आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन हा जिवंतपणीच एक दंतकथा बनला होता. त्याच्याबद्दल किती तरी आख्यायिका सांगितल्या जातात. काही खऱ्या तर काही खोट्या. इतके वर्ष होऊनही वीरप्पनबद्दलचे कुतूहल काही कमी होत नाही. वीरप्पनच्या क्रूरतेच्या कहाण्या तर फारच प्रसिद्ध आहेत.
तामिळनाडू आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातील सरकारी यंत्रणा त्याच्या मागे हात धुऊन लागली असतानाही तो सगळ्यांना यशस्वीपणे गुंगारा देत राहिला. त्याला पकडण्यासाठी गेलेला कोणताही अधिकारी जिवंत परत येत नसे.
“डॉन के पीछे ग्यारह मुलाखोंकी पुलिस पडी हैं. लेकीन डॉन को पकडना मुश्कील ही नहीं नामुंकीन है!” हा डॉन चित्रपटातील डायलॉग कदाचित वीरप्पनला डोळ्यासमोर ठेवूनच लिहिला गेला असेल.
एकदा तर वीरप्पनला पकडण्यासाठी २२ पोलिसांची टीम जंगलात गेली होती. त्याने या सर्वच्यासर्व टीमला यमसदनी धाडले.
वीरप्पन नावाचा हा अध्याय संपून १६ वर्षे झाली तरी, आजही या नवाभोवतीचे गारुड कमी झालेले नाही. या अचाट व्यक्तिमत्वाबद्दल लोकांना आजही प्रश्न पडतात आणि आजही वीरप्पन म्हटले की लोकांचे कान आणि डोळे विस्फारतात. जिवंतपणीच दंतकथा बनलेल्या वीरप्पनला त्याच्या भागातील लोक रॉबिन हूड मानत तर कोणी निर्दयी डाकू.
वीरप्पन जिवंत असताना आणि मृत्यूनंतरही प्रसारमाध्यमातून त्याच्याबाबतीत बरीच चर्चा सुरुच आहे. त्याच्या जीवनावर आधारित काही पुस्तके आणि चित्रपट प्रकाशित झालेत.
वीरप्पन पैशासाठी चंदन तस्करी आणि हस्तिदंताच्या व्यापार करायचा. असे म्हणतात की त्याने फक्त दातांसाठी २००० हत्ती मारले होते. तस्करीसाठी हजारो चंदनाची झाडे तोडून टाकली. याशिवाय, पोलीस अधिकारी किंवा मोठ्या लोकांचे अपहरण करून खंडणी वसूल करत होता.
असे म्हटले जाते की वीरप्पन रबरच्या बुटात पैसे भरून ते बूट तो जमिनीत पुरून ठेवत असे. त्याच्याकडे किती पैसे होते याचा अंदाज कुणालाही लावता आला नाही.
वीरप्पनने दहा वर्षाचा असतानाच एकाचा खून केला होता. हाच त्याचा पहिला गुन्हा होता. तेव्हाच त्याने तीन वनअधिकाऱ्यांचाही खून केला होता. या गुन्ह्यानंतर तो पुन्हा कधीच सामान्य जीवन जगू शकला नाही. असेही म्हटले जाते की त्याला हत्तीच्या दातांचा व्यापार आणि चंदन तस्करीच्या गुन्ह्यात या वनअधिकाऱ्यांनीच फसवले. त्यांनीच आधी वीरप्पनला पुढे करून आपला स्वार्थ साधला. शेवटी त्याच्या डाव त्यांच्यावरच उलटला.
वीरप्पनचे आयुष्य फार रंजक होते. अगदी त्याचे लग्नही एक फिल्मी स्टोरीच होती. माणसात राहणे धोक्याचे आहे हे ओळखल्यानंतर तो जंगलात पळून गेला. पण, पत्नीसाठी शहरात त्याने चांगली सोय केली. कधीकाळी दरिद्री जीवन जीगणारा वीरप्पन पुढे मोठा डाकू आणि मालदार माणूस बनला होता. त्याबरोबरच राजकारण, भ्रष्टाचार आणि हात धुवून मागे लागलेले पोलीस यांचा ससेमिराही कायमच त्याच्यामागे होता.
वीरप्पन पैशांसाठी मोठमोठ्या लोकांचे अपहरण करत असे. एकदा सरकारी अधिकारी समजून त्याने दोन फोटोग्राफर्सना उचलले होते. हे वाईल्डलाइफ फोटोग्राफर होते. या फोटोग्राफर्सनी वीरप्पनसोबत १४ दिवस जंगलात काढले. नंतर वीरप्पनने त्यांना सोडून दिले. या फोटोग्राफर्सनी नंतर ‘बर्डस, बीस्टस अँड बँडिट्स” नावाचे एक पुस्तक लिहिले. ज्यात त्यांनी या अनुभवाचे वर्णन केलेले आहे.
यात त्यांनी वीरप्पनचे जे वर्णन केलेले आहे ते प्रसारमाध्यमे, सरकार आणि पोलीस यंत्रणेने केलेल्या चित्रणाच्या नेमके उलटे आहे. वीरप्पनवर हत्तींना मारण्याचा आरोप करण्यात आले असले तरी, या फोटोग्राफर्सच्या मते वीरप्पन हत्तींच्या बाबतीत खूपच भावनिक होता.
त्याने या फोटोग्राफर्सना सांगितले की, तो हत्तींना मारत नाही. पण, जंगलात जरा जरी खुट्ट झाले तरी सरकार आणि पोलीस ते वीरप्पनच्या नावावरच खपवत असे. हत्तींच्या दातांच्या व्यापारातून तो कधीचाच बाहेर पडला होता, असेही त्याने सांगितले होते. फ्रंटलाइन या पत्रिकेच्या एका रिपोर्ट नुसार वीरप्पनने ५०० पेक्षा कमीच हत्ती मारले होते.
यातून त्याने २.५ कोटीपेक्षाही कमी पैसे कमवले. शिवाय, त्याला कमावलेल्या पैशातील काही हिस्सा हा मध्यस्थ लोकांना द्यावा लागे. शिवाय, त्याच्या सुरक्षेची जबाबदारी घेणारे काही राजकारणी होते, त्यांच्यापर्यंतही त्यातील वाटा पोहोचवणे भाग होते.
१९८७ साली वीरप्पनने एका वनअधिकाऱ्याचे अपहरण केले. तेंव्हा संपूर्ण देशाला वीरप्पन नावाची ओळख झाली. त्यावेळी संपूर्ण देशात त्याच्याच नावाची चर्चा गाजत होती. काही दिवसांनी त्याला पकडण्यासाठी पोलिसांची एक टीम जंगलमध्ये गेली. तर त्यातील २२ लोकांना वीरप्पनने मारून टाकले.
कन्नड चित्रपटातील सुपरस्टार राजकुमार यांचेही वीरप्पनने अपहरण केले होते. त्यांच्या सुटकेसाठी वीरप्पनने कर्नाटक सरकारकडून ५० कोटीची मागणी केली होती.
कर्नाटक आणि तामिळनाडू सीमेवरील लोकांसाठी काही कल्याणकारी योजना राबवाव्यात यासाठीही वीरप्पनने जोर लावून धरला होता. जंगलात राहणारे लोक त्याला आपला रॉबिनहूडच समजत होते. वीरप्पन अशिक्षित असला तरी त्याचे व्यक्तिमत्व प्रभावी होते.
कोणी त्याला एकदा जरी भेटले तरी त्याच्यावर वीरप्पनचा प्रभाव नक्की पडत असे.
१८ ऑक्टोबर २००४ साली वीरप्पनला मारण्यात आल्याची बातमी प्रसारित झाली तेंव्हा अनेकांच्या त्यावर विश्वास बसला नाही. त्याला मारण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचे प्रेत पाहण्यासाठी तब्बल २०,००० लोकांनी हजेरी लावली होती.
वीरप्पनने एकूण १८४ लोकांचे प्राण घेतले होते. यात ९७ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
वीरप्पनला पकडण्यात आले तेंव्हा एक तर त्याचे वय झाले होते. मधुमेहासारख्या आजाराने तो पुरता हैराण झाला होता. त्यातच त्याला डोळ्यांची समस्या भेडसावू लागली होती. शारीरिकदृष्ट्या वीरप्पन या वयात खूपच कमकुवत झाला होता. म्हणूनच त्याला पकडणे पोलिसांना जास्त सोपे गेले.
त्याला पकडण्यासाठी कर्नाटक सरकार आणि तामिळनाडू सरकारने साडेपाच कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. २००३ साली जयललिता यांनी वीरप्पनला मारण्यासाठी एटीएस प्रमुख विजय कुमार नावाच्या एका अधिकाऱ्याची नेमणूक केली. विजय कुमार यापूर्वीही एकदा वीरप्पनला पकडण्यासाठी आखलेल्या मोहिमेत सहभागी झाले होते. परंतु, त्यांना त्यावेळी यश आले नाही.
यावेळी मात्र त्यांनी सावध खेळी करत बेसावध वीरप्पनला आधी ताब्यात घेतले नंतर वीरप्पन पळून जात असल्याचे पाहून त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्याला मारून टाकले.
वीरप्पनला पकडण्यासाठी विजय कुमार यांनी आधी काही एटीएस सदस्यांना त्याच्या गोटात सामील होण्यास पाठवले. हे सदस्य वरचेवर वीरप्पनच्या हालचालींविषयी माहिती देत असत.
एक दिवस सकाळी वीरप्पनला डोळे तपासण्यासाठी दवाखान्यात घेऊन जाताना या एटीएस पथकातून त्याच्या गोटात सामील झालेल्या व्यक्तींनी वीरप्पनला ताब्यात घेतले. त्याच दिवशी रात्री ११ वाजून १० मिनिटांनी त्याचा एन्काऊंटर करण्यात आला.
वीरप्पनला पकडण्याच्या मोहिमेत जे पोलीस आणि एटीएस अधिकारी सामील झाले होते, त्यांना सरकारकडून भरपूर मानसन्मान आणि बक्षीसही मिळाले. या मोहिमेत सामील झालेल्या प्रत्येक व्यक्तीला तीन लाख रुपयांचे बक्षीस, पदोन्नती आणि सरकारच्या वतीने एक-एक घर देण्यात आले.
सोळा वर्ष या घटनेला उलटून गेले पण अजूनही वीरप्पनच्या कितीतरी गोष्टी जगासमोर आल्या नाही. कदाचित त्या कधीच उघड होणारही नाहीत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.