आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आपला भारत देश विविधतेने समृद्ध आहे. धर्म, प्रांत, भाषा, आहार, वेशभूषा इ. सर्वच बाबतीत आपल्याला बऱ्याच ठिकाणी वेगळेपणा जाणवतो. एवढी विविधता असलेला देश संपूर्ण जगाच्या पाठीवर क्वचितच दुसरा एखादा असेल. ‘हिंदू मुस्लिम सीख ईसाई, सब है भाई भाई’ असं म्हणत सर्व जातीधर्माचे लोक इथं आनंदानं एकत्र राहतात. प्रत्येक धर्माची आपली अशी तत्वं, श्रद्धास्थानं असतात.
आपल्या हिंदू धर्मात जसं काशी, मथुरा, अयोध्या, द्वारका किंवा महाराष्ट्रातील अष्टविनायक, देवीची साडेतीन शक्तिपीठं, समर्थ रामदास स्वामींचे अकरा मारुती अशी वेगवेगळी धार्मिक श्रद्धास्थानं आहेत, तशीच ती इतर धर्मांमध्येसुद्धा आहेत. त्यापैकी शीख धर्माच्या पाच प्रमुख स्थानांबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
शीख लोक म्हटलं की आपल्या नजरेसमोर येतात ते उंच, धिप्पाड, भरपूर केस-दाढीवाले, पगडी घातलेले सरदारजी आणि घोळदार सलवार कमीजवर ओढणी घेतलेल्या, केसांची लांबलचक वेणी घातलेल्या गोऱ्यापान स्त्रिया. ‘सत श्री अकाल’, ‘वाहे गुरुजी दा खालसा’ वगैरे वाक्यं आपण त्यांच्याकडून नेहमीच ऐकत असतो. त्यांचे ‘सरसो दा साग’, ‘मक्के दी रोटी’, ‘आलू पराठा’, ‘लस्सी’ वगैरे पदार्थ तर जगभर प्रसिद्ध आहेत.
गुरुनानक यांनी स्थापन केलेला हा शीख समाज मुळातच गुरुभक्त. शीख धर्माला अत्यंत समृद्ध अशी गुरुपरंपरा लाभली आहे. गुरुंनाच सर्वोच्च स्थानी मानणारे हे लोक. शीख समुदायात पाच ठिकाणांना अत्यंत पवित्र स्थान म्हणून मानलं जातं. त्यांच्या भाषेत ‘पंज तख्त’ असा त्यांचा उल्लेख करण्यात येतो. तख्त म्हणजे अधिकाराचं आसन. हे पाच तख्त म्हणजे पाच गुरुद्वारा आहेत.
जाणून घेऊया नेमकी कोणती आहेत ती पाच पवित्र ठिकाणं –
तख्त श्री अकाल साहिब
शीख धर्माचं सर्वोच्च स्थान असलेल्या पंजाबच्या अमृतसर येथील सुवर्णमंदिराच्या समोर काही अंतरावरच हे ठिकाण आहे. पाच तख्तांपैकी सर्वात जुनं ठिकाण म्हणून याचा उल्लेख केला जातो. शिखांचे सहावे गुरू हरगोबिंद यांनी १६०६ साली याची स्थापना केली. अकाल तख्त म्हणजे देवाचं आसन. सुवर्णमंदिर हे अध्यात्मिक मार्गदर्शनासाठी तर अकाल तख्त हे दैनंदिन जीवनात अडचणींवरती न्याय मिळण्यासाठी आहे, असं मानलं जातं.
सुवर्णमंदिरापासून या ठिकाणापर्यंत येण्यासाठी रस्ता आहे. याचं मूळ नाव अकाल बंगा असं होतं. गुरू हरगोबिंद यांचं बालपण याच परिसरात गेलं होतं. जेव्हा त्यांनी आपल्या भावांसोबत मिळून याची स्थापना केली, त्यावेळी त्यांनी अध्यात्मिक (पीरी) व सांसारिक (मीरी) अधिकारांचं प्रतीक म्हणून दोन तलवारी घातल्या. महाराजा रणजीतसिंग यांचे सेनापती हरीसिंग नलवा यांनी या ठिकाणाला सोन्याचा मुलामा दिला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात झालेल्या ऑपरेशन ब्ल्यू स्टार च्या वेळी भारतीय लष्कराने सुवर्णमंदिरावर हल्ला केला, त्यात अकाल तख्तचं नुकसान झालं होतं.
तख्त श्री केशगढ साहिब
पंजाब-हिमाचल सीमेजवळ पंजाबच्या रुपनगर जिल्ह्यात सतलज नदीच्या काठावर शिवालिक टेकड्यांच्या रम्य परिसरात हे ठिकाण आहे. आनंदपूर या ठिकाणी असल्याने याला आनंदपूर साहिब असंही म्हणतात. याची स्थापना १६६५ मध्ये शिखांचे नववे गुरू तेगबहादूर यांनी केली. ते त्याआधी कीरतपूर येथे राहत होते, पण काही मतभेदांमुळे ते तिथून माखोवाल या गावी जाऊन राहिले. १६७५ साली औरंगजेबाच्या आदेशानुसार सक्तीनं इस्लाम धर्म स्वीकार करायला लावला जात असताना गुरू तेगबहादूर यांनी त्याला नकार दिला म्हणून त्यांची छळ करून हत्या करण्यात आली.
शिखांचे दहावे गुरू गोबिंदसिंग यांनी १६९९ साली याच ठिकाणी खालसा पंथाची स्थापना केली.
मुख्य गुरुद्वाराशिवाय या परिसरात इतरही अनेक ऐतिहासिकमहत्त्वाचे गुरुद्वारा आहेत.
तख्त श्री दमदमा साहिब
याला तख्त श्री दरबार साहिब किंवा फतेहगढ साहिब असंही नाव आहे. तात्विक अधिकाराचं स्थान म्हणून हे ओळखलं जातं. पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यात तलवंडी साबो इथं हे ठिकाण आहे. गुरू गोबिंदसिंगांनी युद्धकाळात इथं विश्रांतीसाठी मुक्काम केला होता, म्हणूनच हे स्थान दमदमा साहिब म्हणून ओळखतात. गुरू गोबिंदसिंगांनीच ‘गुरू की काशी’ म्हणून याला गौरवलं आहे. याच ठिकाणी शिखांच्या गुरू ग्रंथ साहिबची निर्मिती झाल्याचं म्हटलं जातं.
तख्त श्री पाटणा साहिब
शिखांचे दहावे गुरू गोबिंदसिंग यांचं जन्मस्थान असलेलं हे ठिकाण बिहारची राजधानी पाटणा इथं असून त्याला तख्त श्री हरमंदिर साहिब या नावानेही ओळखलं जातं. इथंच गुरू गोबिंदसिंग यांचा जन्म २२ डिसेंबर १६६६ रोजी झाला. आनंदपूरला जायच्या आधीची काही वर्षं ते इथं राहत होते. या ठिकाणाला साक्षात गुरुनानक तसंच गुरू तेगबहादूर यांनी भेट दिलेली आहे. महाराजा रणजीतसिंग यांनी हा गुरुद्वारा उभारला.
तख्त श्री हजूर साहिब
गुरू गोबिंदसिंग यांची समाधी असलेलं हे ठिकाण तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब या नावानेही प्रसिद्ध आहे.
इतर चारही तख्त उत्तर भारतात आहेत, पण हे एकच ठिकाण असं आहे, जे आपल्या महाराष्ट्रात नांदेड इथं आहे. महाराजा रणजीतसिंग यांच्या विनंतीवरून सिकंदर जाह व असफ जाह (तिसरा) यांनी अठराव्या शतकात हा गुरुद्वारा गोदावरीच्या काठावर बांधला.
याच ठिकाणी गुरू गोबिंदसिंग यांनी घोषणा केली की, त्यांच्या पश्चात गुरू ग्रंथसाहिबलाच गुरू मानण्यात यावं. गुरू गोबिंदसिंगांनीच अबचलनगर हे नाव या ठिकाणाला दिलं. २००८ साली ऑक्टोबर महिन्यात गुरू ग्रंथसाहिबच्या गुरुपदाला ३०० वर्षं पूर्ण झाली, त्यानिमित्त इथे एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेव्हाचे भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग देखील यावेळी उपस्थित होते. या गुरुद्वाराच्या परिसरात असलेल्या बागेत एका लेझर शो द्वारे शिखांची गुरुपरंपरा दाखवली जाते. याशिवाय परिसरामध्ये ऐतिहासिक महत्त्व असलेले इतरही काही गुरुद्वारा आहेत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.