आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
भारताचे पहिले गव्हर्नर आणि शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांचे भारताशी एक अनोखे नाते होते. ते व्हाईसरॉय झाल्यानंतरच भारताला स्वातंत्र्य देण्याची चर्चा सुरु झाली. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आणि भारताचे विभाजन घडवून आणण्यातही त्यांचा महत्वाचा वाटा राहिला आहे.
माउंटबॅटन यांचे मूळ नाव लुई फ्रान्सिस अल्बर्ट व्हिक्टर निकोलस ऑफ बॅटनबर्ग असे होते. पहिल्या महायुद्धाच्या काळात ते ब्रिटीश सैन्याच्या नौदलाचे प्रमुख होते. स्वकर्तृत्वानेच त्यांनी हे पद मिळवले होते मात्र पहिल्या महायुद्धात ब्रिटीश नौदलाला सतत हार पत्करावी लागत होती, तेंव्हा चारी बाजूंनी त्यांच्यावर टीकेचा भडीमार होऊ लागला. संपूर्ण देशात त्यांच्याविषयीचे मत कलुषित झाले होते.
ब्रिटीश जनता त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होती. त्यात त्यांचे बॅटनबर्ग या जर्मन नावावरून तर फारच गोंधळ उडाला. तेंव्हा राजघराण्यातील लोकांनी आपले हे बॅटनबर्ग आडनाव बदलून घ्यावे असा आदेश सरकारला काढावा लागला.
मात्र दुसऱ्या महायुद्धात त्यांनी ही झीज भरून काढत आपले नाव एक कर्तबगार अधिकारी म्हणून नाव कमावले. १९४१ मध्ये विस्टन चर्चिल यांनी त्यांची तिन्ही सेना दलांच्या संयुक्त हालचालींचे सूत्रधार म्हणून निवड केली.
भारताला स्वातंत्र्य द्यायचे होते आणि मुस्लिमांच्या इच्छेनुसार त्यांना स्वतंत्र राष्ट्रही द्यायचा होता, अशा जटील प्रसंगी ब्रिटीश सरकारने लॉर्ड माउंटबॅटन यांना व्हाईसरॉय पदावर नियुक्त केले. पण, लॉर्ड माउंटबॅटन यांनी नेहरू आणि जिन्ना यांसारख्या नेत्यांशी चर्चा करूनच भारतीय स्वातंत्र्याचा मसुदा तयार केला होता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही ते भारताचे पहिले गव्हर्नर जनरल राहिले. नेहरूंशी तर त्यांचे मित्रत्वाचे संबंध होतेच पण इतर भारतीय नेत्यांशीही त्यांनी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले होते.
एक ब्रिटीश असूनही भारतीय जनतेच्या मनात या ब्रिटीश व्हाईसरॉयाबद्दल आदर आणि प्रेम होते. ३ जून १९४७ रोजी त्यांनी, भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळेल अशी घोषणा केली. भारताची सीमा रेषा ठरवण्याचे सगळ्यात अवघड कामही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आले. त्यासाठी त्यांनी रॅडक्लिफ कमिशनची नेमणूक केली होती. ते भारतात आले तेंव्हा भारतातील हिंदू-मुस्लीम संबंध अत्यंत तणावपूर्ण बनले होते.
फाळणीसंबंधीही त्यांनी भारतातील प्रत्येक नेत्याशी विस्तृत चर्चा करून मगच निर्णय घेतला. या चर्चेदरम्यान त्यांनी भारतातील सर्वच नेत्यांचा विश्वास संपादन केला होता. म्हणूनच भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून त्यांचीच निवड करण्यात आली. भारताच्या समस्यांबद्दल त्यांना कळकळ होती. शिवाय, इतर कुठल्याही व्हाईसरॉयला मिळाले नाहीत असे अधिकार त्यांना मिळाल्याने स्वातंत्र्याचा निर्णय घेणे त्यांच्यासाठी सोपे गेले.
२७ ऑगस्ट १९७९ रोजी आयरिश दहशतवाद्यांनी त्यांचा खून केला तेंव्हा भारताने सात दिवसांसाठी राजकीय शोक जाहीर केला होता. आयरिश दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात लॉर्ड माउंटबॅटन यांच्यासह त्यांच्या दोन नातवांनाही प्राण गमवावे लागले होते.
माउंटबॅटन यांच्या हत्येची बातमी मिळताच भारत सरकारने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सात दिवसांचा राजकीय शोक जाहीर केला. शाळा आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी देण्यात आली. इतकेच काय देशाचा राष्ट्रीय ध्वज म्हणजेच तिरंगाही सात दिवसांसाठी अर्ध्यावर उतरवला होता. भारतात लॉर्ड माउंटबॅटन यांना एक इंग्रज अधिकारी असूनही अफाट लोकप्रियता मिळाली होती.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आणि लॉर्ड माउंटबॅटन यांच्यातील मैत्रीची चर्चा तर आजही होते. लॉर्ड माउंटबॅटन यांची हत्या झाली तेंव्हा इंदिरा गांधीनी आवर्जून त्या दोघांच्या मैत्रीचा उल्लेख केला होता. त्यांना श्रद्धांजली वाहताना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या, “गव्हर्नर जनरल असताना त्याकाळची कठीण परिस्थिती त्यांनी अगदी योग्यरित्या हाताळली होती. भारतीय जनतेप्रती त्यांनी पूर्ण संवेदना आणि सहानुभूती दाखवली होती. त्यांच्या याच स्वभावामुळे ते माझ्या वडीलांचे मित्र होते. भारतातील अनेक नेत्यांशी त्यांचे संबंध मैत्रीपूर्ण होते यामागेही हेच कारण होते. ते इतिहासाचे गाढे अभ्यासक होते आणि भारताच्या स्वातंत्र्यावेळी त्यांनी प्रत्येक निर्णय घेताना काळजी घेतली होती. छोट्या-छोट्या गोष्टींचीही दखल घेतली. त्यांच्या यशाचे गमक यातच आहे. भारताने एक चांगला मित्र गमावला याचे दु:ख वाटते आहे.”
लॉर्ड माउंटबॅटन यांची हत्या झाली तेंव्हा चौधरी चरण सिंह हे भारताचे काळजीवाहू पंतप्रधान होते. ते म्हणाले होते, “हा शोक म्हणजे आमच्या त्यांच्यावरील प्रेमाचे प्रतिक आहे. आम्हाला त्यांच्या प्रती किती आदर होता हेच आम्ही यातून सांगू इच्छितो. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून त्यांनीही प्रयत्न केले. त्यांच्या याच प्रयत्नांचा मान ठेवत त्यांना भारताचे पहिले गव्हर्नर म्हणून आम्ही स्वीकारले होते.”
भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई म्हणाले, “माझे त्यांच्याशी वैयक्तिक संबंध होते हे मी माझे भाग्याच समजतो. त्यांची धाडसीवृत्ती आणि कुशल बुद्धीमत्तेचे मला नेहमीच कौतुक वाटत राहिले. चर्चेतून कोणत्याही प्रश्नावर कसा मार्ग काढावा याची कला त्यांना चांगलीच अवगत होती.”
१९४८ साली ते ब्रिटनला परत गेले पण, त्यानंतरही भारतातील अनेक लोकांशी ते पत्रव्यवहाराच्या माध्यमातून संपर्कात राहिले. त्यांनी जवाहरलाल नेहरू फंडची स्थापना करण्यासाठी पुढाकार घेतला आणि त्यासाठी स्वतःहून भरपूर निधीची जमवाजमव देखील केली. भारतीय विद्यार्थ्यांना ब्रिटनमध्ये शिक्षण घेता येईल यासाठीही त्यांनी भरपूर प्रयत्न केले. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी भारताला एक सक्षम देश म्हणून उभे राहण्यासाठी मदत केली.
मोरारजी देसाई यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास त्यांनी भारतीय समाजाला त्याच्या ताणतणावासह पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन केले.
शांत, थंड डोक्याने निर्णय घेणाऱ्या माउंटबॅटन यांना त्यांच्याच घराजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात मृत्यू आला. भारताविषयी त्यांनी दाखवलेली आस्थाच त्यांना इतर ब्रिटीश अधिकाऱ्यांपेक्षा वेगळी ठरवते. म्हणूनच सामान्य भारतीयांच्यातही त्यांच्याबद्दल सकारात्मक प्रतिमा होती.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.