आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
लेखक: सत्यम अवधूतवार
विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा “रावणदहन योग्य की अयोग्य ?” ह्या प्रश्नावर चर्चाचर्वन चालु झालय. मूळात चर्चा राम आणि रावण ह्या पात्रांपुरती न करता ती त्यांच्या प्रतिकात्मक प्रवृत्तीच्या आधारावर करणे आवश्यक आहे. सरळ सांगायचं झाल्यास नायक विरुद्ध खलनायक, चित्रपटाच्या भाषेत सांगायचे झाल्यास Protagonist – Antagonist म्हणता येईल.
राम आणि रावण ही व्यक्ती म्हणुन नव्हे तर प्रवृत्ती म्हणुन समाजात प्रचलित आहेत. कुठलीही कथा, नाटक, चित्रपट ग्रेट आहे असं आपण केंव्हा म्हणु शकतो ? तर त्या मध्ये सर्व प्रकारच्या मानवी भावना समाविष्ट असतील तरच. मानवी भावना म्हणल्यावर ह्यात सर्व प्रकारच्या भावना आल्या, मानवी जीवनाशी संबंधीत असलेल्या सर्व गोष्टी आल्यात.
कुठल्याही कथेमध्ये जे कोणते पात्रं असतील, त्या पात्रांचा एकमेकांशी कसा परस्पर संबंध आहे आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात कोणते बदल होतात. समाजावर त्याचा (प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष) काय परिणाम होतो हे सर्वस्वी त्या पात्रांच्या स्वभावावर अवलंबुन असेल.
कुठलीही कथा पाहा, त्यात कुणीतरी एक वाईट व्यक्ती किंवा सरळ सरळ एक वाईट प्रवृत्ती असते व त्याविरुद्ध एक चांगला व्यक्ति व एक चांगली प्रवृत्ती असते. हे कुठल्याही कथेचं मूळ आहे. ह्यात प्रवृत्तीकडे दूर्लक्ष करुन व्यक्तीसापेक्ष चर्चा करणं अर्थहीन आहे.
चित्रपटाचे उदाहरण द्यायचे झाल्यास गब्बरसिंग सारखी व्यक्ती एक वाईट प्रवृत्तीचं प्रदर्शन करते तर जय – वीरु हे दोघे त्या प्रवृत्ती विरुद्ध लढणाऱ्या व्यक्तिचं प्रदर्शन करतात. आता येथे कुणी असं म्हणु शकणार नाही की चित्रपटात मुद्दाम गब्बरसिंगचं पात्र चुकीचं दाखवण्यात आलय, त्यावर अन्याय झालाय वगैरे…
चित्रपट क्षेत्रावर रामायण महाभारताचा असलेला जबरदस्त प्रभाव लपुन राहत नाही. विविध चित्रपटांमध्ये तो जाणवतोच. अगदी दादासाहेब फाळके निर्मीत-दिग्दर्शित अयोद्धेचा राजा, लंका दहन, व रामायण महाभारतातील लघुकथांवर बनलेले विविध भाषेतील चित्रपटांपासुन ते हम साथ साथ है, लज्जा, Ra-One, बाघी, तसेच Hollywood च्या Star Wars सारख्या सुप्रसिद्ध चित्रपटांमध्येही रामायणाची मूळ कथा आढळुन येते.
जर Star Wars ची पटकथा पाहिल्यास सरळ सरळ लक्षात येईल की Darth Vader हा Princess Leia चे अपहरण करतो Prince Luke Skywalker हा त्याच्या Chewbacca नामक मित्राच्या टोळीला सोबत घेऊन Darth Vader शी युद्ध करतो आणि Princess Leia ला सोडवतो and happy ending… बाघी चित्रपटातही तोच फॉर्मुला रॉनी, सिया आणि राघव. राघव सियाचे अपहरण करतो आणि रॉनी राघवला हरवुन सियाला परत आणतो.
महर्षी वाल्मिकी रचित रामायणात रावणवधानंतर बिभीषणकडे राज्यकारभार सोपवुन अयोद्ध्यानगरीत श्रीरामांचे सिता, लक्ष्मण व वानरसेनेसोबत आगमन व रामराज्याला सुरुवात इथपर्यंत आहे. त्यानंतर सितेच्या अग्निपरिक्षेची कथा हा उत्तर रामायणाचा भाग म्हणून नमुद केल्या जातो हा भाग वाल्मिकी रामायणात नाही.
सूरज बड़जात्या यांच्या “हम साथ साथ है” चित्रपटात रामायणाचा फार मर्यादित भाग वापरण्यात आला. रामाचा वनवास आणि कैकेयीला होणारा पश्चाताप व एकंदरीत कौंटुबिक परिस्थिती ह्यात दाखवली.
येथे कुणी रावण नव्हता ना कुणी सितेचं अपहरण केलं पण कथानकामध्ये आवश्यक असणारी एक नकारत्मक व्यक्ती (ममता) पती रामकिशन यांना मोठ्या (सावत्र) मुलाला व्यापारातुन बाहेर काढुन तिच्या मुलाच्या हातात व्यापार सोपवण्यास सांगते (अर्थात ती कैकेयी प्रमाणे वागते).
ह्या चित्रपटात रामायणातील कैकेयी ह्या पात्राची प्रवृत्ती दाखवण्यात आली आणि कैकेयीच्या स्वार्थी प्रवृत्तीमूळे रामावर कसा अन्याय झाला. हा एवढाच मर्यादित भाग हम साथ साथ है चित्रपटात येतो.
राजकुमार संतोषी यांच्या “लज्जा” ह्या चित्रपटात उत्तर रामायणातील भाग वापरण्यात आला, म्हणजेच सिता हे एक पात्र दिग्दर्शकाने चार वेगवेगळ्या स्वभावाच्या स्त्री पात्रांमध्ये विभागुन कथेमध्ये मांडलेले आहेत आणि त्या स्त्री पात्रावर रावणाद्वारे आणि रामाद्वारे सुद्धा सितेवर कसा अन्याय झाला हे “Feminism Point Of View” ने चित्रपटात दाखवण्यात आलय.
तर इथे स्त्री विरुद्ध पुरुष ही संकल्पना मांडलेली दिसून येते. उत्तर रामायणातील कथेचा आधार घेऊन राजकुमार संतोषी यांनी राम आणि रावण यांनी वेगवेगळ्या परिस्थिती मध्ये सितेला कसा त्रास दिला हे दाखवले आहे.
याचा सरळसरळ अर्थ काय होतो की, व्यक्तिसापेक्ष आरोप करणं हे किती तथ्यहीन आहे. कारण प्रत्येक व्यक्तिपरत्वे संकल्पना बदलत जातात. कुणाला उत्तर रामायणात रामाची प्रतिमा नकारात्मक वाटते, तर कुणाला मूळ रामायणातील रावणाची प्रतिमा नकारात्मक वाटते.
समाजमनात रावण हे एका वाईट प्रवृत्तीचं प्रतिक आहे. जरी रावण खुप विद्वान असला महान असला तरी त्याने धर्माविरुद्ध केलेले वर्तनच त्याच्या विनाशाचे कारण बनले होते. ह्यावर प्रत्येक व्यक्तीचं वेगवेगळं मत असु शकतं ते माझ्या वरील मताला अनुकल असेलच असं नाही पण मूळात इतरांच मत आणि माझं मत ह्यामध्ये सत्य काय आहे ते समजुन घेणं महत्वाचं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.