आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारतासारख्या बहुपक्षीय राजकारणाची बैठक असणाऱ्या देशामध्ये जाती धर्मावर आधारीत पक्षांचे वर्चस्व वर्षानुवर्षांपासून असणे यात काही विशेष नाही. अशा अनेक पक्षांचे अस्तित्व आपल्या भारतात चिरकालापासून टिकून आहे ज्यांची एक विशिष्ट विचारधारा आहे. विचारधारा असण्यात काही वावगं नाही. परंतु आपला देश कुण्या एकाची मक्तेदारी नाही. एक राजकीय अधिकार आणि लोकशाहीचा आधार म्हणून आपल्या साऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळाला.
कुण्या एका पक्षाची विचारधारा पटली म्हणून त्या पक्षाला पाठिंबा देणे सहाजिकच आहे. पण विचारधारा अन् कृतिकार्यक्रम तथा त्यांची अंमलबजावणी करणे यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. आश्वासनांची विश्वासार्हता लक्षात घेउनच प्रत्येक नागरिक विशिष्ट पक्षाला मतदान करत असतो नव्हे तर तो आपल्यातीलच एक प्रतिनिधी ज्याला आपले प्रश्न कळतील व त्यांची उत्तरे व समाधान करण्यासाठीच निवडून देत असतो.
मग निवडून आलेल्या किंबहुना बहुमताने निवडून आलेल्या कोण्या एका धर्मधार्जिण्या सरकारकडून आमच्या काही माफक अपेक्षा असतील तर वावगं ते काय?
समाजात असेपर्यंत प्रतिनिधी भारतमातेचे गोडवे गातात, गंगा गोदावरीला वंदन करतात, कधी पिर बाबाचा दर्गा तर कधी मंदिरही गाठतात. एकदा का समाजातून सुटून सरकारात घुसले की सारेच प्रतिनिधी एकाएकी लाल, पिवळे, नीळे, हिरवे, भगवे चष्मे घालतात. मग आम्हीही त्यांच्याप्रमाणे चष्मे घालतो तर म्हणतात धर्माकडून अपेक्षा करू नका, धर्मासाठी माणूस नाही तर माणसासाठी धर्म आहे.
मी एक सामान्य माणूस. किमान दोन वेळेचं जेवण मिळावं, एक छोट घर, थोड़ी फार सेविंग एवढीच काय ती मध्यमवर्गीय स्वप्न. पण वेगवेगळे चष्मे घालूनही स्वप्न पूर्ण होत नाहीत व चष्मा काढला तर मी माझी ओळखच गमावून बसतो. मी या समाजाचा राहत नाही अन् मग माझी अवस्था होते-ना घर का ना घाट का.
त्यांच्या पायांना चढायला आम्ही आमचे खांदे दिले अन् वर चढल्यावर त्याच पायांनी आम्हाला लाथाडले. त्यांची काय चूक म्हणा, आम्हीच छोटी स्वप्न पाहिली तिथेच घोडचूक झाली. मोठी स्वप्न पाहणारी स्वप्न पाहतात, सत्यात उतरवतात, जगतात अन् कुठल्या कुठे निघून जातात. आम्ही मात्र छोटी छोटी स्वप्न पाहून, छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधत छोटेच बनून राहिलो.
आयुष्यभर पक्षांचं राजकारण मला कधी कळलच नाही अन् कळणारही नाही असं म्हणून आता चालणार नाही. लाखो जीवांच्या स्वातंत्र्यकुंडातील आहुतीनंतर हा आपला देश स्वतंत्र झाला आहे. पण या स्वातंत्र्याला फाळणीचा कुरूप तीळ तेव्हापासून आजतागायत चिकटून आहे. ज्या हुतात्म्यांनी अक्षरशः स्वतःचा तीळपापड़ करून स्वातंत्र्यासाठी आपले प्राण वेचले त्यांना सलामी द्यायची असेल तर ‘फोड़ा आणि झोडा’ नितीला बळी पडून मतपेटीच्या राजकारणाचे शिकार बनू नका.
सरकारचे जे निर्णय चांगले अर्थात देशहिताचे त्यात साथ दया;अन् जे निर्णय देशाविघातक त्यासाठी पेटून उठा, एकत्र या, एकसंघ व्हा, पण कुठलाही चष्मा न घालता बरं का!
लेखिका- कु. मधुरा संजय काळे
(अंजनगांव सुर्जी
जि.अमरावती)
या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. ThePostman.co.in संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही. | आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.