आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
प्रत्येक भारतीय व्यक्तीसाठी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोन्ही तारखांचे महत्त्व फार मोठे आहे. १५ ऑगस्ट १९४७ साली भारत इंग्रजांच्या तावडीतून मुक्त झाला तर २६ जानेवारी १९५० रोजी भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनला. भारताने लोकशाही राजव्यवस्थेचा स्वीकार केला, या व्यवस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या हातात राष्ट्राच्या कारभाराच्या चाव्या आल्या. भारतात संवैधानिक व्यवस्था अस्तित्वात आल्यामुळे भारतातील जनसामान्य लोकांना अनेक मूलभूत अधिकार प्राप्त झाले, यामुळेच प्रत्येक भारतीय नागरिकासाठी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व फार मोठे आहे.
आपण प्रजासत्ताक दिनाची परेड टीव्हीवर पाहिली असेलच. प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या सुरुवातीला ध्वजारोहण करण्यात येते. यावेळी लष्कराकडून २१ तोफांची सलामी देण्यात येते, तोफांचा आवाज इतका मोठा असतो की आपलं लक्ष लगेचच त्याकडे आकर्षित होतं. राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ ही तोफांची सलामी देण्यात येते व त्यानंतर राष्ट्रगीताची धून वाजण्यास सुरुवात होते.
प्रजासत्ताक दिनाला तोफांची सलामी का दिली जाते? यामागे देखील एक विशेष कारण आहे.
२१ तोफांची सलामी देण्याची परंपरा जगातील अनेक देशांमध्ये प्रचलित आहे. याचा प्रयोग देशातील प्रमुख व्यक्तींच्या सन्मानासाठी करण्यात येतो. खासकरून राष्ट्रपतींना मानवंदना देण्यासाठी या तोफांना बत्ती देण्यात येते. परदेशी पाहुणे ज्यावेळी देशाच्या दौऱ्यावर येतात त्यावेळी त्यांच्या सन्मानार्थ देखील तोफांची सलामी देण्यात येते. पण तोफांची सलामी देण्याची ही परंपरा भारत स्वतंत्र होण्याच्या ही फार अगोदरची आहे, याची मुळं १७ व्या शतकात आढळतात, यामागे एक रंजक कथा आहे.
एकदा ब्रिटिश नौदलाने त्यांच्या शत्रूसमोर शांती प्रस्ताव ठेवला व या प्रस्तावाच्या माध्यमातून ब्रिटिशांनी आपापले ह*त्यार रिकामे करण्याची मागणी केली. या मागणीला शत्रुपक्षाने देखील दुजोरा दिला. ब्रिटिशांनी सर्वप्रथम हवेत गोळी*बार केला आणि त्यांचे हे कृत्य बघून शत्रूने देखील हवेत गोळी*बार केला.
या घटनेनंतर अशा प्रकारचा गोळी*बार हा शांततेच्या वाहनासाठी ओळखला जाऊ लागला. २१ तोफांची सलामी म्हणून देखील याला ओळखले जाऊ लागले.
ख्रिश्चन धर्मात ७ या आकड्याला मोठे धार्मिक महत्त्व आहे. ब्रिटिश लोकांमध्ये ज्यावेळी एखाद्या सैनिकाचा मृत्यू व्हायचा त्यावेळी त्या मृत सैनिकाला त्याच्या सेवेसाठी मानवंदना देण्यात यायची. यावेळी सात बंदूकधारी तीन वेळा आकाशात बंदुकीने फायरिंग करायचे, म्हणजे सात बंदुकींतून तीन गोळ्या या हिशोबाने २१ गोळ्यांची सलामी देण्यात यायची, काही वेळा तोफा अथवा रणगाडे वापरून देखील सलामी देण्यात यायची. ७ तोफांमधून ३ वेळा गोळाफेक केल्यानंतर तिला २१ तोफांची सलामी म्हटले जाऊ लागले.
ब्रिटिशांच्या कवायती फौजेसह ही २१ तोफांच्या सलामीची परंपरा भारतात आली. यानंतर भारतात देखील बंदूक, तोफ आणि रणगाडे यांच्या मदतीने सलामी देण्यास सुरुवात झाली. ‘
तोफांची सलामी हा आदर व्यक्त करण्याचा एक प्रकार बनला. भारतात ब्रिटिश गेल्यानंतर देखील प्रजासत्ताक दिनी तोफांनी सलामी देण्याची परंपरा आजदेखील सुरु असून दरवर्षी सैन्यदलाकडून राष्ट्रपती महोदयांना या पद्धतीने मानवंदना देण्यात येते. ही सलामी प्रजासत्ताक दिनी ज्यावेळी राष्ट्रगीत सुरु असते त्यावेळीच दिली जाते.
५२ सेकंदाच्या कालावधीसाठी चालणाऱ्या राष्ट्रगीताच्या वेळी प्रत्येक २.२५ सेकंदाला ३ वेळा ही सलामी देण्यात येते. ज्या तोफांचा वापर भारतीय सैन्यदलाकडून यासाठी करण्यात येतो त्या तोफांना २५ पाउंडर्स म्हणून देखील ओळखले जाते.
२१ तोफांच्या सलामीला प्रामुख्याने शत्रूला शांततेचा संदेश देण्यासाठी वापरण्यात येते. भारत वगळता चीन, बांगलादेश, कॅनडा इत्यादी देशांमध्येसुद्धा अशा प्रकारे सलामी देण्यात येते.
जेव्हा ब्रिटिशांनी ही पद्धत भारतात रुजवली त्याच्या आधीपासून काश्मीर आणि इतर प्रांतात अशाप्रकारे तोफांना बत्ती देऊन मानवंदना देण्याची प्रथा अस्तित्वात होती. या ठिकाणी १७ ते १९ तोफांची सलामी देण्यात येत होती.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याशी या २१ तोफांच्या सलामीचा फार जवळचा संबंध असून तो सोहळा या सलामीशिवाय अपूर्ण आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.