आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
मानवी इतिहासात आजवर अनेक युद्धं झालेली आहेत आणि यातील बऱ्याच युद्धाबाबत आपण बरच काही वाचलेलं आहे. घनघोर युद्ध, अमानवी युद्धं, रक्तरंजित युद्ध, अशी कितीतरी युद्धाबद्दल आपण काही ना काही माहिती वाचलेली आहे.
आज आपण इथे सर्वाधिक काळ म्हणजे तब्बल ३३५ वर्षे चाललेल्या युद्धाबद्दल आपण माहिती घेणार आहोत.
हो! इतिहासातील हे सर्वाधिक काळ चाललेले युद्ध आहे. नेदरलँड्स आणि ग्रेट ब्रिटनमधील आईल्स ऑफ सिली दरम्यान झाले होते. या युद्धाची सुरुवात १६५१ला झाली आणि सांगता १९८६ ला.
पण, ३३५ वर्षे चाललेल्या या युद्धात रक्ताचा एक थेंबही सांडला गेला नव्हता. हे युद्ध जराही भयावह किंवा रक्तलांछित झाले नव्हते. रक्ताचा एकही थेंब न सांडता झालेले हे युद्ध खरे तर फक्त कागदी युद्ध होते.
कुणी एक गोळी झाडली नाही की कुणी कुणाच्या जीवावर उठले नाही आणि तरीही ३३५ वर्षे हे युद्ध सुरु होते कसे काय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. या लेखातून तुम्हाला त्याचे उत्तर नक्कीच मिळेल.
या युद्धाची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी इंग्लिश गृह युद्धाच्या इतिहासापर्यंत जावे लागेल. पहिल्या एलिझाबेथ राणीच्या निधनानंतर राज्याची सूत्रे तिच्या चुलत भावाच्या म्हणजेच जेम्स स्टुअर्टच्या हातात गेली आणि पहिल्यांदा इंग्लंड, आयर्लंड आणि स्कॉटलंड ही सगळी राज्ये एका छत्राखाली आली. यामुळे अंतर्गत विवाद उफाळून आले आणि आयरिश विरुद्ध इंग्लिश आणि स्कॉटिश बंडखोर एकमेकांविरोधातच उभे ठाकले. सरदार घराण्यांनी राजाला पाठींबा दिला तर संसद सदस्यांना मात्र हा राजा अमान्य होता.
यात नेदरलँडने संसद सदस्यांना पाठींबा द्यायचे ठरवले आणि त्यांचा या इंग्लंडच्या गृह युद्धाशी काहीही संबंध नसताना त्यात ओढले गेले. नेदरलँडच्या पाठींब्यामुळे सरदार घराण्यांनीही आपापल्या तलवारी परजल्या.
या सरदारांनी इंग्लिश खाडीतून जाणाऱ्या प्रत्येक डच जहाजाची अडवणूक केली आणि त्यांची लुटालूट सुरु केली. आता या सरदारांकडेही भरभरून येणाऱ्या जहाजांशी दोन हात करण्यासाठी खूप मोठे सैन्य बळ नव्हते. म्हणून ते मागे सरकत सरकत आइल्स ऑफ सिलीपर्यंत पोहोचले.
डचांचे देखील बरेच नुकसान झाले होते त्यामुळे त्यांनी फक्त आपली पकडलेली जहाजे आणि माल परत देण्याची मागणी केली. पण, सरदारांनी काही या मागणीला भिक घातली नाही. त्यामुळे डचांचा संताप पुन्हा वाढला.
म्हणून १६५१ मध्ये डचांनी आईल्स ऑफ सिलीवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. परंतु इंग्लंडचे सरदार आणि संसद सदस्यांमध्येच तह झाल्याने आता डच नेमके कुणाविरुद्ध युद्ध लढणार म्हणून तेही मागे हटले. परंतु त्यांनी रीतसर युद्ध संपल्याचे जाहीर केले नाही.
नंतरच्या काळात या युद्धाची कुणालाच काही माहिती नसल्यामुळे हे युद्धच विस्मृतीत गेले. परंतु अधिकृतरित्या या युद्धाला पूर्णविराम मिळालाच नव्हता. एका इतिहास तज्ज्ञाला लंडनमधील डच दुतावासात या युद्धाची माहिती मिळाली. तिथे असे युद्ध सुरु झाल्याची पुष्टी करणारी काही कागदपत्रेही सापडली. थोडी अधिक माहिती त्याने शोधून काढल्यानंतर त्याच्या असे लक्षात आले की हे युद्ध सुरु झाल्याचे पुरावे सापडतात पण या युद्धाला पूर्णविराम मिळाल्याचा पुरावा कुठेच सापडत नाही.
त्याने ही बाब दोन्ही सरकारांच्या लक्षात आणून दिल्यावर १७ एप्रिल १९८६ रोजी या युद्धाला पूर्णविराम दिल्याचा करार संमत करण्यात आला आणि इतिहासातील हे दीर्घकालीन युद्ध संपुष्टात आले. एकही जीवितहानी अथवा वित्तहानी न होताही हे युद्ध दीर्घकाळ सुरु कसे राहिले या प्रश्नाचे उत्तर आता तुम्हाला मिळाले असेल.
आईल्स ऑफ सिली समितीचे अध्यक्ष आणि इतिहास तज्ज्ञ रॉय डंकन यांनी या युद्धाची पाळेमुळे शोधून काढली आणि त्यांनी लंडनमधील डच दूतावासालाही याबद्दल माहिती दिली. डच राजदूत जॉंखीर रेन हायडेकॉपर आणि रॉय डंकन या दोघांनी मिळून या ऐतिहासिक दस्तावेजावर सह्या केल्या आणि एक दिर्घकालीन युद्धाला पूर्णविराम मिळाला.
तसे तर हे युद्ध मुळात सुरूच झाले नाही त्यामुळे ते संपण्याचा विषयच नव्हता पण, फक्त काही तांत्रिक बाबींमुळे कसा गोंधळ होतो आणि आपल्या इतिहासात कशी गंमतीशीर भर पडत जाते हेच यावरून समजते. अशा घटना इतिहासाला आणखी रंजक बनवतात. म्हणूनच भविष्य घडवायचे असेल तर तुम्हाला तुमचा इतिहास माहिती पाहिजे असे का म्हटले जाते ते आता समजले असेलच. इतिहासातील या छोट्या छोट्या चुका, खरं तर याला चूक नाही हलगर्जीपणा नक्कीच म्हणता येईल, आपल्याला खूप काही शिकवून जातात.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.