आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
लगान चित्रपट ज्यावेळी पहिल्यांदा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, त्यावेळी लोक आनंदाने वेडे झाले होते. थिएटर गर्दीने खचाखच भरले होते. शेवटच्या चेंडूवर ज्यावेळी आमिर खान सिक्सर मारतो त्यावेळी सर्वत्र जल्लोषाचे वातावरण निर्माण व्हायचे. या चित्रपटाने तीन तासात भारतीय चित्रपटावर जी छाप सोडली होती, ती आजही कायम आहे.
तर चला जाणून घेऊ हिंदी सिनेमाला नवीन उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या लगान चित्रपटाच्या निर्मितीची रोचक कथा..
असे म्हणतात की, आमिर खान बॉलिवूडच्या त्या काही स्टार्सपैकी एक आहे, जे खूप विचार करून आपल्या सिनेमाची निवड करतात. फिल्म डायरेक्टर आशुतोष गोवारीकर यांच्यासाठी आमिरला लगानसाठी तयार करणे फार कठीण काम होते. ज्यावेळी गोवारीकर आपल्या सिनेमाची स्क्रिप्ट घेऊन पहिल्यांदा आमिरकडे गेले त्यावेळी आमिरने स्क्रिप्ट ऐकून सिनेमा करण्यास नकार दिला होता. आशुतोष यांना आमिरचा स्वभाव चांगलाच माहिती होता. त्यांना माहिती होते की स्क्रिप्ट कितीही चांगली असली तरी जोवर आमिरला पसंत पडत नाही तोवर काहीच उपयोग नव्हता. त्यामुळे त्यांनी आपल्या स्क्रिप्टमध्ये बदल केला आणि आमिरकडे गेले. पण यावेळी देखील आमिरने नकार दिला. पण आशुतोष यांनी निश्चय केला होता की ते आमिरसोबतच हा चित्रपट करतील.
त्यांनी सातव्यांदा स्क्रिप्टमध्ये बदल केल्यावर आमिरला स्क्रिप्ट पसंत पडली व त्याने आपला होकार कळवला.
या चित्रपटाच्या निर्मितीसाठी बराच मोठा खर्च करावा लागणार होता. आमिरने होकार कळवल्यावर आशुतोष प्रोड्युसरचा शोध घेऊ लागले. तो चित्रपट कुठल्याही चित्रपट निर्मात्यासाठी जुगारासारखा होता. त्यामुळे कुठलाच प्रोड्युसर या चित्रपटावर पैसे लावण्यासाठी तयार होत नव्हता. लोकांच्या ऑफिसात जाऊन जाऊन आशुतोषचे जोडे झिजायची वेळ आली, पण कोणीच तयार होईना.
आशुतोषची ही अवस्था बघून आमिरने चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली व स्वतः चित्रपटाचा प्रोड्युसर बनला. लगान हा एक पिरियड चित्रपट असल्याने त्याच्या शुटिंगचे देखील मोठे आव्हान होते. आशुतोषला या चित्रपटात ग्राफिक्सचा वापर करायचा नव्हता. पण यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करावे लागले असते, जे फिल्मच्या बजेटला बिघडवणारे ठरले असते.
बराच वेळ विचार केल्यानंतर या चित्रपटाच्या शूटिंगची लोकेशन रियल ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी गुजरातच्या भुजची निवड करण्यात आली. हा भाग शहरापासून लांब होता. इथे उत्तम सुविधा नव्हत्या. इथे ना हॉटेल होते ना चांगल्या खाण्यापिण्याची सोय होती. याशिवाय कडक ऊन. पण या गावातील रहिवाशांनी दिलदारपणे चित्रपटाच्या क्रूची मदत केली.
त्या लोकांनी अनेक गोष्टी ज्या आसपास उपलब्ध नव्हत्या, त्या क्रूला उपलब्ध करून दिल्या. या चित्रपटाच्या शुटिंगच्या वेळी ३०० भारतीय कलाकार, १५ ब्रिटिश कलाकार आणि १० हजार लोकांची गर्दी होती.
ज्या गावात ही शूटिंग सुरु होते, त्या गावाचा शोध घेणे देखील फार अवघड काम होते. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी शंभर जागा बघून झाल्यावर या जागेची निवड केली होती. आपल्या कॅरेक्टरशी सर्व कलाकारांना एकरूप होता यावं यासाठी त्या गावातील घरांमध्येच या कलाकरांनी मुक्काम केला होता. या लोकांच्या घरात राहून त्यांच्या कठीण जीवनाची जाणीव झाल्यावर त्या लोकांचे पात्र अधिक उत्तमपणे रंगवता येईल, हा यामागचा उद्देश होता.
या चित्रपटासाठी शेकडो एकर जमिनीचा वापर करण्यात आला होता. एक गावच या शूटिंगसाठी तिथे वसवण्यात आले होते. तब्बल सहा महिने या चित्रपटाचे शूटिंग चालले. शेकडो अडचणी असल्या तरी चित्रपटाच्या टीमने संपूर्ण मन लावून काम केले होते. शूटिंग संपेपर्यंत हा चित्रपट फक्त आशुतोषचा राहिला नव्हता, प्रत्येक कलाकाराने आणि ग्रामस्थांनी तो चित्रपट जगला होता.
अनेक महिने शूटिंग केल्यावर अखेरीस अनंत अडचणी पार करत १५ जून २००१ ला लगान प्रदर्शित करण्यात आला. त्यावेळी लगानच्या बरोबरीने गदर-एक प्रेमकथा हा चित्रपट देखील रिलीज करण्यात आला. दोन्ही चित्रपट समान ताकदीचे होते. एकीकडे प्रयोगशील लगान तर दुसरा फाळणीवर आधारित गदर होता. अनेकांना वाटले होते की गदरसमोर लगान टिकणार नाही. पण दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसचे विक्रम मोडले.
गदर हिट झाला पण लगानला समीक्षकांची कौतुकाची थाप मिळाली. एका रात्री चित्रपटाने अनेक नवीन रेकॉर्डस केले. भारतातच नाहीतर विदेशात देखीक लगानची चर्चा सुरु होती.
लगानला ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून पाठविण्यात आले. तिथे देखील पुढच्या पुढच्या राऊंडसाठी लगानची निवड करण्यात आली. चित्रपटसृष्टीच्या इतिहासात तिसऱ्यांदा असे घडत होते. लगानला ऑस्कर मिळू शकला नाही, पण सर्वत्र कौतुकाची थाप मिळाली. जगभरात भारतीय सिनेमाकडे बघण्याच्या दृष्टीत लगानमुळे बदल झाला. भारतच नव्हेतर जर्मनी, जपान, आफ्रिकेत देखील लगानची चर्चा होती.
चीनमध्ये नाव बदलून हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला, त्यावेळी तिथे देखील लोकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतले होते.
लगाननंतर अलीकडे भारतात खेळावर आधारित चक दे इंडिया, भाग मिल्खा भाग, सुलतान आणि दंगल अशा चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. लगान भारतीय चित्रपटसृष्टीतील एक ऐतिहासिक चित्रपट होता. आजही भारतीयांच्या मनात लगानचे एक वेगळे स्थान आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.