आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
जिद्द आणि कष्टाची तयारी हे गुण असले तर माणूस अनंत अडचणींवर मात करून ध्येयाकडे झेप घ्यायला सज्ज होतो. अशा अडचणींचा सामना करताना त्याला एकटं पडू न देता सहकार्याचा हात योग्य वेळी पुढे केला तर बुडत्याला काडीचा आधारही पुरतो. त्यांचा उत्साह दुणावतो आणि ते आकाशाला गवसणी घालण्यासाठी सज्ज होतात.
उत्तरप्रदेशातल्या मेरठ इथला नीरज चौहान हा केवळ १९ वर्षांचा तीरंदाज याचे उत्तम उदाहरण आहे. विश्वचषक स्पर्धांसाठी भारताच्या तिरंदाजी संघात त्याची निवड झाली आहे. त्याचं जून ते सप्टेंबर या सहा महिन्याचं वेळापत्रक फारच व्यस्त असणार आहे.
तिरंदाजी विश्वचषकाच्या तीन फेऱ्यांसाठी तो एप्रिल ते जून या कालावधीमध्ये तुर्कस्तान, चीन आणि फ्रान्स या देशांच्या दौऱ्यावर भारतीय संघासोबत असणार आहे. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी तो रवाना होणार आहे. अर्थात या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यानेच नव्हे त्याच्या कुटुंबीयांनीही अतोनात कष्ट घेतले.
नीरजचे वडील अक्षय चौहान हे मेरठच्या कैलासलाल प्रकाश स्पोर्ट्स स्टेडियममध्ये तब्बल २५ वर्ष आचारी म्हणून काम करत होते. मात्र, ही नोकरी हंगामी स्वरूपाची होती. कोरोना महामारीच्या स्टेडियम बंद असल्याने तिथल्या वसतिगृहात रहायलाच कोणी उरलं नाही. अर्थातच चौहान यांची नोकरी गेली. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्यांनी हातगाडीवर भाजी विकण्याचा व्यवसाय सुरू केला.
नीरज आणि त्याचा भाऊ सुनील हेदेखील त्यांच्या बरोबर भाजी विकायला जायचे. सुनील हा देखील राष्ट्रीय पातळीवरचा मुष्टियोद्धा आहे. त्यांचे भाजी विकतानाचे व्हिडीओज समाजमाध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. याबाबत माहिती मिळाल्यावर केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी स्वतः त्यात लक्ष घातलं.
त्यांच्या सूचनेनुसार चौहान कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या काळात क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची मोफत राहण्याची, जेवणाची आणि प्रशिक्षणाचीही व्यवस्था केली. पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय खेळाडू कल्याण निधी दोन्ही भावांना केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली. त्यातून नीरजने आधुनिक क्रीडा साहित्य खरेदी केलं.
आहार आणि खुराकाकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली आणि स्टेडियममध्येच तिरंदाजीचा सराव सुरू केला. त्याने २२ मार्च रोजी जम्मू इथे झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय तिरंदाजीमध्ये सांघिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
नीरज आणि सुनील दोघेही वडिलांच्या नोकरीमुळे स्टेडियमच्या आवारात आणि खेळाच्या वातावरणातच वाढले. नीरजला लहानपणापासून हातात येईल ती वस्तू नेम धरून समोरच्या वस्तूवर फेकण्याचा छंद होता. स्टेडियमवर सुरू असलेला सराव एकटक नजरेने बघता बघता त्याला तिरंदाजीत रस निर्माण झाला.
हा खेळ महागडा असल्याने सुरुवातीला त्याला वडिलांकडून विरोध झाला. मात्र, त्याची या खेळातली आत्मीयता आणि प्रगती बघून त्याला प्रोत्साहन दिलं. त्यांनी त्याला आपल्या परीने शक्य होईल तेवढी भारतीय बनावटीची साधनसामुग्री आणून दिली. कपडे आणि जोडे सुद्धा यथातथाच होते. तरीही राष्ट्रीय पातळीवर पदकांची लयलूट करून नीरजने आपल्या कामगिरीने सर्वांना तोंडात बोटं घालायला लावली.
२७ मार्च रोजी भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) च्या सोनीपत केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या आशियाई आणि विश्वचषकाच्या निवड चाचण्यांमध्ये त्याने देशात दुसरा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत आपण पाहिलेली नीरजची कामगिरी ही आजपर्यंत बघण्यात आलेल्या सर्वोत्तम कामगिऱ्यांपैकी एक होती, अशा शब्दात ‘आर्चरी असोसिएशन ऑफ इंडिया’चे गुणवत्ता विकास संचालक संजीव सिंग यांनी त्याचं कौतुक केलं.
नीराजचं कौशल्य बघून सन २०१३ मध्येच इंडो तिबेट बॉर्डर पोलिसांच्या केंद्रात प्रशिक्षणासाठी त्याची निवड झाली होती. आता वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यावर खेळाडू कोट्यातून त्याला याच अर्धसैनिक दलात जवान म्हणून दाखल करून घेण्यात आलं आहे. तो आता प्रथमच आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं प्रतिनिधित्व करत आहे. वेळीच मिळालेल्या सहकार्याच्या हातामुळे तो कृतज्ञ आहे.
भाजी विकता विकता हातातलं धनुष्य कायमचं खाली ठेवावं लागेल याची सतत धास्ती असायची. मात्र, क्रीडा विभागाकडून वेळेवर मदत मिळाली. आता मला कुटुंबाची, त्यांच्या उदरनिर्वाहाची काळजी करण्याचं कारण उरलेलं नाही. आता सरावावर लक्ष करून उत्तम कामगिरी करायची आणि देशासाठी पदक मिळवून आणायचं हेच माझं ध्येय आहे, असं तो सांगतो.
भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये आंतरराष्ट्रीय पदकविजेते खेळाडू का तयार होत नाहीत असा सवाल नेहेमीच केला जातो. भारतीय खेळाडूंमध्ये प्रतिभेची वानवा नाही. कौशल्याची कमतरता नाही. मात्र, हिऱ्याला पैलू पडेपर्यंत तो कोळशाच्या खाणीत सापडलेला एक स्फटिकाचा तुकडा असतो. खेळाडूंचेही तसेच आहे. त्यांना आवश्यक प्रशिक्षण, पुरेशा सुविधा आणि किमान भौतिक गरजांची पूर्तता एवढं मिळालं तर नीरजसारखे खेळाडू देशाचे नाव उज्ज्वल करतील यात शंका नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.