आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
सध्या देशभरात नागरिकता दुरुस्ती विधेयकामुळे वातावरण तापले आहे. भाजपाने लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहात हे नागरिकता दुरुस्ती विधेयक पारित करून घेतले आहे. या विधेयकाच्या विरोधात ईशान्य भारतातील राज्यात गदारोळ माजला असून परिस्थिती चिघळली आहे.
नागरिकता दुरुस्ती विधेयकामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या तीन देशातील धार्मिक अल्पसंख्यांकांना भारताचे नागरिकत्व प्रदान केले जाणार आहे.
धार्मिक अल्पसंख्यांक म्हणजे या देशातील हिंदू, मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्माचे लोक हे भारतात आश्रय घेण्यास व इथली नागरिकता मिळवण्यासाठी पात्र आहेत.
पण या विधेयकात काही त्रुटी असल्यामुळे देशभरातील अनेक विचारवंतांनी या विधेयकाच्या विरोधात मतप्रदर्शन केले आहे. अनेकांनी हे विधेयक कशाप्रकारे देशहिताला बाधक आहे, यावर मत प्रदर्शित केले आहे. यावरून संसदेत ही मोठा गदारोळ झाला आहे. आज नागरिकता दुरुस्ती विधेयक पारित झालेले असले तरी असंख्य प्रश्न समोर उभे आहेतच.
पण या विधेयकामुळे गेल्या अनेक वर्षांपासून भारतात आश्रित म्हणून वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानातुन भारतात स्थलांतरित झालेल्या हिंदू लोकांना दिलासा मिळाला आहे. दिल्लीत वास्तव्यास असलेल्या एका अशाच पाकिस्तानी हिंदू कुटुंबाला याचा इतका आनंद झाला की त्यांनी आपल्या नुकत्याच जन्माला आलेल्या मुलीचं नामकरण ‘नागरिकता’ केले आहे.
देशाची फाळणी झाल्यापासून पाकिस्तान राहणारे अनेक हिंदू पाकिस्तानात होणाऱ्या अत्याचारांना कंटाळून भारतात आश्रयाला आले आहेत. ते पाकिस्तानचे नागरिक असल्यामुळे त्यांना भारताचे नागरिकत्व मिळू शकलेलं नाही.
भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले पण त्यांना ते मिळत नव्हतं. अखेरीस नागरिकता दुरुस्ती विधेयकामुळे या लोकांना आता नागरिकता मिळणार आहे. याचा आनंद देशभरात आलेले पाकिस्तानातील विस्थापित हिंदू साजरा करत आहेत.
सण २०१२ मध्ये पाकिस्तानातून दास कुटुंबीय पाकिस्तानातून भारतात आले. त्यांना राहायला आणि खायला काहीच नव्हतं. भारत त्यांच्यासाठी परका देश होता. त्यामुळे स्वतःच्या प्राणांच्या रक्षासाठी ते भटकत होते.
अखेरीस दिल्लीमध्ये त्यांना आसरा मिळाला. दिल्लीतल्या रोहिणी भागात इतर पाकिस्तानी हिंदू कुटुंबियांसोबत ते वास्तव्यास आहे. दिल्लीतल्या रोहिणी भागातील सेक्टर ११ आणि १३ मध्ये असलेल्या मंजू का तिला या भागात मोठ्या संख्येने पाकिस्तानी हिंदू विस्थापित वास्तव्यास आहेत.
या पाकिस्तानी हिंदू कुटुंबियांना या ठिकाणी आश्रय मिळाला असला तरी नागरिकता नाही. जेव्हा हे विधेयक संसदेत मंजूर झालं तेव्हा या भागातील लोकांनी देखील आनंदोत्सव साजरा केला आणि सरकारच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले.
दास कुटुंबियांची सून आरती ही गरोदर होती आणि ज्यादिवशी या महिलेच्या पोटी एका बालिकेने जन्म घेतला त्यावेळीच हे विधेयक संसदेत मंजूर झालं. असा दुग्धशर्करा योग्य जुळून आल्यामुळे दास कुटुंबियांच्या आनंदाला पारावर उरला नाही.
त्यांनी आपल्या घरातील नवजात बालिकेला नागरिकता हे नाव दिले.
याप्रसंगी जेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारणा केली तेव्हा आरती दास ज्या नवजात बालिकेच्या आई आहेत, त्यांनी म्हटलं की जेव्हापासून आमच्या मुलीचा जन्म झाला आहे, तेव्हापासून आम्ही विधेयकाच्या चर्चा ऐकत होतो. आता हे विधेयक पास झालेच आहे तर मग आम्ही आम्हाला नागरिकता मिळणार या आनंदात आम्ही आमच्या मुलीचे हे नामकरण केले.
यावर त्या मुलीच्या आजीने मीना दास यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की हे विधेयक पास झाल्यामुळे त्यांना अपार आनंद झाला असून त्यांचा गेल्या ७ वर्षांचा संघर्ष फळास आला आहे.
अशाप्रकारे नामकरण करण्याचा हा पहिलाच प्रसंग नसून याआधी देखील नमामि गंगे, गंगापुत्र भीष्म आणि एनडीआरएफ सिंग असे विचित्र नाव, बिहार मधील पुरग्रस्तांनी मुलांना दिले आहेत. नरेंद्र मोदी २०१९ च्या निवडणुकीत निवडून आले तेव्हा एका काशीतल्या मुस्लिम दांपत्याने आपल्या नवजात बालकाचे नाव नरेंद्र मोदी ठेवले होते.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.