आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
गोव्याचा प्रदेशावर राज्य करणारी राणी अबाक्का चोवटा ही भारतातील पहिली स्वातंत्र्यसेनानी म्हणून ओळखली जाते. ती उल्लाल येथील तुळू साम्राज्याची महाराणी होती. १५२५ साली तिरुमला रायाने तिला महाराणी बनवलं होतं. त्या राजघराण्यात महिलांनाच राज्यकारभार चालवावा लागायचा.
अगदी तरुण वयात राणी आबाक्काला राज्यकारभाराचे प्रशिक्षण देण्यात आले होते. तिला शस्त्र चालवण्यापासून राज्यकारभार चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यांना धनुर्विद्या, तलवारबाजी, बुद्धिबळ, राज्य कारभार या सर्वांचेच शिक्षण देण्यात आले होते. तिने हिंदू-मुस्लिम जनसंख्या असलेल्या राज्याचा राज्य कारभार चालवला.
तिच्या सैन्यात असलेले मोग्व्हिरा मुस्लिम समाजाचे लोक जे प्रामुख्याने मासेमारी करायचे, तिच्या राज्यकारभाराचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण भाग होते, याच लोकांनी पुढे तिला पोर्तुगीजांशी झालेल्या यु*द्धात सहाय्य केले होते.
वास्को द गामाने भारताचा शोध लावल्यानंतर पुढील २० वर्षात पोर्तुगीजांनी भारताच्या पश्चिमी तटावर धुमाकूळ घातला होता. त्यांनी हिंदी महासागरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यांनी भारत, इंडोनेशिया, श्रीलंका आणि चीनमधील मकाऊ बंदरावर आपले ठाणे उभारले. १७ व्या शतकाच्या मध्यापर्यंत पोर्तुगीजांची हिंदी महासागरावर सत्ता होती.
एकेकाळी मुक्त व्यापारासाठी खुला असणारा हिंदी महासागर पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला आणि त्यांनी त्याठिकाणी आपले कर लादले. अरबी आणि इतर व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या करवसुलीतून त्यांनी मोठ्या प्रमाणात धनसंचय केला होता. असेच कर त्यांनी स्थानिक राज्यकर्त्यांवर लादले होते आणि त्यातून त्यांना कोट्यवधींचा नफा होत होता.
जेव्हा पोर्तुगीजांनी गोवा आणि मंगलोरच्या किनारपट्टीवरील काही भाग जिंकून घेतला तेव्हा त्यांची नजर महाराणी आबाक्का चोवटा यांच्या छोट्याशा साम्राज्यावर गेली.
उल्लाल हा एक सुपीक प्रदेश होता. तिथे कपड्याचं आणि मसाल्याचा पदार्थांचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन व्हायचं. या सर्वांची निर्यात देखील केली जायची. महाराणीच्या काळात हा भूभाग भरभराटीला आला होता.
पोर्तुगीजांना उल्लाल राज्यातून खंडणी वसूल करणे शक्य न झाल्यामुळे त्यांनी राणी आबाक्काला धमकवायला सुरुवात केली. परंतु तिने अगदी धीरोदत्तपणे पोर्तुगीजांच्या मागण्या अमान्य करत अरबी आणि इतर देशातील व्यापाऱ्यांशी असलेला व्यापार चालू ठेवला. यामुळे संतप्त झालेल्या पोर्तुगीजांनी राणीच्या साम्राज्यावर हल्ला चढवला.
पोर्तुगीजांनी राणीच्या साम्राज्याचा आसपासच्या बंदरांवर विजय मिळवत, राणीला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, पण राणीने त्यांचे सर्वच प्रयत्न हाणून पाडले. राणीने पोर्तुगीजांशी लढण्यासाठी सुसज्ज अश्या सैन्याची उभारणी केली, ज्यांच्यासमोर पोर्तुगीजांच्या आधुनिक सैन्याची गाळण उडाली. तिच्या युद्धकौशल्याने अनेक पोर्तुगीज अधिकारी अचंबित झाले.
१५५६ साली पोर्तुगीजांनी पुन्हा तिच्या राज्यावर मोठा ह*ल्ला केला. पोर्तुगीजांनी डॉन अल्मानो डी सिल्व्हेराच्या नेतृत्वाखाली मोठं सैन्य उल्लाल साम्राज्याचा पाडाव करण्यासाठी पाठवलं.
पण यावेळीसुद्धा राणीने पोर्तुगीजांच्या सैन्याचा दारुण पराभव केला. पोर्तुगीजांना सलग दुसऱ्यांदा पराभवाचं तोंड बघावं लागलं.
यापुढे राणीने कलिकतच्या झामोरिन आणि आसपासच्या मुस्लिम राजवटीशी युती करून पोर्तुगीजांच्या विरोधात मोठं यु*द्धदल निर्माण केलं. पोर्तुगीजांना शेवटपर्यंत या राणीचा पराजय करता आला नाही. पुढे जाऊन काही काळासाठी पोर्तुगीजांनी तिच्या साम्राज्यावर ह*ल्ले करणं परवडणारं नव्हतं, त्यामुळे काही काळासाठी पोर्तुगीजांनी माघार घेतली.
परंतु जोआओ पेक्सिओटो नामक पोर्तुगीज अधिकाऱ्याने कटकारस्थान करून तिच्या राजधानीवर कब्जा केला. पण राणी अगदी शिताफीने त्यातून निसटली. तिने पराभव मान्य न करता, प्रतिकार करून आपलं शहर पुन्हा ताब्यात घेण्यासाठी लढायला सुरुवात केली. तिने आपल्या दोनशे सर्वात शूर सरदारांच्या मदतीने उल्लालवर पुन्हा आक्र*मण केलं आणि पेक्सिओटोच्या ताब्यातून किल्ला परत मिळवला व त्याची ७० पोर्तुगीज सरदारांच्या सकट हत्या केली.
पुढे तिने विजापूरचा आदिलशहा, अहमदनगरच्या निजामाशी व कालिकतच्या झामोरिनशी युती करत पोर्तुगीजांवर ह*ल्ला केला. तिच्या ह*ल्ल्यात पोर्तुगीज सेनानी गारद झाले आणि त्यांचा ॲडमिरल मॅस्केर्हेनास मारला गेला. यामुळे चवताळलेल्या पोर्तुगीजांनी तिच्यावर पुनश्च आक्रमण केले. नेहमीप्रमाणे तिने ते आक्रमण पुन्हा एकदा शिताफीने परतवून लावले.
पण तिच्या या विजयी परंपरेला गालबोट लावला तो तिच्या नवऱ्याने.
एका आख्यायिकेनुसार तिच्या नवऱ्याने पोर्तुगीजांना गुप्त माहिती पुरवली, ज्यामुळे एका रात्री किल्ल्यावर पोर्तुगीजांनी ह*ल्ला करून महाराणीला अटक केली आणि तुरुंगात डांबले.
हातातून सत्ता गेली तरी शरीरात प्राण असेपर्यंत लढण्याची उर्मी महाराणीत होती. तिने कारागृहातील कैद्यांना सोबत घेऊन बंड पुकारले. पण हे बंड पोर्तुगीजांनी हाणून पाडले. यात महाराणीला वीरगती प्राप्त झाली.
आपल्या राष्ट्राची परकीय सत्ताधिशांपासून रक्षा करण्यासाठी महाराणी शेवटपर्यंत लढा देत होती. आज महाराणी अबाक्काच्या स्मरणार्थ स्मारकाची निर्मिती मंगलोरमध्ये करण्यात आली असून कर्नाटक सरकारच्या हस्ते राणीच्या नावाने शौर्य पुरस्कारही प्रदान करण्यात येतो.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.