आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारतात असंख्य प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक, भव्य दिव्य मंदिरं आहेत. या मंदिरांना त्यांचा एक वेगळा इतिहास आहे आणि त्यांच्याशी निगडित असंख्य लोककथा, चमत्काराचे किस्से देखील प्रसिद्ध आहेत.
राजस्थानमधील जैसलमेर शहरापासून १२५ किलोमीटर अंतरावर असलेल्या तनोटराय मातेचे मंदिर देखील अशाच चमत्कारांसाठी प्रसिद्ध आहे. माता तनोटराय मंदिर, श्री आवाड देवी मंदिर या नावाने देखील प्रसिद्ध आहे. हे एक असे मंदिर आहे जिथे पूजा कोणी पुजारी नाही, तर बीएसएफचे जवान करतात. याचं एक कारण आहे.
१९६५ साली भारत आणि पाकिस्तानदरम्यान यु*द्ध सुरु होते, यावेळी पाकिस्तानने या मंदिरावर ३००० बॉ*म्बगोळे डागले होते. पण हे सर्वच बॉ*म्बगोळे निरुपयोगी ठरले. यापैकी एक ही बॉ*म्ब फुटला नाही.
यु*द्ध संपल्यावर मंदिराच्या आवारातच ४५० जिवंत बॉ*म्ब आढळून आले, पण त्यांच्यापैकी एकही फुटला नाही.
आज या तनोटराय मंदिराच्या आवारात एक संग्रहालय उभारण्यात आले असून याठिकाणी हे बॉ*म्ब प्रदर्शनसाठी ठेवण्यात आले आहेत.
या मंदिराचा इतिहास देखील फार जुना आहे. असं म्हणतात की हे मंदिर सुमारे १२०० वर्षांपूर्वी बांधण्यात आले आहे. या मंदिराची एक कथा प्रचलित आहे. यानुसार राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील चेलुक या गावात मामडिया चरण नावाचा माणूस राहत होता. तो निपुत्रिक असल्याने त्याने हिंगलाज मातेची आराधना केली. इतकेच नाही, आपल्या इच्छापूर्तीसाठी त्याने हिंगलाज मातेच्या देवस्थानाची सात वेळा पायी वारी केली. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन मातेने त्याच्या स्वप्नात येऊन दर्शन दिले आणि वरदान मागायला सांगितले. त्याने वर म्हणून मातेकडे संतान कामना केली. मातेने त्याला कशी संतान हवी आहे? अशी विचारणा केली. यानंतर मामडिया याने मातेलाच कन्येचा रूपाने जन्म घ्या, अशी प्रार्थना केली. मातेने प्रसन्न होऊन त्याच्या पोटी जन्म घेण्याचे वचन दिले आणि त्याच्या घरी आवड देवी या नावाने जन्म घेतला. त्यांना माता तनोटराय या नावाने आज ओळखले जाते.
आवड देवी यांच्या पाठोपाठ मामाडिया यांच्या घरी ६ बालिकांचा जन्म झाला. माता आवड देवीने लहानपणीच आपल्या दैवात्वाची प्रचिती लोकांना करून दिली, लवकरच त्यांचे नाव चारी दिशांना पसरले. मातेच्या भाविकांनी या मंदिराची स्थापना केली होती.
हे मंदिर ज्या भागात आहे तिथे एकेकाळी तनोट नावाचा राजा राज्य करत होता, त्यामुळे या भागाला तनोटराय क्षेत्र म्हणून ओळखले जायचे. यावरून या आवड मातेच्या मंदिराला माता तनोटराय मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले. तनोट राजाने या मंदिराचा जीर्णोद्धार आणि नव्याने प्राणप्रतिष्ठा केली होती.
आज हे मंदिर भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर आहे. भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान १९६५ साली झालेल्या यु*द्धात पाकिस्तानने भारतावर आक्र*मण करत तनोटराय मातेच्या मंदिरावर बॉ*म्बगोळे डागले. तब्बल ३००० बॉ*म्बगोळे पाकिस्तानकडून फेकण्यात आले होते, पाकिस्तानच्या ह*ल्ल्याने मंदिराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल आणि भारतीय सैनिकांचे मनोबल खच्ची होईल असे पाकिस्तानी सैनिकांना वाटले होते. पण झाले भलतेच पाकिस्तानच्या बाजूने फेकण्यात आलेला एकही बॉ*म्ब फुटला नाही, उलट जिवंत पण निष्क्रिय अवस्थेत पडून राहिले. मातेच्या मंदिरात तब्बल ४५० जिवंत बॉ*म्ब सापडले होते. या चमत्काराने भारतीय आणि पाकिस्तानच्या बाजूचे सैनिक चक्रावले होते.
१९७१ च्या यु*द्धावेळी पाकिस्तानने पुन्हा आक्र*मण केले, यावेळी पाकिस्तान आणि भारताच्या दरम्यान तनोटराय मातेच्या मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या लोंगेवाला सीमेवर यु*द्ध सुरु होते. अत्याधुनिक टॅंक घेऊन आलेले पाकिस्तानी सैन्य जिंकेल असे वाटण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली असताना, एक आश्चर्यकारक चमत्कार घडला आणि कुठल्याही अत्याधुनिक शस्त्रांचा वापर न करता भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याचे सर्व टॅंक नेस्तनाबूत केले. हा एक प्रचंड मोठा विजय होता आणि भारतीय सैनिकांनी या विजयाचे श्रेय माता तनोटराय यांना दिले.
भारतीय सैन्याच्या एका छोट्याशा तुकडीने एका भल्या मोठ्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या सेनेचा बिमोड केला, हे निश्चितच मोठे अग्निदिव्य होते. पण हे सर्व मातेच्या कृपेने शक्य झाल्याची भावना सैनिकांनी यु*द्धानंतर व्यक्त केली होती. या वीर जवानांच्या गौरवासाठी भारत सरकारने विजय स्तंभ या सीमेवर उभारला.
१६ डिसेंबरला भारतीय जवान या ठिकाणी उत्सव साजरा करतात. भारतीय सैन्याचा लोंगेवाला येथील विजय बघून पाकिस्तानी सैन्याला देखील मातेच्या देवस्थानाचे महत्त्व पटले आणि पाकिस्तानी सैन्याने देखील मातेची आराधना करायला सुरुवात केली.
पाकिस्तानचे ब्रिगेडियर शाहनवाज यांनी मातेसाठी चांदीचे छत्र अर्पण केले होते व मातेचे दर्शन देखील घेतले होते.
१९६५ च्या यु*द्धानंतर बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या (बीएसएफ) वतीने तनोटराय मातेच्या मंदिराजवळ चौकी उभारली होती. इतकेच नाही, मंदिराच्या देखभालीची जबाबदारी देखील स्वतःच्या खांद्यावर घेतली. आज मंदिराच्या साफसफाईपासून सगळेच कामं बीएसएफच्या माध्यमातून करण्यात येतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरक्षाव्यवस्था असून गस्त घालणारे जवान नेहमी मातेच्या दर्शनासाठी येत जात असतात. रात्रीच्या वेळी जवान येथे भजन कीर्तन देखील करतात.
तुम्हाला कधी भविष्यात या भागाचा दौरा करण्याची संधी मिळाली तर मातेच्या या मंदिराला अवश्य भेट द्या.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.