आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
ज्या वयात मुली केसांत गजरे मळायला शिकतात, झोपाळ्यावर झुलायची हौस बाळगतात, अल्लडपणे भातुकलीचा खेळ खेळतात, त्या वयात ती बंदूक धरायला शिकत होती. नेम धरायला शिकत होती. निशाणा साधण्यापेक्षा अवघड होते, ते वेगात मागे सरकणाऱ्या बंदुकीच्या ट्रिगरचा झोत रोखणं. पण, बंदूक चालवायला शिकण्याची तिची जिद्द इतकी तीव्र होती की, आपल्या नाजूक बोटांना तिने कणखर होण्यास भाग पाडले.
वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी बंदूक चालवायला शिकून ही पोर करणार तरी काय होती? कशाला बाळगली तिने या वयात बंदुकीची हौस?
तिला देशासाठी स्वत:ला अर्पण करायचे होते. तिला देश स्वतंत्र झालेला पाहायचा होता. त्यासाठी प्राणांची आहुती देण्याची वेळ आली तर त्यासाठीही ती सिद्ध झाली होती.
१४ व्या वर्षी तिला बंदूक चालवायला शिकायची होती. कारण, मुलीही स्वातंत्र्यलढ्यात मागे नाही तर मुलांच्या बरोबर सामील होऊ शकतात, क्रांतिकारी काम करू शकतात हे दाखवून द्यायचं होतं.
कुठल्याही अल्लड बालिकेप्रमाणे तिलाही आधी अंधाराची भीती वाटत होती. परंतु जसजशी ती क्रांतिकारकांचे विचार वाचत गेली तसतशी तिची भीती कुठच्या कुठे पळाली. १४ व्या वर्षी तेही दिवसाढवळ्या एका ब्रिटीश न्यायाधीशाचा खून करण्यापर्यंत तिचे धाडस पोचले.
कोण होती ही धाडसी बालिका जिने इतक्या लहान वयात इतके धाडसी काम केले?
सुनीती चौधरी.
सुनीती चौधरी भारतातील सर्वात लहान महिला क्रांतिकारक.
बंगालमधील तीप्पेरा येथील एका मध्यमवर्गीय बंगाली कुटुंबात २२ मे १९१७ रोजी तिचा जन्म झाला. १४व्या वर्षी एका क्रूर ब्रिटीश न्यायाधीशाचा खून केल्यानंतर तिच्यावर खटला चालवण्यात आला. सात वर्षांचा तुरुंगवास भोगल्यानंतर वयाच्या २२व्या वर्षी ती जेल मधून बाहेर आली. तेंव्हा एक भाऊ सोडला तर तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार कुणी नव्हतं. पण, ती इतकी शांत होती की, समोर आलेल्या परिस्थितीला खंबीरपणे सामोरे गेली.
भारतीय स्वातंत्र्य लढा शिगेला पोहोचला होता. सविनय कायदेभंगाची चळवळ जोमाने फोफावत होती. पोलिसांची दडपशाहीदेखील तितकीच कठोर होत होती. आंदोलने, मोर्चे यांची तीव्रता वाढत होती. तसे स्त्री-पुरुषांना अटक करण्याचे, त्यांना तुरुंगात डांबण्याचे प्रकारही वाढले होते. आजुबाजूच्या या घटना सुनितीला अधिक निडर होण्यास भाग पाडत होत्या.
प्रफुल्ला नलिनी ब्रह्मा ही तिची मैत्रीण तिला क्रांतीकारकांची पुस्तके वाचण्यासाठी देत असे. या पुस्तकांवर ब्रिटीश सरकारने बंदी घातली होती. देशासाठी प्राण त्याग करणे हेच खरे जीवन – स्वामी विवेकानंदाच्या या शब्दांनीच तिची मानसिक आणि बौद्धिक जडणघडण होत होती. प्रफुल्ला तिला क्रांतीकारकांविषयी, त्यांच्या धाडसी कारवायांविषयी माहिती सांगे. तेंव्हा सुनितीला आपणही क्रांतीकारकांच्या गोटात सामील व्हावे असे वाटत असे.
सुनीती डिस्ट्रिक्ट व्हॉलेंटियर कॉर्प्सची मेजर बनली. नेताजी सुभाषचंद्र बोस शहरातील विद्यार्थी संघटनेला संबोधित करण्यासाठी आले तेंव्हा तिने नेताजींसमोर परेड केली होती.
प्रफुल्लाने नेताजींना विचारले, स्त्रियांच्या स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाबाबत तुमचे मत काय? तेंव्हा नेताजी तिला उत्तर देताना म्हणाले, “तुम्ही पुढे येऊन जर नेतृत्व करत असाल तर मला आनंदच होईल.”
दरम्यान युगांतर नावाच्या एका संघटनेच्या छत्री संघ नावाच्या महिला शाखेशी सुनीती आणि प्रफुल्ला यांचा संपर्क आला. ही संघटना तरुण मुलींना क्रांतीकार्यात सहभागी होण्याचे प्रशिक्षण देण्यात येत असे. यातील शूर आणि धाडसी मुली ज्यांना संघटनेने प्रशिक्षण दिलेले असे त्या क्रांतीकारकांना माहिती, पेपर, शस्त्रास्त्रे, दारुगोळा आणि पैसा पोहोचवण्याचे काम करता.
परंतु, प्रफुल्ला, शांतीसुधा घोष आणि सुनीती चौधरी यांना यापेक्षा काही तरी वेगळे आणि जबाबदारीचे काम हवे होते.
काही वरिष्ठ नेत्यांनी मातर या लहान मुलींचा क्षमतेविषयी शंका व्यक्त केली. यावर सुनीती म्हणाली, “आम्ही जर आमच्या खऱ्या कामापासून दूर गेलो तर सध्या आम्ही हे जे शस्त्रास्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण घेतोय त्याचा उपयोग काय?”
शेवटी बिरेन भट्टाचार्य यांनी या मुलींवर जबाबदारी सोपवण्याचे निश्चित केले. त्यांनी तिघींची परीक्षा घेतली आणि तिघीतही अजोड धाडस असल्याचे घोषित केले.
अखिल चंद्र नंदी यांच्यांवर या तिघींना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सोपवली. त्या शाळा बुडवून मैनामाटीच्या डोंगरात जाऊन बंदूक चालवण्यास शिकत असत.
बंदूक हाताळताना सुनिताला सुरुवातीला त्रास झाला. तिची तर्जनी बंदुकीच्या ट्रिगरपर्यंत पोहोचत नव्हती. ती तर्जनीऐवजी मधले बोट वापरून ट्रिगर दाबायला शिकली.
जिल्हा न्यायाधीश चार्ल्स जॉफ्रे बकलँड स्टीव्हन्सवर त्यांची नजर होती. सत्याग्रह चुरडून टाकण्यासाठी हा माणूस वाटेल ते प्रयोग करण्याची मजल गाठत होता. त्याने सर्व नेत्यांना तुरुंगात डांबले होते. अहिंसक मार्गाने आंदोलन करणाऱ्या प्रत्येक भारतीयाचा त्यांनी छळ चालवला होता. या न्यायाधीशाला जबर शिक्षा करणे गरजेचे होते. शांती आणि सुनीती यांनी ही जबाबदारी उचलली.
१४ डिसेंबर १९३१ चा दिवस. सकाळी दहाच्या सुमारास न्यायाधीशांच्या बंगल्यासमोर टांग्यातून दोन पोरी उतरल्या. त्या काहीतरी बडबडत, हसत, खिदळत होत्या. टांगेवाला त्यांना तिथे उतरवून घाईने पुढे निघून गेला. त्या न्यायाधीश साहेबांच्या बंगल्यातील अंगणात बसून न्यायाधीश साहेब येण्याची वाट बघू लागल्या. बहुतेक थंडी लागू नये म्हणून त्यांनी साडीवर सिल्कचा कोट चढवला होता.
मुली व्हरांड्यात बसल्या आणि दारात उभ्या असलेल्या सेवकाकडून त्यांनी न्यायाधीशांना भेटण्यासाठी आल्याचा निरोप पाठवला. निरोप घेऊन सेवक आत गेला आणि थोड्या वेळाने न्यायाधीश स्टीव्हन्स बाहेर आले.
मुलीनी त्यांच्या हातात एक मागणीपत्र दिले. परिसरातील मुलींसाठी एक स्विमिंग टँक हवा होता आणि त्यासाठीच इला सेन आणि मीरा देवी या दोघीजणी न्यायाधीश साहेबांना भेटण्यासाठी आल्या होत्या. युवर मॅजेस्टीसारख्या शब्दामुळे आणि थोड्या थोड्या चुकीच्या इंग्रजी भाषेमुळे त्यांच्यावर न्यायाधीश साहेबांचा विश्वास बसला. इलाने तर हेही सांगितले की ती पोलीस अधिकाऱ्याची मुलगी आहे. यामुळे तर न्यायाधीश साहेब अधिकच खुश झाले.
त्यांनी आणलेल्या शिफारस पत्रावर न्यायाधीश साहेबांची सही हवी होती. स्टीव्हन सही करण्यासाठी उठून आत आपल्या चेंबर मध्ये गेले आणि त्यांनी सही केलेला कागद मुलींसमोर आणला. इतक्यात त्या मुलींनी न्यायाधीश साहेबावर आपल्या बंदुका रोखल्या. बंदुकीच्या आवाजाने आजुबाजूचे लोक पळत आत आले पण, तोपर्यंत बराच उशीर झाला होता.
पुढे जे काही होईल त्याला सामोरे जाण्याची त्यांची तयारी होती.
दोन मुलींनी न्यायाधीशांचा खून केल्याची बातमी वणव्यासारखी पसरली. क्रांतिकारकांनी त्याच्या या कृत्याचे समर्थन करणारी पत्रके वाटली. हातात सुनीतीचा फोटो घेऊन तिच्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर उतरले.
आपली योजना पूर्ण करण्यात या मुलींना यश आले असले तरी, त्यांची लढाई अजून बरीच मोठी होती. कोर्टात सुनावणी सुरु झाली. तेंव्हाही या दोन्ही मुलींचा चेहऱ्यावरील चमक कमी झाली नव्हती.
शेवटी निकाल लागला तेंव्हा मात्र त्या फार निराश झाल्या. कारण त्यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती. एका पत्रकाराला मुलाखत देताना त्या म्हणाल्या, “आम्हाला फाशीची अपेक्षा होती, आम्हाला फाशी द्यायला हवी होती,” हे एकून तो पत्रकार सुन्न झाला.
तुरुंगात असतना सुनीती जेलमध्ये नेमून दिलेली कामे शांतपणे करत असे. पोलीस तिच्या घरच्यांचा कसा छळ करताहेत, तिच्या भावाला पोलिसांनी कशी मारहाण केली, याविषयीच्या दुखद कहाण्या ती रोज ऐकत होती तरीही तिच्यातील शांतता थोडीही ढळली नाही.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ६ डिसेंबर १९३९ रोजी तिची तुरुंगातून सुटका करण्यात आली. त्यावेळी सुनीतीचे वय होते २२ वर्षे. तिच्याकडे कुठलेही औपचारिक शिक्षण नव्हते. भाऊ सोडला तर कुणीही पाठीशी उभे राहणारे नव्हते.
परंतु, क्रांतिकारक कधी हार मानत नाहीत. तिने पुन्हा शिक्षण सुरु केले. आयएससीची परीक्षा पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाली. त्यानंतर तिने कॅम्पबेल मेडिकल स्कूल मधून एलएमएस पूर्ण केले आणि शेवटी कलकत्ता मेडिकल कॉलेज मध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतला. १९४४ साली ती एमबी झाली. प्रद्योत कुमार घोष या क्रांतिकारकासोबत तिने विवाह केला.
तिच्यातील निष्ठा आणि प्रेमळ वागणुकीमुळे तिला चंदननगरमध्ये सगळे लेडी माँ म्हणून ओळखू लागले.
१९५१-५२ च्या सार्वजनिक निवडणुकीत कॉंग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाने तिला तिकीट देण्याची तयारी दाखवली होती. पण, तिने जाणीवपूर्वक स्वतःला राजकारणापासून दूर ठेवले.
तिने आपल्या वृद्ध आई-वडिलांची जबाबदारी घेतली. तिला मुलांच्या आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहणे आवडत होते.
१२ जानेवारी, १९८८ रोजी सुनीतीने अखेरचा श्वास घेतला. जाता जाता, तिने देशभक्ती, शूरता, प्रेमळपणा, निसर्गाबद्दल कृतज्ञता अशा कित्येक गोष्टींचा वारसा ठेवून प्रेरणेचा एक स्त्रोत बनून गेली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.