आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
फार प्राचीन काळापासून मानवी समाजाला दुष्काळासारख्या आपत्तीला तोंड द्यावे लागले आहे. आजवर दुष्काळामुळे किती लोकांनी प्राण गमावले असतील याचा नेमका आकडा सांगता येणे कठीण आहे. त्यातही इतर खंडाच्या तुलनेत आशिया खंडात दुष्काळाची वारंवारता जरा जास्तच आहे.
पण तुम्हाला माहितीये का जगाच्या पाठीवर कधीच, कुठेच दुष्काळ पडू नये म्हणून एका माणसाने जगभर फिरून बियाणे, कंद आणि रोप जमवून त्याची सीड बँक केली होती! जगभरातील पिकांमधे असणारे वैविध्य, त्यात होत गेलेले बदल, पिकांमधे झालेली उत्क्रांती या सगळ्यांचा अभ्यास करून या माणसाने पिकांचे उत्क्रांतीशास्त्रही मांडले होते. या माणसाचे नाव होते, निकोल व्हॅविलोव.
निकोल व्हॅविलोव हा सोव्हिएत रशियामधील एक जीवशास्त्रज्ञ, जनुकशास्त्रज्ञ आणि कृषीतज्ञ होता. त्याचा जन्म २५ नोव्हेंबर १८८७ रोजी मॉस्को येथे झाला. जनुक शास्त्राचे जनक मानले जाणारे विल्यम बॅट्सन हे त्याचे गुरू. ते केंब्रिज विद्यापीठाचे विद्यार्थी होते. लंडनच्या जॉन इन्स हॉर्टिकल्चर इन्स्टिट्यूटमधून त्याने शिक्षण घेतले. पुढे तो रशियाच्या सारातोव्ह युनिव्हर्सिटीमधे वनस्पतीशास्त्राचा प्राध्यापक म्हणून रुजू झाला. स्टालिनने त्याला रशियाच्या जैवशास्त्र विभागाचे प्रवक्ते म्हणूनही नेमले.
१९२० च्या सुमारास रशियात प्रचंड मोठा दुष्काळ पडला. अन्नाशिवाय लोकं तडफडून मरत होते.
पुन्हा कधीही भविष्यात अशा दुष्काळाची वेळ येऊ नये म्हणून निकोलने दुष्काळावर मात करण्यासाठी बियाणे, कंदमुळे आणि फळांचा साठा करून ठेवण्याची मोहीम हाती घेतली. यासाठी तो संपूर्ण जगभर फिरला.
या जगभ्रमंतीमध्ये त्यांनी प्रत्येक देशातील पिकांचा अभ्यास केला. पिके आणि बियाणांविषयी त्याने जेवढे काम केले आहे, तितके काम त्याच्याआधी आणि त्याच्या नंतरही कुणी केले नाही. म्हणूनच त्याने साठवलेली सीड बँक ही जगातील सर्वात मोठी सीड बँक मानली जाते.
जैवविविधतेचा त्याने खोलवर अभ्यास केला होता. यासाठी त्याने ६४ देश आणि पाच खंड पालथे घातले होते. या सगळ्या प्रदेशातील हरेक प्रकारच्या वनस्पतीच्या बिया त्याने गोळा केल्या होत्या. या प्रवासासाठी त्याला विविध भाषा अवगत करणे गरजेचे होते. कारण प्रत्येक देशातील शेतकऱ्याशी स्वतः बोलून त्याने ही माहिती गोळा केली होती. केवळ अभ्यासासाठी म्हणून इतक्या भागांतील शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेणारा तो एकमेव शास्त्रज्ञ असावा.
शेतकऱ्यांच्या पारंपारिक शेतीचे तंत्र त्याने समजून घेतले. भटक्या शेतकऱ्यांचे तंत्रही त्याने समजून घेतले. आपल्या शेतीमधे आणि आहारामधेही जी विविधता आज दिसते आहे, त्याचे मूळ ८० वर्षांपूर्वी निकोलने केलेल्या अभ्यासात दडले आहे. निकोलच्या या मेहनतीचे आणि योगदानाचे म्हणावे तसे मुल्यांकन झालेच नाही.
डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांताच्या तोडीस तोड असणारी वनस्पतीतील उत्क्रांतीचा सिद्धांत निकोलनेच मांडला. एकाच प्रदेशात एखाद्या वनस्पतीचे विविध प्रारूपे आढळतात आणि त्या वनस्पतीचे जंगली रूप त्या प्रदेशात मोठ्याप्रमाणात आढळते तिथेच त्या वनस्पतीची निर्मिती झालेली असते. हा सिद्धांतही त्याने मांडला. त्यामुळे कुठल्या पिकाची उत्पत्ती कुठल्या प्रदेशात झाली याचा अभ्यास करता आला.
पण, दुर्दैव हे की इतकी मोठी मांडणी आणि संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्याच्या या अभ्यासाबद्दल पुरस्कार मिळण्याऐवजी रशियातील माथेफिरू हुकुमशहामुळे भुकेनेच तडफडून मारण्याची वेळ आली. दुष्काळावर कायम स्वरूपी इलाज शोधणाऱ्या शास्त्रज्ञाला अन्नासाठी तडफडावे लागले किती ते दुर्दैव?
मानवी जीवनाची सुरूवात झाल्यापासून या पृथ्वीवर १२० वेळा भयाण दुष्काळ पडला असल्याचे पुरावे सापडतात. या दुष्काळात अब्जावधी माणसे मृत्युमुखी पडली असतील. निकोलेंच्या हयातीतच रशियामध्ये तीन वेळा दुष्काळ पडला होता. यातील शेवटचा दुष्काळ हा स्टालिनच्या सामुहिक शेतीच्या प्रयोगामुळे निर्माण झाला होता. कुठल्याच शेतकऱ्याचा आपल्या जमिनीवर मालकी हक्क राहिला नव्हता. या जमिनीतून येणाऱ्या पिकांवरही त्याचेच नियंत्रण होते. सगळ्याच शेतकऱ्यांना अशा प्रकारे अचानक वाऱ्यावर सोडून दिल्याचा प्रकार केल्याने मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट झाली आणि रशियात अन्नधान्याची टंचाई जाणवू लागली.
स्टालिनच्या चुकीच्या निर्णयाचा परिणाम संपूर्ण राष्ट्राला भोगावा लागला होता. स्टालिनला हा आरोप कुणाच्या तरी माथी मारून स्वतः नामानिराळे व्हायचे होते. त्यामुळे त्याने निकोल व्हॅविलोव यालाच यासाठी जबाबदार धरले.
रशियाच्या केजीबी या गुप्तचर संघटनेने अचानक एक दिवस निकोलला पकडून नेले. निकोल त्यावेळी आपल्या बियाणे गोळा करण्याच्याच उपक्रमात व्यस्त होता. सगळीकडे दुसऱ्या महायु*द्धाचा भडका उडाला होता आणि रशियातील या महानाट्यातील एक महत्वाचा भागीदार होता. निकोलला पकडून नेल्यानंतर कुणालाच ते कुठे आहेत, त्याचे काय झाले याची चौकशी करण्याचे धाडस झाले नाही. त्याच्या सोबतचे इतर शास्त्रज्ञ बियाणांची जपणूक करण्यातच व्यस्त होते. स्टालिनला निकोलच्या या बियाण्यांचा कब्जा हवा होता. पण स्टालिनच्या हाती हे बियाणी लागली असती तर त्याचा कितपत योग्य उपयोग झाला असता याची कुणालाच खात्री नव्हती.
केजीबीने अशाप्रकारे फक्त चौकशीसाठी म्हणून रशियातील हजारो लोकांना उचलून नेले होते. त्यांचा अतोनात छळ करून त्यांना मारून टाकले होते. याला स्त्रिया, पुरुष आणि लहान मुलेही अपवाद नव्हती. निकोललाही प्रचंड यातना देण्यात आल्या. शेवटच्या काही दिवसात तर त्याला अन्नपाण्यावाचून ठेवण्यात आले.
फक्त एक कोबी आणि पीठ एवढेच अन्न त्याला मिळत असे.
ज्या माणसाने आपल्या ताटातील अन्न कुठून आले, त्याचा विकास कसा झाला, याचे ज्ञान जगाला दिले त्याच माणसावर अन्नावाचून मारण्याची वेळ आली. आयुष्यातील पन्नास वर्षे ज्याने जगातील दुष्काळ संपवण्याच्या उद्देशाला वाहिली त्याच माणसाला भूकबळी व्हावे लागले.
निकोलने सुमारे २,२०,००० बियांची साठवणूक केली होती. त्याच्या आणखी एका सहकाऱ्याकडेही १,५०,००० बियाणी होती. जर्मन सैन्याच्या किंवा भुकेने व्याकूळ झालेल्या लोकांच्या हाती जर हा साठ पडला असता तर तो क्षणात संपवला गेला असता. इतका मोठा साठा निर्माण करण्यासाठी या शास्त्रज्ञांनी किती वेळ खर्ची घातला होता. या साठ्याची जपणूक करण्यासाठी त्याने स्वतःला एक बिल्डींगमध्ये कोंडून घेतले. बियाणांची राखण करणाऱ्या या शास्त्रज्ञांनी स्वतःही भूकबळी होणे पसंत केले पण हा साठा चुकीच्या हाती लागू दिला नाही.
१९४२ ते १९४३ या एका वर्षाच्या काळात डझनभर संशोधक अशा प्रकारे भूकबळीने मृत्यू पावले असतील. येणाऱ्या पिढ्यांसाठी आणि यु*द्धानंतर उभे राहण्यासाठी धडपडणाऱ्या सगळ्यांनाच या बियाणांची गरज होती. त्यांच्यासाठी या बियाणांचे रक्षण करणे गरजेचे होते. सेंट पीटर्सबर्ग येतील रशियाच्या स्टॉगी इमारतीच्या तळघरात हे बियाणे जपून ठेवण्यात आले होते. सेंट पीटर्सबर्ग येथे आजही हा साठा सुखरूपरित्या जतन करून ठेवण्यात आला आहे.
आज कुठेही दुष्काळ पडला तरी अन्नधान्याची इतकी टंचाई जाणवत नाही की लोक उपाशी राहून मारतील. प्रत्येक देशात मुबलक अन्नधान्य पिकते किंवा प्रत्येक देश इतर देशाकडून अन्नधान्य आयात करण्याइतका समर्थ तरी बनला आहे.
निकोलच्या कामाची त्याच्या हयातीत योग्य दखल तर घेतली नाहीच उलट त्यासाठीच त्याला आपला जीव गमवावा लागला. त्याच्याच प्रयत्नांचे फळ म्हणून महायु*द्धानंतरही आपण वैविध्यपूर्ण आहाराचा उपभोग घेत आहोत. खरेच आपल्या शरीराचे पोषण करणाऱ्या या विविधांगी आहाराबद्दल आपण निकोल व्हॅविलोवच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. तीच त्याच्यासाठी योग्य आदरांजली ठरेल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.