आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
पँजीयापासुन गोंडवना, गोंडवनावरुन युरेशीया, युरेशीया ते आशिया आणि मग भारत. सगळे जग भौगोलिकदृष्ट्या आधी एकच असा मोठा भूखंड होता. नैसर्गिक हालचालींमुळे आधी खंड आणि मग देश तयार झाले. म्हणजे भौगोलिकदृष्ट्या सगळे देश एकमेकांशी होते आणि आजही आहेत. परंतु यापेक्षाही मोठा एक समान घटक काही देशांना एकमेकांशी जोडतो आणि तो म्हणजे इतिहास. हजारो वर्षांचा इतिहास लाभलेल्या विविध लोकसंस्कृतींचा उदय आणि अंत इतिहासाने बघितला आहे.
असाच एक इतिहास आहे, भारतापासुन ४७०० किमी दुर असलेल्या, पुर्व युरोप आणि पश्चिम आशियाच्या सीमेवर वसलेल्या अझरबैजान या देशातील “श्री गणेशाय नम:” असे शब्द लिहिलेल्या “फायर टेम्पल‘ या मंदिराचा. भारत आणि अझरबैजान या देशांमध्ये ऐतिहासिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या या मंदिराबद्दल आज आपण जाणुन घेणार आहोत.
हिंदू देवतेची महती गाणारे एक संस्कृत वाक्य मुस्लिम बहुसंख्य असलेल्या राष्ट्रात असणे हे एक नवलच. अंदाजे ५ व्या ते १५ व्या शतकात, भारतीय व्यापारी मध्य आणि दक्षिण पुर्व आशियाकडे व्यापारासाठी प्रवास करत असत. आता असलेल्या पंजाब मधून अनेक व्यापारी त्यावेळी हजारो मैल असलेल्या ‘बाकु’ ला व्यापाराच्या संधी शोधण्यासाठी गेले. अझरबैजान हा त्यावेळी प्रसिध्द असलेल्या ‘सिल्क रूट’ या व्यापारी मार्गावर स्थित असलेला देश होता.
भारतीय व्यापारी त्यावेळी “जळणारी पृथ्वी” तसेच “अनंत ज्वाला” याबद्दलच्या आख्यायिका ऐकत असत आणि ते बघण्यासाठी सुध्दा ते अझरबैजानला जात असत. राजधानीचे शहर असलेल्या ‘अझेरी’ शहरापासुन १५ किमी अंतरावर असलेल्या अतेशगाहचे मंदिर म्हणजे कॅस्पियन समुद्राजवळ असलेल्या ठिकाणांशी असलेल्या भारताच्या संबंधाचे प्रतिक आहे. याच स्मारकाच्या प्रवेशदारावर असलेले संस्कृत लिखित म्हणजे अझरबैजानच्या भारताशी असलेल्या संबंधाचा पहिला पुरावा आहे.
अतेशगाहला असणारे ‘फायर टेम्पल’ बाकु पासुन पूर्वेला २० किमी वर स्थित आहे. सातव्या शतकापासुन, ‘अनंत ज्वालेचे मंदिर‘ तिथल्या झोरेस्ट्रियन लोकांकडून पुजले जात असे.
‘अताह’ हा आगीसाठी वापरला जाणारा पर्शियन शब्द आहे. हे मंदिर ज्या ठिकाणी स्थित आहे, त्या खडकात ७ ठिकाणी पडलेल्या छिद्रांतून बाहेर पडणारया वायुंमुळे ती आग सतत चालू असायची. सोळाव्या, सतराव्या शतकाच्या शेवटी अझरबैजानच्या हिंदू आणि शीख धर्मस्थळांमध्ये वाढ होण्याचे कारण या दोन्ही धर्मांनी सुरु केलेल्या आगीच्या पुजनास जाते.
हिंदू आणि शीख व्यापाऱ्यांची संख्या वाढत गेली, तशी अतेशगाह वर त्यांच्या असलेल्या वर्चस्वात वाढ होत गेली. जुन्या मंदिराचे अवशेष ७ व्या शतकापासुन अस्तित्वात होते, तरीही नविन मंदिर बांधण्यात आले. मंदिराच्या शिखरावर त्रिशुळ उभारण्यात आला आहे. झोरेस्ट्रीयन लोकांमध्ये त्रिशुळ म्हणजे चांगले विचार, शब्द आणि कार्य यांचे चिन्ह असला, तरीही आणखी बरेच पुरावे हा त्रिशुळ हिंदू धर्माच्या प्रभावाचे प्रतिक आहे असं सिध्द करतात.
काही बदल करुन आजही अनेक भारतीय आणि पर्शियन लोक ज्यांना ‘गौर’ किंवा ‘जेबेर’ असं संबोधले जाते, या जुन्या धार्मिक शिकवणींचे आणि रुढींचे अतिशय उत्साहाने जतन करण्यासाठी आजही प्रयत्न करत आहेत. विशेषत: ‘जोनस हँवे’ च्या कॅस्पियन समुद्रातील ब्रिटिश व्यापाराबद्दल लिहिलेल्या एका ऐतिहासिक पत्रात “आगीचे असलेले महत्त्व” असा एक लेख सापडतो .
‘जेबेर’ हा झोरेस्ट्रीयन साठीचा पर्शियन शब्द आहे तर ‘गौर’ म्हणजे हिंदू आणि शीख धर्मगुरुंसाठी वापरला जाणारा शब्द आहे.
भारतीय- युरोपीय भाषांचा जाणकार असलेल्या एवी विल्यम जैक्सन याने अतेशगाहच्या मंदिराबद्दल तेथील पुजक घालत असलेले कपडे, डोक्याला लावलेले तिलक आणि शाकाहारी आहार या गोष्टी ठळकपणे नमुद केल्या आहेत आणि या गोष्टी झोरेस्ट्रीयन नसुन भारतीय आहेत असेही तो म्हणतो.
अशा प्रभावामुळे तेथील मंदिरांवर संस्कृत आणि गुरुमखी भाषेत अनेक लिखितं लिहिली गेली. एक लिखितामध्ये गणपती आणि ज्वाला जी यांचा उल्लेख आहे, बाकी सगळे लिखितं १७४५ मधले आहेत. १९व्या शतकात अतेशगाह म्हणजे मुंबई आणि इतर भागातील भारतीय पारसी समाजासाठी एक मोठे धार्मिक स्थळ म्हणुन उदयास आले.
तेथील नैसर्गिक वायुंच्या अतिवापरामुळे साठा कमी होत आहे. अनंत ज्वाला जेव्हा १९६९ साली विझली तेव्हा भारतीय प्रवाशांची संख्या कमी होत गेली. १९९८ साली युनेस्कोने या स्थळाला जागतिक वारसा स्थळ म्हणुन घोषित केले. आजही तुम्ही या ठिकाणी गेलात तर तिथे असणारी आग आज पाइपलाईनच्या सहाय्याने पुरवण्यात आलेल्या वायुमुळे तुम्हाला बघायला मिळेल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.