आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
जगभरात सध्या कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. भारतात देखील कोरोनाचा प्रसार झाला असून १३०० हुन अधिक कोरोना बाधित देशभरात आढळून आले आहेत. भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला असून ह्या प्रसंगी देशभरातील व्यवहार ठप्प आहेत. कोरोनाशी लढा देण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केले जात असतांना काही ठिकाणाहून ह्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून देशभरात कोरोनाच्या सावटाखाली धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मज्जाव केलेला असताना दिल्लीतील निजामुद्दीन भागात झालेल्या जमात-ए-इस्लामीच्या तब्लिजच्या धार्मिक कार्यक्रमामुळे देशभरात कोरोना व्हायसरचा फैलाव झाला असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
महत्वपूर्ण बाब म्हणजे ह्या कार्यक्रमाला जगभरातून मुस्लिम मौलवी आले होते ह्या तथ्यापासून दिल्ली सरकार आणि भारत सरकार देखील अनभिज्ञ असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
काल तेलंगाणामध्ये कोरोना व्हायरसने ६ रुग्ण दगावले. ह्यावर स्पष्टीकरण देताना तेलंगणाच्या अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आले की ह्या रुग्णांनी दिल्लीच्या निजामुद्दीन भागातील मकराह मशिदीच्या परिसरातील एका धार्मिक सोहळ्याला हजेरी लावली होती. ह्या धार्मिक सोहळ्यात देश विदेशातुन तब्बल २००० धर्मगुरू आले होते. यात कोरोनाने ग्रासित देशांचा देखील समावेश होता. भारतातून मोठ्या संख्येने लोक ह्या कार्यक्रमासाठी गेले होते.
काल जशी या बाबतीत सूचना दिल्ली प्रशासनाला प्राप्त झाली तसे त्यांचे धाबे दणाणले. रात्री निजामुद्दीनचा परिसर पूर्णतः सील करण्यात आला असून रात्रभर ह्या भागातील नागरिकांना दिल्लीतील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये आणि आयसोलेशन सेंटर्स मध्ये रवाना करण्यात आले आहे.
निजामुद्दीन परिसरातील तब्बल २०० लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती असून २४ रुग्णांच्या चाचण्या ह्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
तमिळनाडू राज्याकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या राज्यातील तब्बल १५०० लोक ह्या कार्यक्रमासाठी दिल्लीच्या निझामुद्दीन भागात गेले असल्याचे म्हटले जात आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू काश्मीर पासून अनेक राज्यात हाय अलर्ट घोषित करण्यात आला असून ह्या राज्यातून मोठ्या संख्येने लोक ह्या धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते.
आता ह्या राज्यांतील सरकारने ह्या कार्यक्रमासाठी गेलेल्या लोकांचा शोध घेण्यास सुरुवात केली असून ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा फैलाव देशभरात होऊन ज्या तिसऱ्या श्रेणीत जाण्याचा धोका टाळण्यासाठी प्रयत्न केले जात होते, त्या सर्व प्रयत्नावर पाणी फिरणार असे स्पष्ट होत आहे.
१३ ते १६ मार्च दरम्यान ह्या भागात झालेल्या धार्मिक कार्यक्रमासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने धर्मगुरू आले होते. इतकंच नाही तर देश विदेशातून २५० च्या आसपास धर्मगुरू आले होते. यात इंडोनेशिया, मलेशिया, चीनला लागून असलेल्या मुस्लिम देशातील लोकांची संख्या देखील मोठी होती. पाकिस्तानमधून देखील ह्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने लोक आले होते. ह्या कार्यक्रमाला तब्बल ३००० लोकांची उपस्थिती असल्याचे म्हटले जात असून १६ तारखेला हा कार्यक्रम संपन्न झाल्यावर २००० च्या आसपास लोक देशाच्या वेगवेगळ्या भागात निघून गेले होते.
यात तमिळनाडू आणि उत्तर प्रदेशातील बहुतांश लोकांचा समावेश होता. ह्या कार्यक्रमानंतर देखील तब्बल १००० च्या आसपास लोक ह्या मशिदीत अडकून पडले होते. काल जसे हे प्रकरण समोर आले तसे ह्या लोकांची रवानगी दिल्लीच्या वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आहे. दिल्ली सरकारने ह्या मशिदीच्या प्रमुख इमामाच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
पण मशिदीच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की आम्ही याची सूचना प्रशासकीय अधिकाऱ्याना दिली होती व आमच्याकडे देशभरात लॉकडाऊन होण्या आधी मोठ्या संख्येने लोक अडकल्याचे देखील त्यांना कळवले होते.
त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवल्याचे पत्र देखील पुरावा म्हणून सादर केले असून त्यावर पोलिसांचा शिक्का देखील दिसून येतो आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणेने ह्याकडे डोळे झाक केल्याचे स्पष्ट होत आहे.
देशभरात तब्बल १० कोरोना रुग्ण जे दगावले आहेत ते ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते, असं स्पष्ट झालं असून जम्मू काश्मीरमधील रुग्ण देखील ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते, याची पुष्टी झाली आहे. महाराष्ट्रातील सांगलीतील लोक या कार्यक्रमाला गेले असल्याचे सांगितले जात आहे. सोबतच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अनेक परदेशी नागरिक मायदेशी परतले नसून देशभरात पसरले असल्याचे बोलले जात आहे.
तमिळनाडू आणि झारखंड राज्याच्या वेगवेगळ्या भागातील मशिदीतूंन पोलिसांनी अशा अनेक परदेशी इमामांना बाहेर काढले आहे व त्यांना विलगीकरण कक्षात रवाना केले आहे. यामुळे हा कार्यक्रम भारतातील कोरोना व्हायरसच्या प्रसाराचे केंद्र बनण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे अशा धार्मिक कार्यक्रमांना आणि मोठ्या एकत्रीकरणाला विरोध असताना इतक्या मोठ्या संख्येने लोक एकत्र आले आणि प्रशासनाला याची माहिती नाही सोबतच गुप्तचर यंत्रणेला देखील याची खबर नसणे हे धोक्याचे लक्षण मानले जात आहे. त्यातल्या त्यात दिल्ली सारख्या धार्मिक हिंसाचाराने ग्रस्त असलेल्या भागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन झालेच कसे काय असा प्रश्न समोर आला आहे.
आज ह्या कार्यक्रमाला आलेले सर्व परदेशी नागरिक हे पर्यटन व्हिसावर आले असून कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची त्यांच्याकडे परवानगी नव्हती मग ते त्या कार्यक्रमाला गेले कसे ? परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय, तसेच दिल्ली प्रशासन यांच्या अनभिज्ञतेमुळे देशभरातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दक्षिण दिल्लीतील एका मोठ्या लोकसंख्येत हा व्हायरस पसरून धोका निर्माण होऊ शकतो. २० हजार कुटुंबांना विलगीकरणं कक्षात रवाना करण्यात येणार असल्याची माहिती नुकतीच समोर आली असून ह्या एका धार्मिक कार्यक्रमामुळे आणि प्रशासकीय नियोजनाच्या ढिसाळपणामुळे देशाचे आरोग्य धोक्यात आले आहे.
भारत जर ह्या व्हायरसचा प्रादुर्भावाच्या तिसऱ्या टप्प्यात गेला तर भारतातील १३० कोटी लोकसंख्येला धोका निर्माण होणार आहे व भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठं नुकसान ह्यामुळे सहन करावं लागण्याचा धोका आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.