आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
सध्या या रणरणत्या उन्हात, प्रत्येकाला गरज असते ती आपल्या शरीराला (आणि आत्म्याला) आल्हाददायक अनुभूती देणाऱ्या पेयाची, एखादं असं पेय जे या उन्हाच्या जाचापासून मुक्त करेल.
उन्हाळ्यात आपण ज्यावेळी कुठे पाहुणे म्हणून जातो किंवा कोणी आपल्याकडे पाहुणे म्हणून येतं, त्यावेळी चहा ऐवजी लिंबू सरबत देण्यात येते. नेहमी नेहमी लिंबू सरबत आणि पन्ह पिऊन कंटाळा येतो.
आधी एक सरबत यायचं. एकदम तजेलदार करणारं. वेगळीच चव होती त्याची. त्या रिफ्रेश करणाऱ्या सरबताचे नाव होतं ‘रुह अफजा’.
परंतु सध्या भारतीय बाजारातून रुह अफजा जणू गायबच झालं आहे, हे तुमच्या लक्षात एव्हाना आलं असेलच. आज जरी अनेक पर्याय उपलब्ध असले तरी रुह अफजाची सर दुसऱ्या कशालाच नाही. रुह अफजा असं अचानक गायब होण्यामागे एक मोठा इतिहास आहे.
आपल्या बालपणाच्या अनेक आठवणी रुह अफजाशी जोडल्या गेल्या आहेत. रुह अफजाचे सरबत पिणे हा एक वेगळाच आनंद असायचा. उन्हाळ्यात तर रुह अफजाची मजा विचारूच नका.
रुह अफजा वेगवेगळ्या जडीबुटी, फळं, फुलं यांना एकत्र करून बनवले जाते. खुर्रा सीड, पुदिना, द्राक्षं, गाजर, टरबूज, संत्रा, खसखस, कमळ, लिली, दमास्क, कोथिंबीर, पालक हे सर्व जिन्नस एकत्र करून रुह अफजा बाटलीतून आपल्या घरात पोहचतं.
१९०७ साली युनानी आरोग्यशास्त्राचा अभ्यासक असलेल्या हकीम अब्दुल माजिद याने रुह अफजाची निर्मिती रुग्णांना त्यांच्या जाचातून मुक्त करण्यासाठी केली होती.
जुन्या दिल्लीच्या हमदर्द नावाच्या दुकानात एक औषध म्हणून सुरुवातीला रुह अफजाची विक्री होत असे.
कालांतराने हे औषध दिल्लीतील लोकांच्या घराचा भाग बनलं. या औषधाचे दोन चमचे पाण्यात अथवा दुधात टाक आणि एक स्वर्गीय आनंद मिळवा, अशी बातमी सगळीकडे पसरायला सुरुवात झाली.
रुह अफजाचा लोगो मिर्जा नूर अहमद यांनी तयार केला होता आणि मुंबईचे काही पारसी छापखाने त्याची छपाई करायचे. तब्बल ४० वर्ष हे रुह अफजाने बाजारात आपली पकड कायम ठेवली.
कालांतराने फाळणीचे सावट देशावर पसरले. दिल्लीतील मुस्लिम कुटुंबांनी पाकिस्तानला आपला बस्तान हलवलं आणि पाकिस्तानच्या हिंदूंनी भारतात बस्तान हलवलं. सगळीच उलथापालथ झाली.
रुह अफजाला घेऊन माजिद यांचे कुटुंब पाकिस्तानात गेले.
माजिद यांच्या मृत्युनंतर त्यांचे पुत्र अब्दुल हमिद यांनी १९२२ पासून रुह अफजाचा कारभार हाती घेतला होता. त्यांचे त्यांच्या लहान भावासोबत सईद सोबत भांडण झाले आणि त्यांचे कुटुंब दुभंगले. एक पश्चिम पाकिस्तानात तर एक पूर्व पाकिस्तानात (आत्ताचा बांगलादेश). सईद यांना आपल्या पित्याचा वारसा कायम ठेवायचा होता म्हणून ते पाकिस्तानला आपल्या भावाकडे गेले आणि त्यांनी पुन्हा शून्यातून रुह अफजा निर्माण करायला सुरुवात केली.
भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेश ह्या तिन्ही देशात रुह अफजाची निर्मिती करण्यात आली.
१९५३ साली वक्फ नावाच्या एका औषधी कंपनीने हमदर्द लॅबोरेटरीज् हे नाव धारण करून रुह अफजाची बाजारात विक्री करण्यास सुरुवात केली.
ह्या तिन्ही देशातील एकमेकांप्रतीच्या वितुष्टाने रुह अफजाच्या विक्रीवर परिणाम केला. काळ बदलला तसे ज्युसचे प्रकारसुद्धा बदलत गेले. सोडा घातलेले, वेगवेगळ्या फळांचे रस, त्याच्या पावडर, स्क्वाश, मिल्कशेक्स, आईस टी, टेट्रा पॅक, बॉटल ज्यूस. एक ना अनेक प्रकार आज बाजारात उपलब्ध आहेत.
पण इतक्या सगळ्या प्रकारच्या पेयांमध्ये रुह अफजाने आपली जागा लोकांच्या मनात कायम ठेवली आहे.
रुह अफजा अजूनही त्याच ७०० मिली. च्या काचेच्या बाटलीत मिळतं. त्यावर जसं पूर्वी असायचा तशाच प्रकारचं फळांचं चित्र असणारा कागद चिकटवलेला असतो.
२०१२ साली हमदर्द इंडीया या रुह अफजा बनवणाऱ्या कंपनीने जवळजवळ दोन करोड रुह अफजाच्या बाटल्या विकल्या
रमजान महिन्यात रुह अफजा पिणे ही एक प्रथाच बनली आहे. पण २०१९मध्ये, ही प्रथा जवळजवळ संपुष्टात आली होती.
रुह अफजा बनवण्यासाठी जे जिन्नस लागतात त्याचा तुटवडा झाल्यामुळे जवळपास पाच महिने रुह अफजा बाजारात उपलब्ध नव्हतं. त्याकाळात कौटुंबिक वादामुळे रुह अफजाचे उत्पादन बंद झाले अशा अफवासुद्धा उठवण्यात आल्या.
परंतु, ५ महिन्यांनी रुह अफजा या सगळ्या अफवांना खोटे ठरवत पुन्हा बाजारात उतरलं.
कितीही पेय बाजारात आणा तरी रुह अफजाची चव कोणालाच नाही. असंख्य भारतीयांच्या जिभेवर कायम रेंगाळते आहे आणि ती अशीच कायम राहो!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.