तुम्ही फास्टर फेणे, व्योमकेश बक्षी, सीआयडी आणि अदालत या मालिका पाहिल्या आहेत का? तुम्ही शरलॉक होम्सच्या गोष्टी वाचल्या आहेत का? बऱ्याचदा या मालिका, चित्रपट आणि पुस्तक वाचताना आपल्याला एका गुप्तहेराच्या जीवनाविषयी कुतूहल निर्माण होते. गुप्तहेर जे आपल्या बुद्धिमत्तेचा बळावर कठीण रहस्ये उलगडवून सत्याचा मागोवा घेतात. अशाच एका महिला गुप्तहेराबद्दल आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत, जिने भारतातील पहिली प्रायव्हेट महिला गुप्तहेर होण्याचा मान पटकावला आहे.
रजनी पंडित असे त्या महिला गुप्तहेराचे नाव असून त्यांनी अनेक कठीण केसेस एका चुटकीसरशी सोडवल्या आहेत. रजनी पंडित यांचा जन्म पालघर जिल्ह्यात झाला. पालघरलाच त्यांनी स्वतःचे शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढे मराठी साहित्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी मुंबईच्या रुपारेल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
रजनीच्या मनात एक गुप्तहेर होण्याचा विचार आपल्या वडिलांकडे बघून आला. रजनीचे वडील हे पोलीस दलात इन्स्पेक्टर होते. त्यांनी महात्मा गांधींच्या ह*त्येचा तपास केला होता. रजनी यांचे वय कमी होते तरी त्यांना त्यांच्या वडिलांच्या कामात फार रस होता. त्या नेहमी त्यांच्या वडिलांच्या इतर पोलीस अधिकाऱ्यांशी होणाऱ्या चर्चा ऐकायच्या, यामुळे त्यांच्या मनात देखील गुप्तहेर होण्याचा विचार येत असायचा, त्यांना हे देखील त्यावेळी कळत नव्हते की हे देखील एक प्रचंड जोखमीचे काम आहे.
आपल्या पोलीस दलातील वडिलांना बघून रजनीच्या डोक्यावर गुप्तहेर बनण्याचे खुळ घुसले ते कायमचेच!
रजनी यांनी आपल्या पित्याची प्रेरणा घेऊन गुप्तहेर बनण्याचे स्वप्न जरी उराशी बाळगले होते तरी त्यांना त्यासाठी आवश्यक ट्रेनिंग घ्यायचे असते याबद्दल कसलीच माहिती नव्हती. त्यांच्या कॉलेजमध्ये घडलेल्या एका घटनेने त्यांना गुप्तहेर म्हणून नावलौकिक मिळवून दिला.
कॉलेजमध्ये रजनी यांना एका मुलीचा व्यवहार फार संशयास्पद वाटत होता. त्यांनी ज्यावेळी तिच्या या व्यवहाराची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला त्यावेळी काही धक्कादायक तथ्ये समोर आली होती. ती मुलगी चुकीच्या मुलांसोबत रोज बाहेर जात होती, त्या मुलांमध्ये राहून ती सिगारेट पिणे आणि दारू पिणे असे उद्योग करू लागली होती.
रजनी यांनी त्या मुलीच्या आईवडिलांचे याकडे लक्ष वेधून घेण्याचे ठरवले. रजनी यांच्याकडे त्या मुलीच्या घरचा पत्ता नव्हता. तो पत्ता मिळवण्यासाठी तिने कॉलेज ऑफिसच्या क्लार्कला संपर्क केला. त्यांनी त्या क्लार्कला सांगितले की, ती मुलगी माझी जवळची मैत्रीण असून तिच्या वाढदिवसाचे गिफ्ट पाठवण्यासाठी मला तिच्या घरचा पत्ता हवा आहे. क्लार्कने लगेच त्यांना पत्ता दिला.
रजनीने एक दिवस शोध घेत त्या मुलीच्या वडिलांची भेट घेतली व त्यांना संपूर्ण हकीकत सांगितली. रजनी यांच्याकडून ही माहिती ऐकल्यावर त्या मुलीच्या वडिलांना धक्काच बसला होता. त्यांना देखील स्वतःच्या मुलीबद्दल इतके माहिती नव्हते जितके रजनीला माहिती होते.
रजनी यांच्या बुद्धीचे कौतुक करताना त्यांनी रजनी यांना विचारले की ‘तुम्ही गुप्तहेर आहात का?’ आणि इथूनच रजनी यांच्या गुप्तहेरीच्या प्रवासाला सुरुवात झाली.
त्या मुलीच्या प्रकरणाचा उलगडा केल्यानंतर रजनी स्वतःला गुप्तहेर समजू लागल्या होत्या. त्यांनी यालाच आपले करियर बनवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या वडिलांचा याला विरोध होता. त्यांचे मत होते की हा व्यवसाय महिलांसाठी सुरक्षित नाही.
पण रजनीने आपल्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध हा व्यवसाय सुरू केला आणि स्वत:ची प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सी सुरू केली.
त्यांनी आपल्या एजन्सीला रजनी पंडित डिटेक्टिव्ह एजन्सी असे नाव दिले. एजन्सी उघडण्याच्या वेळी रजनी यांना लक्षात आले होते की, गुप्तहेर बनण्यासाठी कुठल्या स्पेशल ट्रेनिंगची आवश्यकता नसते. एकाग्रता आणि बुद्धिमता याच्या बळावर हे काम करता येते. स्वतःची एजन्सी उघडल्यावर रजनी यांना अनेक लोकांच्या आलोचनेचा देखील सामना करावा लागत होता. त्यांच्या हितचिंतकांनी त्यांना गुप्तहेर होणे हे महिलेचे काम नाही, असे सल्ले दिले होते. अनेकांनी यामुळे रजनी यांचा जीव देखील जाऊ शकतो, असे सांगितले.
या सगळ्या गोष्टींनी एखादी मुलगी खचली असती. पण रजनी मागे हटल्या नाहीत, त्यांच्यावर इतरांच्या बोलण्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्यांनी आपल्या गुप्तहेरीवर दोन पुस्तकांचे लेखन केले. रजनी यांच्या गुप्तहेर म्हणून असलेल्या कामगिरी दाक्षिणात्य सिनेमा निर्मात्यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
१९९१ मध्ये आपली स्वत:ची डिटेक्टिव्ह एजन्सी उघडणाऱ्या रजनी पंडित यांनी काही वर्षात आपल्या कामाच्या बळावर जगाला हैराण करून सोडले होते. त्यांनी आपल्या २० लोकांच्या टीमच्या बळावर २०१७ पर्यंत ७५ हजारापेक्षा जास्त केसेस सोडवल्या होत्या. असे म्हणतात की पोलीस ज्या केसेस सोडवू शकायचे नाही, त्या केसेस रजनी सहज सोडव्याच्या. लोक लांबून रजनी यांच्याकडे आपल्या केस घेऊन यायचे. रजनी यांचे कार्य इतके प्रभावी होते की पोलीस देखील त्यांची मदत घेऊ लागले होते.
अनेक गंभीर केसेस सोडवण्यात ज्यावेळी पोलिसांना अपयश येत होते, त्यावेळी ते रजनी पंडित यांची मदत घेत होते. अनेक विदेशी लोक देखील आपल्या केसेस सोडविण्यासाठी रजनी पंडित यांच्याकडे यायचे. एक केस सोडवताना रजनी पंडित यांच्या समर्पण भावाने पोलीस देखील प्रभावित झाले होते.
एका महिलेवर तिच्या नवऱ्याच्या ह*त्येचा आरोप होता, पण तिच्या विरोधात पुरावे नव्हते. त्या महिलेकडून पुरावे गोळा करण्यासाठी रजनी पंडित यांनी त्या महिलेकडे नोकर म्हणून पाच महिने काम केले होते. त्यांनी त्या महिलेच्या प्रत्येक व्यवहारावर नजर ठेवली. काही वेळा त्या गर्भवती महिला बनल्या तर कधी अंधळ्या असल्याचे नाटक केले. त्यांनी अनेक रुप घेऊन पुरावे गोळा केले होते.
रजनी पंडित यांचा गुप्तहेर म्हणून असलेल्या कारकिर्दीची सुरुवात जितक्या धुमधडाक्यात झाली तितकाच लज्जास्पद अंत देखील झाला होता. गुप्तहेर म्हणून काम करताना रजनी पंडित एवढ्या पुढे निघून गेल्या होत्या की त्यांनी अनेक कायद्यांचे उल्लंघन केले होते. या गुन्ह्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. चुकीच्या पद्धतीने लोकांचे कॉल रेकॉर्डस् मिळवल्याच्या आरोपावरून पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यांनी लाच देऊन ही माहिती मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
त्यांनी लोकांच्या खाजगी माहितीचा बेकायदेशीर वापर केल्यामुळे त्यांना तुरुंगवास ठोठावण्यात आला होता. चाळीस दिवस जेलमध्ये घालवल्यानंतर त्यांना जामिनावर मुक्त करण्यात आले होते. रजनी पंडित शेवटपर्यंत म्हणत राहिल्या की त्यांनी काही चूक केलेली नव्हती. पण लोकांच्या खाजगी आयुष्यात लुडबुड करणे फार गंभीर होते.
रजनी पंडित यांची चूक असली तरी त्यांनी अनेक चांगले काम देखील करून दाखवले होते. त्यांच्यामुळेच अनेक गुन्हेगार तुरुंगात रवाना झाले आहेत. एक महिला म्हणून त्यांनी केलेली कामगिरी खरंच कौतुकास्पद होती.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.