आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
गावाच्या वेशीजवळ किंवा गावातील मंदिराच्या परिसरात काही छोट्या शिळा आढळतात. ज्यावर काही ऐतिहासिक प्रसंग कोरलेले असतात. या छोट्या शिल्पांना विरगळ म्हटले जाते.
यावर गावातील शूर वीरांच्या कथा कोरलेल्या असतात आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त केलेला असतो. या छोट्या शिल्पांतून त्या गावाला असणारा इतिहास समजून घेता येतो.
प्राचीन काळी राजेराजवाड्यांमध्ये होणाऱ्या युद्धामध्ये धारातीर्थी पडलेल्या सामान्य सैनिकांच्या कोरलेल्या आठवणी म्हणजे हे विरगळ.
पराक्रमी सरदार, उमराव, राजे यांचा इतिहास तर आपण वाचतोच. पण, याच राजांसाठी आपले प्राण तळहातावर घेऊन प्राणांची आहुती देणारे असंख्य सैनिक होते. ज्यांची कागदोपत्री कुठेच नोंद नाही. अशा वीरांची दाखल या विरगळीच्या माध्यमातून घेण्यात आली.
महाराष्ट्र तसेच कर्नाटकात असे असंख्य विरगळ आढळतात.
पण, या विरागळांंबाबत लोकांमध्ये नेमकी माहिती नसल्याने त्याबाबत उदासीनता असल्याचे दिसून येते. युद्धात विरमरण आलेल्या योध्यांच्या सन्मानार्थ त्या गावचे गावकरी किंवा त्या योध्याच्या कुटुंबियांकडून अशा विरगळी बनवल्या जात असत.
यातील बऱ्याच विरगळ या यादवकालीन किंवा शिलाहार कालीन आहेत, असे मानले जाते. पाचव्या ते तेराव्या शतकात हे विरगळ निर्माण करण्यात आले. परंतु, पुरातत्वखात्याने अशा विरगळांच्या संवर्धनासाठी कोणतीही योजना आखलेली नाही. त्यामुळे यातील काही विरगळ आज दुरवस्थेला पोहोचलेत.
गावकऱ्यामध्येही या विरगळांबाबत योग्य जागृती नसल्याने त्यांच्याकडूनही या शिल्पांची प्रचंड हेळसांड होते आहे.
पण, पुण्यातील काही तरुणांनी या विरगळांची माहिती घेऊन त्याच्या संवर्धनाचा विडा उचलला आहे. उच्च शिक्षित तरुणांनी स्वयंस्फूर्तीने हे काम हाती घेतले आहे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. आठवड्याच्या सुट्टीदिवशी पुण्याच्या आसपासच्या गावातून फिरून त्यांनी असे काही विरगळ जमा करून त्यांचे जतन करत आहेत.
स्वराज्याचे शिलेदार आणि रायगड परिवार अशा दोन संघटनेतील तरुण इतिहासाचा हा वारसा जपण्यासाठी धडपडत आहेत.
पुणे परिसरातील मुळशी, मावळ आणि हवेली अशा गावातून फिरत असताना या तरुणांना या शिल्पांनी आकर्षित केले. थोडा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या हे लक्षात आले की, हे दगड काही साधी सुधे दगड नसून त्यावर काही ऐतिहासिक मजकूर, कथा, प्रसंग यांचे वर्णन केले आहे.
या शिळांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केल्यास त्यावरील मजकुराचा अर्थ कळू शकतो. जो आपल्या इतिहासातील अनेक लपलेल्या गोष्टी शोधून काढण्यासाठी उपयोगी ठरू शकतो. एकट्या मुळशी गावातूनच त्यांनी असे जवळपास ७० विरगळ जमा केले आहेत.
सुदैवाने हे विरगळ चांगल्या अवस्थेत आहेत. या विरगळांचे जतन अजून चांगल्या पद्धतीने व्हावे म्हणून हा गट सामान्य लोकांमध्येही त्यांची माहिती देऊन जागृती घडवून आणत आहे. अनेक ठिकाणी हे विरगळ जमिनी खाली गाडले गेले आहेत. गावातील लोकांना जरी असे विरगळ सापडले तर, ते या तरुणांना फोनवरून माहिती देऊन त्यांना बोलावून घेतात.
पुण्याच्या आसपासच्या परिसरात अशा विरगळांंबद्दल योग्य माहिती नसल्याने चुकीच्या पद्धतीने हाताळले जात आहेत. काही ठिकाणी असे विरगळ कपडे धुण्याचा दगड म्हणून वापरले जात आहेत तर, काही ठिकाणी दोन घरातील बांध दर्शवण्याची खून म्हणून वापरला जात आहे.
काही ठिकाणी तर शेंदूर, तेल, हळद-कुंकू वाहून या विरगळांची पूजा देखील केली जाते. त्यामुळे या विरगळांची झीज होत आहे.
ऐतिहासिक विरगळांची दुरवस्था बघवत नसल्यानेच या तरुणांनी शासकीय मदतीची अपेक्षा न करता किंवा शासन दरबारी गाऱ्हाणे न मांडता स्वतःहून त्यांचे जतन करण्याची जबाबदारी उचलली आहे.
या विरगळाचे चार भाग दिसतात.
सर्वात खालच्या भागात वीरमरण आलेल्या योध्याचे शिल्प कोरलेले आहे. त्याच्यावरच्या भागात युद्धाचे चित्र आहे. त्यावर भागात त्या योद्ध्याला स्वर्गगती प्राप्त झाली असून तो भगवान शिवाची आणि पार्वतीची पूजा करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. आणि सर्वात वर कलश किंवा चंद्र सूर्य कोरण्यात आले असून यातून असा संदेश दिला आहे की, जोपर्यंत जगात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत या योध्यांचे स्मृती अजरामर राहील.
काही विरगळांवर सामाजिक-राजकीय प्रसंगही कोरण्यात आले आहेत. चोर दरोडेखोर यांच्यापासून गावाची रक्षा करणाऱ्या शूर स्त्री-पुरुषांच्या कथाही यामध्ये कोरण्यात आल्या आहेत. काही विरगळ हे ज्या वीरांच्या स्मरणार्थ कोरण्यात आले असतील त्या योध्याच्या जीवनातील काही महत्वपूर्ण प्रसंगही दर्शवतात. तत्कालीन सती प्रथेचेही चित्रण काही विरगळांमधून दिसते.
महाराष्ट्राच्या प्राचीन कालखंडाचा विस्तृत इतिहास या विरगळांमधून सापडू शकतो. म्हणूनच हे विरगळ जतन करून त्यांचा अभ्यास केला पाहिजे. यातील काही विरगळांवर मराठी आणि संस्कृत मिश्रित लेखनही करण्यात आले आहे.
सरकारी पातळीवर मात्र या विरगळांच्या संवर्धनाबाबत प्रचंड उदासीनता दिसून येते. या वीरगळांचे संवर्धन करण्यासाठी सरकारी पातळीवर फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. किमान नागरीकांमध्ये या विरगळांबद्दल जागृती घडवून आणून त्यांचे योग्य पद्धतीने जतन कसे करावे याबाबत जागृती घडवून आणली तरी गावोगावचा हा ऐतिहासिक ठेवा जपला जाऊ शकतो.
विरगळ म्हणजे काय? ते कशासाठी उभे करण्यात आले? त्यांच्यातून आपल्या प्रादेशिक इतिहासात कोणती भर घातली जाते? त्यांची रचना कशी आहे? अशा अनेक गोष्टींवर प्रबोधन केले जाऊ शकते. ज्यातून सामान्य लोकही या विरगळांकडे एक ऐतिहासक ठेवा म्हणून पाहतील.
महाराष्ट्रातील अनेक गावातून असे विरगळ सापडतात. त्यातून त्या प्रदेशातील स्थानिक लोकांच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकला जाऊ शकतो. विरगळांचे जतन करणारे तरुणांचे स्वयंस्फुर्त गट स्थानिक पातळीवर उभे केल्यास या इतिहासाचे जतन आणि संवर्धन चांगल्या प्रकारे होऊ शकते. यासाठी तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला पाहिजे.
आजही यातील अनेक विरगळ सुस्थितीत आहेत. त्यामुळे आजच या विरगळांचे जतन करून ठेवल्यास पुढच्या पिढ्यांनाही हा इतिहास समजून घेणे सोपे जाईल आणि स्थानिक इतिहास समृद्ध होण्यास हातभार लागेल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.