आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
२०२१ च्या टी-ट्वेन्टी विश्वचषकातील महत्त्वपूर्ण सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानवर ८ गडी राखून विजय मिळवला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ २०१२ नंतर प्रथमच आयसीसी स्पर्धेच्या ‘बाद फेरी’साठी पात्र ठरू शकणार नव्हता, याची जवळजवळ सगळ्यांनाच खात्री होती. दुर्दैवाने तसंच घडलंही.
भारतीय संघाने २०२१ च्या टी-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेत आपली कामगिरी सुरु करण्यापूर्वीच विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी-ट्वेन्टीचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. आता तो संघाच्या टी-ट्वेन्टी कर्णधारपदावरून पायउतार झाला असला तरी ‘भारतीय संघाचा एकदिवसीय कर्णधार’ या त्याच्या भावी कारकिर्दीबद्दलही आता शंका उपस्थित झाल्या आहेत.
विराट जरी आंतरराष्ट्रीय टी-ट्वेन्टी कर्णधारपदावरून पायउतार झाला असला तरी पण तो सध्या एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करणार आहे. तथापि, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) कोहलीला एकदिवसीय क्रिकेटच्या कर्णधारपदाच्या जबादारीतूनही मुक्त करायचे आहे. त्याच्या जागी रोहित शर्माला एकदिवसीय क्रिकेटमध्येही कर्णधारपद देण्याची चर्चा बीसीसीआयमध्ये सुरु आहे. रोहितला नुकतेच आंतरराष्ट्रीय टी-ट्वेन्टी सामन्यामध्ये कोहलीचा उत्तराधिकारी म्हणून निश्चित करण्यात आले.
एनडीटीव्ही या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, भारतीय संघाचा एकदिवसीय कर्णधार या नात्याने कोहलीच्या कारकिर्दीबाबत बीसीसीआयचे उच्चपदस्थ अधिकारी त्याच्याशी संवाद साधण्याची योजना आखत आहेत. एनडीटीव्हीच्या सूत्रांच्या माहितीनुसार, “कोहली त्याच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करू शकेल यासाठी बीसीसीआयला कोहलीला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करायचे आहे..”
अहवालानुसार, पुढील वर्षी जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिका मालिका सुरू होताच कोहलीला भारतीय संघाचे एकदिवसीय कर्णधारपदसुद्धा सोडण्यास सांगितले जाऊ शकते. २०२१ च्या टी-ट्वेन्टी विश्वचषकाच्या समाप्तीनंतर रोहितला न्यूझीलंड मालिकेसाठी भारताच्या टी-ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर केएल राहुलची पन्नास षटकांच्या फॉरमॅटमध्ये रोहितचा ‘उपकर्णधार’ म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
२०२१ च्या टी-ट्वेन्टी विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील न्यूझीलंड १७ नोव्हेंबरपासून तीन टी-ट्वेन्टी सामन्यांसाठी भारत दौरा करणार आहे. यावेळी रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करणार असून कोहलीला आंतरराष्ट्रीय टी-ट्वेन्टी सामन्यांमधून विश्रांती देण्यात आली आहे.
बीसीसीआयने आज न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठीसुद्धा भारताच्या संघाची घोषणा केली. न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीलाही कोहली मुकणार आहे, पण दुसऱ्या कसोटीत संघाचे नेतृत्व करण्यासाठी कोहलीचे पुनरागमन होईल. पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि मोहमद शमी यांनासुद्धा बीसीसीआयने विश्रांती दिली आहे.
टी-ट्वेन्टी विश्वचषकात निराशाजनक धावा केल्यानंतर मर्यादित षटकांच्या स्वरूपातील कोहलीचे कर्णधारपद बीसीसीआयच्या नजरेत आले. कारण संघ त्यांच्या मोहिमेच्या सुरुवातीला पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध दोन सलग पराभवांसह उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही. बीसीसीआय मर्यादित षटकांमध्ये विभाजित कर्णधारपद कायम ठेवेल की रोहितकडे वन डेचे कर्णधारपदही सोपवले जाईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.