आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
क्रिकेट म्हणजे ग्लॅमर. क्रिकेट म्हणजे जाऊ तिथे तासनतास वाट बघत थांबलेले चाहते. प्रत्येक कृती कॅमेऱ्यात बंद करणारे पत्रकार. सगळीकडे जायला विमानं. मोठमोठ्या पार्ट्या. एकदम सिनेमात बघतो तसं लक्झरी आयुष्य.
पण जेव्हा नुकतीच भारताने क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती त्याकाळी हे चित्र अगदी उलट होतं.
साधारण १९४०च्या दशकात क्रिकेटपटूंना एक टेस्ट मॅच खेळण्यासाठी एक रुपया मिळायचा.
होय! फक्त एक रुपया. विमानाने प्रवास करण्याइतकी लक्झरी त्याकाळी शक्यच नव्हती. आपले सगळे खेळाडू कुठेही जायचे असले की रेल्वेनीच प्रवास करायचे. काही वर्षांनी ही फीस वाढून ५ रुपये इतकी झाली.
आज जे प्रमुख खेळाडू आहेत ते दरवर्षी सात करोड इतक्या मोठ्या रकमेचा करार BCCI सोबत करतात. याशिवाय आयपीएल सारख्या मॅचेसमधून त्यांना लाखो रुपये मिळतात.
1955 नंतर बीसीसीआयची परिस्थिती थोडी सुधारली आणि खेळाडूंचं मानधन 250 रुपयांवर आलं. पण तरीही कित्येकदा ते देण्याची सुद्धा परिस्थिती नसायची. तरीही आपल्या खेळाडूंनी कधी त्याचा बाऊ केला नाही. हळूहळू ही किंमत पाच दहा हजारांत गेली.
ही सगळी तेव्हाची परिस्थिती माधव आपटे म्हणून आपले जुने क्रिकेटपटू आहेत, त्यांनी एका मुलाखतीत सांगितली.
हळूहळू मात्र ही परिस्थिती पालटली. बीसीसीआयने पहिली करारप्रणाली 1 ऑक्टोबर 2004 मध्ये चालू केली. त्याचवेळी फक्त 17 खेळाडुंना ए, बी, आणि सी अशा ग्रेड्स मध्ये विभागण्यात आले. सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड समवेत एकूण 7 खेळाडूंना ए ग्रेड, 7 लोकांना बी तर उरलेल्या तिघांना सी ग्रेड.
याचवेळी खेळाडूंचे मानधन ठरवण्यात आले होते. ए ग्रेड वाल्यांना वर्षाकाठी तब्बल 50 लाख, बी आणि सी ग्रेडला अनुक्रमे 35 आणि 20 लाख. शिवाय टेस्ट आणि एकदिवसीय सामन्यांचे वेगळे.
इथूनच क्रिकेटपटूंचे दिवस पालटायला सुरुवात झाली. दरवर्षी या कॉन्ट्रॅक्टची समिक्षा होते आणि साधारणपणे ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या दरम्यान तो लागू होतो.
2017 मध्ये एक नवीन करारनामा आणण्यात आला. त्यानुसार अजून एक ग्रेड आणली. ए प्लस. खेळाडूंचे एकूण प्रदर्शन, त्यांची सिनिओरिटी या हिशोबाने काही खेळाडूंना ए प्लसचा दर्जा देण्यात आला. या करारनाम्यानुसार खेळाडूंच्या मानधनात तब्बल तीनपट वाढ झाली. आता हे मानधन काही करोडमध्ये गेलं आहे.
याच करारामध्ये आधी केवळ 2 ग्रेड्समध्ये असलेल्या महिला खेळाडूंना देखील 3 ग्रेड्समध्ये विभाजण्यात आले व मानधनाची रक्कम देखील वाढवण्यात आली. अर्थात महिला खेळाडूंचे मानधन आजही काही लाखांतच आहे.
सगळ्याच कॅटेगरीमधल्या खेळाडूंच्या मानधन, ग्रेड्सची वाढ यादरम्यान झाली.
क्रिकेटची लोकप्रियता आपल्या देशात दिवसागणिक वाढतेच आहे. अगदी प्रत्येक गावात प्रत्येक गल्लीमध्ये क्रिकेटचे कसोटी सामने चालतात. कितीतरी मुलं-मुली आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटमध्ये भारतातर्फे खेळू इच्छितात.
कित्येकांचा हा प्रवास पूर्ण होतो तर कोणी आपल्या विद्यार्थ्यांना तिथे पोहोचायला मदत करतायत. आज क्रिकेटला ग्लॅमर आलं आहे पण सुरुवातीला मात्र असे नव्हते. सगळ्यांनी फार कठीण परिस्थितीतुन मेहनतीने भारतीय क्रिकेटला आज या उंचीवर आणले आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.