आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
“होशवालों को खबर क्या……”
हे शब्द एकदा जरी कानावर पडले तरी दिवसभर आपण हेच गुणगुणत असतो! काय जादू आहे नाही या गाण्यात! या आणि अशा अनेक शायरीची मेजवानी पुरवणारे जादूगार म्हणजेच निदा फाजली.
निदा फाजली यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९३८ रोजी दिल्लीला झाला होता. मुर्तजा हसन आणि जमीन फातिमा याचे तिसरे अपत्य म्हणजे निदा फाजली. त्यांचे वडील देखील शायर’ होते. निदाचे प्राथमिक शिक्षण ग्वाल्हेरला झाले व नंतर त्यांनी लक्ष्मी कॉलेज येथून पदवी घेतली.
काही शायर लिखाणासाठी खास त्यांचे टोपण नाव वापरतात. निदा फाजली यांचे खरे नाव मुक्तदा हसन असे होते, निदा फाजली या टोपण नावाने लेखन करत. आपल्या सगळ्या कलाकृतींसाठी त्यांनी आयुष्यभर हेच नाव वापरले.
‘निदा’ या शब्दाचा अर्थ ‘आवाज ‘असा होतो. जो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अगदी साजेसा आहे.
शायर हे अनेक अव्यक्त भावनांचे आवाज बनवूनच जगत असतात. तर, फाजली हा शब्द कश्मिरी शब्द फाजील या शब्दावरून घेण्यात आला आहे. त्याचा अर्थ दयाळू किंवा उदार असा होतो. निदा फाजली हे सुरुवातीला कश्मीरमधे वास्तव्यास होते. त्या दरम्यान दंगली भडकल्या होत्या, ज्यामुळे त्यांचे आई-वडील पाकिस्तानात जाऊन राहू लागले. पण निदा मात्र भारतातच राहिले.
निदा फाजली भारतात तर राहिले पण, त्यांना रोजगाराचा प्रश्न होताच. त्यासाठी ते भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये भटकत राहिले. त्यावेळी मुंबईत हिंदी व उर्दू साहित्याची नियतकालिके छापली जात होती. त्यात धर्मयुग सारिका यांसारख्या लोकप्रिय नियतकालिकांचा समावेश होता. निदांनी तिथे आपलं नशीब आजमावून बघायचं ठरवलं. सुरुवातीला धर्मयुग, समाचार, ब्लिट्झ अशा मासिकांतून स्तंभलेखन करू लागले. त्यांची सरळ तरीही प्रभावशाली लेखनशैलीच त्यांची ओळख बनली. निदा यांच्या शायरीची खास गोष्ट म्हणजे त्या समजायला आपल्याला उर्दू भाषेची जाण असावी लागतेच असं नाही त्यांच्या रचना कोणालाही सहज समजतात.
निदा फाजली हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. १९९८ साली त्यांच्या ‘खोया हुं सा कूच’ या रचनेला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. तसेच ‘सुर’ या चित्रपटासाठी २००३ साली त्यांना ‘स्टार स्क्रीन’ पुरस्कार देण्यात आला. ‘दिवारो के बीच’ या त्यांच्या आत्मकथेला त्यांना मध्यप्रदेश सरकारचा ‘मीर तकी मीर’ हा पुरस्कार मिळाला आहे.
याव्यतिरिक्त उर्दू आणि हिंदी साहित्यातील योगदानासाठी त्यांना संगम पुरस्कार मिळाला आहे.
निदा फाजली यांनी चित्रपटांसाठी लिहिलेली काही गीते खूप प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांचे काही काव्यसंग्रह देखील प्रसिद्ध झाले. त्यापैकी ‘मोरा नाच’, ‘सफर मे धूप तो होगी’, ’लफजो के फूल’, इत्यादी काव्यसंग्रह विशेष गाजले. कित्येक लोकांच्या मुक्या भावना आपल्या शब्दांतून मांडणारे निदा फाजली यांनी २०१६ साली जगाचा निरोप घेतला.
पण, “कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता, कहीं जमीं तो कहीं आसमाँ नहीं मिलता!!” असं म्हणत आयुष्याच्या वळणांवर निदा फाजली आजही आपल्यासोबत उभे आहेत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.