आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
कोणताही राजा, राणी किंवा एखाद्या राजघराण्याचा शाही थाट आपण बऱ्याचदा चित्रपटांत पाहिलेला किंवा पुस्तकांत वाचलेला आहे. त्यांचं एकंदर आयुष्यच आपल्यासारख्या सामान्य लोकांपेक्षा खूप वेगळं असतं. राजेशाही इतमामात असलेलं त्यांचं दिसणं, चालणं, बोलणं, वागणं हे सगळंच आपल्याला कुठे ना कुठे आकर्षित करत असतं.
याबाबतीत एक सुप्रसिद्ध उदाहरण म्हणजे दिवंगत इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि तिचा संपूर्ण राजपरिवार. संपूर्ण जगभरात या राणीचं नाव आदराने घेतलं जातं. बऱ्याचदा ती भारतात येऊन गेली आहे. तिच्यासह तिचा संपूर्ण परिवार शाही जीवन जगतो. त्यांचा तो भव्य राजवाडा व त्यांचं एकूणच राहणीमान खूप उच्च दर्जाचं आहे.
मात्र प्रत्येक गोष्टीला जशा दोन बाजू असतात, याही बाबतीत त्या आहेतच. या लोकांना कायम फॉर्मल कपडेच वापरावे लागतात. जिथे जातील तिथे स्वतःसाठी बनवलेले खास अन्न व पाणीच घ्यावे लागते. स्थानिक अन्नपदार्थांची चव चाखता येत नाही. राजपरिवारातील जास्त सदस्य कधी एकत्र प्रवास करू शकत नाहीत. काही अपवाद वगळता कोणालाही त्यांच्यासोबत फोटो काढणं शक्य नाही किंवा कोणालाही त्यांचा ऑटोग्राफही घेता येत नाही. असे अनेक शिष्टाचार या राजघराण्याला नेहमीच पाळावे लागतात. हे असं जगणं आपल्यासारख्या सामान्य लोकांना अतिशय जाचक वाटू शकतं. पण हा राजपरिवार मात्र कित्येक दशकांपासून अशाच प्रकारे जीवन जगत आहे.
पण या नियमांमुळे एखाद्याचं आयुष्य उद्धवस्त झालं तर? खरंतर अशी दुर्दैवी वेळ कोणावरही येऊ नये, पण हे सत्य आहे. एका राणीला तिच्या राजपरिवारात असलेल्या कडक नियमांमुळे जीव गमवावा लागला. नेमकं काय झालं? कोण होती ती राणी? हेच आज आपण जाणून घेणार आहोत.
ही दुर्दैवी राणी होती थायलंडची राणी सुनंदा कुमारीरत्ना. थायलंडचा राजा मोंगकूट याच्या एकूण ८२ मुलांमधील हे ५० वं अपत्य. मोंगकूटनंतर थायलंडचा राजा बनलेल्या राजा चुआलॉंगकॉर्नची ती पत्नी होती. तिचा जन्म दि. १० नोव्हेंबर १८६० रोजी बँकॉकमध्ये झाला. तिच्या आईचं नाव पियाम सुचरिताकुल असं होतं. वयाच्या १७व्या वर्षीच १८७७ साली तिचा विवाह झाला. या राणीला एकूण दोन मुलं. त्यापैकी पहिली मुलगी कन्नाभोर्न बेजरत्ना हिचा जन्म १२ ऑगस्ट १८७८ रोजी झाला.
एकदा आपल्या मुलीसोबत राणी सुनंदा कुमारीरत्ना नावेत बसून आपल्या राजवाड्यातून दुसऱ्या एका महालात जात असताना अचानक त्यांच्या नावेला दुसऱ्या नावेचा धक्का लागून ती पाण्यात बुडू लागली. राणी सुनंदाला पोहता येत नसल्यामुळे ती पाण्यात बुडू लागली. पण तिथे असलेल्या कोणालाही तिला वाचवणं शक्य झालं नाही कारण त्या काळी राजपरिवारातील व्यक्तींना सर्वसामान्यांनी स्पर्श करू नये असा नियम होता, जो मोडणाऱ्याला फाशीच्या शिक्षेची तरतूद होती. हा नियमच दुर्दैवाने राणी सुनंदा कुमारीरत्ना व तिच्या मुलीच्या जीवावर बेतला.
मात्र यात तथ्य नसल्याचं काहीजण म्हणतात. राणी सुनंदा व राजकुमारी जेव्हा बुडू लागल्या, तेव्हा नाविकांनी पाण्यात उडी मारली. राणी व राजकन्येला शिडाच्या अडकलेल्या पडद्यांमधून बाहेर काढलं व त्यांना दुसऱ्या बोटीवर नेण्यात आलं. तिथे परिचारिकांनी त्यांना वाचवण्याचे अनेक प्रकारे प्रयत्न केले, पण त्या दोघींचाही दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना दि. ३१ मे १८८० रोजी घडली. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे त्यावेळी राणी सुनंदा कुमारीरत्ना दुसऱ्यांदा गरोदर होती. तिचं दुसरं मुल जन्मालाच येऊ शकलं नाही.
मृत्यूनंतर देखील राणी सुनंदा कुमारीरत्ना अन् राजकुमारी कन्नाभोर्न बेजरत्ना यांच्या बाबतीत अनेक वेगळ्याच गोष्टी घडल्या. दोघींच्या अकाली निधनाने दुःखी झालेल्या राजा चुआलॉंगकॉर्नच्या आदेशानुसार, त्यांच्यावर झालेल्या शाही अंत्यसंस्काराची तयारी जवळपास १० महिने चालली होती. तोवर त्या दोघींचे मृतदेह पाऱ्याचं इंजेक्शन देऊन सुकवून सोनेरी पेटाऱ्यात ठेवण्यात आले होते.
दोघींच्या थडग्याच्या बांधकामासाठी खास प्रकारचे दगड व लाकडे जमवण्यात आली. अंत्यसंस्काराची चिमणी सुमारे ८५ मीटर उंच होती. दि. १० मार्च १८८१ रोजी राणी व राजकन्येचा अंत्यविधी सुरू झाला. १५ मार्च १८८१ ला सायंकाळी ६ च्या दरम्यान राजा चुआलॉंगकॉर्नच्या हस्ते अंत्यसंस्काराची चिता पेटवली गेली, जी पूर्ण रात्रभर जळत होती. २० मार्च १८८१ रोजी ग्रँड पॅलेसच्या मिरवणुकीने या कार्यक्रमाची सांगता झाली. आशिया खंडाच्या इतिहासात सर्वात महागडे अंत्यसंस्कार म्हणून या अंत्यसंस्कारांचा उल्लेख केला जातो. जे त्यानंतर क्वचितच कुणाच्या वाट्याला आले असतील.
राजा चुआलॉंगकॉर्नने नंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्या अधिकाऱ्याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली, ज्याने राणी मरणाच्या दारात असतानाही तिला वाचवण्याऐवजी राजपरिवाराच्या नियमांनाच महत्व देऊन तिला मदत करण्याचे आदेश सेवकांना दिले नाहीत.
ही आजवरच्या इतिहासातली अशी एकमेव घटना नाही की, एखाद्या राजपरिवारातील व्यक्तीचा अचानक विचित्र प्रकारे मृत्यू झाला आहे. याशिवाय देखील अशी अनेक उदाहरणं आहेत. ग्रीसचा दुसरा राजा अलेक्झांडर याचाही वयाच्या केवळ २७ व्या वर्षी माकडाने केलेल्या हल्ल्यात जखमी झाल्यामुळे मृत्यू झाला होता. ते माकड एका नोकराने तिथे पाळलं होतं. त्याने राजाच्या पाळीव जर्मन शेफर्ड कुत्र्यावर हल्ला केला असताना त्याला वाचवण्याच्या नादात राजाला मात्र आपला जीव गमवावा लागला.
अजून एक दुर्दैवाची गोष्ट अशी की, राणी सुनंदा कुमारीच्या बाबतीत राजपरिवाराचा नियम जरी बाजूला ठेवला तरी त्या काळातील स्थानिक अंधश्रद्धेनुसार एखाद्याला पाण्यामध्ये बुडण्यापासून वाचवणं म्हणजे पाण्यात वास्तव्य करणाऱ्या आत्म्यांच्या कार्यात अडथळा निर्माण करणं असा समज होता. त्यामुळेही कदाचित राणीच्या मदतीला कोणीही गेलं नाही.
मात्र खरंच एखाद्याच्या जीवापेक्षा नियम महत्वाचे असतात का? हा प्रश्न राणी सुनंदा कुमारीरत्नाच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे पडतो.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.