आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
युद्ध मग ते कुठलेही असो, त्याच्याशी खूप साऱ्या रोमांचक, साहसी, हजरजबाबी, धैर्य, कुशलता, नेतृत्व आणि बौद्धिक कसोटी पाहणाऱ्या कथांनी भरलेले असते.
अशा कथा नेहमीच आपल्याला प्रेरणा देत राहतात. कोणत्याही काठीण प्रसंगातही थोड्याश्या धीराने, संयमाने आणि आत्मविश्वासाने काही निर्णय कसे आपल्याला त्या प्रसंगातून बाहेर पडण्यास मदत करू शकतात, याची अनेक उदाहरणे अशा युद्ध कथांमध्ये आपल्याला सापडू शकतात.
उलट, आपल्या ताकदीचा फाजील आत्मविश्वास आणि आत्मप्रौढी कशी रसातळाला पोचोवू शकते, हेही या कथा आपल्याला सांगत असतात.
एकूण युद्ध कथा या आपल्याला मानवी अहंकारातून निर्माण होणाऱ्या क्रौर्यातून किती मोठा संहार उद्भवू शकतो आणि संपूर्ण मानवजातीवर आणि येणाऱ्या पिढ्यांवर त्याचे किती दूरगामी दूष्परिणाम होऊ शकतात, हे देखील सांगत असतात. पण, समोर ठाकलेल्या प्रसंगाशी दोन हात करण्याची वेळ तर प्रत्येकावरच येते त्यासाठी हातात शास्त्र घेऊन मैदानात उतरलेच पाहिजे, असं अजिबात नाही.
असेच एक ऐतिहासिक युद्ध १९१७ साली भारत आणि पाकिस्तानमधे झाले होते. पूर्व पाकिस्तानच्या या स्वातंत्र्यलढ्यात भारताने ऐतिहासिक विजय मिळवला आणि पाकिस्तानपासून बांग्लादेश स्वतंत्र झाला.
१६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तान सैन्याने शरणागती पत्करल्याचे जाहीर करताच, या युद्धाला पूर्णविराम मिळाला.
३ डिसेंबर १९७१ रोजी या युद्धाला तोंड फुटल्यानंतर, पश्चिम आणि पूर्व भागात दोन्हीकडे विमानहल्ले सुरु करण्यात आले. या लढाईत विजय मिळवून देण्यात या भारतीय हवाईदलाचे योगदान फारच मोलाचे होते.
हवाई दलाच्या ४४ स्क्वॅड्रन या तुकडीला नंतर एक महावीर चक्र आणि तीन वीरचक्र प्रदान करून त्यांच्या शौर्याचा गौरव करण्यात आला.
गुवाहाटीच्या विमानतळावर कॅरीबौ वाहतून विमानाची एक तुकडी होती. आता हे विमान लष्करी सेवेतून निकामी करण्यात आले आहे. या वाहतूक विमानच्या सहाय्याने प्रत्यक्ष युद्धभूमीवर सैन्याला लागणारी इतर कुमक आणि तरतुदी पुरवण्याची तसेच संकट काळी सैन्याची सोडवणूक करण्याची जबाबदारी होती.
या विमानाची गती फक्त २१६ मी/तास. इतकीची होती. तरीही थोड्या थोड्या अंतरावर लँडींग करण्याची क्षमता या विमानात होती. ३ आणि ४ डिसेंबर रोजी पाकिस्तानी सैन्याने हल्ले सुरु केल्यानंतर भारतीय नौदलाला देखील प्रत्यक्ष युद्धात उतरावे लागले.
६ डिसेंबर रोजी, धाक्याच्या तेजगांव विमानतळावरुन पाकिस्तानी वैमानिकांना सब्रे लढाऊ विमाने उडवता येऊ नयेत म्हणून त्या विमानतळाच्या धावपट्टीवर मोठ मोठे खड्डे खोदण्यात आले. दुसऱ्या दिवशी रात्री पाकिस्तानी सैन्याने हे खड्डे भरून काढले आणि धावपट्टीची दुरुस्ती करून घेतली.
भारतीय सैनिकांनी पुन्हा तिथे काही खड्डे निर्माण केले. आता ती धावपट्टी अजिबात दुरुस्तच करता येऊ नये आणि विमानांचे उड्डाण रोखण्यासाठी या धावपट्टीवर सतत बॉम्ब हल्ले सुरु ठेवणे आवश्यक होते.
तेव्हा ग्रुप कॅप्टन व्ही. सी. मान्कोटीया यांनी या कॅरीबौ वाहतूक विमानालाच बॉम्बर बनवण्याची कल्पना मांडली.
कॅप्टन मान्कोटीया यांची १९७० च्या सुमारास गुवाहाटीजवळील बोरझार येथील हवाई दलाच्या तळावर स्टेशन कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी, डकोता, पॅकेट, ऑट्टर, सुपर कान्स्टेलेशन, आयएल-१४, एचएस ७४८ आणि एएन-१२ आणि शेवटी कॅरीबौ अशी सर्व प्रकारच्या वाहतुकीची विमाने चालवली होती.
जेव्हा त्यांनी कॅरीबौ या वाहतूक विमानाचेच बॉम्बर मध्ये रुपांतर करण्याचे ठरवले तेंव्हा सुरुवातीला तरी, ही कल्पना अशक्यप्राय वाटली होती. परंतु, एअर कमांडला या कल्पनेतील हुशारी लक्षात आली आणि त्यांनी या दिशेने प्रयत्न करण्यास अनुमुती दिली.
या कॅरीबौच्या मदतीने पाकिस्तानी वैमानिकांना त्रास देणे आणि त्यांना धावपट्टी दुरुस्त करण्याची संधी न देणे हेच एकमेव उद्दिष्ट होते.
अर्थात, कॅरीबौ चालवणाऱ्या वैमानिकांनी देखील या कल्पनेला पाठींबा दर्शवला आणि त्यांनी ही विमाने रात्रीच्या वेळी शत्रूच्या इलाख्यात उडवण्याची तयारी देखील दाखवली. अर्थात, त्यांना बॉम्बिंग साठी आवश्यक तंत्र शिकून घेणे गरजेचे होते, मात्र त्यांनी त्यासाठी देखील तयारी दाखवली.
७ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या गडद अंधारात चार कॅरीबौ विमाने बॉम्बिंग मिशनवर गेली. त्यांचे लक्ष्य होते, तेजगांव विमानतळ उध्वस्त करणे. अर्थात रात्रीच्या वेळी कॅरीबौ विमाने चालवणे म्हणजे अत्यंत धोकादायक कामगिरी होती.
कारण हे विमान काही लढाऊ विमान नव्हते, त्यात बॉम्बिंगसाठी आवश्यक असणारी कोणतीही सुविधा देखील नव्हती.
विमाने उडवणाऱ्या वैमानिकांना फारच दक्ष राहून ही कारवाई पूर्ण करायची होती. महत्वाचे म्हणजे शत्रूच्या रडारपासून स्वतःला सुरक्षित ठेवायचे होते. अर्थात, या लढाऊ तुकडीला रात्रीच्या अंधारात, पॅराड्रॉप करण्याचा अनुभव होता, पण रात्रीच्या वेळी कोणत्याही खुणा स्पष्ट ओळखू येत नव्हत्या.
ढाक्यापासून जवळच्या अंतरावरूनच या विमानांनी आपल्या उद्देशाला आकार देण्यासाठी ६५०० फुटावर पोचण्याची कसरत सुरु केली. यामुळे विमाने पाडणाऱ्या शत्रूच्या गन्स पासून त्यांना सुरक्षा मिळणार होती.
अर्थात, संपूर्ण मिशन फत्ते होईपर्यंत विमान स्थिर ठेवण्याची गरज होती. कोणतीही गडबडीची हालचाल झाली असती, तर बॉम्ब खाली पडण्याच्या प्रक्रियेत अडथळे आले असते.
सुदैवाची गोष्ट म्हणजे रात्रीच्या अंधारातही तेजगांवची ती धावपट्टी रात्रीच्या अंधारातही स्पष्टपणे ओळखू येत होती. बॉम्ब पडण्यासाठी त्या विमानांजवळ कोणतीच इलेक्ट्रॉनिक साधन नव्हते.
बॉम्ब पडण्यासाठी वैमानिकांनी आपल्या अंदाजानुसारच कामगिरी पार पडली.
प्रत्येक विमानाने गुवाहाटी विमानतळावर परत येण्यापूर्वी, दहा १००० एलबी इतके बॉम्ब त्या धावपट्टीवर पाडले होते. ये मिशन पूर्ण करण्यास कॅरीबौ विमानांना चार तासापेक्षाही जास्त काळाचा अवधी लागला. तरीही मिशन पूर्ण होताच, चारही विमाने सुरक्षितपणे परतली होती. कॅरीबौ विमानांद्वारे पाकिस्तानच्या हवाईदलाला त्रास देणे हाच या मिशन मागचा उद्देश होता.
अर्थात, हा उद्देश सफल करण्यात त्यांना यश आले होते. त्या रात्री पाकिस्तानी हवाईदलाची अक्षरश: झोप उडाली होती. पाकिस्तानी हवाई दलाला रात्रभर थोडी देखील उसंत मिळाली नव्हती.
या मिशन मध्ये विंग कमांडर सेन, व्हीपीएस गील, देलींदर कोहली आणि राजेश पायलट या बहाद्दूर वैमानिकांचा सहभाग होता.
अशाच पद्धतीने सलग तीन रात्री तेजगांव धावपट्टी आणि विमानतळाच्या परिसरात बॉम्ब हल्ले करण्यात आले. ब्राह्मबांरीया येथील पाकिस्तानी ब्रिगेडच्या तळावर देखील दोन रात्री हल्ले करण्यात आले.
धीम्या गतीने उडणाऱ्या आणि खास फक्त वाहतुकीसाठी बनवण्यात आलेल्या अशा विमानांच्या सहाय्याने शत्रूच्या प्रदेशात घुसून उंचावरून बॉम्ब हल्ला करण्याची ही कल्पनाच इतकी धोकादायक होती, की नुसत्या कल्पनेनेही एखाद्याची झोप उडाली होती.
पण, कॅरीबौच्या या यशस्वी हल्ल्यांनी भारताच्या विजयाचा रस्ता सुकर केला, नव्हे तर या विमानाच्या या हल्ल्यानीच भारताकडे विजयश्री खेचून आणली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
मोक्याच्या क्षणी आत्मविश्वास ढळू न देता, आपल्या कल्पनेवर दृढश्रद्धा ठेवत आणि त्यासाठी धैर्य दाखवत या वैमानिकांनी जीवाची बाजी लावून दाखवलेले हे अतुलनीय शौर्य पाहून डोळे विस्फारल्या शिवाय राहत नाहीत.
भारतीय हवाई दलाने कॅप्टन मान्कोटीया यांच्या या शौर्याची दाखल घेत त्यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कॅरीबौ सारख्या विमानांचा लढाऊ विमानाप्रमाणे युद्धात वापर करणे ही कल्पनाच मोठी सहसाची होती, ज्यात यश देखील आले.
१६ डिसेंबर १९७१ रोजी या युद्धाला पूर्ण विराम मिळाला असला, तरी, या युद्धातील भारतीय हवाईदलाची भूमिका आणि कार्य अत्यंत अतुलनीय होते. भारतीय हवाईदलाच्या साहसी प्रयत्ना मुळेच भारताला हा विजय मिळवणे सहज शक्य झाले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.