्ये तर सरकारने घोषणा केली आहे की कोरोना व्हायरस हा मेड इन चायना असल्यामुळे तो काही जास्त काळ टिकणार नाही त्यामुळे लोकांनी तणावग्रस्त न होता आपली काळजी घ्यावी.
कंबोडियाच्या राष्ट्रध्यक्षांनी घोषणा केली आहे की जो कोणी देशात मास्क लावून फिरताना दिसेल त्याला देशातून हद्दपार करण्यात येईल, त्यांच्या मते हा प्रकार लोकांमध्ये गरज नसताना भय उत्पन्न करत आहे.
हे देश अशाप्रकारे का प्रतिक्रिया देत आहेत ?
पाकिस्तानसाठी चीन हा जीवाभावाचा सवंगडी आहे. चीनच्या कुठल्याही धोरणावर पाकिस्तानने आजवर टीका केलेली नाही, अगदी उईगर मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचारांवर पाकिस्तानच्या तोंडातूण शब्द फुटेना झाले आहेत.
पाकिस्तानचे चीन सोबत असलेले संबंध त्यांच्यासाठी फुस्फुसासारखे आहेत ज्यांच्या शिवाय पाकिस्तानला देश चालवणे अवघड होऊन बसणार आहे.
आज पाकिस्तानचे नागरिक चीनमधून कितीही मदतीची कामना करत असले तरी चीनच्या वाकड्यात जागतिक स्तरावर आधीच निर्माण होणाऱ्या असंतोषात भर घालण्याचा पाकिस्तानचा मानस नाही म्हणून ते अगदी सावध भूमिका घेत आहे.
या आजारामुळे अनेक देशांनी चीनशी वाह्तुक बंद केल्याने चीनच्या व्यापारावर मोठा परिणाम होतो आहे.
अमेरिकेच्या बंदीमुळे चीन भडकला असून अमेरिकेच्या अशा वागणुकीमुळे आज व्यापारी संबंध खराब असल्याचं चीनने सपष्ट केलं आहे. पण अमेरिका मागे हटायला तयार नसून कुठल्याही प्रकारे आपल्या नागरिकांना हानी पोहचवण्याचा आमचा मानस नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या आजाराच्या हाताळणी बाबत होत असलेल्या सततच्या टीकेमुळे चीन नाराज झाला असून, गेल्यावेळी पेक्षा अधिक प्रमाणात ह्या आजाराच्या उच्चाटनासाठी प्रयत्न करतो आहे.
ह्यामुळे पाश्चात्य संशोधक चीनवर नाराज आहेत. कंबोडियाच्या पंतप्रधानांनी म्हणले आहे की असा कुठल्याच कंबोडीयन नागरिकाला याचा त्रास नाही.
भारताने चीनमध्ये असलेल्या आपल्या नागरिकांना भारतात परत बोलावून घेतले आहे, परंतु पाकिस्तानणे असे कोणतेही पाउल उचलले नाही.
त्याला कारण म्हणून पाकिस्तानणे उथळ राजकीय युक्तिवाद मांडले आहेत, परंतु कोरोना व्हायरसच्या सामना करताना पाकिस्तानने दाखवलेल्या हलगर्जीपणावर जगभरातून टीका होते आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.