आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
जगाच्या इतिहासात अनेक युद्धं होऊन गेली आहेत. कित्येक युद्धांचे दीर्घकालीन परिणाम आपण पाहिलेले आहेत. आज आपण अशाच काही युद्धांबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे जगाचा इतिहासच बदलून गेलाय पण, या युद्धांबद्दल आजही फार कमी लोकांना माहिती असेल.
त्सुशिमाचे युद्ध १९०५
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जपानची महत्त्वाकांक्षा वाढली होती. त्याला मांचुरिया आणि कोरिया यांच्यात विभाजन घडवून दोन स्वतंत्र, पण प्रभावी गट निर्माण करायचे होते. परंतु रशियाला त्यांची ही कल्पना अजिबात आवडली नाही आणि रशियाने त्यांच्या या कामात खोडा घातला. याचा सूड उगवण्यासाठी जपानने ८ फेब्रुवारी १९०४ रोजी आर्थर बंदरावरील रशियन सैन्यावर हल्ला केला.
अचानक झालेल्या या हल्ल्याला तोंड देण्यास रशियन सैन्य सज्ज नव्हते आणि या युद्धात त्यांचा पराभव झाला. यानंतरही रशियाने जपानची खरी ताकद ओळखली नाही. एकामागून एक पराभव त्यांच्या वाट्याला येत गेले.
आर्थर बंदर तर जपानच्या ताब्यात गेलेच पण, रशियन सैन्याचेही बरेच नुकसान झाले. एकामागून एक पराभवांची मालिका सुरु असतानाही रशियन झार निकोलस दुसरा याला मात्र रशियाच्या बाल्टिक सैन्यावर खूप भरोसा होता. रशियन ऍडमिरल झिनोवी रोझेसट्वेंस्की जपानच्या ऍडमिरलला त्याच्या पायावर लोळण घायला भाग पाडेल अशी स्वप्नं ते पाहत होते. परंतु त्सुशिमा समुद्रधुनीमधे सुरु झालेल्या या युद्धात दोनच दिवसात रशियाची तीन जहाजे पाली पडली.
संपूर्ण जग दोन्ही देशातील युद्धांचा हा तमाशा फक्त पाहत होते. त्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट यांनी रशियाची समजूत काढली आणि दोन्ही देशात सामंजस्य करार घडवून आणला. या करारानुसार जपानची कोरियावरील सत्ता रशियाला मान्य करावी लागली आणि आर्थर बंदर जपानकडे सुपूर्द करावे लागले. याशिवाय, सखालीन इस्लानचा काही भाग आणि लीओतुंग पेनिन्सुलाचा प्रदेशही जपानला द्यावा लागला.
या युद्धात विजय मिळाल्यानंतर जपानकडे पहाण्याचा दृष्टीकोनच बदलून गेला. जपान एक आधुनिक सत्ताधारी देश म्हणून स्वतःची ओळख सिद्ध करू पाहत होता. जपानच्या विस्तारवादी महत्त्वाकांक्षा याच काळात वाढल्या.
१०६६ सालचे हास्टिंगचे युद्ध
हास्टिंगचे युद्ध हे नॉर्मंडीच्या ड्युक विल्यम आणि इंग्लडचा राजा हेरॉल्ड गॉडविन्सन यांच्यामधे लढले गेले. १२ ऑक्टोबर १०६६ साली राजा हेरॉल्ड गॉडविन्सनचे सैन्य सेन्लॅक हिलजवळ तळ ठोकून बसले होते. एका युद्धावरून नुकतेच परतलेले हे सैन्य खूप थकून गेले होते. परंतु, नॉर्मंडीच्या ड्युकने हल्ला केल्यावर युद्ध सुरु झाले तेंव्हा ते आपल्याभोवती संरक्षक भिंत निर्माण करून आपल्या पारंपारिक पद्धतीने लढू लागले. शत्रू सैन्य ताज्या दमाचे होते आणि त्यांच्याकडे मजबूत घोडदळ आणि पायदळ होते.
पहिल्या दिवशी संपूर्ण दिवसभर युद्ध सुरूच होते परंतु हेरॉल्ड गॉडविन्सनच्या सैन्याचे काहीच नुकसान झाले नव्हते. परंतु दिवस संपला आणि सैन्याचा वेढा सैल झाला.
नॉर्मन्सनी इंग्लिश सैन्य ढिले पडल्याचे पहिले आणि त्यांनी पूर्वकल्पना नसताना निश्चिंत असलेल्या गॉडविन्सनच्या सैन्यावर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यात गॉडविन्सनच्या सैन्याचा पाडाव झाला. खुद्द गॉडविन्सनदेखील या हल्ल्यात मृत्युमुखी पडला. एकामागून एक करत सर्व इंग्लिश सैनिकांना मारून टाकण्यात आले.
या युद्धाने युरोपचा इतिहासच बदलून गेला. इंग्लंडवर परकीय आक्रमकांची सत्ता स्थापन झाली ज्यामुळे त्यांच्या समाजिक आणि राजकीय जीवनातही अमुलाग्र बदल झाले.
लेचफेल्डचे युद्ध (९५५)
हंगेरीच्या लुटारूंनी मध्य युरोपात प्रचंड लुटालूट सुरु केली होती. यांच्या दहशतीने लोक स्वतःहून स्वतःजवळचे दागिने किंवा पैसे देऊन टाकत. अशा या हंगेरी लुटारूंना फ्रँक्स म्हणजेच चार्लमॅग्नेच्या पूर्वेकडील प्रदेशातही खूप रस होता. या प्रदेशात जर अंतर्गत वाद उफाळलाच तर हे मॅग्योर म्हणजेच हंगेरी लुटारू या प्रदेशवर हल्ला करण्यास सज्ज होते.
९३६ मधे ओट्टो नावाचा एक सॅक्सन नेता इस्ट फ्रँक्स आणि सॅक्सन यांच्या वतीने गादीवर बसला. आपण चार्लमॅग्नेचे खरे वंशज आहोत असा त्याचा दावा होता. हळूहळू ओट्टो एक हुकुमशहा झाला त्याच्या जुलुमाने इस्ट फ्रँक्स आणि सॅक्सन जनता त्रस्त झाली.
ओट्टोचा मुलगा लुईडॉल्फ ऑफ सर्बिया यानेच एक दिवस आपल्या पित्याच्या या हुकुमशाहीविरोधात बंड पुकारले. ओट्टोला त्याच्या घरातूनच विरोध होतो आहे हे पाहून राज्यातील अनेक छोटे सरदार या बंडखोरीत सामील झाले. लुईडॉल्फ ऑफ सर्बियाला त्याच्या मेव्हण्याचाही पाठींबा होता. यामुळे इस्ट फ्रँक्समध्ये अंधाधुंदीचे वातावरण तयार झाले आणि अशा परिस्थितीत हंगेरी लुटारूंनी म्हणजेच मॅग्योरनी देखील आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला. ९५४ मधे त्यांनी फ्रांकोनिया आणि बव्हारियामधे हल्ला केला. इथे त्यांनी प्रचंड लुटालूट माजवली. बरगंडी, फ्रांस आणि लोंबार्डीमध्येही त्यांनी उच्छाद मांडला.
परंतु, ओट्टोच्या सैनिकांनी या सगळ्याला जशास तसे उत्तर दिले. मॅग्योर गटातील शेवटचा सैनिक संपत नाही तोपर्यंत त्यांनी लढाई सुरूच ठेवली. तीन दिवसात अगदी एकेका मॅग्योरला त्यांनी शोधून शोधून मारले आणि हे युद्ध संपले. मॅग्योर लोकांची दहशत तर संपलीच, पण त्यामुळे ओट्टो शक्तिशाली राजा म्हणून पुढे आला. ९६२ मधे बारावा जॉन याने ओट्टोला रोमचा सम्राट घोषित केले. ओट्टोने रोमन साम्राज्याला नवसंजीवनी तर दिलीच, पण त्याने आजच्या जर्मनीचाही पाया घातला.
मेटॉर्सचे युद्ध (इसपू २०७ )
इसपू २०७ मधे झालेल्या या मेटॉर्सच्या युद्धामुळे रोमन साम्राज्याला एक नवी दिशा मिळाली. त्यावेळी रोम आणि कार्थेज या जगातील दोन महासत्ता होत्या. दुसऱ्या पुनिक युद्धाच्या काळातच हे छोटेसे युद्ध होऊन गेले.
कॅर्थागो हस्दृबल बरका हा कॅर्थागो सैन्याचे नेतृत्व करीत होता. तर जीअस क्लॉडिअस निरो आणि मार्कस लीव्हीयस हे रोमन सैन्याच नेतृत्व करीत होते. दोन्ही सैन्य पराक्रमी, मेहनती आणि शिस्तबद्ध होते. रोमने यातील तिन्ही युद्धे जिंकली होती. या युद्धात कार्थाजीनीयस राज्याचे नावच कायमचे मिटले.
युद्धांचा परिणाम हा जितका गंभीर तितकाच दूरगामीही असतो. या चार युद्धांबद्दलची ही माहिती वाचल्यानंतर तुम्हाला हे पटलेच असेल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.