आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
चॉकलेट खायला कुणाला आवडत नाही. दात न आलेल्या छोट्याशा बाळापासून दात पडलेल्या म्हाताऱ्याकोताऱ्यांपर्यंत सगळ्यांना चॉकलेट खायला आवडते. त्यातही चॉकलेटमध्ये जर तिखट-मीठ लावलेल्या कैरीचा स्वाद असेल तर? तर काय स्वर्गसुखच! भारतातील लोकांची हीच आवड लक्षात घेऊन डीएसग्रुपने या क्षेत्रात उडी घेतली आणि बघता बघता कंपनीने कोट्यावधींचा आकडा पार केला.
आपल्या सर्वांच्या आवडत्या आंबट-चटपटीत-मसालेदार पल्स कॅन्डीचा हा तितकाच मजेदार प्रवास वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. फक्त एक रुपयाची गोळी कोट्यावधीचा नफा मिळवून देते म्हणजे काय? याचा ग्राहक वर्ग किती मोठा असेल? पल्स कॅन्डीने यासाठी कोणती विशिष्ट मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरली असेल? हे प्रश्न तुम्हालाही पडले असतील ना! मग याची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
तसे तर डीएस ग्रुप गेल्या ९०हून अधिक वर्षापासून भारतीय बाजारपेठेत टिकून आहे. तंबाखु, मसाले, माउथ फ्रेशनर आणि अशाच छोट्या छोट्या गोष्टींनी या कंपनीने भारतीय बाजारपेठेत स्वतःचे पक्के स्थान निर्माण केले आहे. कंपनी कितीही जुनी असली आणि तिचा विस्तार कितीही मोठा असला तरी, शेवटी बाजारात टिकून राहण्याचे आव्हान कुणालाच सुटलेले नाही आणि बाजारात टिकून राहायचे तर, सतत काही तरी नवनवे प्रयोग करत राहिले पाहिजे. प्रतिस्पर्धी कंपन्या कधी मात देऊन पुढे जातील याचा काही नेम नाही.
जुनी उत्पादने तर होतीच पण कंपनीचा नफा वाढवण्यासाठी डीएस ग्रुप काही तरी नवा जुगाड शोधत होती. यासाठी त्यांनी मार्केट सर्व्हे केला आणि आंबा किंवा कच्ची कैरीचा स्वाद देणारा एखादा पदार्थ बाजारात आणण्याचे ठरले. या फ्लेवरची कॅन्डी बाजारात आणली तर नक्कीच ही कॅन्डी अपेक्षित यश मिळवून देईल यात वादच नव्हता.
पण कच्ची कैरी ही नेहमीच तिखट-मीठ लावून खाल्ली जाते. त्यामुळे कैरीच्या आंबटपणासोबतच तिखट-मिठाचा चटपटीत स्वादही जर यात टाकला तर ग्राहक खुश होतील, असा कयास बांधून, मसालेदार मँगो कॅन्डी बनवण्याचा निर्णय पक्का करण्यात आला.
कॅन्डीची कल्पना पक्की झाली असली तरी ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार होती. २०१३ मध्ये कंपनीने मँगो कॅन्डी बनवण्याचा निर्णय घेतला आणि प्रत्यक्षात २०१५ मध्ये ही कॅन्डी बाजारात आली. कल्पनेतून वास्तवात उतरण्यासाठी तिला दोन वर्षांचा प्रवास करावा लागला. कॅन्डी तर बनली पण या कॅन्डीचे मार्केटिंग कसे करावे यासाठी कंपनीकडे कोणताही प्लान तयार नव्हता.
शेवटी कुठल्याही प्रमोशनशिवायच ही कॅन्डी बाजारात उतरवण्याचे ठरवले गेले. खरंतर मार्केटिंग हा कुठल्याही व्यवसायाचा प्राण झाला आहे. अशा काळात कसलेही मार्केटिंग न करता ही नवी कॅन्डी बाजारात आणण्याचा निर्णय तसा धाडसी होता, पण जर तुमचे उत्पादनच भन्नाट असेल तर अशा उत्पादनाला जाहिरातींची गरज लागत नाही. फक्त या कॅन्डीच्या पॅकिंगवर त्यांनी विशेष लक्ष दिले. हिरव्या आणि काळ्या रंगांच्या कॉम्बिनेशन मधील हे पॅकिंग ग्राहकांना आकर्षित करू लागले. याची चव जेव्हा जिभेवर उतरत असे तेव्हा तर ग्राहकांना वेगळीच मजा येत होती.
आंबा हे वर्षातून फक्त एका सिझनमध्ये मिळणारे फळ. आंबा आवडत नाही, अशी व्यक्ती शोधूनसुद्धा सापडणार नाही. आंबा आणि कैरीची चव चाखण्याची इच्छा सर्वांनाच होते पण हे फळ काही बारा महिने मार्केटमध्ये असत नाही. तेव्हा दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न म्हणून ही कॅन्डी खाणारेही अनेक जण असतील.
डीएस ग्रुपने आपले हे नवे उत्पादन भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल याची दक्षता घेतली. ही कॅन्डी नक्कीच फायदा मिळवून देणार यावर कंपनीला विश्वास होताच.
अवघ्या आठ महिन्यात या कॅन्डीने कंपनीला १०० कोटी रुपयांचा व्यवसाय केला. कंपनीला अवघ्या काही महिन्यातच आपले उत्पादन डबल करावे लागले.
पूर्वी जिथे लोकं एक-दोन कॅन्डीज विकत घेत तिथे आता पल्सच्या मुठभर कॅन्डीज विकल्या जात होत्या. लोकांना इतके याचे व्यसन लागले होते. त्यामुळे कंपनीचा नफा अधिकाधिक वाढत गेला. इतक्या नफ्याची खुद्द कंपनीनेही कल्पना केली नसेल. एखाद्या विशिष्ट वयाचा ग्राहक वर्गच याचा चाहता आहे असेही काही नव्हते. प्रत्येक वयातील व्यक्ती या कॅन्डीची मागणी करत होती. असा प्रतिसाद इतर कुठला कॅन्डीला क्वचितच मिळाला असेल.
बाजारात आणताना तरी डीएस ग्रुपने या कॅन्डीच्या प्रमोशनसाठी काहीही विशेष प्रयोग केले नव्हतेच आणि नंतरही करावे लागले नाही. या कॅन्डीच्या ग्राहकांनीच याचे प्रमोशन केले.
अनेक लोकांनी या कॅन्डीचे फोटो, व्हिडीओ बनवून आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केले. ग्राहकांनीच स्वतःहून प्रमोशन केल्यावर आणखी काय पाहिजे?
अनेकांनी या कॅन्डीच्या टेस्टबद्दल पोस्ट केल्या, मेमे केले, व्हिडीओ बनवले, त्यामुळे आता प्रमोशनसाठी आणखी काही वेगळं करण्याची गरज उरली नव्हती. यानंतर ग्राहकांच्या संख्येत आणखीन कित्येक पटींनी भर पडत गेली.
२०१५ साली पल्स कॅन्डी मार्केटमध्ये आली आणि २०१६ साली हिचे उत्पादन १३०० टन प्रति महिना इतके वाढले. त्यानंतरही आजपर्यंत ते सातत्याने वाढतच आहे. पल्सचे हे यश पाहून इतर अनेक कंपन्यांनीही हा कच्चा मँगो फ्लेवर बाजारात आणण्याचा प्रयत्न केला पण पल्सचा दर्जा इतर कुणालाही गाठता आला नाही.
कच्चा मँगो कॅन्डीने तर आता बाजारात व्यवस्थित जम बसवला होता, आता कंपनीला काही नवे फ्लेवर्स बाजारात आणण्याची इच्छा होती. आता कंपनीने पेरू फ्लेवरची कॅन्डी बाजारात आणली. पेरूसुद्धा तिखट-मिठासोबतच खाल्ला जातो, म्हणून या फ्लेवरमध्येही मँगो कॅन्डीसारखाच चटपटीत मसाला टाकण्यात आला. पण या फ्लेवरला मँगो कॅन्डीसारखा प्रतिसाद मिळाला नाही. लोकांना मँगो कॅन्डीने जितकी भुरळ घातली होती तितकी भुरळ या पेरू फ्लेवरने घातली नाही हे मान्य करावे लागेल.
भारतात सध्या तीन कॅन्डी कंपन्या टॉपवर आहेत. पेर्फेट्टी, पार्ले आणि आयटीसी कॅन्डीज. पल्सलाही या पहिल्या तीनच्या यादीत स्थान मिळवायचे आहे. यासाठी कंपनी आणखी काही वेगवेगळे प्रयोग करत आहे. कच्चा मँगोनंतर पल्सने, पेरू, अननस आणि स्ट्रॉबेरी हे तीन फ्लेवर बाजारात आणले आहेत.
पल्सचे हे नवे फ्लेवर बाजारात नक्की काय जादू करतात हे येणाऱ्या काळात दिसेलच!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.