आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
साधारण ८०चे दशक असेल जेव्हा, मुंबईमधील व्यापारी, बिल्डर्स आणि फिल्म मेकर्स अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला घाबरून जीवन जगत होते. मुंबईत माफियांचे राज्य होते, सगळीकडे खू*न आणि खंडणीचे सत्र सुरु होते. मुंबईतील सामान्य जनतेला या डी कंपनीच्या द*हश*तीपासून मुंबई पोलिसांनी मुक्ती दिली. मुंबई पोलीस दलातील अनेक अधिकाऱ्यांनी यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. यापैकीच एक होते प्रदीप शर्मा. एनकाऊंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळख असलेले प्रदीप शर्मा यांनी अंडरवर्ल्डच्या अनेक चांगल्या चांगल्या गुंडांना यमसदनी धाडले होते.
आग्र्याच्या खांदोली येथे जन्माला आलेल्या प्रदीप शर्मा आधी ग्वाल्हेरमध्ये राहिले, मग उत्तर प्रदेशला मथुरा तिथून धुळे आणि सर्वात शेवटी मुंबईत आले. इथे त्यांनी आपले एमएसस्सीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी मुंबई पोलीस कमिशनची परीक्षा दिली आणि त्यात यश मिळवून ते पोलीस दलात भरती झाले.
प्रदीप शर्मा १९८३च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांच्याबरोबर या बॅचमध्ये प्रफुल्ल भोसले, शिवाजी कोळेकर, विनायक सावडे, अस्लम मोमीन, विजय साळस्कर, रवींद्र आंग्रे, अशोक बोरकर अशा दिग्गजांचा यात समावेश होता. या सर्वांची ट्रेनिंग अरविंद इनामदार या अत्यंत प्रभावी मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली झाली होती. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर प्रदीप शर्मा यांची पहिली पोस्टिंग माहीम पोलीस स्टेशनला करण्यात आली. ज्यावेळी प्रदीप शर्मा यांनी आपली जबाबदारी सांभाळली त्यावेळी मुंबईत अंडरवर्ल्डची द*हश*त होती. दाऊद इब्राहिम, छोटा राजन सारख्या नामचीन गुंडानी पोलिसांना नाकेनऊ आणली होती.
प्रदीप शर्मा यांची नजर या सगळ्यांवर होती. काही दिवस माहीममध्ये काम केल्यानंतर प्रदीप शर्मा यांची मुंबई क्राईम ब्रँचला बदली करण्यात आली.
गॅंगवॉर, खंडणीच्या बळावर मोठमोठ्या गॅंगस्टर्सने आपले गुन्हेगारीचे साम्राज्य उभे केले होते. हे सगळेच गॅंगस्टर्स प्रदीप शर्मा यांच्या हिटलिस्टवर होते. प्रदीप शर्मा यांनी लगेचच स्वच्छता अभियान सुरू केले. छोटा राजन हा प्रदीप शर्मांच्या हिटलिस्टवर होता. छोटा राजनपर्यंत पोहचल्यानंतर त्यांनी दाऊदच्या टोळीला देखील पट्ट्यात घेण्यास सुरुवात केली. अंडरवर्ल्डच्या प्रत्येक निर्णयाची चाहूल आणि गुप्त माहिती प्रदीप यांच्यापर्यंत पोहचत असे. कुठलंही काळं काम करायला गुंड बाहेर पडले की प्रदीप शर्मा व त्यांची टीम त्यांना गाठून त्या गुंडांचा सफाया करत होती.
प्रदीप शर्मा आणि मुंबई पोलिसांच्या टीमवर अनेक पोलीस अधिकाऱ्यांपासून सामान्य जनतेचा देखील मोठा विश्वास होता. मुंबईतील गुंडगिरीला प्रदीप शर्माच आळा घालू शकतात, असा विश्वास त्यांना होता. ज्यावेळी प्रदीप शर्मा यांची टीम एखाद्या गुंडाचा एन्काउंटर करायची, त्यावेळी पत्रकारांना ते नेहमी सांगायचे की त्यांचा त्या गुन्हेगाराला जिवंत पकडण्याचा प्रयत्न होता, फक्त त्याने गोळीबार केल्यामुळे आम्ही बचावासाठी म्हणून फायरिंग केली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. गुंडाच्या भयाने ज्या जुहू आणि घाटकोपर पोलीस स्टेशनचा चार्ज कुठला पोलीस अधिकारी घेत नव्हता, त्या ठिकाणी प्रदीप शर्मा यांनी काम केले. इतकेच नाही तर, तेथील गुन्हेगारी देखील संपवण्यासाठी पुढाकार घेतला.
प्रदीप शर्मा यांनी सर्वात पहिला एन्काउंटर गँगस्टर विनोद मातकरचा केला होता. यानंतर सुभाष लकडवालाला कंठस्नान घातले होते. प्रदीप यांच्यासोबत विजय साळसकर आणि शंकर या दोन पोलीस अधिकाऱ्यांना लकडवालाला पकडायला पाठवले होते. पण लकडवाला हा पोलिसांना फसवून पळायला लागला. अखेरीस प्रदीप शर्मा यांनी आपल्या ९ एमएमच्या बंदुकीने लकडवालाच्या छातीचा वेध घेतला. ३ वर्षात प्रदीप शर्मा यांना एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाऊ लागले, त्यांच्या नावानेच गुन्हेगार थरथर कापायचे.
१९८९ ते २००६ या १७ वर्षांच्या कार्यकाळात प्रदीप शर्मा यांनी तब्बल ११२ एन्काउंटर केले. यात लष्कर-ए-तोयबाच्या तीन द*हश*तवाद्यांचा देखील समावेश आहे.
प्रदीप शर्मा यांच्यावर १९९६ मध्ये अंडरवर्ल्डला मदत केल्याचा आरोप लावण्यात आला होता. २००२ मध्ये झालेल्या घाटकोपर बॉ*म्बस्फो*टात त्यांचे नाव आल्यामुळे त्यांची धारावीत बदली करण्यात आली होती. नोव्हेंबर २००६ मध्ये झालेल्या लखनभैय्या बरोबरच्या चकमकीनंतर प्रदीप शर्मा यांना निलंबित करण्यात आले होते.
२००९ ते २०१३ प्रदीप शर्मा तुरुंगात होते. राम नारायण गुप्ता उर्फ लखनभैय्या हा माफिया छोटा राजनचा हस्तक होता. २००६ साली डी एन नगर पोलिसांच्या एका तुकडीने फेक एन्काउंटरमध्ये त्याला मारले. यानंतर प्रदीप शर्मांवरचे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत, पण त्यांना पुन्हा एकदा पोलिसांमध्ये नोकरी करण्याची संधी देखील मिळाली नाही. याविरुद्ध त्यांना न्यायालयीन लढाई लढावी लागली, जिचा निकाल त्यांच्या बाजूने लागला.
प्रदीप शर्मा म्हणाले होते की मी १२०० पेक्षा जास्त गुन्हेगारांना पकडले आहे आणि दोन डझनांपेक्षा अधिक कट्टरपंथी अतिरेक्यांना चांगल्या मार्गाला लावले आहे.
तब्बल ९ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्यांनी मुंबई पोलीस दलात त्यांनी पुन्हा प्रवेश केला. २०१७ मध्ये दाऊदचा भाऊ इकबाल कासकरला पकडण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
प्रदीप शर्मा यांनी इकबाल कासकरला दाऊदची बहीण हसीना पारकरच्या एरियामधून पकडले होते, हा तोच भाग होता जिथे पाऊल देखील ठेवण्याची पोलीस अधिकाऱ्यांची हिंमत होत नसे.
प्रदीप शर्मा यांचा प्रवास हा एखाद्या चित्रपटासारखा आहे. त्यांच्या कामगिरीने प्रभावित होऊन २००४ साली ‘अब तक ५६’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. २०१५ मध्ये या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित करण्यात आला. राम गोपाल वर्माच्या या चित्रपटात नाना पाटेकर यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. २०१४ मध्ये आलेला मराठी चित्रपट रेगे देखील यांच्याच कथेपासून प्रेरित होता.
प्रदीप शर्मा यांनी २०१९ मध्ये राजकारणात नशीब आजमावलं होतं, मात्र याठिकाणी त्यांना पराभवाची चव चाखावी लागली होती. प्रदीप शर्मा यांचे आजही नाव काढले तरी मुंबईतील गुंडांच्या अंगाचा थरकाप होतो, इतकी त्यांची द*हश*त आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.