आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
तुम्हाला डोंगरांचे सुळके दिसतील त्यांच्यावरून वाहणारे ढग दिसतील तिथले सूर्यास्ताचे फोटो दिसतील किंवा मग अजस्त्र सुळ्यांच्या कातळातून धो धो वाहणार पाणी दिसेल. कुठे आहे ही जागा ? आणि नेमकं काय आहे तिथे असं या साठी तुम्हाला हा लेख वाचावा लागेल.
अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगडाच्या बाबत पर्यटकांना प्रचंड आकर्षण आहे, रम्य असा मोठ्ठा हिरवाईने नटलेला डोंगर,तिथे दिसणारे विविध प्राणी, पक्षी तसेच त्या गडाला असणारा पुरातन इतिहास व तेथील लेण्या त्या गडाला परिपूर्ण व लोकप्रिय बनवतात.
अजस्त्र पसरलेल्या सह्याद्री पर्वत रांगेतील हरिश्चंद्रगडाचा हा विशाल डोंगर ठाणे, पुणे, व अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेला असून त्याची उंची सुमारे ४००० फूट इतकी आहे. तसेच महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शिखर म्हणून प्रसिद्ध असणारे तारामती शिखर सुद्धा याच गडाचा भाग आहे. केवळ एका खांबावर असलेली मोठी केदारेश्वराची गुहा असेल किंवा जुने हेमाडपंथी महादेवाचे मंदिर असेल या सगळ्या या गडाच्या बाबी पर्यटकांना मोहून टाकतात.
अशाच हरिश्चंद्रगडाची महत्त्वाची व सर्वात सुंदर असणारी एक बाजू म्हणजे हा कोकणकडा. ३००० पेक्षा जास्त फुटांचा अखंड वक्राकार असा हा दगडी कडा कोकणकडा म्हणून ओळखला जातो.
याच्या नावाच्यामागे बऱ्याच गोष्टी आहेत जो तो आपल्याला माहिती असलेली दंतकथा सांगत असतो पण एकंदरीत त्या बाजूने कोकणकडचा काही भाग त्या काळी दिसत असावा म्हणून कदाचित त्या कड्याला कोकणकडा अस म्हणत असावेत.
बेलपाडा नावाच्या गावाच्या बाजूने मुख्य रस्ता असणारा हा कडा आपल्या अक्राळ विक्राळ सुळ्यांनी प्रसिद्ध आहे तसेच इथून दिसणारा सूर्यास्त सुद्धा अत्यंत प्रसिद्ध आहे, गिर्यारोहणप्रेमी लोक इथे वेगवेगळ्या पॅराशूट उडी, रॅपलिंग, रॉक क्लाइंबिंग सारख्या थरारक कसरती करण्यासाठी कोकणकड्यावर येत असतात. व आठवणी निर्माण करत असतात.
हा कडा रोमन अक्षरांमधल्या U आकारासारखा असून 90 अंशात नसून बाह्यगोल आकारात आहे, व हा कडा समोरून नागाच्या फनी सारखा दिसतो.
या कोकणकड्याची महती लक्षात घेता गेल्या काही वर्षांपासून हरिश्चंद्रगडावर स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी कोकणकडा महोत्सवाचे सुद्धा आयोजन करण्यात येऊ लागले आहे. या विविध कार्यक्रमांनी परिपूर्ण होणाऱ्या कोकणकडा महोत्सवात गिर्यारोहण क्षेत्राशी संबंधित चित्रपट,लघुपट व माहितीपट दाखविले जातात तसेच गडकिल्ल्यांसाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या लोकांचा सन्मान सुदधा केला जातो. आणि या महोत्सवाला दुर्गप्रेमी मोठ्या संख्येने हजर असतात.
वसंत बापट यांनी मोहून टाकणाऱ्या अश्याच सह्याद्रीच्या कड्यांचं आपल्या खाली दिलेल्या कवितेतून वर्णन केलंय
केवळ माझा सह्यकडा
भव्य हिमालय तुमचा अमुचा, केवळ माझा सह्यकडा
गौरीशंकर उभ्या जगाचा, मनांत पूजिन रायगडा
तुमच्याअमुच्या गंगायमुना, केवळ माझी भिवरथडी
प्यार मला हे कभिन्न कातळ, प्यार मला छाती निधडी
मधुगुंजन लखलाभ तुम्हांला, बोल रांगडा प्यार मला
ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते, तुकयाचा आधार मला
धिक तुमचे स्वर्गहि साती
इथली चुंबिन मी माती
या मातीचे कण लोहाचे, तृणपात्यांना खड्गकळा
कृष्णेच्या पाण्यातुन अजुनी वाहतसे लाव्हा सगळा
कबीर माझा, तुलसी माझा, ज्ञानेश्वर परि माझाच
जयदेवाचा जय बोला परि माझा नाम्याचा नाच
जनीं जनार्दन बघणारा तो “एका” हृदयी एकवटे
जनाबाईच्या ओवीमध्ये माझी मजला खूण पटे
इंद्रायणिच्या डोहामधली गाथा ओली ती ओली
ती माझी मी तिचाच ऐशी; जवळिक कायमची झाली
भक्तीचा मेळा दाटे
चोख्याची पैरण फाटे
निर्गुण मानवतेची पूजा करणारे करू देत भले
माझ्यासाठी भीमाकांठी भावभक्तिची पेठ खुले
रामायण तर तुमचेंमाझे भारत भारतवर्षाचें
छत्रपतींची वीरकहाणी निधान माझ्या हर्षाचें
रजपुतांची विक्रमगाथा तुमच्यापरि मजला रुचते
हृदयाच्या हृदयांत; परंतू बाजी बाजीची सुचते
अभिमन्यूचा अवतारच तो होता माझा जनकोजी
दत्ताजीचे शेवटचे तो शब्द अजुनि हृदयामाजीं
बच जायें तो और लढें
पाउल राहिल सदा पुढे
तुम्हांस तुमचें रुसवेफुगवे घ्या सगळा नाजुक नखरा
माझ्यासाठी; राहील गाठी; मरहट्याचा हट्ट खरा
तुमचें माझें ख्यालतराणे दोघेही ऐकू गझलां
होनाजीची सोनलावणी वेड लावते; परि मजला
मृदुंग मोठा सुमधुर बोले, मंजुळ वीणा अन मुरली
थाप डफाची कडकडतां परि बाही माझी फुरफुरली
कडाडणारा बोल खडा जो दरी-दरीमधुनी घुमला
उघडुनि माझ्या हृदयकवाडा तोच पवाडा दुमदुमला
तटातटा तुटती बंद
भिंवईवर चढते धुंद
औट हात देहात अचानक वादळ घुसमटुनी जातें
उचंबळे हृदयात पुन्हा तें इतिहासशी दृढ नातें
कळे मला काळाचे पाउल द्रुतवेगानें पुढति पडे
कळे मला क्षितिजाचे वर्तुळ क्षणोक्षणीं अधिकचि उघडे
दहा दिशांचे तट कोसळले, ध्रुव दोन्ही आले जवळी
मीही माझें बाहू पसरुन अवघ्या विश्वातें कवळी
विशाल दारें माझ्या घरची, खुशाल हीं राहोत खुली
मज गरीबाची कांबळवाकळ सकलांसाठी आंथरली
मात्र भाबडया हृदयांत
तेवत आहे जी ज्योत
ती विझवाया पहाल कोणी मुक्त करुनि झंझावात
कोटि कोटि छात्यांचा येथे कोट उभारू निमिषांत
— वसंत बापट (सेतू, १९५७)
तर या वर्षांत अश्या अदभूत,निसर्गरम्य कोकणकड्याला नक्की भेट द्या, व त्या जागेचा तुम्ही सुद्धा आनंद घ्या.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.