आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
काही माणसांना आयुष्यात नक्की काय करायचे ते योग्य टप्प्यावरच गवसते. त्यांना अंधारात वाटा धुंडाळाव्या लागत नाहीत, की आपल्याला काय आवडते किंवा जमते हे ट्रायल अँड एरर करून बघत चाचपडत बसावे लागत नाही. कुठे पोहोचायचे ते ध्येय त्यांनी आधीच ठरवलेले असते. त्याकडे जायचे कसे हा रस्ताही त्यांना माहीत असतो. विनिता जैन या अशाच व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांची एका वाक्यात ओळख करून द्यायची तर त्या बायोटिक या आयुर्वेदिक फार्मा कंपनीच्या संस्थापिका आहेत.
विनिता यांचा जन्म कोलकाता येथे झाला. आसाम, दार्जीलिंग अशा ठिकाणी डोंगरदऱ्यांच्या सान्निध्यात त्यांचे बालपण गेले. त्यांच्या आजोबांच्या मालकीचे तेथे चहाचे मळे होते. त्या राहात ती वस्ती इतकी दुर्गम होती, की साधे दवाखान्यात जायचे तरी किमान पाचशे किलोमीटर अंतर जावे लागे. त्यामुळे साहजिकच घरगुती उपचारांवर भर असे. त्यांच्या लहानपणी आजार बरे करण्यापासून ते सौंदर्य प्रसाधनांपर्यंत सगळ्या बाबतीत नैसर्गिक उपचारांची आणि आयुर्वेदाची मदत घेतली गेली.
त्यांचे आजी-आजोबा वयाच्या सत्तरीतही निरोगी होते, त्यांची त्वचा नैसर्गिकरीत्या तजेलदार, चमकदार होती. चांगले हवामान, निसर्गाचे सान्निध्य, आणि नैसर्गिक गोष्टींचा जास्तीत जास्त वापर यामुळे आयुष्य कसे निरोगी राहते याचा वस्तुपाठ त्यांना लहानपणीच मिळाला. त्यातूनच आयुर्वेदाविषयी त्यांच्या मनात जिज्ञासा जागृत झाली. औषधी वनस्पतींच्या जगात त्या अक्षरश: हरवून गेल्या. त्याच काळात त्यांच्या मनात या क्षेत्रात करिअर करण्याचे बीज रोवले गेले.
आयुर्वेद या शास्त्रात आयुष्याबद्दलचे ज्ञान आहे. ज्या शास्त्राच्या उपयोगाने निरोगी आयुष्य प्राप्त करून घेता येते ते शास्त्र म्हणजे आयुर्वेद. प्राथमिक स्वरूपाचा आयुर्वेद लिखित स्वरूपात सर्वप्रथम अथर्ववेदात आढळतो. चरकसंहिता, सुश्रुतसंहिता व कश्यपसंहिता यांच्यामध्ये त्याचे शास्त्रीय स्वरूपातील विवेचन केलेले दिसते.
नंतर त्यात रसतंत्राची महत्त्वाची भर पडली. अतिप्राचीन काळापासून आयुर्वेद शास्त्रपदवीला पोचला तो मानवी शरीराचा व सृष्टीचा संपूर्ण अभ्यास केल्यामुळे त्यात मानवी जीवन व सृष्टी यांच्या क्रिया-प्रतिक्रियांचे मौलिक तत्त्वचिंतन केलेले दिसून येते. तत्त्वज्ञान हा आयुर्वेदाचा पाया आहे आणि उच्च सुसंस्कृत मानवी जीवन हा त्याचा आदर्श आहे.
आयुर्वेदाबद्दलच्या कुतूहलापोटी त्यांनी औषधी वनस्पतींचा अभ्यास सुरू केला. त्यांच्या मालकीच्या चहाच्या मळ्यांच्या आजूबाजूला राहणारे आयुर्वेदाची प्रॅक्टिस करणारे वनौषधींचे तज्ञ आणि हिमालयीन गुरु त्यांचे मार्गदर्शक बनले. हे लोक आजोबांच्या टी इस्टेटीच्या बाजूला असलेल्या गुहांमध्ये राहत. पुढे १९९० मध्ये त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी मिळवली. आता खऱ्या अर्थाने करियर सुरू होणार होते. त्यासाठी त्यांनी थेट स्वित्झर्लंड गाठले.
सुमारे पाच हजारांहून अधिक वर्षे जुन्या असलेल्या वनौषधी शास्त्राचा अभ्यास केला आणि त्याचा आधुनिक काळाशी मेळ घातला तर यश आपलेच आहे याची त्यांना पक्की खात्री होती. त्यासाठी त्यांनी सखोल अभ्यासाला सुरुवात केली. स्वित्झर्लंडमध्ये त्या जैवतंत्रज्ञान म्हणजेच बायोटेक्नॉलॉजी या विषयात संशोधन करणार होत्या. त्यासाठी त्यांनी काही डॉक्टर्स आणि त्वचारोगतज्ञ यांच्याशी हातमिळवणी केली.
चरक संहिता, सुश्रुत संहिता, अष्टांग संहिता, भागवत निघंटु यांसारख्या प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला. पण त्याच वेळी एक गोष्ट डोक्यात पक्की होती – व्यवसाय करायचा तर केवळ ज्ञान असून चालणार नाही त्याला व्यवहाराची जोड द्यायला हवी. म्हणून मार्केटिंगचा अभ्यास करण्यासाठी विनिता यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी गाठली. मार्केटिंग क्षेत्रातली पदवी मिळाल्यानंतर व्यवसाय करण्याचा आत्मविश्वास आला.
१९९२ साली दहा कोटी भांडवल आणि सहा तज्ञ डॉक्टरांची टीम यांच्यासह विनिता यांनी व्यवसायात उडी घेतली आणि बायोटिक या ब्रॅण्डच्या स्वरूपात त्यांचे स्वप्न साकार झाले. सुरुवातीलाच त्यांनी स्विस बाजारपेठेला लक्ष्य केले. ही उत्पादने त्यांच्यासाठी पूर्णतः नवीन होती. अगदी त्यांच्या गंधापासून पॅकेजिंग पर्यंत आणि टेक्श्चरपासून उपयोगापर्यंत सगळेच काही स्विस मार्केटसाठी अनोखे होते. त्यामुळे त्या बाजारपेठेने त्यांच्या उत्पादनांना आपलेसे केले आणि त्यानंतर त्यांची जी घोडदौड सुरू झाली ती अजून कायम आहे.
नितळ त्वचा आणि निरोगी शरीर ही देणगी आयुष्यभरासाठी हवी असेल तर आयुर्वेदाची कास धरा, असा त्यांचा नेहमीचा सल्ला आहे. त्यांच्याच म्हणण्यानुसार जन्मलेल्या बाळाची त्वचा नितळ आणि दोषरहित असते. ती तशीच आयुष्यभर टिकवायची असेल, तर बायोटिकची उत्पादने लवकरात लवकर वापरायला सुरुवात करणे उत्तम. बायोटीकची हिमाचल प्रदेशमध्ये फॅक्टरी आहे, तर स्वित्झर्लंडमध्ये ‘आर अँड डी’ युनिट. सुरुवातीलाच त्यांनी त्यांची उत्पादने स्विस बाजारपेठेत विकल्यामुळे भारतीय बाजारपेठेच्या तुलनेत त्यांची विक्री पाच ते आठ पटीने जास्त झाली.
त्या काळात एखाद्या गोष्टीचे भारतात उत्पादन करणे आणि स्वित्झर्लंडमध्ये विक्री करणे हे नवीन होते आणि इथेच विनिता यशस्वी ठरल्या. ही त्यांची मोठी कामगिरी होती. बायोटिकने अल्पावधीत मोठी मजल मारली. दरवर्षी ही कंपनी ४०-४५% वाढ दर्शवत आहे आणि आज तिचे मूल्य दीडशे कोटी डॉलर्सपेक्षा जास्त आहे.
त्यांच्या कंपनीचा वाढीचा वेग पाहून त्यांना अनेक गुंतवणूकदारांकडून कंपनीत पैसे गुंतवण्यासाठी ऑफर्स आल्या आहेत. पण विनिता यांनी तो मोह टाळला आहे. त्यांना आपल्या कंपनीची प्रतिमा कर्जमुक्त आणि पूर्णतः अंतर्गत भांडवलावर उभी असलेली अशीच राखायची आहे. एका भारतीय कंपनीसाठी ही निश्चितच मोठी गोष्ट आहे. या कंपनीची आज चार हजार मल्टीब्रँड आउटलेट्स आहेत, आणि स्पेन, युएस, फ्रान्स, नेदरलँड्स, इटली, मलेशिया, नेपाळ, श्रीलंका, बेल्जियम, सिंगापूर अशा अनेक देशांमध्ये ही कंपनी आपली उत्पादने निर्यात करते.
विनिता यांच्या मते आंत्रप्रिन्योरशिप ही एक महत्त्वाची जबाबदारी आहे. उद्योजक लाखांचा पोशिंदा असतो, रोजगारनिर्मिती करतो, आणि एवढेच नाही तर आपल्या कर्मचाऱ्यांना दर्जेदार, चांगले राहणीमान देऊ करतो. त्यामुळे उद्योजक हा २४ तास उद्योजकच असतो. किंबहुना, त्याने तसेच असणे गरजेचे असते. आज त्यांच्या कंपनीत तीन हजार कर्मचारी काम करतात. त्यापैकी ७५ टक्के महिला आहेत. महिला सक्षमीकरणाचे याहून चांगले उदाहरण कुठे पाहायला मिळेल?
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.