आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
‘ग्रॉस डोमेस्टिक ग्रोथ’च्या पाठीमागे धावणाऱ्या जगात एक असा देश देखील आहे जो ‘ग्रॉस नॅशनल हॅप्पीनेस’च्या पाठीमागे लागला आहे. या ठिकाणी लोकांना हसण्यासाठी गुदगुल्या कराव्या लागत नाहीत ना कॉमेडी शो पहावे लागतात. इथे लोकांच्या चेहऱ्यावर सदैव स्मित हास्य दरवळत असते. तो देश म्हणजे आपला शेजारी भूतान आहे.
भूतान आपल्या अनेक वर्षांच्या सांस्कृतिक वारशासाठी, निसर्ग सौंदर्यासाठी, सुंदर चित्रकला आणि लोककलेसाठी ओळखला जातो. हा देश आकाराने लहान आहे, इथे लोकांकडे संसाधने कमी आहेत असे असले तरीही हा देश सुखी आहे.
१०व्य शतकात मोहम्मद गझनवी, १२व्या शतकात मंगोल चंगेज खान आणि १४ व्या शतकात मुघल आक्रमणामुळे भारतातून बौद्ध धर्माचा सर्वनाश झाला. अहिंसेवर श्रद्धा असणाऱ्या बौद्ध धर्मियांचे आयुष्य धोक्यात आल्यामुळे ते हिमालयात जाऊन निवास करू लागले. हिमालयातील घनदाट अरण्यात ते सुरक्षित होते, त्यामुळे ते येथेच स्थायिक झाले.
१६ व्या शतकात तिबेट आणि नेपाळमधून काही लोक याठिकाणी स्थायिक झाले. याठिकाणी लोकांची संख्या ४० टक्क्याने वाढली आणि भूतान अस्तित्वात आले.
संस्कृतमधील भू उत्थान या शब्दावरून भूतान हे नाव पडले. भू उत्थानचा अर्थ आहे जमिनीपासून वर उठलेला भूभाग होय. अनेक भूतानी लोक याला ‘ड्रेक यूल’अर्थात ‘थॉवर ड्रॅगन’ची भूमी मानतात.
१९०७ साली भूतानमध्ये राजेशाहीची स्थापना झाली. पहिल्यांदाच इथल्या लोकांनी भगवान बुद्ध आणि प्रकृतीपासून फारकती घेत एखाद्या मनुष्याच्या चरणी सर्वस्व अर्पण केले होते. १९व्या शतकापर्यंत भूतानच्या लोकसंख्येत वाढ झाली होती. बौद्ध मठाधीशांनी तिथे राजेशाहीची स्थापना केली आणि उग्येन वांगचुक याला भूतानचा पहिला राजा म्हणून घोषित करण्यात आले. १९०७ ते १९२६ या काळात त्याने राज्य केले, यानंतर जिग्मे वांगचुक याला राजगादी सोपविण्यात आली. त्याने १९५२ पर्यंत भूतानवर राज्य केले. यानंतर त्याचा मुलगा जिग्मे दोरजी याने १९७२ पर्यंत आणि त्यांचा पुत्र जिग्मे सिंघे याने २००६ पर्यंत राज्य केले.
२००६ मध्ये जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक याच्याकडे भूतानचे सिंहासन आले.
अनेक शतके या दुर्गम भागातील देशाला जंगली भाग म्हणून ओळखले जात होते, संपूर्ण जगाला भूतानी लोक आदिवासी वाटत होते. पण काळ पालटला. १९७४ साली भूतानला संयुक्त राष्ट्रांनी एक राष्ट्र म्हणून मान्यता दिली. आज भूतान एक लोकतांत्रिक राजेशाही देश आहे, इथे प्रधानमंत्री आहेत, खासदार आहेत, पण याठिकाणी सर्वोच्च पदावर भूतानचा राजाच आहे. २००८ पासून भूतानमध्ये नियमित निवडणूका होतात, असे असले तरी येथील लोकांच्या मनात राजाविषयी असलेली श्रद्धा आणि कृतज्ञता अजिबात कमी झालेली नाही.
भूतानच्या राजप्रमुखाला ‘ड्यूक गल्पो’ असे म्हटले जाते. हे पद जरी वंश परंपरागत असले तरी भूतानची संसद ‘शेंगडू’मध्ये एक तृतीयांश बहुमत असल्यास राजाला आपल्या गादीला सोडावे लागते.
शोंगडूमध्ये १५४ जागा असतात, यापैकी १०५ लोकप्रतिनिधी असतात, १२ धार्मिक प्रतिनिधी असतात आणि ३७ राजनियुक्त प्रतिनिधी असतात. या सर्वांचा कार्यकाळ तीन वर्षाचा असतो. भूतानमध्ये कधीच राजकीय विवाद बघायला मिळत नाहीत. भूतान कधीच आपल्या अंतर्गत गोष्टीत इतर देशांना दखल देऊ देत नाही.
१८६५ मध्ये भूतान आणि ब्रिटन यांच्यादरम्यान सिनचुलू करार करण्यात आला. या करारामुळे ब्रिटनला भूतानचा काही भाग मिळाला आणि त्यासाठी किंमत मोजावी लागली. १९१० मध्ये भूतानच्या राजात आणि ब्रिटिशांमध्ये अजून एक करार करण्यात आला, ज्यानुसार ब्रिटन भूतानच्या अंतर्गत गोष्टीत ढवळाढवळ करणार नाही, पण त्यांची विदेशनीती निश्चित करेल, असे ठरवण्यात आले. भूतानने कधी विदेशी सत्ता आपल्या जवळ येऊ दिल्या, ना त्यांनी कधी तसा रस घेतला.
१९४९ ला भारत स्वातंत्र्य झाला आणि भारताने भूतानची स्वतःच्या ताब्यात असलेली सगळी जमीन परत केली, जी ब्रिटिशांनी गिळली होती. तेव्हाच भूतान आणि भारतात मैत्री झाली. भूतानने आपल्या रक्षणाची जबाबदारी भारतीय सैन्यावर सोपवली. आज भारतीय सैन्य आणि हवाई दल भूतानची रक्षा करते आहे.
भूतानचे लोक आनंदी असण्यामागे अजून एक कारण आहे. भूतानच्या लोकांनी विदेशी लोकांना देशात येण्याची कधीच अनुमती दिली नाही. ते नेहमी प्रकृतीच्या जवळ व बौद्ध धर्माच्या शिक्षेप्रमाणे जीवन जगत आले आहेत. १९७० साली या देशाच्या विकासाची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरु करण्यात आली. १९७४ साली पहिल्यांदा विदेशी लोकांना भूतानमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळाली. आजही इथे जाणे इतके सोपे नाही. भूतानचा बहुतांश भाग हा पर्वतांनी व्यापलेला आहे. जिथे थोडे मैदान आहे तिथे देशाचे ६०% नागरिक वास्तव्य करतात. बहुतांश भाग हा जंगलाने घेरलेला आहे. येथील लोक पर्यावरणवर अवलंबून असल्यामुळे येथे पॉलिथिनचा वापर करण्यात येत नाही.
इथे रात्रीच्या वेळी रोडवर लाईट्स लागत नाहीत, लोकांना गरज वाटली तर ते कंदीलाच्या प्रकाशात मार्गक्रमण करतात. स्वतः जरी कमी वीज वापरत असला तरी भूतान भारताला वीजपुरवठा करतो. भूतान हा एक स्वच्छ व सुंदर देश आहे.
१९६० पर्यंत भूतानमध्ये एक रस्तादेखील नव्हता, लोकांना गाड्या काय असतात हे माहिती नव्हते. टेलिफोन, मोबाईल, इंटरनेट तर फार लांबच्या गोष्टी होत्या. १९९९ भूतानमध्ये पहिल्यांदा टीव्ही आला आणि त्याच्या काही काळानंतर तिथे इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. भूतानी लोकांनी मात्र इलेक्ट्रिक आक्रमण म्हणत त्याच्याकडे दुर्लक्ष केले. भूतानमध्ये साधे चित्रपटगृह देखील नाही. भूतानचे लोक फार धीम्या आवाजात एकमेकांशी संवाद साधतात. तेथील लोक मानतात इथल्या प्रत्येक कणात गौतम बुद्धांचा वास आहे. भूतानी लोक सदैव ध्यान मुद्रेत असतात. मोठ्या आवजाने ध्यान भंग होते, म्हणून ते हळूहळू बोलतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी भूतानच्या दौऱ्यावर गेले होते, त्यावेळी पहिल्यांदा तिथे लाऊडस्पीकरची व्यवस्था करण्यात आली होती.
भूतान तंत्रज्ञानात मागास असला तरी आरोग्य व इंजीनिअरिंगच्या इतर क्षेत्रात प्रगतिशील असून तिथे बऱ्याच सुविधा उत्तम दर्जाच्या आहेत. भूतानी लोकांचे टाइम मॅनेजमेंट उत्तम असून तेथील प्रत्येक गोष्टीसाठी योग्य तितका वेळ देतात. भूतानमध्ये सेक्सबद्दल अगदी मोकळेपणाने बोलले जाते. अगदी लहान मुलांच्या समोर देखील न लाजता आईवडील त्याविषयी चर्चा करू शकतात. इथे मुलांना सगळे समजत असल्याने सेक्स एज्युकेशन देण्याची गरज पडत नाही.
भूतानमध्ये पुरुषांच्या लिंगाची छाप प्रत्येक घरावर आढळून येते, याला पेनीस आर्ट म्हटले जाते. तिबेटियन धर्मगुरू दृक्पा कुंले यांनी या परंपरेची सुरुवात केली होती.
ते भूतानमध्ये धर्मप्रचार करण्यासाठी आले होते. त्यांनी एक मठ स्थापन करण्यासाठी हवेत बाण सोडला, हा बाण जाईल तिथे मठ स्थापन करण्यात येईल, असा त्यांनी निश्चय केला होता.
हा बाण एका मुलीच्या खोलीत गेला. ते जेव्हा बाणाच्या पाठीमागे तिथे पोहचले तेव्हा त्या मुलीचे रूप बघून मोहित झाले. त्यांनी तिथेच राहण्याचा निर्णय घेत, तिथे आश्रम स्थापित केले आणि लिंगाच्या लाकडी मुर्त्या जागोजागी लावल्या. या मुर्त्या पुढे भूतानमध्ये पूजनीय मानल्या जाऊ लागल्या.
भूतानमध्ये ब्रोक्सा नावाच्या जमातीत एक विचित्र प्रथा आहे. इथे एका स्त्रीला दोन विवाह करण्याची अनुमती आहे व ती दोन्ही पतींबरोबर एकाच घरात राहू शकते.
भूतानी लोक कधीच कोणाचे वाईट चिंतीत नाही, ते मानतात की यामुळे वातावरणात नकारात्मक ऊर्जा पसरते. ही ऊर्जा आजूबाजूच्या प्रकृतीला हानिकारक ठरू शकते. इथे लोक धान्य उत्पादन, कुक्कुटपालन आणि दुग्ध व्यवसाय करतात. हाच त्यांचा आहाराचा देखील भाग आहे. एमा दतशी याला इथे राष्ट्रीय पक्वान मानले जाते. भूतानी लोक प्रचंड धार्मिक प्रवृत्तीचे आहेत. ते पाहुण्याचे सुपारी देऊन स्वागत करतात.
भूतानच्या लोकांचा आत्मा आणि पुनर्जन्म या गोष्टीवर प्रचंड विश्वास आहे. यामुळे त्या आपल्या पूर्वजांच्या स्मृतीला कायम जंगलात जपून ठेवतात. इथे परमेश्वराप्रमाणे राजा आणि राणीचे पूजन करण्यात येते. ज्यावेळी जग एकमेकाला हॅप्पी न्यू इयर म्हणत असते, त्यावेळी भूतानी लोक मात्र एकमेकांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देत असतात. भूतानी लोकांचा वेगवेगळा जन्मदिवस नसतो, ते लोक एकाच दिवशी आपला जन्मदिन साजरा करतात. यामुळेच हे लोक इतके आनंदी आहेत.
आता भूतानचे लोक जगातील सर्वात आनंदी लोक का आहेत हे तुमच्या लक्षात आले असेलच. भूतानच्या लोकांकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे, ती म्हणजे सुख हे काही झगमगाटात नाही, जर इच्छा आणि कल्पना सीमित असतील तर सुख प्रत्येक परिस्थितीमध्ये उपभोगता येते. खरं सुख म्हणजे काय हे अनुभवायचे असेल तर एकदा भूतानला नक्की जायला हवे कारण इथे भारतीय लोकांचे मनापसून स्वागत करण्यात येते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.