आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
भारतीयांच्या बुद्धिमत्तेची दखल सगळ्या जगाने घेतली असली तरी आपण भारतीय मात्र आपल्याच विद्वानांना विसरतो. त्याऐवजी पाश्चिमात्य देशातील वैज्ञानिकांचे गोडवे गात असतो.
विमानाचा शोध लावणारे राईट बंधु सगळ्यांना माहीत आहेत, परंतु भारतात त्यांच्या आधीच पहिले विमान बनवणारे भारतीय शिवकर तळपदे मात्र आपल्याला माहीत नाही. पायथागोरसच्या प्रमेयाची सिद्धता बौध्दायन नावाच्या भारतीय गणितज्ञाने केली होती असाही दावा आता केला जात आहे.
आज आपण अशाच एका आधुनिक भारतातील अनेक शोधांचे पेटंट नावे असलेल्या एका भारतीय संशोधकाची माहिती बघणार आहोत.
या भारतीय एडिसनचे नाव आहे- शंकर आबाजी भिसे.
ब्रिटिशकालीन मुंबई शहरात जन्म झालेले शंकर भिसे लहानपणापासूनच संशोधनात रस घेत असत. भारतीय विद्वत्तेचे झेंडे परदेशात फडकवणाऱ्या या संशोधकाचा जन्म २९ एप्रिल १८६७ ला मुंबईत झाला.
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हटलं जातं ते खरंच आहे. अवघ्या १४ व्या वर्षी त्यांनी कोल गॅस बनवणारे उपकरण बनवले होते. १६व्या वर्षी संशोधनासाठी इंग्लंड किंवा अमेरीकेत जाण्याचे स्वप्न त्यांनी बघितले.
त्यावेळी विज्ञानाकडे असलेली भारतीयांची उदासीनता बघता हे विचार अगदी आश्चर्यचकीत करुन सोडणारे आहेत. त्यासाठी शंकर आबाजी भिसे यांचे अधिकच नवल वाटले तर नवल वाटायला नको.
१८९०-९५च्या काळात त्यांनी दृष्टीय भ्रमाच्या संकल्पनेवर काम केले. एका पदार्थाचे परावर्तन दुसऱ्या पदार्थात होण्याचे प्रात्यक्षिक त्यांनी दाखवले. इंग्लंडमधील मँचेस्टर शहरात झालेल्या एका स्पर्धेत त्यांनी हेच प्रात्यक्षिक सादर केले तेव्हा त्यांनी पहिले पारितोषिक मिळवले.
या स्पर्धेत अनेक युरोपियन संशोधकांनी सहभाग घेतला होता. अल्फ्रेड वेब नावाच्या एका वैज्ञानिकाने त्यावेळी त्यांची स्तुती केली होती. या स्पर्धेत पुरस्कार म्हणुन त्यांना एक सुवर्ण पदक देण्यात आले होते.
मुंबईत राहत असताना त्यांनी एका सायन्स क्लबची स्थापना केली होती. मराठीत एका विज्ञान पत्रिकेचे प्रकाशनसुद्धा ते करत असत. या पत्रिकेचे नाव ‘विविध कला प्रकाश’ असे होते. विज्ञानाचे महत्त्व समजुन सांगण्यासाठी वापरली गेलेली सोपी भाषा हे या पत्रिकेचे वैशिष्ट्य होते.
त्याच वेळी लंडनमध्ये एका आगळ्या वेगळ्या स्पर्धेची घोषणा करण्यात आली. लंडनमध्ये प्रकाशित होत असलेल्या एका मासिकात या स्पर्धेची जाहिरात आली होती. किराणा सामानाचे वजन आणि पैकिंग करु शकेल अशी एक ऑटोमेटिक मशिन बनवण्यासाठी ही जाहिरात होती.
भिसेंनी आपले डिझाइन पाठवली आणि त्यांचे यंत्र लंडनमध्ये स्विकारण्यात आले. या यंत्राच्या शोधाने संशोधन विश्वात भिसे यांचे नाव ओळखले जाऊ लागले.
यानंतर भिसेंनी आर्थिक पाठिंबा मिळवण्यासाठी लंडनला जाण्याचे ठरवले. जाण्याअगोदर ते आपल्या मित्रांना “एक तर मी खुप मोठा संशोधक होइल नाही तर माझे पैसे संपतील. परंतु जोपर्यंत दोन्हीपैकी एक होत नाही तोपर्यंत मी परत येणार नाही” असे बोलून गेले होते.
लंडनला जाण्याच्या अगोदर त्यांची ओळख त्यावेळच्या राष्ट्रीय कॉंग्रेसच्या सचिवांशी झाली. त्यांच्या पत्राने भिसेंची ओळख प्रसिद्ध उद्योगपती आणि पुढे जाउन भारताच्या स्वतंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या दादाभाई नौरोजी यांच्याशी झाली.
पुढे जाऊन दादाभाई नौरोजींनी भिसेंना आर्थिक पाठबळ देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तसा करारसुद्धा केला. त्याच बरोबर त्यांनी भिसेंना वाचण्यासाठी बरेच आधुनिक विज्ञानाशी संबंधित लेख आणि पुस्तके वाचण्यास दिली.
भिसेंच्या कारकिर्दीतील सगळ्यात महत्त्वाचा शोध होता तो छपाई क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवून आणणारा त्यांचा “भिसोटाईप”. त्याकाळी छपाई करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘सी टाईप’च्या ठोकळ्याचे यंत्र अतिशय हळु काम करत असे.
अशा वेळी भिसेंनी हा वेग वाढवण्यासाठी एका नविन यंत्राची निर्मिती केली. या यंत्रालाच भिसोटाईप म्हणुन ओळखले जाऊ लागले. हे यंत्र एवढे क्रांतीकारी होते की लंडनच्या काही संशोधकांनी त्याच्यावर विश्वास ठेवण्यास नकार दिला.
भिसेंनी मग लंडनमधून आर्थिक मदत जमवली आणि स्वत:चा धातू निर्मितीचा कारखाना निर्माण केला. याच कारखान्यात १९०८मध्ये त्यांनी हे यंत्र या संशोधकांना बनवून दाखवले तेव्हा त्यांनी विश्वास ठेवला.
हे यंत्र एका मिनिटात १२०० वेगवेगळ्या अक्षरांची छपाई करु शकत होते. या यंत्रामुळे भिसेंची ख्याती जगभर पसरली. आता त्यांचे विरोधक सुद्धा त्यांची स्तुती करु लागले होते.
सगळे ठिक चालू असताना दादाभाई नौरोजी यांनी भिसेंना नविन गुंतवणुकदार शोधायला सांगितले. हेनरी हिंडमेन या इंग्रज उद्योजकाशी त्यांनी भिसेंची ओळख करुन दिली. भिसोटाईपसाठी १५,००० पाऊंड देण्याची त्यानी वचन दिले, परंतु त्याला ते पाळता आले नाही.
त्यावेळात त्यांनी एकाच वेळी ३००० अक्षरांची छपाई करु शकेल असा भिसोटाईपचा पुढचा प्रकार सुद्धा बनवला होता. पैशांच्या कमतरतेमुळे त्यांना भिसोटाईप बाजारात योग्य पद्धतीने आणताच आला नाही आणि डिसेंबर १९०८ मध्ये त्यांना लंडन सोडावे लागले.
भिसेंच्या कामाने अजुन एका नेत्याला भुरळ घातली होती, ते नेते होते गोपाळ कृष्ण गोखले. मुंबईला येताना जहाजावर त्यांची भेट झाली होती. गोखलेंच्या आग्रहाखातर कॉंग्रेसच्या मद्रास येथील वार्षिक अधिवेशनात भिसेंनी प्रमुख पाहुणे म्हणुन हजेरी लावली होती.
पहिल्या महायुद्धाच्या वेळी त्यांना अमेरीकेत जाण्याचा योग आला. तिथे त्यांची ओळख लाला लजपतराय यांच्याशी झाली. लाला लजपतराय यांनी त्यांना असे अनेक अविष्कार घडवून भारताची मान उंच करत राहा असा आशिर्वाद दिला. याच वेळी त्यांनी अमेरीकेत एका छपाई यंत्राची निर्मिती केवळ ३ दिवसात बनवले होते.
‘भिसोटाईप’ बरोबरच त्यांनी बाकी क्षेत्रात सुद्धा अनेक शोध लावले. रसायनशास्त्र आणि विद्युतक्षेत्रात त्यांनी भरपूर शोध लावले. १९१७ मध्ये त्यांनी एका साबणाची निर्मिती सुद्धा केली होती. याचे सर्व अधिकार त्यांनी एका इंग्रजी कंपनीला विकले होते.
हवेतून वायू वेगळे करु शकणारे एक यंत्र सुद्धा त्यांनी बनवले होते. सुर्यप्रकाशाचे रुपांतर विद्युत उर्जेत करणारे एक यंत्र सुद्धा त्यांनी बनवले होते.
ऑटोमेडिन नावाचे एक औषधसुद्धा त्यांनी बनवले होते. पहिल्या महायुध्दात या औषधाचा वापर अँटीसेप्टीक म्हणून मोठ्या प्रमाणात केला गेला. या औषधातुन भिसेंना बरेच पैसे मिळाले. याच औषधाची निर्मिती भारतात करण्याची त्यांची इच्छा अपूर्णच राहिली.
भिसेंनी त्यांच्या कारकिर्दीत २०० पेक्षाही जास्त शोध लावले. ४० पेटंट त्यांच्या नावावर आहेत. यामुळेच त्यांना अमेरीकेत ‘भारतीय एडिसन’ म्हणत असत. आपल्या या शोधवृत्तीचे श्रेय भिसे यांनी स्वत: परदेशी मासिकांना दिले आहे.
त्यांच्या शेवटच्या काळात ते विज्ञानापासून दुर गेले आणि जादूटोणा सारख्या गोष्टीत त्यांनी रस घेण्यास सुरुवात केली. यामुळेच त्यांच्या शोधांना शेवटच्या काळात भारतीय जनतेपासून दुर ठेवले गेले असे सांगितले जाते.
महात्मा गांधी यांच्या विचारांचे पुरस्कर्ते असलेले आणि स्वातंत्र्य चळवळीत सहभाग असलेले शंकर आबाजी भिसे यांचा मृत्यू ७ एप्रिल, १९३५ ला न्यूयॉर्कमध्ये झाला.
४० पेटंट नावावर असताना एडीसन म्हणून संबोधले जात असले तरी प्रसिद्धीच्या बाबतीत मात्र भिसे निकोला टेस्ला होते. आयुष्यभर केलेल्या शोधांची पोचपावती त्यांना मिळालीच नाही.
संशोधन क्षेत्रात कसलेही सरकारी अनुदान, आर्थिक मदत नसलेल्या काळात भारताचा झेंडा इंग्लंड, अमेरीकेत झळकावणारे डॉ. शंकर आबाजी भिसे हे आजच्या तरुण पिढीसाठी खरे आदर्श आहेत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.