आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
पृथ्वीच्या निर्मितीपासून मानव आणि निसर्गाचं अतूट नातं आहे. परस्पर संबंधांतूनच निसर्गचक्र सुरू आहे. मानवाने काळाच्या ओघात निसर्गाचा योग्य तो वापर करणं शिकून घेतले. पावसाचे पाणी जमिनीवर पडून मातीत अंकुर फुटतात व त्याचे रूपांतर वृक्षामधे होते, याचे मानवाने सूक्ष्म निरीक्षण केले व शेती करायला सुरुवात केली.
सुरुवातीला शिकार करण्यासाठी दगडी हत्यारं ते बनवू लागले. या हत्यारांमध्ये पूढे प्रगती झाली. मानवाने तयार केलेली हत्यारे मानवाच्या महत्वाकांक्षेचे प्रतिक मानले जाते. काळ जसा पूढे सरकत गेला, तशी मानवाच्या बुद्धीत देखील वाढ होत गेली. निसर्गाच्या सानिध्यात राहून, त्याच्या निरीक्षणातून तो खूप काही शिकत गेला. तो फक्त शिकतच नव्हता तर आपल्या कलाचातुर्याने तो जीवनावाश्यक वस्तू तयार करू लागला. निसर्गातील अनेक आश्चर्यांमागील कारणे त्याने शोधून काढली. त्याने विज्ञानाच्या कक्षा प्रचंड रूंदावल्या.
झाडे व प्राणी या निसर्गाने दिलेल्या दोन अनमोल देणग्या आहेत. झाडाचा एकही भाग असा नाही जो दुरुपायोगी आहे. झाडांबरोबरच प्राणीसुद्धा या निसर्गचक्राचा एक महत्वाचा भाग आहे.
‘जीवो जीवस्य जीवनम्’ या तत्वानुसार प्राणी मानव एकमेकांवर अवलंबून असतात.
शेकडो वर्षांपासून मानव प्राण्यांचा उपायोग विविध कामांसाठी करत आला आहे. कबूतराचा वापर संदेशवाहक म्हणुन केल्याचा उल्लेख आहे. बैल शेतीच्या कामासाठी वापरले जातात. गाई, गुरं, कोंबड्या यासारखे प्राणी अनेक प्रकारे उपयोगी ठरतात. आज अनेकांचा व्यवसाय यांच्यावर अवलंबुन आहे. अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायावर चालतो.
भारताच्या जी. डी. पी.मध्ये या व्यवसायांचा मोठा वाटा आहे. प्राण्यांचे दात, केस आणि चमडीचा वापरदेखील अनेक कामासाठी करण्यात येतो. काही प्राणी नकळत आपल्या उपयोगी पडतात. जसे साप उंदीरांपासून शेतीचे रक्षण करतात. गांडूळ खत हे शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांसाठी उत्तम पर्याय म्हणून वापरले जाते.
गाईला तर आपल्याला संस्कृतीत माता म्हणुन संबोधले जाते. गोमूत्रापासून ते दुधापर्यंत सर्वच औषधी आहेत. कित्येक प्राण्याला आपल्या पौराणिक कथांमध्ये एक विशिष्ठ महत्व दिलेले आहे. त्यासोबत एखादी कथा देखील जोडली असल्याचे आढळून येते. जेव्हापासून मानव निसर्गाला व प्राण्यांना आपला गुलाम समजू लागला तेव्हापासून निसर्गचक्राचं संतुलन बिघडत गेले. स्वतःच्या स्वार्थासाठी निसर्ग व प्राण्यांचा त्याने स्वतःला वाटेल तसा उपयोग करणे चालू केले. या कथा खरंतर प्राण्यांची हानी होऊ नये, मानवने त्यांच्याशी क्रूरतेने वागू नये यासाठीच रचल्या असाव्यात.
आपल्या पुराणात एक कथा सांगितली जाते. पार्वतीने तिच्या मुलाला आपल्या दालनाच्या बाहेर उभे ठेवले. शंकराने आत जाण्याची विनंती केल्यावर मातेने कोणालाही आत सोडू असा आदेश दिला आहे असे सांगून शंकराला आत जाण्यास स्पष्ट नकार दिला. क्रोधात येऊन शंकराने आपल्याच मुलाचे शीर धडापासून वेगळे केले. हा सर्व प्रकार पार्वतीने बाहेर आल्यावर बघितल्यानंतर तिला अतीव दुःख झाले. तिने खरी हकीकत शंकराला सांगितल्यावर आपल्या कृत्याचा त्यांना पश्चाताप झाला. त्यांनी ताबडतोब सर्वांना दुसरे मस्तक शोधून आणाण्यची आज्ञा दिली.
शोधता शोधता सर्वजण एका हत्तीजवळ येऊन थांबले. हत्तीने आपले मस्तक आनंदाने महादेवाच्या चरणी अर्पण केले. शंकराने आपल्या मुलाच्या शरीरावर ते मस्तक बसवले व तो बालक पुनर्जीवित झाला.
गज अर्थात हत्तीचे मस्तक गणपतीला लावल्यामुळे त्याला आपण गजमुख असे म्हणतो. अशा अनेक पौराणिक कथांमधे आपल्या प्राण्यांचा उल्लेख केलेला आढळतो.
हत्ती निसर्गातील सगळ्यांत मोठा आणि शक्तिशाली प्राणी आहे. प्रामुख्याने आशिया खंडात हा प्राणी सर्वाधिक प्रमाणात आढळतो. हस्तीदंतांसाठी अनेक हत्तींची शिकार करण्यात येते. सर्कशीत खेळ दाखवण्यासाठी त्यांना उभे केले जाते.
काही गावांत हत्तीवर सवारी सुद्धा करतात. पण या सगळ्यांत त्यांना किती त्रास होत असेल याचा आपण विचारच करत नाही. आपल्या क्षणिक आनंदासाठी ते दुर्लक्षित होतात. पण त्यांना जो त्रास सहन करावा लागतो, जे काही भोगावं लागतं याचा विसर आपल्याला पडू नये. त्यांच्या यातनांची जाणीव आपल्याला राहावी यासाठी एक स्मारक भारतात उभारण्यात आले आहे.
आपण अनेक थोर पुरुषाचे स्मारक उभारतो. त्यांचे कार्य, विचार सीमित न राहता पुढच्या पिढीपर्यंत पोहचावे, त्यांनी केलेल्या कार्याचा विसर न पडावा हाच त्यामागील उद्देश असतो.
पण ‘हत्तींचं स्मारक’ ही संकल्पनाच वेगळी आहे.
फक्त हत्तीच नाही तर इतर अनेक प्राण्यांचीही आपण आपल्या स्वार्थासाठी हत्या करतो. त्यांनी केलेल्या मदतीच्या बदल्यात त्यांचे आभार मानण्याऐवजी त्यांची कत्तल केली जाते. त्यांनी केलेल्या मदतीची जाणीव आपल्याला असावी व आपल्या मनात त्यांच्याविषयी प्रेम, आदर निर्माण व्हावा यासाठी असे स्मारक उभारण्यात यायला हवे.
मथुरा येथे हत्तींसाठी एक खास स्मारक उभारण्यात आले आहे. वाईल्डलाइफ स. ओ. स या चॅरिटीद्वारे हे स्मारक उभारण्यात आले आहे. भारतात प्राण्यासाठी उभारण्यात आलेले असे हे पहिलेच स्मारक आहे.
जे हत्ती मानवाच्या क्रूरतेमुळे, स्वार्थीपणामुळे मृत पावले अशा हत्तींच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारण्यात आले आहे. हे स्मारक ताजमहलापासून थोड्याच अंतरावर स्थित आहे. या स्मारकात मोठमोठ्या दगडांवर त्या हत्तींची नावे कोरली गेली आहेत, ज्यांना क्षुल्लक कारणांसाठी आपल्या जीव गमवावा लागला आहे.
हत्तींची संख्या दिवसेंदिवस कमी होते आहे, त्यांचे रक्षण व संवर्धन करणे आवश्यक आहे, याची जाणीव करून देणे, हे स्मारक उभारण्यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे. इतर अनेक प्राण्यांप्रमाणे हत्तीसुद्धा आता लुप्त होत चाललेल्या प्राण्यांमध्ये गणले जातात.
त्यांचे संवर्धन व्हावे, रक्षण व्हावे यासाठी ही कल्पना खरोखरच कौतुकास्पद आहे. सर्वांनी नक्कीच भेट द्यायला हवी असे हे स्मारक आहे..!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.