आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
कृषिप्रधान भारतात सर्वांत अवघड आणि तोट्याचा व्यवसाय म्हणजे शेतीव्यवसाय. भारतात शेती करणे म्हणजे तारेवरची कसरत. त्यातही अवकाळी, दुष्काळ, इत्यादी संकटांवर मात करून पीक घेणे म्हणजे सोपे काम नाही. १९७२ साली भारतात भीषण दुष्काळ पडला होता. या दुष्काळामुळे सुमारे २० लाख लोकांचा बळी गेला. १९७२ ते १९७५ या वर्षांमध्ये भारतासह जगाच्या अन्य भागांमध्ये भीषण अन्न संकट ओढवले होते.
अशा परिस्थितीत देशातील अनेक शेतकऱ्यांनी आपापल्या जमिनी विकून उदरनिर्वाह चालवला. गुजरात राज्यातही भयावह परिस्थिती होती. गुजरातमधील चंदुभाई विराणी यांच्या वडिलांनी देखील शेती विकली होती आणि त्यांना यातून १० हजार रुपये मिळाले. पण या कठीण परिस्थितीत काहीही न करता शांत बसून चालणार नव्हतं.
आर्थिक अडचणींमुळे चंदुभाईंना दहावीपर्यंतच शिक्षण घेता आले होते. आर्थिक अडचणींवर मात करण्याच्या दृष्टीने त्यांचे कुटुंब गुजरातमधील दुर्गम भागातून धुंडोराजी या गावात आले. २० हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून चंदुभाई आणि त्यांचे दोन भाऊ मेघजीभाई आणि भिखुभाई यांनी शेतीच्या अवजारांचा व्यापार सुरु केला. पण दोन वर्षांमध्येच हा व्यवसाय बंद पडला.
त्यानंतर चंदुभाई आणि त्यांच्या भावांनी अनेक लहान मोठ्या नोकऱ्या केल्या. यांमध्ये राजकोट शहरातील सुप्रसिद्ध ऍस्ट्रॉन सिनेमा थिएटर्सचे सीट्स रिपेअर करणे, सिनेमांचे पोस्टर्स लावणे आणि थिएटरच्या कॅन्टीनमध्ये काम करणे यांचा समावेश होता. त्यानंतर चंदूभाईंनी याच थिएटरजवळ खाद्यपदार्थ विकायला सुरुवात केली. पुढे त्यांना महिना १००० रुपये इतक्या किंमतीवर ऍस्ट्रॉन सिनेमा थिएटरमध्येच खाद्यपदार्थ विकण्याचे कंत्राट देण्यात आले. त्यांच्याकडील सॅंडविचेस लोकांच्या पसंतीला पडत होती. पण लोकांच्या आवडीचे हे सॅन्डविचेस ते घरी नेऊ शकत नव्हते.
कालांतराने चंदुभाईंना एक भन्नाट कल्पना सुचली आणि त्यांनी थिएटरमध्ये बटाट्याचे वेफर्स विकायला सुरुवात केली. काही दिवसांनी वेफर्सचे उत्पादन वाढवण्याची गरज भासू लागली, पण त्यासाठी एक स्वतंत्र कारखाना आणि यंत्रसामुग्रीची आवश्यकता होती.
वडिलांकडून जमिनीचे १० हजार रुपये घेऊन त्यांनी घरातच एका छोट्या कारखान्याची सुरूवात केली. कारखान्याची सुरुवात झाल्यानंतर चंदुभाईंच्या व्यवसायातही वाढ झाली आणि त्यांनी आणखी दोन कॅन्टीन्समध्ये वेफर्स पुरवायला सुरुवात केली. कालांतराने त्यांनी आपल्या वेफर्सची विक्री ३० दुकानांमध्ये सुरु केली. हळू हळू व्यवसायात वाढ होत गेली आणि चंदुभाईंना शहराच्या बाहेर एक कारखाना सुरु करावा लागला.
१९८९ साली चंदुभाईंनी ५० लाखांचे कर्ज घेऊन गुजरातमधील सर्वांत मोठा बटाट्याचे वेफर्स तयार करण्याचा कारखाना उघडला. वेफर्सची गुणवत्ता, स्वच्छता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या गोष्टींवर चंदुभाईंनी लक्ष केंद्रित केले होते. काही दिवसांनी मागणीबरोबरच वेफर्सचे उत्पादन देखील वाढवण्याची गरज भासू लागली, आणि तासाला सुमारे २५० किलोग्रॅम वेफर्स या प्रचंड क्षमतेने उत्पादन सुरु झाले. यावेळी चंदुभाईंची महिन्याची कमाई होती सुमारे ३० हजार रुपये, जे आजच्या काळात साधारणतः लाखभर तरी किमतीचे असतील.
१९९२ साली त्यांनी ऍस्ट्रोन सिनेमा थिएटरजवळील बालाजी हनुमान मंदिराच्या नावावरून “बालाजी” या ब्रॅण्डची सुरुवात केली. आपल्या चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या बालाजी वेफर्सने लोकाग्रहास्तव नमकीन आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये देखील आपले नशीब आजमावले.
२००० सालापर्यंत बालाजी वेफर्सकडे गुजरात राज्यातील एकूण वेफर्स मार्केटपैकी ९०% मार्केट शेअर होता, तर ७०% नमकीन्सचा मार्केट शेअर होता. बालाजीकडे १०० पेक्षा जास्त डिस्ट्रिब्युटर्स अर्थात वितरक आणि ३० हजारांहून अधिक रिटेलर्स म्हणजेच किरकोळ व्यापारी एवढं मोठं नेटवर्क होतं. तर त्यांच्या कारखान्याची क्षमता प्रचंड वाढली होती. सुरुवातीला एका तासाला २५० किलो वेफर्स तयार करणारा कारखाना आता एका तासाला १२०० किलो वेफर्सचे उत्पादन करीत होता. पण ‘बालाजी वेफर्स’ हा खऱ्या अर्थाने एक ब्रँड बनवायचा असेल तर मात्र गुजरातच्या बाहेरही आपली उत्पादने पोहोचायला हवीत याची चंदुभाईंना पुरेपूर जाणीव होती.
चंदुभाईंनी राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात ‘बालाजी वेफर्सची’ सुरुवात केली. इतर राज्यांमध्ये गेल्यानंतर बालाजी वेफर्सने तिथल्या खवय्यांची नस चांगल्या प्रकारे ओळखली होती. त्यांनी विशिष्ट प्रांतातील खाद्य संस्कृतीनुसार फ्लेवर्स ठेवले होते. गुजरातसाठी खास तयार केलेला गाठीया फ्लेवर्स आणि महाराष्ट्रासाठी खास तयार केलेला चाट चस्का फ्लेवर यांच्यामुळे बालाजी वेफर्स हा ब्रँड इतर राज्यांतही प्रसिद्ध झाला.
बघता बघता बालाजी वेफर्स हा एक मोठा ब्रँड बनला आणि त्याचे मूल्यांकन, म्हणजेच व्हॅल्युएशन झाले १००० करोड. त्यावेळी मार्केटमध्ये लेज आणि अंकल चिप्स नावाचे वेफर्स होते, पण बालाजी वेफर्स या दोन्ही ब्रँडइतकीच किंमत लावून त्यांच्यापेक्षा २५% जास्त वेफर्स देत असे. अमेरिकन मल्टिनॅशनल कंपनी पेप्सीच्या लेज कंपनीने भारतात आपलं बस्तान बसवलं असतानाच बालाजी वेफर्सने मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री केली होती. बालाजी वेफर्समुळे लेजला १०% मार्केट शेअर गमवावा लागला. आकडा लहान वाटत असला तरी कंपनीसाठी तो एक मोठा धक्का होता.
याचीच दखल घेऊन पेप्सीने २०१३ साली बालाजी वेफर्स ४००० करोड रुपयांमध्ये विकत घेण्याची ऑफर दिली. यावेळी बालाजी वेफर्स १८०० करोडचा व्यवसाय करीत होतं. पण बालाजी वेफर्सचे सर्वेसर्वा चंदुभाई विराणींचे आणखी मोठे प्लॅन्स आहेत. म्हणूनच त्यांनी त्यावेळी देखील पेप्सीने दिलेली ही ऑफर नाकारली. पेप्सीबरोबरच केलॉग्स (kellogg’s) नावाच्या एका आंतरराष्ट्रीय कंपनीने देखील बालाजी वेफर्स आणि चंदुभाईंना अशीच ऑफर दिली होती, पण त्यांनी ही ऑफर देखील नाकारली.
आजमितीस बालाजी वेफर्स वर्षाकाठी ४००० करोडची कमाई करते. देशभरात त्यांचे चार मोठे कारखाने आहेत, या कारखान्यांमध्ये दररोज तब्बल ६५ लाख किलो बटाटे आणि १ कोटी किलो इतर खाद्यपदार्थांवर प्रक्रिया होऊन विविध नमकीन्स आणि वेफर्स बनवले जातात. म्हणूनच चंदूभाई विराणी यांना वेफर्सचा सुलतान म्हणतात. कंपनीच्या यशामध्ये सुमारे ५ हजार कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे, ज्यापैकी निम्मा आकडा महिलांचा आहे.
ऍस्ट्रोन थिएटरमध्ये खाद्यपदार्थ वितरित करण्याचे कंत्राट मिळाल्यानंतर चंदुभाईंच्या आयुष्यात क्रांती झाली. सुरुवातीच्या काळात यश मिळूनही, चंदुभाईंनी इतर उद्योगांमध्ये आपले नशीब आजमावले नाही. “एकावेळी एक क्षेत्र. एका वेळी एक लढा,” असं ६४ वर्षीय चंदुभाई म्हणतात.
हाताशी काहीही नसताना केवळ १० हजार रुपयांपासून सुरु केलेला पण आज ४००० करोडपेक्षाही जास्त मूल्यांकन असलेला ब्रँड अनेक नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.