आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आज प्रचंड स्पर्धा आहे. या स्पर्धेत जो टिकेल त्यालाच डोक्यावर घेतलं जातं. आता तुमच्या हातात असलेल्या मोबाईल फोनचाच विचार करा, यात अक्षरशः दर सहा महिन्यांनी कितीतरी अपडेट्स येत असतात. अनेक कंपन्या सातत्याने हे अपडेट्स फॉलो करतात म्हणून टिकून राहतात. नाही तर कधी काळी मार्केटवर राज्य गाजवणाऱ्या कंपन्यांनाही इथे आपला गाशा गुंडाळावा लागतो.
उदाहरणच द्यायचे झाले तर ब्लॅकबेरीचे घ्या. २०१८ साली या कंपनीला चक्क आपले प्रोडक्शन बंद केल्याचे जाहीर करावे लागले. नाही तर एक काळ असा होता की ब्लॅकबेरीशिवाय लोकांचे पानही हलत नव्हतं. मग नेमकं असं काय झालं की कंपनीला आपले प्रोडक्शन बंद करण्याची वेळ आली? जाणून घेऊया या लेखातून.
आज आपण आपल्या फोनवरून इमेल, सोशल मिडिया आणि अनेक प्रकारचे गेमिंग अॅप्स वापरू शकतो. हे कशामुळे शक्य झाले? तर मोबाईलमध्ये मिळणाऱ्या इंटरनेट सुविधेमुळे. नाहीतर एक काळ असा होता जेव्हा ईमेल चेक करण्यासाठीसुद्धा कंप्युटरचा वापर करावा लागत होता. अशा काळात ब्लॅकबेरीने सर्वात आधी इंटरनेट फिचर देणारा मोबाईल आणला.
ईमेल चेक करणे, फॉरवर्ड करणे, इंस्टंट मेसेजेस पाठवणे या सगळ्या सुविधा त्याकाळी ब्लॅकबेरीने दिल्या होत्या म्हणूनच या फोनला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
एकेकाळी लाखो भारतीयांच्या वापरातील हा फोन आज धूळ खात पडला आहे, यामागे तशी अनेक करणे आहेत, पण आज आपण त्यातील काही प्रमुख कारणांचा विचार करू.
टचस्क्रीन सुविधेकडे दुर्लक्ष करणे पडले महागात
बाजारात जोपर्यंत इंटरनेट सुविधा देणारा ब्लॅकबेरी हा एकच फोन होता, तोपर्यंत ब्लॅकबेरीची चलती होती. त्यानंतर अॅपल आणि सॅमसंग यांसारख्या कंपन्यांनी त्यांच्या फोनला टचस्क्रीनसारखे पर्याय दिले ज्यामुळे फोन हाताळणे एकदम सोपे झाले. अशाच फोनची बाजारात संख्या वाढू लागली.
टचस्क्रीनच्या जमान्यातही ब्लॅकबेरीने मात्र आपला क्वार्टी कीबोर्ड सोडला नाही. याआधी ब्लॅकबेरी इंस्टंट मेसेजिंगसाठी आणि इंटरनेटसाठीच तर वापरले जात होते मात्र त्याच सुविधा इतर मोबाईलमधेही मिळत असतील आणि त्या वापरणे जास्त सोपे असेल तर ब्लॅकबेरीचा तो किचकट किबोर्ड आणि स्क्रोलिंग बटण वापरण्याला कोण प्राधान्य देईल?
लोकांना आता फोनवरून फोटो, व्हिडीओ, अॅप्स, गेम्स करायचे होते, हे सगळं त्या क्वार्टी कीबोर्डमुळे निव्वळ अशक्यप्राय होतं. साध्या टेक्स्ट मेसेजमध्ये इमोजी वापरण्याचीही सुविधा नव्हती. बाजारपेठेतील या बदलत्या मानसिकतेशी ब्लॅकबेरीने जुळवून न घेता ग्राहकांच्या माथी तो क्वार्टी कीबोर्ड थोपवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे ग्राहकांनीही ब्लॅकबेरीकडे पाठ फिरवली.
फोनचं जाडजूड डिझाईन
ब्लॅकबेरीचा आणखी एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे त्याचं डिझाईन. इतर फोन्समध्ये टचस्क्रीन फिचर असल्याने कीबोर्ड गायब झाला होता. ब्लॅकबेरी मात्र कीबोर्डशी चिकटून राहिल्याने त्याची डिझाईनही जुनाट आणि जड वाटत होती. हा कर्मठपणाच त्यांना पुढे जाऊन महागात पडला.
बीबीएमचा दुराग्रह
ब्लॅकबेरीने बीबीएमसारखे टेक्स्ट मेसेजिंग फिचर देऊन एकेकाळी आपली हवा केली होती. थोडक्यात बीबीएम म्हणजे त्याकाळातील व्हाट्सअॅपच! ज्यात इंस्टंट मेसेजेसची सुविधा होती, ग्रुप चॅट करता येत होते, एखादा महत्त्वाचा नंबर पिन करून ठेवता येत होता. बल्क मेसेजेस पाठवता येत होते. या सुविधेमुळेच भारतात हा फोन तरुणांच्या आणि कार्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनला होता.
ब्लॅकबेरीने ही सुविधा प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यास नकार दिला. बीबीएम ही फक्त ब्लॅकबेरीचीच मक्तेदारी राहील असे पाहिले.
पुढे व्हाट्सअॅप आले आणि बीबीएमला कुणीही विचारेनासे झाले.
एकतर व्हाट्सअॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध असल्याने कोणत्याही फोनवरून वापरता येत होते. त्यामुळे ज्या बीबीएमच्या जोरावर ब्लॅकबेरीने मार्केट मारले होते ते बीबीएम फिचरही आता मागे पडले होते. नंतर ब्लॅकबेरीने बीबीएमबद्दलचा दुराग्रह बदलला पण तोपर्यंत व्हाट्सअॅप, किक आणि आय मेसेजसारख्या अनेक अॅप्सनी मार्केट काबीज केले होते.
अॅप्सची मर्यादा
ब्लॅकबेरीने आपल्या ओएस सिस्टीमवर उपलब्ध करून दिलेले अॅप्स खूपच मर्यादित होते. एकीकडे प्ले स्टोअरवर रोज वेगवेगळ्या अॅप्सची जत्रा लागलेली असताना ब्लॅकबेरीने मात्र हा ऑप्शन खूपच मर्यादित ठेवला, ज्यामुळे हवे ते अॅप्स डाऊनलोड करणे शक्य नव्हते. यामध्ये फेसबुक आणि ट्विटरसारखे अॅप्स वापरता येत असले तरी, हे अॅप्स फक्त हाफस्क्रीनवरच दिसत होते. ज्यामुळे ते वापरताना असुविधा निर्माण होत असे. हाफस्क्रीनवर या अॅप्सवरील संपूर्ण कंटेंट पाहता येणे शक्य नसे. साहजिकच ग्राहकांनी ब्लॅकबेरीकडे पाठ फिरवायला सुरुवात केली.
कार्पोरेट क्षेत्राशी जुळवून न घेणे
कार्पोरेट हाच ब्लॅकबेरीचा खरा ग्राहक वर्ग होता. तंत्रज्ञान बदलेल तसे बदलणारा हा ग्राहक वर्ग टिकवून ठेवणे ब्लॅकबेरीला जमले नाही. सर्वांत आधी इंटरनेट आणि बीबीएमसारख्या सुविधा देऊन ब्लॅकबेरीने याच कार्पोरेट वर्गाला आपले लक्ष्य बनवले होते आणि नंतर मात्र याकडे त्यांनी दुर्लक्ष केले.
फक्त बिझनेसच्या कामासाठी फोन वापरणारा हा ग्राहक वर्ग आयफोन आणि स्मार्टफोनकडे वळला होता. दिवसेंदिवस कार्पोरेट वर्गाचे मोबाईलवरील अवलंबन वाढत होते. त्यामुळे त्यांना अधिक सुरक्षित मोबाईल फोनची गरज होती. ब्लॅकबेरी आपला फोन अधिक सुरक्षित असल्याचा दावा करत होती. मात्र नंतर अशा अफवा उठू लागल्या की भारत आणि पाकिस्तान सरकारच्या दबावाला बळी पडून या कंपनीने आपल्या फोनचा डेटा अॅक्सेस करण्याची मुभा या दोन्ही देशांतील सरकारांना दिली आहे. त्यामुळे या फोनच्या सुरक्षेचा आणि गोपनीयतेचा प्रश्न ऐरणीवर आला.
कार्पोरेट वर्गातील ग्राहकांना ही रिस्कच नको होती.
ज्या कार्पोरेट ग्राहकाकडून कंपनीला ९०% नफा मिळत होता तो सगळाच ग्राहकवर्ग कंपनी गमावून बसली. फक्त कार्पोरेट वर्गाचा विचार करून जरी कंपनीने स्वतःच्या मॉडेलमधे आणि फीचर्समध्ये बदल केले असते तरी, कंपनी टिकून राहिली असती.
स्पर्धेकडे दुर्लक्ष
ब्लॅकबेरीची मोठी घोडचूक ठरली ती हीच की आजूबाजूच्या बदलत्या वातावरणाशी जुळवून घेणे तर दूरच पण त्यांनी किमान स्पर्धेत टिकून राहण्याचाही विचार केला नाही. आयफोन आणि स्मार्टफोनच्या जमान्यात जिथे रोजरोज नवे बदल येत असतात तिथे या कंपनीने मात्र आपल्या फोनमधे, सुविधेमधे काही नवेपणा आणण्याचा विचारच केला नाही.
नवा ग्राहकवर्ग आकर्षित करणे तर राहूदेच पण आहे तो ग्राहकवर्ग कसा टिकून राहील यासाठीही काही पावले उचलली नाहीत. सुरुवातीला काळाच्या पुढे राहून सुविधा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या या कंपनीने नंतर काळासोबत चालण्याचाही प्रयत्न करू नये हे कंपनीसाठी खूपच घातक ठरले. ब्लॅकबेरीच्या किंमतीत नवनवे फीचर्स देणाऱ्या आयफोन आणि स्मार्टफोन येत असताना, ग्राहकांनी याच्याकडे पाठ फिरवणे साहजिकच होते.
ब्लॅकबेरीला एकेकाळी बाजारपेठेत अॅपलचा दर्जा होता पण फक्त आपल्या कर्मठ, हेकट धोरणांमुळे या कंपनीने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.