आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारताची सुरक्षा करणे हे काही सोपे काम नाही. उत्तरेकडे दोन्ही बाजूंना शत्रू राष्ट्र आणि त्यांच्या सभोवताली, विशेषतः ईशान्येकडे त्यांना प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे समर्थन देणारे बांग्लादेश, नेपाळ आणि म्यानमारसारखे राष्ट्र. इकडे दक्षिणेला श्रीलंकेत चीनने हंबणथोटा बंदर आपल्या आर्थिक मुत्सद्देगिरीच्या मदतीने हस्तगत केले आहे.
पाकिस्तान आणि चीन तर एकमेकांचे ‘ऑल वेदर फ्रेंड्स’ असल्याने चीन कधीही पाकिस्तानच्या भूमीचा आणि संसाधनांचा वापर भारताविरुद्ध करू शकतो. अशा परिस्थितीमध्ये फक्त विविध देशांमध्ये आपले हवाई तळ असून चालणार नाही तर भारतीय भूमीचे प्रभावी हवाई संरक्षणसुद्धा तितकेच महत्वाचे आहे.
भारताच्या हवाई हद्दीची सुरक्षा:
भारतीय हवाई क्षेत्राच्या संरक्षणासाठी अनेक सिस्टिम्स कार्यरत आहेत, यामध्ये प्रद्युम्ण बॅलिस्टिक मिसाईल इंटरसेप्टर सिस्टीम, अश्विन बॅलिस्टिक मिसाईल इंटरसेप्टर सिस्टीम, पृथ्वी डिफेन्स वेहिकल, पीडीव्ही मार्क २, आकाश शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम, एस-१२५ पेचोरा, स्पायडर, बरॅक लॉन्ग रेंज सरफेस टू एअर मिसाईल, एफआयएम-९२ मॅन पोर्टेबल स्टिंगर मिसाईल, टू-के वन टू कब, स्वर्डफिश रडार आणि अशा अनेक सिस्टीम्सचा समावेश होतो.
रशियन एस-४०० मिसाईल सिस्टीम:
एस-४०० ही रशियाची सर्वात प्रगत ‘लॉन्ग रेंज सरफेस टू एअर मिसाईल्स एअर डिफेन्स सिस्टीम’ म्हणून ओळखली जाते. भारताची हवाई सुरक्षा अत्याधुनिक बनवण्याच्या दृष्टीने मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारत आणि रशियादरम्यान अत्याधुनिक ‘एस-४००’ च्या ५ सिस्टिम्स खरेदी करण्यासाठी ५ अब्ज डॉलर्सचा करार झाला. एस-४०० च्या प्रचंड क्षमतेमुळे आपल्या ‘एफ-३५’ सारख्या लढाऊ विमानांची विक्री धोक्यात येईल असे अमेरिकेला वाटते त्यामुळे रशियन शस्त्रास्त्र कंपन्यांवर अमेरिकेने निर्बंध लागू केले आहेत.
एस-४०० सिस्टीम एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्यासाठी अत्यंत सोपी आहे. सर्व रडार्स, मिसाईल्स आणि लौंचर्स एका क्रॉस-कंट्री ट्रकवर बसवलेले असल्याने, या सिस्टिमला शोधणे आणि नष्ट करणे शत्रूला अत्यंत कठीण काम होऊन बसते. एस-४००चा सर्वांत मुख्य भाग म्हणजे ‘९२एन६इ इलेकट्रोनिकली स्टिअर्ड रडार’. हे रडार ६०० किलोमीटरवरील सुमारे ३०० टार्गेट्स ट्रॅक करू शकते.
प्रत्येक एस-४०० सिस्टीममध्ये ४०० किमी श्रेणी, २०० किमी श्रेणी, १०० किमी श्रेणी आणि ४० किमी श्रेणी अशी चार प्रकारच्या मिसाईल्स असतात. या मिसाईल्स १०० फूट ते ४० हजार फूट उंचीपर्यंत उडणारे शत्रूचे विमान शोधून नष्ट करू शकतात.
भारतीय हवाई हद्दीच्या सुरक्षेसाठी एस-४०० महत्वाची का?
या मिसाईल्स लढाऊ विमानांपासून क्रूझ मिसाईल्स आणि हवेतून मारा होणाऱ्या स्मार्ट बॉम्बपर्यंत अनेक हवाई धोक्यांना नष्ट करू शकतात तसेच इलेक्ट्रॉनिक जॅमिंगसारख्या हॅकिंगच्या तंत्रालासुद्धा ही मिसाईल सिस्टीम बळी पडू शकत नाही. गेल्या पाच वर्षांपासून एस-४०० सिस्टीमचा बारकाईने अभ्यास करणाऱ्या भारतीय हवाई दलाने एस-४०० सिस्टीमची ही फीचर्स हवाई सुरक्षेसाठी उत्तम आहेत असा निष्कर्ष काढला.
आयएएफची एअर डिफेन्स मिसाईल्स सध्या केवळ ४० किलोमीटर अंतरावरील लक्ष्यांवर मारा करू शकतात. पुढील वर्षी इस्रायलकडून ‘मिडीयम रेंज सरफेस टू एअर मिसाईल्स’ भारत खरेदी करणार आहे आणि त्यांची रेंज ८० किमीपर्यंत वाढवली जाईल. त्यापेक्षाही कैक पटीने एस-४०० एअर डिफेन्स सिस्टीम उत्तम आहे. हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याच्या मते, एक एस-४०० सिस्टीम तैनात केल्याने भारतीय हवाई धोक्यांचा संपूर्ण स्पेक्ट्रम कव्हर होतो.
रशियाने भारताला एस-४०० ट्रायम्फ सरफेस टू एअर मिसाईल सिस्टीम देण्यास सुरुवात केली आहे. डिलिव्हरी नियोजित वेळेप्रमाणे सुरू आहे असे रशियाच्या ‘फेडरल सर्व्हिस फॉर मिलिटरी-टेक्निकल कोऑपरेशन’चे संचालक दिमित्री शुगाएव यांनी स्पुतनिक वृत्तसंस्थेला सांगितले.
तुर्की-रशिया एस-४०० डील आणि अमेरिकेचा हस्तक्षेप:
२०१९ साली, तुर्कीने रशियन एस-४०० एअर डिफेन्स सिस्टीमच्या अब्जावधी-डॉलरच्या खरेदीवर सहमती दर्शवली होती त्यामुळे तत्कालीन ट्रम्प प्रशासनाने एर्दोगान राजवटीविरूद्ध निर्बंध लादले होते. एर्दोगनने नुकसानभरपाईची मागणी केली असतानाही अमेरिकन सरकारने यूएस एफ-35 विमाने खरेदी करण्याची तुर्कीची योजना रद्द केली.
अमेरिकेने अलीकडेच तुर्कीला रशियाकडून अधिक शस्त्रे खरेदी केल्यास द्विपक्षीय संबंध कमी करण्याचा इशारा दिला आहे. नाटो संघटनेचा सदस्य असलेल्या तुर्कीने २०१७ साली एस-४०० एअर डिफेन्स सिस्टीम खरेदीच्या बाबतीत अमेरिकेच्या इशाऱ्यांकडे साफ दुर्लक्ष केले.
भारत आणि रशियादरम्यानच्या या डीलला अमेरिकेचा प्रतिसाद:
आधीही सांगितल्याप्रमाणे अमेरिकेला ही डील काही पटलेली नाही. एस-४०० च्या प्रचंड क्षमतेमुळे आपल्या ‘एफ-३५’ सारख्या लढाऊ विमानांची विक्री धोक्यात येईल असे अमेरिकेला वाटते, त्यामुळे रशियन शस्त्रास्त्र कंपन्यांवर अमेरिकेने निर्बंध लागू केले आहेत. यापूर्वी, दोन अमेरिकन सिनेटर्सनी राष्ट्राध्यक्ष ‘जो बिडेन’ यांना रशियाकडून एस-४०० एअर डिफेन्स सिस्टीम खरेदी केल्याबद्दल भारतावरील निर्बंध माफ करण्याची विनंती केली होती.
‘रशियन एअर डिफेन्स सिस्टीम खरेदीबाबत बिडेन प्रशासनाची चिंता दिल्लीला कळवली असून दिल्ली आणि मॉस्को यांच्यातील व्यवहार कमी होत आहेत’ असे सिनेटर्सनी सांगितले. बेलारूसवरसुद्धा पाश्चिमात्त्य सत्तांनी अनेक निर्बंध लावले आहेत तरी रशिया बेलारुसला संरक्षण सामग्री विकू शकतो. बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष लुकाशेन्को यांनी युक्रेनच्या सीमेवर तैनाती करण्यासाठी रशियन एअर डिफेन्स सिस्टीम विकत घेण्यास स्वारस्य व्यक्त केले होते.
रशियाची एस-४०० मिसाईल एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीम एकाच वेळी अनेक कामं करू शकते. एअर डिफेन्स सिस्टीमच्या या क्षमतेमुळे अनेक देशांनी ते खरेदी करण्यात स्वारस्य व्यक्त केले आहे.
भारतात या वर्षाच्या अखेरीस रशियन एस-४०० डिफेन्स सिस्टीमची पहिली तुकडी एअर फोर्समध्ये सामील होण्याची शक्यता आहे असे भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी सांगितले होते. यूएस चीनचा मुकाबला करू पाहत आहे. एयुकेयुएस* (Australia, United Kingdom & United States) सुरक्षा करारानंतर बिडेन प्रशासनाने भारताच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
कारण भारत-अमेरिका संबंधांमध्ये क्वाड (क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग किंवा भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि जपान यांची इंडो-पॅसिफिक भागातील सुरक्षेसंबंधी युती) अधिक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. युनायटेड स्टेट्सबरोबर भारताचे संरक्षण करार देखील गेल्या काही वर्षांपासून जोर धरत आहेत यामुळे देशाला वादग्रस्त रशियन संरक्षण करारावर अमेरिकन अधिकार्यांशी सविस्तर चर्चा करण्याची संधी मिळणार आहे.
तथापि अमेरिकेने भारताला ‘काउंटरिंग अमेरिकाज अॅडव्हर्सरीज थ्रू सॅन्क्शन्स अॅक्ट’द्वारे संक्शन्स लादण्याचा इशारा दिला होता. पण अमेरिकन प्रशासनाने इंडो-पॅसिफिकच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित केल्यामुळे एस-४०० ची डील सेटल केली जाऊ शकते. त्यामुळे एस-४००ची ही डील निर्विघ्नपणे पार पडेल अशी आशा बाळगायला काही हरकत नाही.
अमेरिकेने तुर्कस्तानवर घातलेल्या निर्बंधांनंतर वॉशिंग्टन भारतावर अशाच प्रकारचे दंडात्मक उपाय लादण्याची भीती व्यक्त केली जात होती. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या उपसचिव ‘वेंडी शर्मन’ या गेल्या महिन्यात भारत दौऱ्यावर आल्या होत्या. एस-४०० मिसाईल सिस्टीम वापरण्याचा निर्णय घेणारा कोणताही देश ‘धोकादायक’ आहे आणि कोणत्याही देशाच्या सुरक्षेसाठी ते बरोबर नाही, असे वक्तव्य त्यांनी केले होते. पण अमेरिका आणि भारत या सिस्टीमच्या खरेदीवर मतभेद दूर करण्यास सक्षम होतील अशी आशासुद्धा त्यांनी व्यक्त केली. याबाबत भारत आणि अमेरिका यांच्यात चर्चा सुरू आहे.
*एयुकेयुएस हा ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंग्डम आणि युनायटेड स्टेट्स यांच्यातील त्रिपक्षीय सुरक्षा करार आहे. हा सुरक्षा करार १५ सप्टेंबर २०२१ रोजी इंडो-पॅसिफिक प्रदेशाच्या सुरक्षिततेसाठी घोषित करण्यात आला होता. या कराराअंतर्गत अमेरिका आणि ब्रिटन ऑस्ट्रेलियाला अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या घेण्यासाठी मदत करतील.
एस-४०० हस्तांतराच्या अंतिम टप्प्यात:
ट्रायम्फ एस-४०० सरफेस टू एअर मिसाईल सिस्टीमच्या पहिल्या रेजिमेंटचे संचालन करण्यासाठी रशियाने भारतीय जवानांच्या एका गटाला प्रशिक्षित केले आहे आणि ते सैनिक मायदेशी देखील परतले आहेत. भारताला या सिस्टीमचे वेगवेगळे घटक वेळेच्या आधी पोहोचवण्यास सुरुवात झाली आहे आणि २०२१ संपेपर्यंत सिस्टीमचे सर्व पार्टस् भारतात पोहोचतील.
तसेच ज्या ठिकाणी एस-४०० एअर डिफेन्स ठेवले जाईल त्या ठिकाणी सिस्टीम सेटिंगची देखरेख करण्यासाठी रशियन तज्ञ नववर्षाच्या सुरुवातीला भारताचा दौरा करतील.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.