आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
केसरी आणि मराठासारख्या वृत्तपत्रातून टिळकांनी जनसामान्यात देशभक्तीची भावना जागृत केली. ब्रिटीश सरकारची अन्यायकारक धोरणे आणि त्यांची भारतीय संस्कृतीबद्दलची हीन भावना या दोन्हींचा त्यांनी कडाडून विरोध केला. ब्रिटीश वस्तूंच्या बहिष्कारासाठी त्यांनी देशव्यापी आंदोलन सुरु केले. वर्तमानपत्रातून इंग्रजांविरोधात आवाज उठवल्याने त्यांच्यावर देशभक्तीचा गुन्हा नोंदवण्यात आला.
अन्यायकारी ब्रिटीश राजवटी विरोधात टिळकांनी दिलेला लढा सर्वपरिचित आहे. स्वराज्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी योगदान दिले त्यात “बाळ गंगाधर टिळक” यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे क्रांतिकारी स्वातंत्र्यसैनिक तर होतेच त्याबरोबरच ते थोर समाजसुधारक, निस्वार्थ शिक्षक आणि वकील देखील होते. भारतीय इतिहास, संस्कृत, हिंदू धर्म, गणित आणि खगोलविज्ञान यासारख्या विषयांत त्यांचे सखोल ज्ञान अचंबित करणारे होते.
बाळ गंगाधर टिळक यांच्या जन्म २३ जुलै, १८५६ रोजी महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यात झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखली हे त्यांचे जन्मस्थान. त्यांचे वडील गंगाधरपंत टिळक हे शिक्षक होते. टिळकांचे प्राथमिक शिक्षण आणि संस्कृतचे शिक्षण घरीच झले. १८६६मध्ये गंगाधरपंत यांची पुण्याला बदली झाली आणि साहजिकच कुटुंबासमवेत बाळ टिळक पुण्यात राहायला आले. पुण्यातच त्यांनी मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण केले.
लोकमान्य टिळक हाडाचे शिक्षक होते. समाज शिक्षित झाल्याशिवाय जागृत होणार नाही याची त्यांना कल्पना होती. म्हणूनच त्यांनी समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याचे कार्य हाती घेतले. त्यांनी ठिकठिकाणी इंग्लिश स्कूलची स्थापना केली. शिवाय, विनवेतन शिक्षकी पेशा पत्करला.
पुढे १८८१ साली केसरी आणि मराठा ही दोन वृत्तपत्रे सुरु केली. यातील केसरी हे वृत्तपत्र मराठीतून तर मराठा इंग्रजीतून छापले जात होते. या वृत्तपत्रांच्या माध्यमातून लोकशिक्षण, राजकीय जागृती आणि शासकीय अन्यायाचा प्रतिकार करण्याचे काम सुरु केले.
१८८२ साली टिळक आणि आगरकरांनी मिळून डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. याच संस्थेंतर्गत १८८५ साली फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. इथे टिळक स्वतः गणित आणि संस्कृत विषय शिकवत असत.
राजकीय सुधारणा आधी की सामाजिक सुधारणा आधी यावरून पुढे त्यांचे आगरकरांशी मतभेद झाले.
टिळकांना जितका स्वदेशाचा अभिमान होता तितकाच अभिमान स्वधर्माचा देखील होता. ज्यांना हिदुत्वाचा अभिमान नाही हिंदू धर्मात काय सुधारणा कराव्यात हे सांगण्याचाही अधिकार नाही असे ते म्हणत.
टिळकांनी केसरीतून केलेले लेखन हे स्फुटलेखन स्वरुपात मोडणारे होते. केसरी व्यतिरिक्त टिळकांनी दर्पणमधून इंग्रजी लेखन देखील केले. संस्कृत आणि इंग्रजी साहित्याचे ते गाढे अभ्यासक होते.
तत्वज्ञान हा विषय तर त्याच्या अत्यंत आवडीचा होता. त्यांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहिलेल्या गीतारहस्य या ग्रंथातून याची प्रचिती येते. गीतारहस्याशिवाय ओरायन, आर्क्टिक होम इन द वेदाज आणि वेदांगज्योतिष हे त्यांनी लिहिलेल्या ग्रंथापैकी काही प्रमुख ग्रंथ.
३ जुलै, १९०८ रोजी टिळकांनी क्रांतिकारी प्रफुल्ल चाकी आणि खुदिराम बोस यांनी केलेल्या बॉम्ब हल्ल्याचे समर्थन करणारा लेख केसरीतून प्रसिद्ध केला. या लेखामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आणि त्यांना सहा वर्षासाठी बर्मा येथील मंडालेच्या तुरुंगात कैद करण्यात आले. शिवाय, त्यांच्यावर एक हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला.
अर्थात, तुरुंगात जाण्याची ही काही त्यांची पहिली वेळ नव्हती. यापूर्वीही अनेकदा केसरीतून त्यांनी केलेल्या सडेतोड लिखाणाबद्दल आणि सरकारी टीकेबद्दल तुरुंगवास भोगावा लागला होता.
मांडलेच्या तुरुंगात असतानाच त्यांनी गीतारहस्य हा श्रीमद्भगवद्गीता या हिंदू ग्रंथाचे सटीक विश्लेषण केले. श्रीकृष्णाने सांगितलेल्या कर्मयोगाचे त्यांनी विस्तृत विवेचन या ग्रंथातून केले. देश गुलामीच्या बेड्यांत जखडला असताना भक्ती आणि मोक्ष नाही तर कर्मयोगच नितांत आवश्यक आहे, हे त्यांनी यातून ठासून सांगितले. गीतेसंदर्भात आपले विचार मांडत असताना त्यांनी लोकांना वास्तविक कर्तव्यांची जाणींव करून दिली.
लोकांनी एकत्रित येऊन सरकारची धोरणे समजून घ्यावीत त्याविरोधात आवाज उठवावा आणि सरकारविरोधात लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण व्हावी या हेतूने त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा सुरु केली. भारतात विविध जाती धर्मात विभागलेल्या समुदायांनी एकत्रित येतून एकसंघ समाज घडावा आणि सर्वांनी इंग्रजांविरोधात रणशिंग फुंकावे यासाठी त्यांनी व्यापक जनआंदोलन सुरु केले.
तुरुंगात असतानाच त्यांनी भारतीय राष्ट्रवादी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा दृढसंकल्प केला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी १९१६ साली होम रूल लीग या संघटनेची बांधणी केली.
याचवेळी, “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच” अशी प्रतिज्ञा त्यांनी केली.
बालविवाह, सतीप्रथेसारख्या कुप्रथांचा त्यांनी विरोध केला. बालविवाहावर बंदी घालण्याची मागणी केली. विधवा पुनर्विवाहाचे समर्थन केले. अस्पृश्यता आणि जातीवादाचाही त्यांनी विरोध केला. मुंबईत दुष्काळ पडल्यानंतर आणि पुण्यात प्लेगची साथ पसरलेली असताना त्यांनी लोकांची सेवा केली.
राष्ट्रीय पातळीवर स्वराज्य स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या चतुःसुत्रीचा त्यांनी हिरीरीने पुरस्कार केला. आपल्या लोकांना सक्षम करण्यासाठी जर कोणता मार्ग असेल तर तो स्वदेशी आणि बहिष्कारच असे ते आवर्जून सांगत.
त्यांनी सुरु केलेल्या चळवळींनी व्यापक स्तरावर गती घेतली असताना आणि समाजाच्या सर्व स्तरातून ती रुजत असतानाच १ ऑगस्ट, १९२० रोजी मुंबईमध्ये असाध्य आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने भारतीय स्वातंत्र्य चळवळीत एक मोठी पोकळी निर्माण झाली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.