आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
इतिहासात आजवर भूकंपं, यु*द्धं, महापूर, दुष्काळ, विविध रोगांच्या साथी यामुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर जीवितहानी, वित्तहानी घडून आल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. जीव गमावणं, कुटुंबाची वाताहात, घरंदारं, शेतीभाती, गाव सोडून दुसरीकडे जावं लागणं अशा अनेक गोष्टी अशावेळी संबंधित नागरिकांनी अनुभवल्या आहेत.
या साखळीतलीच एक कडी म्हणजे आयर्लंडमधील “बटाट्यांचे दुर्भिक्ष्य” किंवा “द ग्रेट हंगर” या नावाने ओळखलं गेलेलं संकट. ते नक्की काय होतं?
ते साल होतं १८४५. वर्ष सुरू झालं तेव्हा कुणाला कल्पनाही नसेल, या वर्षात एवढी उलथापालथ घडणार आहे म्हणून. पण ती तशी घडली खरी. आणि त्यासाठी कारणीभूत ठरला Phytophthora infestans किंवा P. infestans नावाचा बुरशीसदृश जीव. आजही ही रोगकारक बुरशी मुख्यतः बटाटा आणि टोमॅटो या पिकांचा कर्दनकाळ म्हणूनच ओळखली जाते. त्यावर्षी ही बुरशी संपूर्ण आयर्लंडमध्ये वेगाने पसरली होती आणि तिच्या प्रादुर्भावामुळे त्यावर्षीचे बटाट्याचे जवळपास निम्मे पीक नष्ट झाले. एवढंच नाही तर पुढील सात वर्षांत तीन चतुर्थांश पिकाची नासाडी झाली.
आयर्लंड ही त्यावेळी इंग्रजी राजवटीच्या आधिपत्याखालील एक वसाहत होती. तेथील बटाईने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बटाटे हा एक प्रमुख अन्नस्रोत होता. त्यामुळे तिथल्या लोकसंख्येवर, या प्रादुर्भावाचा भयंकर परिणाम झाला.
१८५२ साली जेव्हा हा प्रभाव ओसरला, तोपर्यंत अंदाजे १० लाख आयरिश लोकांची उपासमार आणि त्याच्याशी निगडित इतर कारणांमुळे बळी गेला होता, तर अजून १० लाख लोकांवर देश सोडायची वेळ आली होती.
एकोणिसाव्या शतकातील आयर्लंड
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात स्वतंत्र होईपर्यंत, आयर्लंड ही एक ब्रिटिश वसाहत होती. दोन्ही देश एकत्रितपणे “युनायटेड किंगडम” नावाने ओळखले जात. त्यावेळी “एमेराल्ड” बेटावरील रहिवाशांना लंडन येथील संसदेवर प्रतिनिधी निवडून देण्याचा अधिकार असला तरी आयर्लंडचे कार्यकारी प्रमुख, जे “लॉर्ड लेफ्टनंट” आणि “चीफ सेक्रेटरी ऑफ आयर्लंड” या नावाने ओळखले जात, त्यांना ब्रिटिश सरकारच नियुक्त करते. “हाऊस ऑफ कॉमन्स” अर्थात “कनिष्ठ सभागृह” येथे, आयर्लंडचे १०५ प्रतिनिधी असत, तर “हाऊस ऑफ लॉर्डस” अर्थात “वरिष्ठ सभागृह” येथे आयर्लंडमधील २८ सरदार (जमीनदार) असत. महत्वाची गोष्ट अशी की, हे निवडून दिलेले प्रतिनिधी मुख्यत्वे ब्रिटिश जमीनदार किंवा त्यांची मुलेच असत.
भरीस भर म्हणजे, जे आयरिश लोक कॅथलिझम अनुसरत असत – ज्यामध्ये आयर्लंडच्या बहुतेक स्थानिक जनतेचा समावेश होत होता – त्यांना जमीनीची मालकी मिळवण्याची किंवा जमीन भाड्याने घेण्याची मुभा सुरुवातीच्या काळात नव्हती. तसेच त्यांना मतदानाचा किंवा कोणतेही शासकीय पद भूषविण्याचा कायदेशीर अधिकार देखील नव्हता. १८२९ च्या सुमारास असे बहुतेक कायदे रद्दबातल ठरविण्यात आले, मात्र त्यांचा प्रभाव आयर्लंडच्या समाज आणि शासनावरून पूर्णपणे ओसरला नव्हता आणि त्याचवेळी बटाट्यांचा दुष्काळ सुरु झाला.
बहुतेक जमीन ही अँग्लो – आयरिश कुटुंबांच्या मालकीची होती, आणि बहुतेक आयरिश कॅथलिक कुटुंबांना बटाईने शेती करणे आणि जमीन-मालकांना भाडे देणे हाच एक पर्याय उपलब्ध होता.
गंमत म्हणजे, हा बटाट्यांचा दुष्काळ सुरु होण्याच्या केवळ १०० वर्षं आधी, जमीनदार लोकांनी आयर्लंडमध्ये प्रथमच बटाट्याची लागवड केली होती.
शिवाय “आयरिश लम्पर” नावाच्या एकाच जातीचा बटाटा त्यावेळी आयर्लंडमध्ये पिकत असला तरी बटाटा हे गरिबांचे, विशेषतः हिवाळ्यात खाल्ले जाणारे, प्रमुख अन्न बनले होते.
भयानक उपासमारीची सुरुवात
१८४५ च्या सुमारास जेव्हा P. infestans च्या प्रादुर्भावामुळे बटाट्याची पिके आडवी होऊ लागली, तेव्हा डब्लिनमधील आयरिश नेत्यांनी, राणी व्हिक्टोरिया आणि संसदेकडे यावर ताबडतोब आणि ठोस कृती करायला हवी अशी मागणी केली. त्यानुसार त्या काळी अस्तित्वात असलेले “कॉर्न लॉज” नावाने ओळखले जाणारे कायदे आणि ज्यांच्यामुळे “मका” आणि “ब्रेड” यांसारखे अन्नपदार्थ महाग होत असत, असे कर रद्द करण्यात आले. हे कॉर्न लॉज मुख्यतः इंग्लिश शेतकऱ्यांच्या हिताचे होते आणि इंग्लंडमध्ये आयात होणाऱ्या स्वस्त मालापासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी केलेले होते. या कायद्यांमुळे कॉर्न (मका), बार्ली, गहू ही धान्यं पण महाग होत.
परंतु बटाट्याच्या पिकांवर पडलेल्या रोगांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई या बदलांमुळे होऊ शकली नाही. बहुतेक शेतकऱ्यांना स्वतःपुरते अन्न पिकवणे देखील कठीण झाले. त्यातच इतर जीवनोपयोगी वस्तूंच्या वाढणाऱ्या किमतींनी या शेतकऱ्यांच्या संकटात भर पडली. परिणामी, हजारो लोकांना उपासमारीने, तर इतर शेकडो जणांना, कुपोषणामुळे आपला जीव गमवावा लागला.
इतिहासकारांच्या मते, या संकटकाळातही, आयर्लंडकडून ब्रिटनला मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची निर्यात चालूच होती. काही संशोधनांनुसार तर पशु आणि बटरच्या निर्यातीमध्ये वाढ झाली असावी. पण या गोष्टींमुळे संकटात अजून वाढ झाली.
त्यावेळेच्या नोंदींनुसार, फक्त १८४७ या एकाच वर्षात, ग्रामीण भागात बटाट्यांच्या पिकांचा विध्वंस होत असतानाच, वाटाणा, द्विदल धान्ये, ससे, मासे आणि मध अशा पदार्थांची निर्यात आयर्लंडमधून चालूच होती.
१८५२ च्या सुमारास बटाट्यांवरील प्रादुर्भाव ओसरला. पण तोपर्यंत बरेच नुकसान झाले होते. वेगवेगळ्या अंदाजांनुसार, या काळात जवळजवळ १० लाख आयरिश पुरुष, स्त्रिया आणि मुले, मृत्युमुखी पडले, असे मानले जाते. तसेच अजून १० लाख लोकांनी, गरीबी आणि उपासमारीपासून वाचण्यासाठी स्थलांतर केले. यातील बहुतेक जण उत्तर अमेरिका आणि ब्रिटनमधील वेगवेगळ्या शहरात स्थायिक झाले.
बटाट्यांच्या दुष्काळाचे ऐतिहासिक महत्व
या सगळ्या गदारोळामध्ये, ब्रिटिश सरकारची भूमिका काय होती याबद्दल अजूनही एकमत झालेले नाही. सरकारने आकसापोटी, आयर्लंडच्या गरिबांच्या दैन्यावस्थेची दखलच घेतली नाही की सरकारचा एकूणच नाकर्तेपणा आणि अपुरा प्रतिसाद यामुळे त्यांची अकार्यक्षमता सिद्ध झाली याचा वाद अजूनही चालूच आहे.
परंतु बटाट्याच्या दुष्काळाचे आयरिश इतिहासातील महत्त्व, आणि त्यामुळे एकोणिसाव्या व विसाव्या शतकात जगभरात इतरत्र झालेले आयरिश लोकांचे स्थलांतर हे वादातीत आहे. त्यानंतर कितीतरी वर्षांनी ब्रिटिशांना उपरती झाली आणि टोनी ब्लेअर, ब्रिटिश पंतप्रधान असताना १९९७ साली त्यांनी एका निवेदनाद्वारे ब्रिटिश सरकारकडून या घटनेची नीट हाताळणी न झाल्याबद्दल, आयर्लंडची जाहीर माफी मागितली.
आयरिश उपासमारीची स्मारके
त्या घटनेचा परिणाम म्हणून, ज्या ज्या शहरांमध्ये, आयरिश लोकांनी स्थलांतर केले होते, त्या त्या शहरांमध्ये, अलीकडच्या काळात, त्या घटनेमुळे बळी गेलेल्या लोकांसाठी स्मृतीसभा घेण्यात आल्या. अमेरिकेतील बोस्टन, न्यूयॉर्क, फिलाडेल्फिया, फिनिक्स, तर कॅनडामधील मंट्रियाल व टोरोंटो इथे स्मारके उभारण्यात आली आहेत. अशीच स्मारके आयर्लंड, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमधील काही शहरांमध्येही आहेत. याशिवाय, ग्लासगो सेल्टिक एफसी, या स्कॉटलंडमधील फ़ुटबाँल संघाच्या खेळाडूंनी, ३० सप्टेंबर २०१७ रोजी, त्या घटनेतील मृतांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या गणवेशावर स्मृतिफीत लावली. या संघाची स्थापना, त्या घटनेमुळे, स्कॉटलँडमध्ये निर्वासित म्हणून आलेल्या आयरिश लोकांनी केली होती.
Quinnipiac University हॅमडेन, कनेक्टिकट येथे एक संग्रहालय देखील उभारण्यात आले आहे. बटाट्यांच्या दुष्काळाचे परिणाम आणि इतर माहितीचा स्रोत, तसेच अभ्यासकांना या घटनेचा आणि परिणामांचा पुढे अभ्यास करता यावा हा या संग्रहालयाचा उद्देश आहे. बहुतेकदा वस्तुसंग्रहालयं भूतकाळातल्या भयानक घटनांचा, स्मृतींचा आरसा असतात.
हिरोशिमा इथलं पीस मेमोरियल किंवा जेरुसलेममधील याद वाशेम मेमोरियल किंवा मग हे हॅमडेनचं संग्रहालय इथे भेट देऊन आल्यावर अस्वस्थता येणं अगदी स्वा भाविकच. पण इतिहासात झालेल्या चुका आणि त्यातून काय घेता येईल हे जाणून घ्यायचं असेल तर या जागांना भेट द्यायलाच हवी. बटाट्याच्या दुष्काळाने पण जगाला काही गोष्टी नक्कीच शिकवल्या. नैसर्गिक संकट आणि पुरेशा नियोजनाअभावी त्याची वाढलेली तीव्रता हे त्यानिमित्ताने अधोरेखित झालं. तुम्हाला काय वाटतं?
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.