आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
रूमीच्या कविता, कोट्स, शायरी माहित नाही असा माणूस विरळंच. एक पर्शियन कवी, वक्ता, तत्वज्ञ, न्यायाधीश, मौलवी आणि सुफी कवी म्हणून रूमी सर्वपरिचित आहे, पण त्यापलीकडे सुद्धा रूमी कसा होता हे समजून घ्यायचं असेल तर इतिहासाची पाने चाळून पाहावी लागतील.
१३व्या शतकात पर्शियामध्ये जलालुद्दीन मोहम्मद रूमी नावाचा एक अवलिया कवी होऊन गेला ज्याने त्याच्या आयुष्यात एकूण ७०,००० कडवी लिहिली. त्याचं साहित्य दिवान-इ-शम्स–इ-तब्रीझी आणि मसनवी या दोन ऐतिहासिक खंडात सामाविष्ट करण्यात आलेलं आहे. रूमीच्या कविता भले त्या २ ओळीच्या असतील, चार ओळींच्या असतील परंतु त्याचे शब्द हृदयाला भिडतात.
जीवनातले अनेक अर्थगर्भ प्रसंग आणि त्यापाठीमागचं तत्वज्ञान रूमी आपल्या कवितांमधून उलगडतो.
त्याच्या कविता अगदी आत्ता आत्तापर्यंत, पर्शियन साहित्य जगत सोडलं तर कुणाला माहित नव्हत्या. मात्र त्यांचं इंग्लिश भाषांतर करून त्या अमेरिकेत २०व्या शतकाच्या शेवटी प्रसिद्ध झाल्या आणि रुमी जगभरात पोहोचला.
तसं पाहायला गेलं तर अरबी साहित्य, उर्दू, तुर्की अथवा पर्शियन साहित्याचा एक वेगळा बाज आहे. शायरी, शेर, गझल हे त्यातले प्रमुख भाग. उर्दू, अरबी मधले इतर अनेक कवी असतानासुद्धा रुमीची कविता जगभरातल्या लोकांच्या मनावर अधिराज्य करुन आहे. रूमीच्या कवितेतून प्रेम दिसतं पण ह्या प्रेमाची व्याख्या संकुचित नाही. प्रेम ही व्यापक भावना आहे आणि प्रेमाने माणसाच्या आयुष्यात नवनवीन ज्ञानाचे, सत्याचे आयाम दिसतात हे रूमीचं तत्वज्ञान आहे.
“You have to keep breaking your heart untill it opens” अशा शब्दात रूमी आयुष्यातलं अटळ सत्य सहजपणे सांगून जातो.
३० सप्टेंबर १२०७ रोजी त्या काळी पर्शियन साम्राज्याचा भाग असलेल्या अफगाणिस्तानमध्ये एका श्रीमंत घरंदाज कुटुंबात रूमीचा जन्म झाला होता. रूमीच्या जन्मानंतर मोंगल हल्लेखोरांपासून बचावासाठी म्हणून रूमीचे वडील सहकुटुंब रोमन अँटोनियामध्ये (आजचा तुर्कस्थान) गेले.
रोमन या शब्दाला जवळचं म्हणून रूमी, हे नाव जलालुद्दीन मोहम्मदने आयुष्यभर आपल्या नावाच्या शेवटी अभिमानाने मिरवलं.
आईचे तुर्की राजघराण्याच्या लोकांबरोबर असलेले नाते आणि न्यायाधीश म्हणून काम करणारे वडील अशा पार्श्वभूमीवर रूमीचे आयुष्य समाजाच्या उच्च स्तरातील लोकांमध्ये ऐषोआरामाचे गेले. वयाच्या २५व्या वर्षी आपल्या वडिलांच्या मृत्युनंतर तो एका मदरश्यामध्ये मौलवी देखील बनला.
असं मानल जातं जो रूमी आत्ता आपल्याला कवी म्हणून परिचित आहे त्याच्यामधली ही दैवी देणगी मिळवून द्यायला रूमीला शम्स नावाच्या व्यक्तीने मदत केली.
हा शम्स कोण होता याबद्दल इतिहासात मतभेद आहेत. बरेच लोक शम्सला रूमीचा समलैंगिक जोडीदार मानतात. इतर अनेक लोकं याचं खंडनसुद्धा करतात.
एक घरंदाज, खानदानी, श्रीमंत आणि उच्च स्तरात वावरणारा रूमीसारखा माणूस आणि हे विश्वची माझे घर म्हणून घर, दार, संपत्ती यांचा विचार न करता भटकणारा गरीब पण कलंदर, डोक्याने तिरकस असा फकीर शम्स यांच्यामधले संबंध नक्की काय आणि कसे होते याबाबत कुठल्याही इतिहासकाराला छडा लावता आलेला नाही. एक गोष्ट मात्र खरी, शम्सने रूमीला आयुष्याकडे बघण्याचा एक नवा दृष्टीकोन दिला.
दोघांमधले प्रेम नक्की कुठल्या प्रकारचे होते आणि त्या प्रेमाला लैंगिकतेची किनार होती का हे प्रश्न जर काही काळासाठी बाजूला ठेवले तर रूमीच्या स्वर्गीय कविता तयार झाल्या त्या याचं काळामध्ये जोपर्यंत शम्स त्य्याच्याबरोबर होता.
शम्स-इ-तब्रीझी मध्ये या साऱ्या कवितांचं संकलन आहे. ज्यामध्ये प्रेम, अध्यात्म, हृदय, सत्य, आत्मा, ईश्वर अशा संकल्पनेवर रूमी अफलातून लिहून जातो.
“Your task is not to seek for love, but merely to seek and find all the barriers within yourself that you have built against it.”
“What you seek is seeking you.”
“Don’t grieve. Anything you lose comes round in another form.”
या अशा अनेक साध्या वाटणाऱ्या रचनांमधून रूमी मनाची बंद कवाडे उघडत जातो. हृदयातले अनेक हळवे कप्पे शोधत जातो.
रूमी आणि शम्सची जवळीक अर्थातच समाजाच्या डोळ्यात येत गेली.
इतिहासाची पाने उघडून पाहिली तर लक्षात येते की दोघेजण तासन् तास निसर्गात भटकत असत, एकमेकांशी संवाद साधत असत आणि जेव्हा संवाद थांबेल त्यावेळी दोघेही नि:शब्द एकमेकांच्या संगतीत हृदयातल्या आवाजाला साद घालीत असत. हे अर्थात असे वागणे त्याकाळच्या समाजाला मान्य असणे शक्य नव्हते.
शम्सचे वाढते महत्व रूमीच्या जवळच्या माणसांना सहन झाले नाही आणि त्यांनी शम्सचा भयानक छळ करायला सुरुवात केली. त्याला कंटाळून शम्स एक दिवस निघून गेला. त्याच्या वियोगात वेड्या झालेल्या रूमीने त्याचा शोध घेण्याचा अनेकवार प्रयत्न केला.
काही काळानंतर त्याला कळाले शम्स दमास्कस मध्ये आहे तेव्हा त्याचा पत्ता मिळवून रूमीने त्याच्यासाठी पत्रे लिहिली, त्याला परत येण्याची विनंती केली आणि त्याप्रमाणे शम्स परतून आला देखील.
यावेळी त्यांची जी union झाली ती त्यांच्या आधीच्या काळापेक्षा वेगळी होती. इतक्या दिवसाच्या वियोगाने दोघांनांही गंभीर आणि शांत बनवले होते. गुरु-शिष्य अथवा विद्यार्थी आणि दाता असे जे नाते होते ते जाऊन रूमी आणि शम्स मानसिकरीत्या एकाच पातळीवर आले. त्यानंतरही त्यांची मैत्री, भटकंती चालू राहिली मात्र हे सुख फार काळ टिकले नाही. शम्सचा खून झाला आणि रूमी एकटा पडला.
शम्सच्या मृत्युनंतर रूमीच्या कविता एकटेपणाच्या दु:खाने अधिक खोल, आशयघन आणि गंभीर झाल्या. त्याच्या कवितेत शोक दिसू लागला पण त्याचबरोबर शरीर गेलं तरी तारांगणा पलीकडे असलेल्या शाश्वत सुखाची व्याख्यासुद्धा त्यातून व्यक्त झाली होती. शम्स त्याच्याबरोबर असताना ज्या काही कविता त्याने केल्या त्याचे संकलन म्हणजेच शम्स-इ-तब्रीज. २००६ साली हा खंड इंग्लिशमध्ये भाषांतरित होऊन जगभरातील वाचकांना वाचण्यासाठी उपलब्ध झालेला आहे.
शम्स गेल्यानंतर रूमीच्या आयुष्यात इतर अनेक मित्र येवून गेले. त्यापैकी काही लोकांचे उल्लेख सापडतात आणि अनेक जणांचे उल्लेख अज्ञात आहेत. प्रेम हे शरीर, वंश, धर्म यापलीकडे आहे, वेगळे आहे, त्याच्यावर भेदभावाची पुटे चढवू नका.
तुम्हाला जे हवंय ते तुमच्या खोल अंतरंगात आहे, ते तुम्हाला बाहेर कसं सापडेल? असे अनेक अंतर्मुख करणारे प्रश्न रूमीच्या कवितेत सापडतात. ईश्वराच्या जवळ तोच असतो ज्याने राग, द्वेष, भेद सोडून स्वत:मधली आणि दुसऱ्यामधली प्रेम भावना स्विकार केलेली असते, या अर्थाने रूमीच्या कवितेत ईश्वराचा उल्लेख येतो.
१ डिसेंबर १२७३ ला रूमीने या जगाचा निरोप घेतल्यानंतर त्याच्या अनुयायांनी त्याच्या नावावर स्वतंत्र पंथाची स्थापना केली.
जोधा अकबरमध्ये पाहिलेलं ख्वाजा मेरे ख्वाजा, दिल में समा जा हे गाणं अनेकांना आठवत असेल. हृदयातल्या ईश्वराला साद घालत मौलवी गोल गोल फिरत राहतात. त्यांचं हे फिरणं तासनतास चालू राहतं. हाच तो रूमीचा पंथ.
रूमी शम्सच्या वियोगात स्वत:भोवती तासंतास गोल फिरत राहून त्याची आठवण काढायचा. बऱ्याचदा त्याच्या तोंडून अगदी दैवी शब्द उमटायचे. शम्सचा वियोग, ईश्वराची प्रार्थना, ईश्वरामध्ये विलीन होण्याची इच्छा अशा संमिश्र भावना त्यात असायच्या. त्याच्या मृत्यनंतर त्याच्या अनुयायांनी तीच पद्धत चालू ठेवली. आजही रूमीचा हा पंथ तुर्कस्थान मध्ये पाहायला मिळतो.
रूमी गेल्यानंतर तब्बल ८०० वर्ष होवून गेली तरीसुद्धा त्याने लिहिलेल्या काव्याचा प्रभाव आज जगभर टिकून आहे यातच त्याचं खरं यश सामावलेलं आहे.
“The wound is the place where the light enters you”, असं म्हणून जाणारा रूमी कितीही वेळा वाचला तरी प्रत्येक वेळी एक नवा अर्थ देऊन जातो.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.