आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
लहानपणापासून अनेक क्षेत्रात पाऊल टाकणारी पहिली महिला म्हणून डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी ओळखल्या जातात. त्यांनी भारतातील पारंपरिक सामाजिक प्रथांचा बिमोड करत लैंगिक समानतेसाठी सदैव प्रयत्न केले. त्यांनी मेडिकल, शिक्षा आणि कायद्याच्या क्षेत्रात मोठे नाव कमावले. फार कमी लोकांना माहिती आहे की भारतातील महिलांची स्थिती सुधारण्यात या महिलेचा मोठा वाटा आहे.
मुथुलक्ष्मी १९ व्या शतकातील एका बुरसटलेल्या समाजात जन्मला, ज्यात स्त्री फक्त लग्न करून नवऱ्याची सेवा करण्यापर्यंत मर्यादित होती.अशा समाजात जन्म घेऊन देखील त्या मागे हटल्या नाहीत. त्यांनी सदैव महिलांच्या न्याय हक्कांसाठी संघर्ष केला. मुथुलक्ष्मी ह्या एक कडव्या स्त्रीवादी होत्या. कदाचित भारतातील पहिल्या स्त्रीवादी होत्या.
१९ व्या शतकाच्या शेवटी मुथुलक्ष्मी यांनी समाजसुधारक म्हणून मोठी कामगिरी बजावली होती. बाल विवाह, देवदासी, वैश्यालय, लहान मुलं आणि महिलांच्या तस्करी विरोधात कडक कायदे करवून घेतले. त्यावेळच्या प्रस्थापित कर्मठ समाजव्यवस्थेला त्यांनी खुले आव्हान दिले होते.
लहानपणापासूनच मुथुलक्ष्मी यांना शिक्षणाची गोडी होती, पण त्या तामिळनाडूच्या पुडुकोट्टई नावाच्या एका छोट्या गावात जन्माला आल्या. या भागातील बहुतांश लोकांची मानसिकता पितृसत्ताकच होती. येथे फक्त पुरुषांना शिक्षणाचा अधिकार होता. त्यांचे वडील नारायण स्वामी अय्यर हे महाराजा कॉलेजचे प्राध्यापक होते, त्यांनी घरीच मुथुलक्ष्मी यांना मॅट्रिकपर्यंत शिक्षण दिलं.
मॅट्रिकच्या परीक्षेत मुथुलक्ष्मी यांनी टॉप केलं. त्यांच्या या यशाने जिल्ह्याभरात खळबळ माजली. ज्यावेळी महाराजा कॉलेजमध्ये त्यांच्या ऍडमिशनसाठी अर्ज करण्यात आला, त्यावेळी कॉलेजचे प्रिंसीपल आणि इतर पदाधिकारी पेचात पडले कारण मुथुलक्ष्मी यांच्या अगोदर या कॉलेजात कुठल्याच मुलीने शिक्षण घेतले नव्हते. एकीकडे ही परिस्थिती असताना अर्थातच काही सनातनी मंडळींनी मुथुलक्ष्मी यांच्या शिक्षणाला विरोध करण्याचा प्रयत्न केला.
पुड्डूकोटईचे राजे मार्तंड भैरव थोंडमन मुथुलक्ष्मी यांची कामगिरी बघून प्रचंड प्रभावित झाले त्यांनी समाजातील विरोधाला झुगारून लावत मुथुलक्ष्मी यांना कॉलेजात शिक्षण घेण्याचे आदेश दिले. त्यांना फक्त कॉलेजात ऍडमिशन मिळवून देण्यात आली नाहीतर त्यांची उत्तम व्यवस्था करण्यात आली.
१९१२ साली मुथुलक्ष्मी यांनी अजून एक यश कमावले, त्या मद्रास विद्यापीठाच्या इतिहासातील पहिल्या महिला ग्रॅज्युएट बनल्या.
वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून, मुथुलक्ष्मी यांनी सर्जरीमध्ये गोल्ड मेडल मिळवले. याच कॉलेजजीवनात त्यांचा सरोजिनी नायडूंशी संपर्क आला. त्यांच्या प्रभावात येऊन मुथुलक्ष्मी महिलांसाठीच्या बैठकांना उपस्थित राहू लागल्या. ऍनि बेझंट आणि महात्मा गांधी यांच्या प्रभावाखाली त्यांनी स्त्रियांच्या हक्कासाठी चळवळ उभारायला सुरुवात केली.
एकीकडे सार्वजनिक आयुष्यात येत होती, तशी अनेक वादळे मुथुलक्ष्मी यांच्या वैयक्तिक आयुष्यात देखील येत होती. १४ व्या वर्षी त्यांचा बालविवाह निश्चित कऱण्यात आला होता, पण मुथुलक्ष्मी यांनी नकार दिला. १९१४ ला त्यांच्या करियरमध्ये आणि सामाजिक कामात ढवळाढवळ करणार नाही, हे वचन घेऊन त्यांनी डॉ. टी सुंदर रेड्डी यांच्याशी वयाच्या २८ व्या वर्षी लग्न केले.
एकदा मुथुलक्ष्मी यांना इंग्लंडमध्ये महिला आणि बालकांच्या स्वास्थ प्रशिक्षण वर्गासाठी जायचे होते, पण घरच्यांनी कुठलीच आर्थिक मदत करण्यास नकार दिला. मुथुलक्ष्मी यांना त्यावेळी पनागल राजा यांनी अर्थसहाय्य केले होते, ज्याच्या बळावर त्या प्रशिक्षण वर्गाला जाऊ शकल्या होत्या.
ऍनि बेझंट यांच्या महिला कल्याण आंदोलनात मुथुलक्ष्मी सहभागी झाल्या. पुढे १९२६ला महिला भारतीय संघाने नेमणूक केल्यावर त्यांनी १९३० साली विधान परिषदेचे सदस्यत्व मिळाले. महिलांमध्ये फक्त घर सांभाळण्याची नाहीतर राष्ट्रनिर्माणाची देखील शक्ती आहे, असे मुथुलक्ष्मी यांनी दाखवून दिले.
मुथुलक्ष्मी यांनी बालविवाह, देवदासी, वैश्या आणि महिला व लहान मुलामुलींची तस्करी यांविरोधात आवाज उठवला, त्यासंबंधी कायदे बनवून घेतले. तत्कालीन कर्मठ लोकांच्या प्रचंड विरोधाचा सामना मुथुलक्ष्मींना करावा लागला पण त्या देखील खमक्या होत्या. त्यांनी कोणाच्याही विरोधाला न जुमानता, महिला व बाल कल्याणाचे काम सुरु ठेवले.
मुलींचे लग्नाचे वय १६ आणि मुलांचे २१ करावे, ही मागणी घेऊन त्यांनी मोठे आंदोलन केले. त्या म्हणायच्या की सती प्रथेमुळे जर एका महिलेचे आयुष्य बरबाद व्हायचे तर बालविवाहामुळे अनेक स्त्रियांचे आयुष्य बरबाद होते.
इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या की जर मुथुलक्ष्मी नसत्या तर आज महिलांची जी स्थिती आहे, त्याहीपेक्षा वाईट स्थिती राहिली असती.
१९४७ ला लाल किल्ल्यावर ज्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला, त्यांच्यापैकी मुथुलक्ष्मी एक होत्या. भारतात मतदान, शासन आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा विरोधात अनेक आंदोलनात त्यांनी सहभाग नोंदवला होता.
लहान मुलांसाठी बालगृह आणि कॅन्सरग्रस्तांसाठी इन्स्टिट्यूट उभारल्यामुळे सर्वत्र त्यांच्या नावाची चर्चा आहे. दलित आणि मुस्लिम महिलांच्या स्वास्थ्य विषयक प्रश्नांना देखील मुथुलक्ष्मी यांनी वाचा फोडली होती. त्या लेखिका आणि संपादिका देखील होत्या. कॅन्सर क्षेत्रातील योगदानासाठी मुथुलक्ष्मी यांच्या नावाने एक पुरस्कार देखील दिला जातो. तामिळनाडू आणि दक्षिण भारतात डॉ. मुथुलक्ष्मी यांचे नाव मोठे आदराने घेतले जाते. २०१९ मध्ये गुगलने डुडलच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली होती.
त्यांनी केलेला कार्याला सलाम!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.