आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
लेखिका- प्रा. लक्ष्मी रेड्डी
(संशोधक विद्यार्थी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)
हैद्राबाद मुक्तिलढा ऐतिहासिक असून नव्या पिढीसाठी प्रेरक आहे. या लढ्याचे रणशिंग खऱ्या अर्थाने आर्य समाजाने फुंकले. परंतु दुर्दैवाने या लढ्यात आर्य समाजाने दिलेल्या महानतम योगदानाची इतिहासात म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही. परिणामी अनेक आर्य क्रांतिकारकांचे कार्यकर्तृत्व त्यामुळे झाकोळले गेले. हैद्राबाद मुक्तीलढ्यातील असेच एक नक्षत्राप्रमाणे तळपणारे रणझुंजार व्यक्तिमत्व म्हणजे पंडित नरेंद्रजी. आज त्यांच्या ४५ व्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकणारा हा विशेष लेख
१० एप्रिल १९०७ साली रामनवमीच्या दिवशी एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या पंडित नरेंद्रजीना आई गुणवतीदेवी आणि पिता रॉय केशव प्रसाद सक्सेना यांच्याकडून जन्मतःच समृद्ध संस्कृतिक वारसा लाभलेला. हिंदी, उर्दू व फारसी भाषेवर त्यांचे असामान्य प्रभुत्व होते. त्यांच्या पूर्वजांना निजाम सरकारकडून वतनदारी मिळालेली. परंतु नरेंद्रजीनी हैद्राबाद मुक्तीलढ्यात उडी घेतल्याने त्यांना या वतनदारीला कायमचे मुकावे लागले.
तारुण्यावस्थेतच त्यांना सामाजिक आणि आध्यात्मिक भान आले होते. जीवनाचा ध्येय मार्ग त्यांनी निश्चित केला होता. चार-चौघांसारखा सामान्य माणसाचा संसार न करता सर्वस्व अर्पण करून देशसेवा व समाजसेवा करावी या उदात्त विचाराने पंडितजी झपाटले होते.
स्वामी दयानंद सरस्वती, समर्थ रामदास यांच्याप्रमाणे गृहत्याग करून त्यांनी आत्मशोध घेतला. समाजातील अंधश्रद्धा व मूर्तीपूजेला प्रखर विरोध दर्शवला. पंडित रामचंद्रजी देहलवी, पंडित बुद्धदेवजी विद्यालंकार यांच्या विचारांनी प्रेरित होऊन पं. नरेंद्रजी आर्यसमाजी बनले. स्वामी दयानंद सरस्वती लिखित ”सत्यार्थप्रकाश ‘ हा ग्रंथ वाचल्यानंतर त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलली.
लाहोर येथील ‘दयानंद उपदेशक विद्यालयात’ त्यांनी शिक्षण घेतले. स्वामी स्वतंत्रतानंदजी सारख्या अनेक ख्यातनाम आचार्यांनी त्यांना शिकवले. विद्यार्थिदशेत असताना त्यांनी काश्मीर येथील दंगल पीडित हिंदूंची सेवा करण्याचे आणि राजोरी कॅम्पचे नेता म्हणून काम पाहिले. वडील प्लेगच्या आजाराने त्रस्त असल्याचे समजतात ते हैद्राबादला परतले.
भाई श्यामलाल, भाई बन्सीलाल, चंदुलालजी, न्या. केशवराव कोरटकर व विनायकरावजी विद्यालंकार यासारख्या दिग्गज आर्य नेत्यांचा त्यांना सहवास लाभला. त्यानंतर त्यांनी आर्य समाजाच्या कार्याला स्वतःला जुंपून घेतले. आपल्या ओजस्वी वक्तृत्वाने वैदिक धर्माचा प्रचार सुरू केला. आर्य समाजामार्फत चालवल्या जाणाऱ्या “वैदिक आदर्श” या साप्ताहिकाच्या प्रकाशन व संपादनाची जबाबदारी चोख बजावली. आपल्या धारदार लेखणीतून त्यांनी निजामाविरुद्ध अक्षरशः जंग छेडली.
“हैद्राबाद म्हणजे ८२ हजार चौरस मैलांचा मोठा जेलखाना असून सरकार विरुद्ध पाऊल उचलणे आम्हाला भाग पडेल” या त्यांच्या वक्तव्याला राजद्रोह समजून त्यांना सहा महिन्यांची मनानुर जेल येथे काळ्यापाण्याची सजा सुनावण्यात आली. त्यांच्या लिखाण व भाषणावर निजाम सरकारने बंदी घातली.
लवकरच आर्य समाजाने निजामाच्या जुलमाविरुध्द देशव्यापी सत्याग्रह सुरू केला. देशभरातून सुमारे पंधरा हजार आर्य क्रांतिकारक हैद्राबाद येथे आले. या सत्याग्रह चळवळीत २१ आर्यवीर शहीद झाले. अखेर निजामाने माघार घेतली. पंडित नरेंद्रजींची कैदेतून सुटका करणे निजामास भाग पडले.
पुढे १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. परंतु निजामाने हैद्राबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन न करता स्वतंत्र राहणे पसंत केले. त्याविरुद्ध स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली स्टेट काँग्रेसने सत्याग्रह सुरू केला. त्यामध्ये पंडित नरेंद्र सक्रियरित्या सामील झाले. सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीस कारवाई करून निजामाची राजवट संपवली. १७ सप्टेंबर १९४८ ला हैदराबाद स्वतंत्र झाले.
हैद्राबाद मुक्ती लढा, पंजाबचे हिंदी रक्षा आंदोलन, गोरक्षा आंदोलन, शुद्धी आंदोलन व इतर आंदोलनात पंडित नरेंद्रजींनी हिरीरीने भाग घेतला. ‘मजलीस-ए-इत्तेहादलू- मुसलमीन’ या कडव्या संघटनेने १० हजार हरिजनांचे जबरदस्तीने धर्मांतरण केले. त्या सर्वांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्याची ऐतिहासिक कामगिरी पंडित नरेंद्रजींनी केली.
त्यांना ठार मारण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण हा आर्य क्रांतिकारक मृत्युंजयी ठरला. हैद्राबादच्या मध्य दक्षिण आर्य प्रतिनिधी सभेचे ते दीर्घकाळ सर्वेसर्वा होते. हैद्राबादच्या विधानसभेत काँग्रेसचे आमदार ही होते. राजकारणाने अनिष्ट वळण घेतात त्यांनी राजकारण कायमचे सोडले. विधायक कार्याला स्वतःला वाहून घेतले. सुलतान बाजार येथील आर्य समाज हेच त्यांचे निवासस्थान राहिले. १९७६ साली त्यांनी संन्यास धर्माची दीक्षा घेऊन ‘स्वामी सोमानंद’ हे नाव धारण केले. त्याच वर्षी २४ सप्टेंबर १९७६ रोजी त्यांचे देहावसान झाले.
हैद्राबाद मुक्ती लढ्याचे धडाडीचे सेनापती, प्रखर समाजसुधारक, भारताचे मॅझिनी, दक्षिण केसरी आणि आर्य युवक हृदयसम्राट म्हणून ओळखले जाणारे पंडित नरेंद्रजी आपल्या तेजस्वी कामगिरीमुळे आर्य जगतातील एक अविस्मरणीय व्यक्तिमत्व ठरतात. पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !!!
या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.