आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
३२ लाख ८७ हजार २६३ वर्ग किमी क्षेत्रफळावर आपल्या देश विस्तारलेला आहे. वैविध्यपूर्ण भौगोलिक परिस्थिती असलेल्या भारतामध्ये जगातील सर्वात मोठं रस्त्यांचं जाळं आहे. महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांचं हे जाळं ६४.५ टक्के मालाच्या वाहतुकीत आणि साधारण ९० टक्के प्रवासी वाहतुकीत योगदान देतं. शहरांचा सतत होणारा विकास आणि स्मार्ट शहरांच्या निर्मितीमुळं सध्या रस्ते बांधकाम प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
शहरांतील व्यापाराला आवश्यक पायाभूत सुविधा पुरवणे आणि वाहनांच्या वाढत्या संख्येला मार्ग उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं देशात अनेक रस्ता बांधकाम कंपन्या काम करत आहेत. अशा कंपन्यांमध्ये एका मराठमोळ्या व्यक्तीची कंपनी अग्रस्थानी आहे.
‘आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलर्स लिमिटेड’ असं या कंपनीचं नाव आहे. ‘आयआरबी’ इन्फ्रास्ट्रक्चरला रस्ते बांधणी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून नावलौकिक मिळवून देण्यात कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र डी. म्हैसकर यांचा सिंहाचा वाटा आहे.
वीरेंद्र म्हैसकर हे आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड, या बांधकाम कंपनीचे मालक आहेत. महाराष्ट्रीयन लोकांमध्ये कष्ट करण्याची प्रचंड क्षमता आहे पण, त्यांना त्याच रुपांतर मोठ्या यशामध्ये करता येत नाही किंवा मराठी लोक फक्त नोकरीचं करू शकतात, त्यांना व्यवसाय करण्याचं कौशल्य नाही, अशी टीका अनेकदा केली जाते. हीच गोष्ट वीरेंद्र म्हैसकर यांनी खोटी ठरवत आपल्या कंपनीला देशात अव्वल ठिकाणी नेऊन पोहचवलं. हा पल्ला गाठण्यासाठी वीरेंद्र यांनी दिवस-रात्र मेहनत घेतलेली आहे.
मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या श्रीराम पॉलिटेक्निक महाविद्यालयातून त्यांनी सिव्हिल इंजिनीअरींगची पदविका पूर्ण केली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९९० मध्ये वयाच्या १९व्या वर्षी त्यांनी कुटुंबाच्या रस्ते बांधणी व्यवसायात प्रवेश केला. त्यांनी १९९८ मध्ये त्यांनी व्यवस्थापकिय संचालक म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर आपली कल्पकता आणि दूरदृष्टीच्या बळावर व्यवसायाचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला. अल्पावधीतच आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर रस्ते आणि महामार्ग तयार करणारी आणि त्यांची देखभाल करणारी अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाऊ लागली.
२००८ मध्ये सार्वजनिक झालेली आयआरबी कंपनी सध्या पश्चिम भारतातील अग्रणी टोल रोड ऑपरेटर आहे. अलीकडेच म्हैसकरांनी रिअल इस्टेटमध्ये देखील आपला चांगला जम बसवला आहे. याशिवाय त्यांनी विमानतळ बांधण्याचं देखील कंत्राट मिळवलेलं आहे.
आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चरची बीओटी भांडवल गुंतवणूक ६ अब्ज रुपयांपेक्षा जास्त आहे. बीओटी ही एक अत्याधुनिक संकल्पना आहे. ज्यात सरकारच्या हातात असलेल्या पायाभूत प्रकल्पांच्या मालकीचं बांधकाम, संचालन आणि हस्तांतरण करण्यात खासगी कंपन्या पुढाकार घेतात. खासगी रस्ते बांधकाम कंपन्यांसाठी सरकार ग्राहकाची भूमिका निभावतं. रस्ते प्रकल्पांमधून प्राप्त झालेल्या उत्पादनातील मोठी रक्कम या कंपन्यांना मिळते, त्याबदल्यात या कंपन्यांनी रस्त्याची देखभाल करणं अपेक्षित असतं. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक वीरेंद्र म्हैसकर यांनी सर्वप्रथम बीओटीचं महत्त्व जाणलं. हे मॉडेल सरकार आणि कंपनी दोघांनाही कसे फायदेशीर आहे, हे म्हैसकरांनी शासनाला पटवून दिलं.
म्हैसकरांच्या नेतृत्वाखाली आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चरनं आतापर्यंत देशातील रस्ते विकसित करण्याच्या उद्देशाने अनेक मोठे बीओटी प्रकल्पांचं आव्हानं यशस्वीपणे पेलवलं आहे. बीओटी उपक्रमांच्या सर्वात मोठ्या ऑपरेटरपैकी आयआरबी एक आहे. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चरनं देशातील पहिला बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर (बीओटी) रस्ता प्रकल्प कार्यान्वित केला.
कंपनीनं ठाणे-भिवंडी बायपासचं काम पूर्ण केलं. हा भारतातील पहिला बीओटी प्रकल्प ठरला. बीओटीअंतर्गत सध्या आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चरकडे एकूण १२ हजार किमी लांबीचे रस्ते आहेत. यात निर्माणाधीन आणि कार्यरत दोन्ही प्रकल्पांचा समावेश आहे.
आतापर्यंत आयआरबीनं राज्यातील खंबाटकी घाट, ठाणे-भिवंडी बायपास ४ लेन प्रोजेक्ट, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, पुणे-सोलापूर, ठाणे-घोडबंदर, पुणे-नाशिक असे अनेक महत्त्वाचे बीओटी प्रोजेक्ट पूर्ण केले आहेत. राज्याबाहेर देखील आयआरबीचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. राज्याबाहेर, सुरत-दहिसर, जयपूर-देओली, भरूच-सुरत, ओमाल्लूर-सालेम-नमाक्कल, पठाणकोट-अमृतसर हे बीओटी प्रकल्प रवींद्र म्हैसकरांच्या ताब्यात आहेत. या प्रकल्पांच्या कामांमुळं वीरेंद्र डी. म्हैसकर, रस्ता विकास व्यवसायातील सर्वाधिक मागणी असलेले व्यक्ती बनले आहेत. कंपनीने आता हायवे इन्फ्रास्ट्रक्चरमधील आणखी एक व्यवसाय मॉडेल एचएएम (हायब्रिड ऍन्युइटी मॉडेल)मध्ये प्रवेश केला आहे.
२०११मध्ये आयआरबीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र डी. म्हैसकर यांची सीएनबीसीटीव्ही १८ इंडिया बिझिनेस लीडर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. पुरस्कारांच्या सहाव्या आवृत्तीमध्ये त्यांना ‘यंग तुर्क ऑफ द इयर’ हा पुरस्कार देण्यात आला. तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते म्हैसकरांना हा सन्मान मिळाला होता.
म्हैसकरांच्या नेतृत्त्वात आयआरबीनं दोनदा सीएनबीसीटीव्ही १८ इस्सार स्टील इन्फ्रास्टक्चर एक्सलन्स अवॉर्ड जिंकलेला आहे. फोर्ब्स या जगप्रसिद्ध मासिकानं वीरेंद्र म्हैसकरांचा समावेश भारतातील सर्वात श्रीमंत १०० व्यक्तींच्या यादीमध्ये केला आहे.
आपल्या कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर असताना वीरेंद्र म्हैसकर २०१२मध्ये वादात सापडले होते. तेलंगणातील आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या खुनाच्या प्रकरणात त्यांचं नाव आलं होतं. सतीश शेट्टी हे पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गालगतच्या जमीन बळकावण्याच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा शोध घेत होते. १३ जानेवारी २०१० रोजी त्यांची चाकूनं भोसकून हत्या करण्यात आली होती. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या कामाचं कंत्राट म्हैसकर यांच्या आयआरबी कंपनीकडे होतं. त्यामुळं त्यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय सीबीआयला होता. सीबीआयनं मे २०१२ मध्ये म्हैसकरांना समन्स बजावून चौकशीसाठी बोलावलं होतं.
तपासादरम्यान सीबीआयनं वीरेंद्र म्हैसकर यांच्यासह कंपनीतील काही अधिकाऱ्यांना पॉलीग्राफ चाचण्याही केल्या होत्या. सीबीआयनं एप्रिल २०१८ मध्ये या प्रकरणाची फाईल बंद केली. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकिय संचालक वीरेंद्र म्हैसकर आणि इतर सर्व अधिकाऱ्यांना सीबीआयनं क्लीन चिट दिली.
या प्रकरणामध्ये वीरेंद्र म्हैसकरांचा समावेश होता की नाही याबाबत अद्यापही संशय आहे. मात्र, त्यांनी याचा परिणाम आपल्या कामावरती होऊ दिला नाही.
मराठी माणूस देखील यशस्वीपणे व्यवसाय करू शकतो किंबहुना तो यशाच्या शिखरावरही नेऊन ठेवू शकतो, हे वीरेंद्र म्हैसकर यांनी सिद्घ करून दाखवलं आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.