आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
आत्ताची पिढी ही पूर्ण मोबाईलच्या अधीन झाली आहे. या पिढीला पुस्तकांमध्ये डोकं घालण्यापेक्षा मोबाईलचेच जास्ती वेड आहे. मात्र मोबाईल येण्याच्या अगोदरची परिस्थिती वेगळी होती.
टीव्ही आणि मोबाईल येण्याच्या अगोदर कॉमिक्स, महिन्याला प्रकाशित होणारी लहान मुलांची मासिके हाच ९०च्या दशकापर्यंत जन्माला आलेल्या पिढीचा मोठा ठेवा होता. आपल्यापैकी अनेक लोकांना लहानपणी दरमहा प्रकाशित होणारे चंपक, चांदोबा, ठकठक, फुलबाग, फुलपाखरू अशी मासिके आठवत असतील.
परदेशात प्रकाशित होणारी सुपरमॅन, बॅटमॅन, वंडर वूमन अशी मासिकेसुद्धा तेंव्हा मोठमोठ्या मेट्रोपोलीटीन सिटीमध्ये मिळायची. प्रत्येक प्रादेशिक भाषेची स्वत:ची अशी कॉमिक्स बुक्सची शाखा आणि प्रसिद्ध चेहरे देखील होते.
आज मार्व्हेल युनिवर्सनी काढलेल्या ऍव्हेंजर्स नावाची सुपर हिरोजच्या सिनेमांची सिरीज जगभरात प्रचंड गाजते आहे. यामध्ये समावेश असणाऱ्या सुपर हिरोच्या लीगने जगभरातील आबालवृद्धांना वेडे केले आहे. आत्तापर्यंत २२ चित्रपट प्रकाशित झाले आहेत. हे सुपर हिरो कधी काळी अमेरिकेतून प्रकाशित होणाऱ्या मार्वल कॉमिक्सचा भाग होते.
तशीच सिरीज जस्टीस लीग नावाने अमेरिकेच्याच डीसी कॉमिक्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुपरमॅन, अक्वामॅन बॅटमॅन, वंडर वूमन अशा कॅरॅक्टर्सचीसुद्धा निघाली आहे.
ही झाली बाहेरच्या देशातली कहाणी. आपल्या देशात सुद्धा असे कॉमिक्स भरपूर निघालेले आहेत. या कॉमिक्सच्या हिरोनी अनेक वर्षे आपल्याकडे लाखो लोकांचे मनोरंजन करण्याचे काम आहे. जेंव्हा टीव्हीचे युग अवतरले तेंव्हा यातील कॉमिक्समधील पात्रांवर अनेक मालिका दूरदर्शनवर बनवण्यात आल्या.
त्यात प्रामुख्याने सुपरमॅन या इंग्लिश सुपरहिरोच्या कन्सेप्ट वरून बनवलेला शक्तिमान, मिलिंद सोमणचा कॅप्टन व्योम, डीटेक्टीव्ह व्योमकेश बक्षी, चाचा चौधरी अशा अनेक मालिकांचा समावेश होता.
आपल्याकडे ४ वर्षापूर्वी अभिनेता सुशांत सिंगने भारतीय गुप्तहेर व्योमकेश बक्षीला सिनेमाच्या पडद्यावर जिवंत केले होते.
थोडक्यात कॉमिक्स आणि त्यांच्या सुपरहिरोची क्रेझ इतकी वर्षे उलटून गेली तरी प्रचंड आहे नव्हे दिवसेंदिवस ती वाढतेच आहे.
जसे परदेशात आयर्नमॅन, थॉर वगैरे सुपरहिरो होते तसेच आपल्याकडेसुद्धा आपले सुपर हिरो या कॉमिक्सच्या रूपाने आपल्याला मिळाले. त्यापैकी भारतात सर्वात गाजलेल्या अशा कॉमिक्सचा आणि त्यांच्या सुपर हिरोचा इतिहास आपण पाहणार आहोत.
तुलसी कॉमिक्स या नावाने १९९० साली आपल्याकडे कॉमिक बुक्सची एक सिरीज सुरु झाली. याचे मुख्यालय दिल्ली येथे होते आणि दिल्लीमधून हिंदी भाषेत तुलसीचे कॉमिक्स संपूर्ण भारतभर वितरीत होत होते. त्यानंतर यांची वाढती लोकप्रियता पाहून प्रादेशिक भाषेतसुद्धा तुलसी कॉमिक्स नंतर प्रकाशित होऊ लागले. या कॉमिक्सचे आपले असे सुपर हिरो होते.
यात सगळ्यात लोकप्रिय नायक होते अंगारा, जंबू आणि योगा. यांच्या व्यतिरिक्त तौसी, मिस्टर इंडिया, महाबली आकाश, इत्यादी पात्रे या कॉमिक बुकने आपल्या भेटीस आणली होती.
आता खर तर ही पात्रे नवीन पिढीला कळणार नाहीत पण ९० च्या दशकात शालेय शिक्षण घेणारी पिढी हे कॉमिक्स आवर्जून वाचत असे.
तुलसीच्या सुपरहिरोपैकी सगळ्यात यशस्वी ठरलेले सुपरहिरो म्हणजे अर्थात अंगारा, जंबू आणि तौसी.
अंगाराची जन्मकथा देखील त्याच्या नावाप्रमाणेच विलक्षण आहे. आपण जसे अनेकवेळा पाहतो सुपर हिरो हे कुठल्या तरी प्रयोगशाळेमध्ये जन्माला येतात त्यामुळे ते लॅब एक्सपेरीमेंट असतात. अंगारा देखील असाच प्रयोगशाळेत जन्माला आलेला हिरो आहे.
अंगाराद्वीप नावाचे एक काल्पनिक द्वीप आहे ज्याला अमेरिकेच्या आर्मीने घेरले असते. ज्यामुळे या द्वीपावर राहणाऱ्या पशुपक्षी, वन्यप्राणी आणि जंगल संपत्तीला धोका निर्माण होतो. तेव्हा त्यांच्या रक्षणासाठी अंगाराचा जन्म होतो.
अंगाराच्या सगळ्या शक्ती निसर्गातील प्राण्यांपासून आलेल्या असतात.
त्याची नजर गरुडासारखी तीक्ष्ण असते, अंगाराचे काळीज सिंहाचे आहे, त्याची बुद्धी कोल्हयासारखी चतुर आहे, त्याची त्वचा पाणघोड्याची त्यामुळे त्याच्यावर कुठल्याच शस्त्राचा काहीच परिणाम होत नाही.
असा हा अफलातून तयार झालेला सुपरहिरो जंगलाचे आणि तेथे राहणाऱ्या प्राण्यांचे, आदिवासी लोकांचे रक्षण करतो या कल्पनेवर अंगाराच्या कथा आधारित असायच्या.
आपला दुसरा सुपर हिरो म्हणजे जंबू. जंबू हा एक रोबोट आहे. मात्र त्याचे अनेक गुण मानवासारखेच असतात. ज्या शास्त्रज्ञ भावांंला बनवलं असतं ते स्वत:चा मेंदू या रोबोटमध्ये प्रत्यारोपित करतात.
त्यामुळे मानवी भावभावना असणारा हा रोबोट आपल्या शहरात राहणाऱ्या लोकांचे रक्षण करतो अशा कल्पनेवर आधारित जंबूच्या कथा असायच्या.
तुलसीचे अजून एक लोकप्रिय पात्र म्हणजे तौसी.
तौसी हा एक इच्छाधारी नाग असून तो नागलोकाचा राजा आहे आणि पृथ्वीवरील लोकांना वाचवण्यासाठी तो पृथ्वीवर येतो अशी कल्पना घेऊन त्याच्या कहाण्या बनवल्या गेल्या.
योगा नावाचे योगामध्ये प्रवीण असलेल्या हीरोचे देखील पात्र तुलसी कॉमिक्सच्या बऱ्याच कथांमध्ये असायचे.
या व्यतिरिक्त तुलसीच्या स्वत:च्या राणी, राजा, जादुगार, परी, राक्षस इत्यादींंवर आधारित दरमहा वेगवेगळी पुस्तके निघत रहायची.
तुलसी कॉमिक्स ९० च्या दशकात तुफान चालले. दर महिन्याला या कॉमिक्सचा किमान १० पुस्तकांचा सेट निघायचा. त्यातले तीन सेट हे जंबू, अंगारा, तौसी या पात्रावर आधारलेले असायचे.
त्या काळातील मुलांमध्ये या कॉमिक्स ची तुफान क्रेझ असायची. अनेक लोकांच्या बालपणीच्या आठवणी देखील या पात्रांबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत.
पुढे जसजसे टीव्ही, केबल आले तसतसा वाचन संस्कृतीचा ऱ्हास होत गेला, मुलांमधली वाचनाची आवड कमी होत गेली आणि या कॉमिक्सचा खप देखील कमी होत गेला.
तुलसी कॉमिक्स २००४ला पूर्णपणे बंद करावे लागले कारण त्यांचा खप होत नव्हता. अनेक लोक त्यानंतर जुने अंक घरात जपून ठेऊन त्याची पारायणे करतात.
आजही सोशल मिडीयावर या सुपर हिरोंचे स्वत:चे फॅन पेजेस आहेत.
जे भाग्य अमेरिकन सुपर हिरोच्या वाट्याला आल ते भाग्य या मातीतल्या सुपर हिरोंच्या वाट्याला आल नाही हे दुर्भाग्य म्हणावे लागेल.
आजदेखील या सुपरहिरोच्या कल्पनेवर आधारित अनेक उत्तम चित्रपट बनू शकतात. बॉलीवूडने या गोष्टीत आवर्जून लक्ष घालावे अशी तुलसी कॉमिक्सच्या चाहत्यांची मागणी आहे आणि या देशी सुपरहिरोच्या करामती पाहता ही मागणी योग्य आहे असेच वाटत राहते!
कधीतरी या भारतीय सुपर हिरोंच्या कहाण्यांवर चित्रपट येतील अशी आपण आजच्या घडीला अशा व्यक्त करू शकतो हे नक्की!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.