आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारतात ज्ञात इतिहास कालखंडापासून वीर यो*द्धे आणि साहसाची कोणत्याही काळात आणि क्षेत्रात कमतरता नाही. कमतरता आहे ती फक्त शैक्षणिक स्रोतांमधून सांगितल्या जाणाऱ्या समग्र इतिहासाची. माणसाला कोणतीही गोष्ट सैद्धांतिक रूपाने सांगितल्यास ती पटकन कळत नाही किंवा पटत नाही, पण त्या सिद्धांताबरोबर ‘उदाहरण’ दिल्यास तो सिद्धांत लगेच पटतो/समजतो. म्हणूनच ज्ञानेश्वरीमध्ये गीतेचं निरूपण करताना ज्ञानेश्वरांनी अनेक दृष्टांत म्हणजेच उदाहरणं दिली आहेत.
पण आजच्या तरुण पिढीला शैक्षणिक ‘सिलॅबस’मधून शिकवला जाणारा इतिहास मोठ्या प्रमाणात इंग्रज आणि मुघल कालखंडातील आहे. ब्रिटिश राज्यव्यवस्थेने आपल्या सोयीसाठी तयार केलेला ‘गुलामगिरीचा’ इतिहास आणखी किती दिवस पाठ्यपुस्तकांत राहणार आहे? बाहेरून आलेल्या लुटारूंचा इतिहास शिकून आणि त्याच इतिहासाचा अंगीकारून आजचे विद्यार्थी कोणता आदर्श स्वीकारणार? पौरस, चोल राजवंशातील कित्येक राजे असे अपरिचित वीर भारतात होऊन गेले. यामध्ये स्त्रिया पिछाडीवर नव्हत्या. अशाच एका महान साम्राज्ञीच्या नावावरून मध्यप्रदेशातील अत्याधुनिक रेल्वे स्टेशनचे नामकरण करण्यात आले आहे.
भोपाळच्या हबीबगंज रेल्वे स्थानकाला गोंड राजवंशातील सम्राज्ञी कमलापतीचे नाव देण्यात आले आहे. भोपाळचा प्रदेश सोळाव्या शतकात गोंड शासकांच्या ताब्यात होता. त्यावेळी राणी कमलापतीचा विवाह गोंड राजा सूरत सिंहचा मुलगा निजाम शाह याच्याशी झाला. राज्यावर अनेक आक्र*मणे करण्याचा निर्धार त्यावेळच्या शत्रूंनी केला होता, पण जेव्हा जेव्हा आक्र*मण झाले तेव्हा राणी कमलापतीने त्या आक्र*मणाला खंबीरपणे तोंड दिले आणि शत्रूला पळवून लावले, असा युक्तिवाद राज्य सरकारने केंद्रीय गृहमंत्रालयासमोर केला आहे.
राजा कृपाल सिंह हे सल्कानपूर संस्थानचे राजा होते. त्यांच्या कारकिर्दीत प्रजा अत्यंत सुखी व संपन्न होती. त्यांना एक मुलगी झाली. ती लहानपणापासूनच कमळासारखी सुंदर होती, म्हणून तिचे नाव कमलापती पडले. ती लहानपणापासूनच खूप हुशार आणि धाडसी होती. घोडसवारी, कुस्ती आणि धनुर्विद्येत ती पारंगत होती. कालांतराने ती ‘सेनापती’ बनली. तिने वडिलांच्या सैन्यासह आणि तिच्या महिला साथीदारांसह लढायांमध्ये सहभाग घेतला. तिचे लग्न गिन्नौरगढच्या निजाम शहाशी झाले.
१७०७ साली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याचे पतन सुरु झाले. त्याचवेळी भोपाळपासून ५० किमी अंतरावर असलेले गिन्नौरगढ हे छोटेसे संस्थान अस्तित्वात आले. निजाम शाह याठिकाणी राज्य करीत होता. निजाम शहा हा गोंड राजवंशातील राजा होता. त्याला ७ बायका होत्या असेही म्हणतात. त्यापैकी एक राणी होती कमलापती. ती राजाची सर्वांत प्रिय पत्नी होती. राणी सुंदर असण्याबरोबरच हुशारही होती. राजा निजाम शाहने १७०० साली राणी कमलापतीच्या प्रेमापोटी भोपाळमध्ये सात मजली राजवाडा बांधला. राणी कमलापतीचे वैवाहिक जीवन सुखी होते. त्यांना मुलगा झाला, त्याचे नाव नवल शहा.
आजचे भोपाळ हे त्याकाळी एक छोटेसे गाव होते, येथे निजाम शहाचे राज्य चालत असत. सत्तेच्या मोहापायी आपल्याच नातेवाईकांशी दगाफटका करण्याचा प्रदीर्घ इतिहास भारताला आहे. शिवरायांसारख्या महान सेनानीलासुद्धा कित्येक लढाया स्वकियांविरुद्ध लढाव्या लागल्या. गिन्नौरगढच्या संस्थानात काही वेगळे घडले नाही. बारी किल्ल्यातील जमीनदाराचा मुलगा चैन सिंग हा राजा निजाम शाहचा पुतण्या होता.
विवाहित असूनही कमलापतीशी लग्न करण्याची त्याची इच्छा होती. त्याने राजा निजाम शाहला मारण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, त्यात तो अयशस्वी झाला. एके दिवशी त्याने निजाम शाह याला प्रेमाने जेवायला बोलावले आणि जेवणात विष देऊन त्याचा खू*न केला. या दग्याफटक्यातून वाचण्यासाठी राणी कमलापती आपला मुलगा नवल शाहसह गिन्नौरगडहून भोपाळच्या ‘राणी कमलापती पॅलेस’मध्ये स्थलांतरित झाल्या.
काही अफगाणी भोपाळच्या सीमेजवळ येऊन थांबले आहेत हे राणी कमलापतीला कळाले. या अफगाणांचा सरदार मोहम्मद खान होता, मोहम्मद खान पैश्याच्या लोभापायी कोणासाठीही यु*द्ध लढत असे. राणी कमलापतीने मोहम्मद खानला एक लाख रुपये देण्याचे वचन देऊन चैन सिंगवर ह*ल्ला करायला सांगितले. मोहम्मदने गिन्नौरगड किल्ल्यावर ह*ल्ला करून किल्ला ताब्यात घेतला. या ह*ल्ल्यात चैन सिंग ठार झाला.
पण आता मोहम्मदला भोपाळचे संपूर्ण संस्थान काबीज करायचे होते. त्याने राणी कमलापतीला धर्मांतर करण्याचा आणि लग्न करण्याचा प्रस्ताव दिला. राणी कमलापतीचा १४ वर्षांच्या मुलाने हा घाणेरडा हेतू ओळखून आपल्या १०० सैनिकांसह लाल घाटीमध्ये लढाई करण्यास गेला. एका भीषण यु*द्धानंतर नवल शाहचा दुर्दैवी मृत्यू झाला. या यु*द्धात राणी कमलापतीचे दोन यो*द्धे वाचले. ते जवळच असलेल्या मनुभानच्या टेकडीवर पोहोचले आणि काळा धूर केला, म्हणजेच यु*द्ध हारल्याचे निशाण.
ही विचित्र परिस्थिती पाहून महाराणी कमलापतीने मोठ्या तलावाचा अरुंद मार्ग मोकळा केला, त्यामुळे मोठ्या तलावाचे पाणी लहान तलावात जाऊ लागले. यामध्ये राणी कमलापतीने स्वतः राजवाड्यातील सर्व संपत्ती आणि दागिने घेऊन जलसमाधी घेतली. मोहम्मद खान गडावर पोहोचेपर्यंत सर्व काही संपले होते. राणी कमलापतीने परक्याला भोपाळच्या राजगादीवर बसू दिले नाही. कमलापतीने १७२३ मध्ये आपले जीवन संपवले होते. तिच्या मृत्यूनंतर मात्र भोपाळ नवाबांच्या ताब्यात आले.
गोंड राणी कमलापती आणि त्यांच्या बलिदानासाठी आपण कृतज्ञ आहोत. भोपाळच्या प्रत्येक भागात राणी कमलापतीची कथा सांगितली जाते आणि म्हणूनच भोपाळच्या हबीबगंज रेल्वे स्थानकाला गोंड राजवंशातील सम्राज्ञी कमलापतीचे नाव देण्यात आले आहे. पण फक्त रेल्वेस्थानक, शहरे, जिल्हे इत्यादींची नावं बदलून इतिहास सर्वांसमोर येत नाही. त्यामुळे भारताचा समग्र इतिहास थोडक्यात का होईना पण शाळा आणि महाविद्यालयांच्या पाठ्यपुस्तकांत असावा, हीच त्या वीर यो*द्ध्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.