आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
मऊ, मुलायम दाट केस हे तर सौंदर्याचं प्रतिक आहे. स्त्री असो की पुरुष डोक्यावर दाट, उडती रेशमी जुल्फे असल्याशिवाय मजा नाही. केसांची निगा राखणं ही अत्यावश्यक बाब असते. केसांसाठी नाना प्रकारचे तेल, शॅम्पू, स्पा ट्रीटमेंट घेतली तरी, केसांच्या आरोग्यासाठी महत्वाची बाब असते ती केसांची स्वच्छता.
आजच्या घडीला बाजारात शॅम्पूचे शेकडो ब्रँड्स मिळतात. पण, तुम्ही लहानपणीचे दिवस आठवले तर तुमच्या लक्षात येईल की आपली आई किंवा आजी कुठलाही शॅम्पू न वापरता शिकाकाई आणि रिठा एकत्र उकळून गाळून उरलेले पाणी केस धुण्यासाठी वापरत असे. तोच आपला शॅम्पू!
तसं बघायला गेलं तर शॅम्पू ही भारतानेच जगाला दिलेली एक अनोखी भेट आहे. शॅम्पू हा शब्दच मुळी हिंदी भाषेतील चम्पो या शब्दातून निर्माण झालेला आहे. चंपी हा शब्द डोक्याचा किंवा शरीराचा मसाज या अर्थाने वापरला जातो.
आज भारतात देखील सॅचेटमधील तयार शॅम्पू वापरला जात असला तरी, एकेकाळी इथे काही ठराविक वनस्पतीची पाने, बिया, फळे आणि फुले यांचे एकत्र मिश्रण करून ते केसांना लावून केस धुतले जात असत.
केस धुण्यासाठी अशा प्रसाधनांचा वापर करण्याची ही पद्धत भारतातच तयार झाली हे तुम्हाला माहित आहे का? मग भारतातील ही खास पद्धत जगभर कशी पोहोचली कशी? जाणून घेऊया या रोचक प्रवासाची माहिती या लेखातून.
शॅम्पूचा वापर कधीपासून सुरु झाला याचा शोध घेतल्यास आपल्याला इस १५०० पर्यंत मागे जावे लागेल. त्याकाळी रिठा, आवळा, शिकाकाई आणि जास्वंदी यांचे मिश्रण उकळून ते पाणी केस धुण्यासाठी वापरले जाई. केसांवरील धूळ, घामामुळे येणारा चिकटपणा, कोंडा स्वच्छ करण्यासाठी हा झाडांची पानेफुले वापरून तयार केलेला हा शॅम्पू जास्त प्रभावी ठरे. शिवाय, फुलांचा सुगंध केसात दरवळत राही.
मग, भारतातील हा शॅम्पू पश्चिमी देशात कसा आणि कधी पोचला?
भारतातील हा शॅम्पू पश्चिमी देशात पोचवला तो पटना येथील व्यवसायाने केशकर्तनकार असलेल्या इसमामुळे.
१७५९ साली पटना येथे जन्मलेल्या सेक डीन मोहमद यांनी भारतातील या पारंपारिक पद्धतीने शॅम्पू बनवण्याच्या पद्धतीत काही तांत्रिक बाबी शिकून घेतल्या आणि त्यात आपल्या अभ्यासाने आणखीन भर घातली. सोबतच त्याने लोकांना मसाज देण्याची कलाही अवगत केली.
१९ व्या शतकाच्या सुरुवातीला हा आपल्या बायकोपोरांसह इंग्लंडला रवाना झाला. इंग्लंडमध्ये गेल्यानंतर त्याने ब्रायटन येथे आपला स्पा उघडला. याला त्याने मोहमद्स बाथ असे नाव दिले होते. इथे तो आपल्या गिऱ्हाईकांना हेड मसाज देत असे. हेड मसाज करण्यात तो फारच पारंगत होता. अल्पावधीतच त्याची कीर्ती किंग जॉर्ज चौथा याच्यापर्यंत पोहोचली.
किंग जॉर्ज चौथा आणि किंग विल्यम पाचवा यांनी त्याला आपला खाजगी शॅम्पू सर्जन म्हणून नेमले.
मोहमदचा हा स्पा अगदी अलिशान होता. स्त्री आणि पुरुषांसाठी इथे वेगवेगळ्या खोल्या होत्या. पुरुषांसाठी बैठकीची खोली आणि स्त्रियांसाठी खाजगी पार्लर. मोहमदच्या या स्पामध्ये नेहमी गर्दी असे. त्यामुळे गिऱ्हाईकांना आपला नंबर येईपर्यंत कंटाळा येऊ नये आणि त्यांचा विरंगुळा व्हावा यासाठी काही सोयी केल्या होत्या.
त्यांच्यासाठी सुबक वाचनकक्ष उभारण्यात आले होते. जिथे त्यांच्यासाठी वर्तमानपत्र, मासिके असे साहित्य वाचनासाठी ठेवले जात असे. या स्पाच्या भिंतींवर पारंपारिक भारतीय शैलीतील चित्रे रेखाटण्यात आली होती.
या स्पामध्ये एक सन रूम देखील होती. ज्या ग्राहकांना सन बाथचा आनंद घ्यायचा असेल त्यांच्यासाठी ही सोय केली होती.
मोहमदची लोकप्रियता इतकी वाढत होती की डॉक्टर देखील आपल्या रुग्णांना त्याच्या स्पामध्ये जाण्याची शिफारस करत. शॅम्पू आणि भारतीय औषधींसह स्टीमबाथ घेण्याचे फायदे काय असतात यावर त्याने एक पुस्तक देखील प्रकाशित केले होते.
२०व्या शतकात शॅम्पूचा अर्थ बदलला. पूर्वी शॅम्पू म्हणजे मसाज आणि त्यानंतर औषधी लावून केस धुणे असा अर्थ घेतला जात असे. पुढे यातून मसाज हद्दपार झाला आणि केसांना स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारे प्रसाधन एवढाच अर्थ उरला. पारंपारिक झाडफुलांच्या मिश्रणाऐवजी यात रासायनिक घटक वापरले जाऊ लागले.
आज मोठ्या बॉटलपासून छोट्या सॅचेटपर्यंत पाहिजे त्या आकारात हा शॅम्पू मिळतो. पण या रसायनयुक्त शॅम्पूचे काही दुष्परिणामही पाहायला मिळतात. आजही काही घरातून पारंपारिक शिकेकाई आणि रिठा या औषधी पदार्थांचाच वापर केस धुण्यासाठी केला जातो.
शिकेकाई आणि रिठा भिजत घाला. मग त्या उकळा. मग गाळून त्याचे पाणी वापरा असे अनेक सोपस्कार जरी करावे लागत असले तरी, या पारंपारिक शॅम्पूचा कोणताही साईडइफेक्ट होत नाही.
भारतात अशा सॅचेमध्ये येणारा शॅम्पू पहिल्यांदा बनवला चिक शॅम्पू या कंपनीने. हळूहळू हे उत्पादन प्रचंड लोकप्रिय झाले.
सेक दीन मोहमद यांच्या संशोधनापासून ते आजच्या शेकडो प्रकारच्या शॅम्पूपर्यंत केलेला प्रवास बराच मोठा आहे. आज केसांचा पोत आणि प्रकार ठरवून शॅम्पू वापरले जातात. शॅम्पूमुळे केस कोरडे होतात म्हणून त्यानंतर कंडीशनर वापरला जातो.
आज उपलब्ध असणारे शॅम्पू हे रासायनिक घटकांपासून बनवले जातात. अभ्यासकांच्या मते यात जो सोडियम लॉरेल सल्फेट वापरला जातो त्यामुळे केस शुष्क, कोरडे होतात आणि गळण्याचे प्रमाण वाढते. या घटकामुळे केसांच्या वरच्या आवरणाला इजा होते. ज्यामुळे केसांचे आरोग्य सुधारण्याऐवजी ते अजून खराब होतात. यामुळे डोळ्यांना देखील इजा होऊ शकते.
मात्र रासायनिक घटकांच्या दुष्परिणामामुळे आता पुन्हा नैसर्गिक घटक वापरून तयार केलेले शॅम्पू वापरण्याकडे लोकांचा कल वाढतो आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.