आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
स्टॉक मार्केट हे एक अस्थिर क्षेत्र आहे. या क्षेत्रात ज्याप्रमाणे अचानक मोठा फायदाही होऊ शकतो तसाच अचानक तोटासुद्धा होऊ शकतो. याठिकाणी गुंतवणूक करताना कस लागतो तो मानवी बुद्धिमत्तेचा. पण आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि कल्पनेच्या पलीकडेही काही घटना स्टॉक मार्केटमध्ये घडत असतात. असंच काही अनपेक्षित घडलं १९८२ साली.
१९८२ साली एका कंपनीच्या शेअरमुळे शेअर बाजार तीन दिवस बंद होता. एप्रिल १९८२ चे मुंबई स्टॉक एक्सचेंज. परिस्थितीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करणारे आणि घाबरलेले व्यापारी स्टॉक एक्सचेंजच्या हॉलमध्ये आले. सहसा, विविध कंपन्या स्टॉक एक्सचेंजमध्ये व्यापार करतात. त्या दिवशी शेअर बाजार फक्त एकाच कंपनीच्या व्यापारासाठी उघडला होता ती कंपनी म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज. मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये पहिल्या क्रमांकाची रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी शॉर्ट-सेलरच्या गटाशी लढत होती. शॉर्ट सेलर्सनी १९८२ मध्येही कंपन्यांसाठी समस्या निर्माण केल्या होत्या.
१९८० च्या दशकात भारत एक ‘बंद अर्थव्यवस्था’ होता. युएसएसआर या साम्यवादी सत्तेशी जवळीक असल्यामुळे, भारताने परदेशी व्यापाऱ्यांसाठी आपली बाजारपेठ बंद केली होती आणि साम्यवादी आर्थिक धोरणांचे अनुसरण केले. बाजारपेठेतील भारतीय खेळाडू हे मक्तेदारीवादी होते, अशा मोठ्या खेळाडूंना कोणतीही कंपनी विरोध करीत नसे.
धीरूभाई अंबानी यांनी रिलायन्स उद्योग समूहाचे नेतृत्व केले आणि पुढील दशकांतील आधुनिक भारताला आकार दिला. त्यांनी निवडणुकीच्या निकालांवर जबरदस्त प्रभाव टाकला होता. याशिवाय भारतीय अर्थसंकल्प संसदेत मांडण्यापूर्वी त्यांच्या टेबलवर येत असत असेही म्हटले जाते.
धीरूभाई अंबानी यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात कापड उत्पादक म्हणून केली आणि कालांतराने त्यांनी पेट्रोकेमिकल क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली. त्यांचा मुलगा मुकेश अंबानी आता भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे, रिलायन्सने दूरसंचार क्षेत्रातही ‘जिओच्या’ स्वरूपात प्रवेश केला. १९७२ साली कंपनीची इनिशियल पब्लिक ऑफरिंग फक्त १० रुपये होती. कालांतराने कंपनीच्या शेअर्सची किंमत आणि नफा वाढला. १९८२ साली रिलायन्स सुमारे २०० रुपयांवर व्यापार करत होते.
या काळात शेअर बाजार डिजिटल झाला नव्हता त्यामुळे घोटाळे आणि फेरफार होण्याची शक्यता होती. घोटाळे करणाऱ्यांचा असाच एक गट होता आणि त्यांचे प्रमुख शस्त्र होते ‘शॉर्ट सेलिंग’. हे प्रकरण समजून घेण्यासाठी सर्वप्रथम ‘शॉर्ट सेलिंग’ काय असते हे समजून घेणे महत्वाचे आहे. ‘शॉर्ट सेलिंग’ म्हणजे अशा प्रकारे गुंतवणूक करणे की मालमत्तेचे मूल्य कमी झाल्यास गुंतवणूकदारास नफा होईल. यासाठी आपण एक उदाहरण घेऊ.
समजा कंपनी ‘अ’चा शेअर १० रुपये आहे. जर एका शॉर्ट सेलरला कंपनीच्या शेअरची किंमत चालू दरापेक्षा आणखी कमी होण्याची अपेक्षा असेल तर तो १० रुपयांचा तो शेअर खरेदी न करताच विकतो कारण त्याला तो शेअर तिसऱ्या व्यक्तीला देण्यासाठी फक्त एका दिवसाचा (मार्केटच्या एका दिवसाचा अर्थात सकाळी ९.१५ ते दुपारी साधारण ३.३० पर्यंतचा) कालावधी असतो. या कालावधीत जर शेअरची प्राईझ २ रुपयांनी कमी झाली तर शॉर्ट सेलरला २ रुपयांचा नफा होतो. पण जर या उलट शेअरची किंमत १४ रुपये झाली तर त्याला तो १४ रुपयांना खरेदी करून समोरच्याला द्यायला लागतो. त्या केसमध्ये त्याला ४ रुपयांचा तोटा होतो.
त्याकाळचा सर्वात मोठा शॉर्टसेलर मनू मानेकच्या (Scam १९९२ सिरीजमधला मनू मुंधरा) ‘कोलकाता बिअर्स’ या व्यापारी संघटनेला रिलायन्सचा शेअर शॉर्ट सेल करायचा होता आणि शेअरची किंमत कमी करायची होती. व्यापाऱ्यांच्या गटाने एकत्र येऊन योजनेवर सहमती दर्शवली. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसाठी त्यावेळी सेटलमेंटची वेळ १५ दिवस होती आणि जर विक्रेता शेअर तयार करू शकत नसेल तर त्याला दंड भरावा लागतो. कोलकाता बिअर्सच्या ट्रेडर्सनी ट्रेडिंग सुरू केल्यामुळे रिलायन्सचा शेअर १२० रुपयांपर्यंत घसरला.
आपल्याकडे कंपनीमध्ये आधीपासूनच असलेला प्रमोटर (शेअर असलेला व्यक्ती) कंपनीचा आणखी शेअर सरकारच्या मान्यतेशिवाय विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे धीरूभाई अंबानी या योजनेत हस्तक्षेप करणार नाहीत याची बेअर्सना खात्री होती. पण अंबानींच्या योजना खास होत्या. शॉर्ट-सेलर्सने ऑर्डर दिल्यावर कोणीतरी ते विकत घेत होते.
यामुळेच रिलायन्सच्या शेअरची किंमत कमी होण्याऐवजी वाढू लागली आणि १२५ रुपयांवर पोहोचली. खरेदीदार मध्यपूर्वेतील कोणीतरी व्यक्ती होता, यामुळे अंबानीसारखा श्रीमंत आणि बुद्धिमान माणूस या ‘गेममध्ये’ आहे हे सिद्ध झालं. ते शेअर्स विकत घेणारा तो माणूस होता अंबानींचा विश्वासू आनंद जैन. शॉर्ट सेलर्स घाबरले आणि त्यांनी अधिक शेअर्स विकले, परंतु तो खरेदीदार शेअर्स खरेदी करतच राहिला. १५ दिवसांचा कालावधी संपला पण स्टॉकची किंमत काही शॉर्ट सेलर्सच्या अपेक्षेप्रमाणे घसरली नाही.
त्या खरेदीदाराने प्रति शेअर ५० रुपये दंड मागितला. शॉर्ट सेलर्सना ते मान्य नव्हते. या मतभेदामुळे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज तीन दिवस बंद होते. जेव्हा मार्केट पुन्हा उघडले तेव्हा स्टॉक एक्स्चेंजने फक्त रिलायन्सच्या शेअर्सच्या व्यापारास परवानगी दिली कारण याच शेअर्सच्या प्रचंड ऑर्डर्स होत्या.
प्रचंड मागणीमुळे रिलायन्सच्या शेअरची किंमत २१० रुपयांवर गेली. परिणामी आपल्या पोझिशन्स बंद करण्यासाठी शॉर्ट सेलर्सना स्वतःच्या खिशातून मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागला. त्यांनी या प्रकारातून चांगलाच धडा घेतला आणि धीरूभाई अंबानींविरोधात पुन्हा असा प्लॅन करण्याची हिम्मत कधीही केली नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.