आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाने जगाला चांगला धडा दिला आहे. म्हणूनच तर आज युद्धाची बतावणी करण्यापूर्वीही हजारदा विचार केला जातो. कुणालाच युद्ध नको आहे, कारण या दोन्ही युद्धात बहुतांश राष्ट्रांना झळ बसलेली आहे. या युद्धात संपूर्ण जगाच्या लोकसंख्येच्या तीन टक्के लोक मृत्युमुखी पडले. जिंकलेल्या आणि पराजित झालेल्या दोन्हीकडील देशाची अपरिमित हानी झाली होती.
दुसऱ्या महायुद्धात तर हरेक प्रकारे एकमेकांवर मात करण्याचा प्रयत्न झाला. जमिनी हल्ले, हवाई हल्ले, इतकेच काय समुद्री युद्धही लढले गेले. ज्याला विन्सटन चर्चिल यांनी अटलांटिकचे युद्ध असे नाव दिले. अटलांटिक महासागरात १९३९ पासून १९४५ पर्यंत हे युद्ध लढले गेले.
दुसऱ्या महायुद्धात भाग घेणाऱ्या बहुतांश राष्ट्रांची वाहतूक, युद्ध साहित्य पोहोचवणे, सैनिकांसाठी रसद पोहोचवणे ही अशी कामे अटलांटिक समुद्रातूनच होत असे. एखाद्या देशाचा जलमार्ग जर बंद केला तर त्या देशाच्या युद्धनितीवर त्याचा मोठा परिणाम होत असे.
मित्र राष्ट्रांनी अक्ष राष्ट्रांचा हा जलमार्ग बंद करून त्यांच्या युद्धनीतीवर परिणाम घडवून आणण्याची योजना आखली पण त्यांनाही याचे उलटे परिणाम भोगावे लागले. एकमेकांच्या जहाजांना अडवण्याची स्पर्धा सुरू झाली आणि अटलांटिक महासागराचे रुपांतर युद्धभूमीत झाले.
जर्मनीने १९४० मध्ये फ्रान्सवर विजय मिळवला. फ्रान्सच्या पराभवानंतर कार्ल डोनिटज याला आपल्या युद्धनौकांच्या संचालनासाठी नव्या जागेची गरज भासू लगली आणि त्याने बिस्केच्या खाडीत तशी कुठली नवी जागा मिळते का याचा शोध सुरू केला. जर्मनीच्या यू बोटींनी ब्रिटिशांच्या जहाजांवर हल्ले सुरु केले. कार्ल डोनिटज याने यू बोटींचा एक गट तयार केला जो फक्त रात्रीचेच हल्ले करत असे. जिकडून धोका आहे असे वाटेल त्या दिशेला या बोटीतून हल्ले सुरू होत असत.
जर्मनच्या या ‘यू बोटींनी’ सगळ्यांच्याच नाकी नऊ आणले होते. रात्रीच्या वेळी होणाऱ्या हल्ल्यांमुळे त्यांना चांगलाच फायदा होत होता आणि अशा प्रकारे जर्मनीने मित्र राष्ट्रांची २७० जहाजे नष्ट केली.
इतके नुकसान झाल्यानंतर ब्रिटिशांना कळून चुकले की, यू बोटींचा निकाल लावल्याशिवाय या युद्धाला पूर्णविराम मिळणार नाही. या बोटी नष्ट करणे काही सोपी गोष्ट नव्हती. तरीही ब्रिटीशांनी प्रयत्न सुरू ठेवले. यासाठी त्यांनी आधी आपली रणनीती बदलली. त्यांनी छोट्या छोट्या युद्धनौका समुद्रात सोडल्या आणि या युद्धनौकांच्या सहाय्याने जर्मनच्या यू बोटींची वासलात लावली गेली. यात अमेरिकेनेही ब्रिटनची मदत केली. खरे तर यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष रूझवेल्ट यांना जनतेच्या रोषालाही सामोरे जावे लागले. परिणामत: जर्मनीने अमेरिकेच्या ‘रुबेन जेम्स’सारख्या युद्ध नौका नष्ट केल्या. त्यांनाही याची झळ बसली.
अटलांटिक महासागरामधल्या चिंचोळ्या पट्ट्यातून प्रवास करणे तसे धोक्याचे होते. अशा ठिकाणाहून पुढे जाण्यासाठी विमानांचा वापर करण्यात आला. जिथे जलमार्गे प्रवास शक्य नसेल तिथे विमानाने प्रवास करून निश्चित ठिकाणी जहाजे आणि हत्यारे पोहोचवण्यात येऊ लागली. मोठमोठ्या जहाजांसमोर यू बोटींचे काही एक चालेनासे झाले तेव्हा जर्मनीला झळ पोहोचू लागली. यु बोटी नष्ट करण्यात मित्र राष्ट्रांना अखेर यश मिळाले. या बोटींसोबतच जर्मनीचा विनाशही निश्चित झाला. ब्रिटनला सैनिक आणि संसाधनांचा वेळेवर पुरवठा होऊ लागला त्यामुळे प्रत्यक्ष मैदानातही जर्मनीची पीछेहाट सुरू झाली.
जर्मनीने या युद्धात पांढरे निशाण फडकवताच हे अटलांटिक युद्धही संपुष्टात आले. मित्र राष्ट्रांनी विजय मिळवला असला तरी, त्यांच्या ३५०० व्यापारी जहाजांचे आणि १७५ युद्धनौकांचे प्रचंड नुकसान झाले होते.
जीवितहानीचा आकडा तर त्याहून मोठा आहे. सुमारे ७२,००० नौसैनिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. जर्मनीलाही काही कमी किंमत चुकवावी लागली होती असे नाही. जर्मनीचे ७३८ यू बोटी नष्ट झाल्या होत्या आणि ३००० नौसैनिकांना प्राणाची आहुती द्यावी लागली होती.
अटलांटिक युद्धात विजय मिळवून मित्र राष्ट्रांनी आक्रमक आणि युद्धखोर राष्ट्रांना एक चांगला धडा शिकवला होता. पण त्यांनासुद्धा यात अतोनात नुकसान सोसावे लागले होते. कित्येकांनी या लढाईत आपल्या प्रिय व्यक्ती कायमच्या गमावल्या होत्या. कित्येक देशांतील तरुणांच्या मनात युद्धाच्या सावल्या पुढे कित्येक दिवस थैमान घालत होत्या. मोठमोठ्या देशांनाही या युद्धानंतर सावरणे खूप कठीण गेले.
युद्धात कोण जिंकले कोण हरले हे महत्त्वाचे असले तरी अंतिम सत्य हेच असते की, कुणीही हरले अथवा जिंकले तरी दोन्हीकडे सारख्याच प्रमाणात हानी झालेली असते. विजय मिळाला तरी त्याचा जल्लोष करण्यासारखी परिस्थिती नक्कीच नसते.
दोन्ही महायुद्धांनी संपूर्ण जगाला हाच धडा दिला आहे. भविष्यात या प्रकारचे महायुद्ध घडू नये आणि प्रत्येक राष्ट्रांनी आपापल्या समस्या चर्चेने सोडवण्यात याव्या यासाठी संयुक्त राष्ट्र संघाची स्थापनाही करण्यात आली तरी अजूनही या राष्ट्रांना शांततेचे महत्त्व पटले आहे असे वाटत नाही. शस्त्रास्त्रांनी सज्ज होण्याची स्पर्धा वाढत आहे. अजूनही काही राष्ट्रांना आपल्या सीमांचा विस्तार करायचा आहे, महासत्ता म्हणून जागतिक पटलावर नाव कमवायचे आहे, दरारा राखायचा आहे. यासाठी छुप्या पद्धतीने काही मार्ग नक्कीच अवलंबले जात आहेत.
आजच्या काळात जर या सत्तापिपासू लोकांनी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या या आठवणी आणि त्याचे भयावह परिमाण अभ्यासले तर नक्कीच त्याच्या लालसेला लगाम बसेल. युद्धातून काय मिळते? असा प्रश्न कुणी विचारलाच तर फक्त भयावह परिणाम एवढेच त्याचे उत्तर देता येईल!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.