आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
जे जीवनातील कमतरतेपेक्षाही जीवनावर प्रेम करण्याची इच्छा प्रबळ असली पाहिजे हे शिकवतात. एक पाय गमावला असतानाही एव्हरेस्ट सर करणाऱ्या अरुणिमा सिन्हा विषयी तुम्ही ऐकले असेल. लहानपणीच दोन्ही पाय गमावलेल्या, देवरिया जिल्ह्यातील राजबली प्रसाद यांची जीवनकथाही तितकीच प्रेरणादायी आहे. दोन्ही पाय गमावले असले तरी इच्छाशक्ती मात्र दुप्पटीने वाढली. आपल्या जिद्दीने त्यांनी क्रीडा क्षेत्रात दैदिप्यमान यश मिळवले. आंतरराष्ट्रीय स्तरावर दहा सुवर्ण पदके मिळवून स्वतःची क्षमता सिद्ध केली. मात्र संघर्षावर मात करून पुढे आलेल्या व्यक्तीलाही जेव्हा निराशा घेरते तेव्हा मात्र होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागत नाही.
राजबली प्रसाद यांच्या जीवनप्रवासाचा हा वेध घेतल्यानंतर मानसिक शक्ती आपल्या आयुष्यात किती महत्त्वाची भूमिका बजावते याची खात्री पटेल.
राजबली प्रसाद यांचा जन्म रुद्रपुरमधील पिपर काछार या गावात झाला. त्यांचे वडील रेल्वेत नोकरी करायचे. रेल्वेतील कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सरकारी निवासातच त्यांचे कुटुंब राहत होते. राजबली दोन वर्षाचे असतानाच खेळता खेळता रेल्वे खाली सापडले. या अपघातात त्यांचे पाय गंभीररित्या जखमी झाले आणि डॉक्टरांना त्यांचे दोन्ही पाय काढावे लागले.
त्यांच्या आईवडिलांना मात्र या अपघाताचा खूपच धक्का बसला. ते गौरीबजार रेल्वे स्टेशन सोडून ते आपल्या मूळ गावी राहायला आहे. पुढे राजबली यांनी शिक्षण घेण्याचा विचार केला. त्यांच्या गावात शाळा नसल्याने शाळेसाठी त्यांना रुद्रपूरला यावे लागत होते. वाटेतील नदी पार करून ते शाळेत पोहोचत. शाळेत असतानाच त्यांचा कल खेळाकडे जास्त झुकू लागला.
बारावीत गेल्यानंतर त्यांना असे वाटू लागले की आपण कुठल्या तरी विशिष्ट खेळात प्राविण्य मिळवले पाहिजे. यासाठी त्यांनी थाळी फेक आणि पोहणे हे दोन प्रकार निवडले. खेळ हीच त्यांच्या जीवनाची प्रेरणा बनली.
संपूर्ण समर्पणाचा निश्चय करून ते खेळामध्ये उतरले. हळूहळू त्यांच्यातील क्रीडा कौशल्ये विकसित होत गेली तसतसे त्यांना अधिकाधिक यश मिळत गेले. प्रदेश स्तरावरून सरुवात करून ते देश स्तरावरील स्पर्धेपर्यंत पोहोचले होते.
देशांतर्गत संघात खेळता खेळता लवकरच ते भारतीय संघासाठी खेळू लागले. १९८१ साली जपानमधे ज्या पॅरा ऑलिंपिक स्पर्धा झाल्या त्यात त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. पोहण्यात आणि शार्प शूट स्पर्धेत त्यांनी दोन सुवर्णपदके मिळवली, देशाचे नाव उंचावले.
त्यानंतर हॉंगकॉंग येथे आयोजित करण्यात आलेल्या पॅसिफिक खेळातही त्यांनी अशीच उज्वल कामगिरी केली. इथेही त्यांना पोहणे, थाळी फेक या दोन प्रकारामध्ये सुवर्ण पदक मिळाले. हा सगळा काळ त्यांच्या आयुष्यातील यशोशिखरावर विराजमान होण्याचा काळ होता. त्यांची विजयाची घोडदौड अशीच कायम सुरु राहिली. एकामागून एक अशी आंतरराष्ट्रीय पातळीवरील दहा सुवर्ण पदके त्यांनी पटकावली, चार रौप्य आणि एक कांस्य पदकही मिळवले.
राजबली म्हणजे त्यांच्या छोट्याशा गावासाठी खरेखुरे हिरोच होते. त्यांच्या या कर्तृत्वाचा त्यांच्या गावालाही अभिमान होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला होता. त्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून कानपूरच्या एल्गिन फॅक्ट्रीत त्यांना नोकरी देण्यात आली.
नोकरी मिळाल्यानंतर त्यांनी लग्न केले. लग्नानंतर त्यांना लवकर संतती झाली नाही. पण, तरीही ते निराश झाले नाहीत. त्यांनी दोन मुली दत्तक घेतल्या. दोन अनाथ मुलींचे पालकत्व स्वीकारून त्यांनाच आई-वडिलांचे प्रेम देण्याचे ठरवले. आयुष्याच्या या टप्प्यापर्यंत त्यांना कधीच निराशेने घेरले नाही.
त्यांचे आयुष्य सुरळीत चालू होते. परंतु अचानकच ते ज्या कंपनीत काम करत होते ती एल्गिन फॅक्ट्री अचानक बंद पडली. नोकरी बंद पडल्यानंतर ते घरीच राहू लागले. हाताला काम नसल्याने घरात आर्थिक तंगी जाणवू लागली. घर चालवण्यासाठी त्यांच्या पत्नीने पोलीस स्टेशनमध्ये चौकीदारी करण्याची नोकरी पत्करली.
परंतु तरीही त्याच्या आर्थिक परिस्थिती फारशी सुधारणा झाली नाही. घरात बसून काय होणार? हा विचार करून त्यांनी घरोघरी जाऊन दुध विकायला सुरुवात केली.
नोकरी गेल्यानंतर हळूहळू ते निराश होत गेले. मानसिक तणावाला बळी पडल्याने त्यांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम दिसू लागला. ते सारखेच आजारी पडू लागले. आधीच नाजूक झालेल्या आर्थिक परिस्थितीत त्यांच्या औषध गोळ्यांच्या खर्चाची आणखी भर पडत होती.
त्यांना आलेल्या परिस्थितीतून सावरणे जमलेच नाही. एकेकाळी देशाला सुवर्ण पदके मिळवून देणारा हा खेळाडू आज आर्थिक विवंचनेच्या गर्ततेत गटांगळ्या खात होता. शेवटी ९ एप्रिल २०१७ रोजी दवाखान्यात उपचार सुरु असतानाच त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
त्यांच्या अशा अचानक निघून जाण्याने त्यांच्या कुटुंबियांची आणि विशेषत: त्यांच्या पत्नीची अवस्था सैरभैर झाली. पदरात दोन मुली असताना एकटीने त्यांचा सांभाळ कसा करायचा याचा विचार त्यांना आता रोज छळतो. त्या पदर खोचून कामाला लागल्या असल्या तरी एकट्याने त्यांना हा संसार सावरणे अशक्य होत आहे. खूप प्रयत्न करूनही कुटुंबाची आर्थिक परवड तशीच आहे. निराशेने त्या कधीकधी राजबली यांची सुवर्ण पदके विकण्याचा विचार करतात पण, तेही धाडस होत नाही.
राजबली प्रसाद यांनी जगभरात देशाचे नाव जगभरात उंचावले. अपंग असतानाही त्यांनी दाखवलेले कर्तृत्व असामान्य असेच आहे. पण, तरीही त्यांनी आपल्या भूतकाळातील कर्तृत्वाचे भांडवल करण्याचा कधी विचारही केला नाही.
अनेकांना हिंमत देणारे राजबली यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचीच जर अशी अवस्था होत असेल तर, हे वास्तव खूपच निराश करणारे आहे. होय ना?
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved